आपण शाळेत असतानाचं जगच काही वेगळं असतं. लहानपणीच आपल्याला संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून, शाळेत सगळे सण समारंभ साजरे केले जायचे. त्या दिवसाला अनुसरून भाषण पाठ करून घेतलं जायचं, विशिष्ठ पोशाख करायला सांगत. मग त्यात आषाढीला वारकरी, टिळक जयंतीला लोकमान्य, कोणी विवेकानंद तर कोणी जिजाबाई, मुक्ताबाई व्हायचं.
ज्या महिन्यात जो सण यायचा त्याचं चित्र हमखास चित्रकलेच्या बाई शिकवायच्या. तशी बरीच चित्र होती, पण त्यातलं लक्ष्यात राहिलेलं चित्र म्हणजे गुरुपौरणिमेचं चित्र. “एका मोठ्या झाडा खाली गुरू बसलेत, त्यांच्या समोर शिष्यगण आहेत व ते आपल्या शिष्यांना उपदेश देत आहेत.” असं चित्र दरवर्षी आम्ही काढायचो. वर्ग शिक्षकांसाठी फुलं, गजरा, किंवा एखादी छोटी भेट वस्तू प्रत्येकजण घेऊन येत.
खरंच बालवयात सांगितलेल्या गोष्टींचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. आपण सगळ्यांनीच लहान असताना आजीकडे कायमच गोष्ट सांग म्हणून हट्ट केला असेल, मला काल्पनिक गोष्टी पेक्षा खऱ्या गमती जमती ऐकायला जास्त आवडायचं. मग त्यात ओघाने यात्रेच्या, गंगेला पूर आल्याच्या अश्या वेगवेगळ्या गोष्टी असायच्या.
आजीमुळे मला संस्कृत श्लोक, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान हे बालवयातच मुखोद्गत झाले. इतकेच काय, बाल गटातील रामरक्षा पठण स्पर्धेचे प्रथम पारितोषिक गावकरी पेपरचे तत्कालीन संपादक दादासाहेब पोतनीस यांच्या हस्ते मिळाले.
पुढे मग शाळेत वेगवेगळे उपक्रम व्हायचे, त्यात गीतेच्या १५ व्या अध्यायाचं वाचन म्हणा किंवा ज्ञानेश्वरी पठण, निबंध स्पर्धा; मी नेहमीच सहभागी होत गेले. एकदा एका स्पर्धेचा विषय होता “ग्रंथ हेच गुरू“. विषय जरा वेगळा होता. मनात विचार आला, गुरू म्हणजे कोणी तरी व्यक्ती असायला हवी. मग वाटलं काही जरुरी नाही, कारण जसं व्यक्ती ही योग्य दिशा दाखवते, संकटावर मात करायला शिकवते, मार्गदर्शन करते तर ग्रंथ तरी दुसरं काय करतात ? माणसाने आयुष्यात काय करावे, का करावे, काय करू नये हेच तर सांगतात. आणि विशेष म्हणजे ग्रंथामध्ये लिहिलेले ज्ञान हे कोणत्याही काळात लागू पडते.
म्हणजे बघा ना, श्री कृष्णाने सांगितलेली गीता त्या काळी अर्जुनासाठी जितकी उपयुक्त होती तितकीच ती आताच्या २१ व्या शतकातही आहे. आताचे हिंदी, मराठी, सिनेमांचे दिग्दर्शक सुध्दा आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून कथा, संवाद याद्वारे गीतेतील उपदेशाचा उल्लेख करताना दिसतात.
ग्रंथ हा असा खजिना आहे, त्याचा जितका आपण उपयोग करून घेऊ तितके आपण समृद्ध होत जाऊ. गणित, विज्ञान, औषधशास्त्र, अंकशास्त्र, जन्म मृत्यू, वैद्यक शास्त्र, या विषया वरील ग्रंथ एकत्रित पहिले तर ग्रंथांचे स्वतंत्र, वेगळे विश्वच समोर उभे राहिल्या सारखे वाटते.
आपल्या भारतीय ग्रंथांनी, परदेशी संशोधकांना देखील भुरळ पाडली आहे. हटयोगी साधू आपल्याला जादूगार वाटतात. परंतु त्यामागे त्यांचा अनेक ग्रंथांचा अभ्यास असतो. ग्रंथाचं सामर्थ्य शब्दात सांगायला कदाचित माझा अभ्यास कमी पडेल, परंतु ते जाणवणारी काही उदाहरणे द्यायला नक्की आवडेल. क्रांतीकारक दामोदर हरी चापेकर हे जेव्हा फाशी गेले तेव्हा त्यांच्या हातात भगवद्गीता होती. तसेच काही वर्षांपूर्वी अंतराळात सुखरूप जावून परत आलेली सुनीता विल्यम्स आपल्या यानात भगवद्गीता घेऊन गेली होती.
यावरून एक नक्की सांगता येईल, ग्रंथाची ताकद ज्याला समजली तो त्यांना शरण गेला. काही दिवांपूर्वी सोशल मीडिया वर एक फोटो पाहिला, एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या कंपाऊंडची भिंत वेगळ्याच पद्धतीने रंगवण्यात आली होती. साधारणपणे कार्टून वगैरे असायला पाहिजे त्या ठिकाणी चक्क वेगवेगळ्या ग्रंथांचे मुखपृष्ठ रंगवण्यात आले होते. या कल्पनेचे खरचं कौतुक करावे वाटले, आपला वारसा हा आपणच पुढे न्यायला हवा, मग तो संस्कृती चा असो वा ग्रंथांचा. नाही का ?

– लेखन : श्रद्धा कराळे, वारली चित्रकार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
खूप छान लिहिल आहेस श्रद्धा. लहानपणीच्या आठवणी मनावर कोरलेल्या असतात. अशीच लिहित रहा
खूप छान लिहिलं आहे…. अभिनंदन 💐💐
श्रद्धा,
सुंदर लिहिले आहेस. बालपणीच्या आठवणी लिहिताना तुझ्या मनात काय आले असेल याची जाणीव झाली.
अशीच लिहीत जा.
अप्रतिम श्रध्दा…
खूप छान श्रद्धा कराळे