Monday, June 2, 2025
Homeलेखमुंबई : अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अन्यायकारक !

मुंबई : अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अन्यायकारक !

मुंबईतील खाजगी अनुदानित शाळांमधील शेकडो शिक्षक “अतिरिक्त” ठरवले गेले असून, त्यांचे समायोजन ठाणे, पालघर, रायगड या सारख्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या कुटुंबीयांवर, आर्थिक स्थैर्यावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ताही धोक्यात आली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी विरोधाचे रान उठवले आहे.

संच मान्यता सदोष आणि शासनाचा निष्काळजीपणा :
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येमध्ये वाढ होण्यामागील मुख्य कारण म्हणजे संच मान्यते मधील दोषपूर्ण बदल. २८ ऑगस्ट २०१५ आणि १५ सप्टेंबर २०२४ रोजी घेतलेल्या शासन निर्णयांनी शिक्षक संख्येचा निकष बदलण्यात आला. यापूर्वी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक, तसेच कला, क्रीडा, कार्यानुभव यासाठी विशेष शिक्षकांची तरतूद होती. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांचे योग्य असे प्रमाण (रेशो) ठेवले जात होते. २५ विद्यार्थ्यांना दीड शिक्षक, तीन भाषांसाठी तीन शिक्षक, गणित-विज्ञान व समाजशास्त्रासाठी स्वतंत्र शिक्षक शिवाय कला क्रीडा कार्यानुभव साठी विशेष शिक्षक असे व्यवस्थित नियोजन होते. आज मात्र याच रेशोंचा बळी देत, एका शिक्षकाला अनेक विषय शिकवण्याची जबरदस्ती केली जाते. मराठी विषयाच्या शिक्षकाला इंग्रजी / हिंदी शिकवण्यास भाग पाडले जाते, कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांना विषय शिक्षक बनवले गेले यामुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरते. शिक्षणाचा दर्जा हा शिक्षकांच्या गुणवत्तेवर आधारित असतो. शिक्षकच जर योग्य विषयाचा नसेल, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ आहे.

कोणतीही शहानिशा नाही; त्रुटींचा डोंगर :
शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये कौन्सिलिंगची पद्धत राबवलेली नाही. शिक्षकांचे विषय, आरक्षण, वयोमर्यादा, अनुदानाचा टप्पा, गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, सिंगल पेरेंट यांसारख्या संवेदनशील बाबींची कोणतीही दखल शिक्षण विभागाने घेतलेली नाही. शासन आदेश असतानाही शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुमारे ५०० शिक्षकांचे समायोजन ठाणे, पालघर व रायगड मधील दुर्गम भागात केले आहे, जेथे प्रवास करणे शारीरिक व मानसिकदृष्ट्या अशक्यप्राय आहे. विशेषतः महिला शिक्षकांचा मोठा सहभाग असल्याने हा निर्णय अधिकच अन्यायकारक ठरतो.

शासन निर्णयाचा विरोधाभास :
२०१७ चा शासन निर्णय स्पष्टपणे सांगतो, की खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जर खाजगी अनुदानित शाळेत होत नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये करावे. मात्र शासन स्वतःच या आदेशाचा भंग करत आहे. मुंबई महानगरपालिकेतील शेकडो जागा रिक्त असताना देखील, मुंबईबाहेर समायोजन होत आहे. शिक्षण व्यवस्थेतील हे विसंगत धोरण शिक्षकांवर अन्याय करणारे असून, विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात आहे.

अशैक्षणिक कामांचा बोजा आणि गुणवत्तेचा घसरता आलेख :
सध्या शाळांमध्ये ऑनलाइन नोंदी, निपुण भारत, आधार कार्ड अपडेट, परीक्षांचे मार्क्स, यु डायस डेटा, विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती भरणे, अनेक ऑनलाईन माहिती शासनाकडून वारंवार मागणे यांसारखी अनेक कामे शिक्षकांकडूनच करून घेतली जात आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षकांमुळे शिक्षण प्रक्रियेत बाधा निर्माण होते. या कामांमुळे शिक्षणाचा मूळ उद्देश भरकटत आहे. शिक्षकांची संख्या कमी करून बजेट वाचवण्याच्या नादात शासनाने शाळांमधून विषय शिक्षक कमी केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होतो आहे. गुणवत्तेचे तीनतेरा वाजले आहेत.

शिक्षकांची आर्थिक होरपळ :
मुंबईतील शिक्षकांना 30 टक्के घरभाडे भत्ता मिळतो मात्र ग्रामीण भागात मात्र तो दहा टक्केच मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या महिन्याच्या पगारात थेट १५,००० रुपयांची घट होते. शिक्षकांच्या घराच्या लोणचा हप्ता, मुलांच्या शिक्षणावरचा खर्च, आरोग्यावरचा खर्च, याचे नियोजन केलेले आहे. जर अचानक एवढा पगार कमी झाला तर कुटुंबाचे बजेट कोसळेल. पगार थांबवण्याची धमकी देऊन शिक्षकाला अन्यायकारक समायोजन स्वीकारण्यास भाग पाडले जाते. हे आर्थिक व मानसिक शोषण असून, ते तातडीने थांबवले पाहिजे.

शासनाने तात्काळ कृती करावी :
महाराष्ट्र राज्याने नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात सुरुवात केली आहे. यासाठी मोठ्या संख्येचे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. असं असताना आहे ती व्यवस्था उध्वस्त करण्याचं काम सरकारने करू नये. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या संख्येची आकडेमोड करत, दुर्गम भागात फेकून देणे म्हणजे शिक्षण क्षेत्रावर गदा आणणे होय. हे तात्काळ शासनाने थांबवायला हवे.

यासाठी खालील उपाय योजावेत :
१) अतिरिक्त शिक्षकांची राबवलेली समायोजन प्रक्रिया तात्काळ थांबवावी.
२) अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करावे.
३) २०१७ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी.
४) संच मान्यतेच्या विषयी चे निकष 28 ऑगस्ट 2015 पूर्वीप्रमाणेच ठेवावेत.
५) समायोजन प्रक्रियेत स्वेच्छेने रुजू झालेल्या शिक्षकांच्या पगारात कपात होणार नाही याची हमी शासनाने द्यावी.

जालिंदर सरोदे

— लेखन : जालिंदर सरोदे.
कार्याध्यक्ष, शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. ज्वलंत प्रश्न बातमीतून मांडला धन्यवाद मनःपूर्वक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम