मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी सोहळ्याचा सांगता समारंभ, ५ ऑगस्ट रोजी शारदा मंगल कार्यालयात मा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली, प्रख्यात हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी व डॉ. भालचंद्र नेमाडे प्रमुख पाहुणे यांच्या सहयोगाने भव्य स्वरूपात संपन्न झाला.
प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रास्ताविक केले.
आपल्या भाषणात अशोक वाजपेयीजी म्हणाले की, “महाराष्ट्र,परभणी मे साहित्य संमेलन के उद्घाटन समारोह पर मै पहली बार गया और इतना बडा समुदाय उपस्थित देखकर दंग रह गया, हमारे हिन्ही मे मराठी से ज्यादा लोकसंख्या है, लिखनेवाले लोग है लेकिन इतना बडा जनसमुदाय कभी भी, कही भी साहित्य के मंडप मे दिखाई नही देता”

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने शास्त्रीय संगीताची परंपरा अजूनही जोपासली आहे. खरंतर जवळपास ही सगळीच घराणी आमच्या हिंदी भागातील पण आम्ही ती विसरत चाललो आहोत. एवढचं नव्हे तर आधुनिक रंगमंच, कला, सिनेमा, साहित्य यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी “प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपची” ची स्थापना हिन्दू, मुस्लीम आणि ख्रिश्चन अशा पाच मित्रांनी केली होती. मी काही वर्ष महात्मा गांधी विद्यापीठाचा कुलपती म्हणून काम केले आहे. मी अतिशय आत्मविश्वासाने सांगतो की गांधीच्या विचारांना मारायचे काम आजचे राजकारणी करत आहेत. ही खूपच खेदजनक बाब आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत स्री, अपंग, बालिका, दलित यांचं शोषण, हत्या, हिंसा व बलात्कार हे 70 % हिन्दी भाषीय प्रदेशात होत आहे हे खेदजनक आहे.
आपण एकूणच देशातील लोकांचा विचार केल्यास खोट्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत असून, खोटे बोलणा-यांची संख्याही कितीतरी पटीने वाढत आहे ही गोष्ट चिंताजनक असून, आपण काय खावं, कोणते कपडे घालावेत, काय बोलावं यावरसुद्धा लक्ष ठेवलं जाऊ लागलं आहे. आज राजकारणी धर्माचा प्रसार, प्रचार करीत आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यावर राजकारणाचा प्रभाव खूपच मोठा आहे. आणि मिडीया सरकारला प्रश्न न विचारता विरोधी पक्षातील लोकांना प्रश्न विचारत आहे. आजच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करतांना ते पुढे म्हणाले की,
“आज बात बहोत चिंताजनक बन गई है | सत्य पर यकिन करनेवाले और बोलनेवाले बहोत ही कम है |हमारे यहाॅ पहले संविधान सामाजिक धर्म था अब धर्म सामाजिक संविधान बन गया है |नष्ट कर देनेका उत्साह बढ रहा है |लोकतंत्र को अब प्रजा मे बदलने की कोशिश की जा रही है |इसलिए सचपर अडे रहकर अभिव्यक्त होना यही साहित्य का सबसे बडा पुरस्कार है |
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे म्हणाले की, पेशव्यांनी पराभव पत्करून आपले राज्य इंग्रजांच्या स्वाधीन केले ते एका अर्थाने चांगलेच झाले. इंग्रज वाईटच होते पण पेशवेही काही चांगले नव्हते. यात सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर आपलीच माणसे आपलेच आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण करीत होते. आज जर देशातील घडणा-या घटनांकडे दृष्टिक्षेप टाकला तर एक गोष्ट लक्षात येते की आजची परिस्थिती भयानक आहे.आजच्या पिढीने परिस्थितीत बदल घडवून आणला पाहिजे आणि त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजेत. ग्रंथालयं वाचवली, वाढवली पाहिजेत. तिथेच आपणांस खरे ज्ञान मिळते. अर्थात काही ग्रंथ खोट्याचाच प्रचार, प्रसार करतांना दिसतात. विवेकाने विचार केल्यास व वाचत गेल्यास खरं काय, खोटं काय हे कळण्यास नक्कीच मदत होईल यात वाद नाही,म्हणून वाचत चला. संपूर्ण आयुष्य खर्चून ख-या ज्ञानाचा एक कण जरी मिळाला तरी स्वतःला भाग्यवान समजा.
माननीय शरद पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, या ग्रंथसंग्रहालयात आठ लाखांहून जास्त ग्रंथ उपलब्ध आहेत, ते आम्ही आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करू. यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे संरक्षण मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण हे देशात, परदेशात कुठेही गेले तरी सतत वाचत असत आणि ग्रंथ खरेदी करीत, अशी आठवण सांगितली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी असलेले अठ्ठावीस हजार ग्रंथ व बँकेतील रू 86000/= एवढ्या
रकमेतून कराड येथे नवीन वाचनालयाची निर्मिती करण्यात आली. सयाजीराव गायकवाड हेही ग्रंथप्रेमी होते. तर तंजावर येथे अनेक दुर्मीळ ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. तेव्हा ग्रंथ वाचवा, वाचा व समृद्ध व्हा असं खास करून तरुण पिढीने लक्षात ठेवावे.

यानंतर प्रमुख कार्यवाह श्री.रवींद्र गावडे यांनी ग्रंथालयाच्या नवीन कार्यकारिणीने कार्यभार हाती घेतल्यावर केलेली अनेक हितोपयोगी कामे -जसे की बांद्रा, घाटकोपर येथील जागा ताब्यात घेऊन दिमाखात शाखा सुरू, सेवकांना पगारवाढ देऊन तीन लाखांचे मेडिक्लेम कवच व तरुण पिढीला अभ्यासिका उपलब्ध करून देऊन, सभासदसंख्या व उत्पन्नाचे स्रोत वाढवले- याचा उचित आढावा घेऊन सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मृण्मयी भजक यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख साहित्यिक, ग्रंथालयाचे सभासद, इतर ग्रंथालयाचे प्रतिनिधि, विद्यार्थी, पत्रकार मोठ्या उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
— टीम एनएसटी. ☎️9869484800