Saturday, June 14, 2025
Homeबातम्या'वैशाख वादळ वारा महोत्सव' संपन्न !

‘वैशाख वादळ वारा महोत्सव’ संपन्न !

पुणे येथील नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशन येथे नुकताच एक दिवसीय ‘वैशाख वादळ वारा महोत्सव’ पार पडला.

या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. उद्घाटन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून वि. दा. पिंगळे, प्रा. हनुमंत धालगडे, मा. प्रतिमा काळे, कवयित्री महमुदा शेख, मिटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाहीर शिवाजीराव थिटे यांच्या शिवाजी महाराजांच्या मानवंदनेने झाली.

बहुतेक मराठी कवी आणि साहित्यिक आजही प्रेम, आलिंगन, चुंबन, शेती, माती, नातीगोती या विषयांत गुंतलेले दिसतात. मात्र, आजच्या साहित्याला वैश्विक संस्कृती, अर्थकारण, शोषण, युद्ध आणि जागतिक प्रश्न यांसारख्या विषयांवर भाष्य करण्याची नितांत गरज आहे. साहित्यकलेने सत्य, विवेक आणि न्याय यांचा धर्म स्वीकारावा.सांस्कृतिक लोकशाही बळकट झाल्यासच राजकीय लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. ही सांस्कृतिक एकात्मता राजकीय नेत्यांनाही शिकवावी लागेल. जाती-पातीच्या भिंती ओलांडून निधर्मी, संविधानाधिष्ठित संस्कृती निर्माण झाली पाहिजे. आजच्या काळात नव्या हिटलरसारख्या प्रवृत्तींना थांबवणे आवश्यक आहे.
विश्वात शांतता नांदावी, यासाठी साहित्यिकांनी सजगपणे पुढाकार घेतला पाहिजे, असे मार्मिक विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक चंद्रकांत जोगदंड यांनी केले. सूत्रसंचालन रानकवी वनशिव यांनी उत्कृष्ट केल.

कवी संमेलन :- यानंतर डॉ. शैलेंद्र भणगे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या ५० हून अधिक कवींनी आपापल्या बहारदार रचना सादर केल्या. गझलकारांनीही आपल्या सुरेल गझलांनी सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

बबन पोतदार यांनी मनोगतात सांगितले की, “साहित्यिकाच्या हातून साहित्यकृती कशी साकार होते याची अनुभूती या कविसंमेलनात मिळाली. कवींशी सान्निध्य लाभणे हे अत्यंत आनंददायक आहे.”

प्रकाश देशमुख व सूर्यकांत तिरंगे यांनीही आपली मते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात, विविध साहित्यिक कुटुंबातील दिवंगत सदस्यांच्या स्मृतिपित्यर्थ उत्कृष्ट पुस्तकांचे सन्मान करण्यात आले. यामध्ये ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या सहसचिव कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांच्या “संवाद हृदयाशी” या काव्यसंग्रहाला ‘ज्योत्स्ना देवेंद्र गावंडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.त्यांना यापूर्वी बालतरंग या बालकविता संग्रहासाठी राज्यस्तरीय तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या स्पंदन या बहुभाषीय त्रैमासिकाच्या उपसंपादिका असून, इख्लास या रमजान विशेषांकाच्या संपादिका म्हणूनही कार्यरत आहेत.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments