आईच्या दुधावर खरं तर बाळाचा जन्मजात हक्क आहे. आईच्या दुधाने बाळाची भविष्यातील रोग प्रतिकारशक्ती वाढते. असे असूनही गेल्या काही वर्षांपासून फिगर बिघडेल, नोकरी किंवा अन्य काही कारणांमुळे बाळाला स्वतः चे दूध पाजण्याकडे मातांचा कल कमी होऊ लागला. ही परिस्थिती बदलावी म्हणून जगभर १ ते ७ ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो. या विषयी अधिक माहिती देत आहेत, बालरोगतज्ज्ञ व बाल आरोग्य चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते
डॉ हेमंत व डॉ अर्चना जोशी…..
आम्ही मुंबई जवळील विरारला १९८५ मध्ये मुलांचा दवाखाना सुरु केला. आम्ही मातांना सांगायचो की ६ महिने केवळ आईचे दुध दिले तर मुले जास्त चांगली होतात. त्यांचे आजार व मरण घटते. पण कामावर जाणाऱ्या मातांना रजा तर ३ महिनेच होती. ती ६ महिने असणे जरुरीचे होते.
आम्ही १९८८ मध्ये एक पत्रक बनविले. त्यात सांगितले की युनीसेफ सांगते की ६ महिने बाळांनी फक्त आईचे दुध पिले पाहिजे. ६ महिने बाळांनी फक्त आईचे दुध पिले तर मुले जास्त चांगली वाढतात. जास्त हुशार होतात. मुलांचे आजार कमी होतात. बालमृत्यूचे प्रमाण १०% नी कमी होती. यासाठी कामावर जाणाऱ्या आयांना भर पगारी रजा ३ महिने आहे, ती ६ महिने करावी.
आम्ही हे पत्रक मराठी, हिंदी, इंग्रजीत केले. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या आई बाबांना दिले. त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये द्यायला सांगितले. त्यांच्या कर्मचारी संघटनेला द्यायला सांगितले. जो भेटला त्याला आम्ही हे सांगत गेलो.
एकदा तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे यांना आम्ही म्हटले की सरकारने विषमज्वर लस सर्व मुलाना द्यायला पाहिजे. ते म्हणाले कि मुलांच्या डॉक्टरांच्या संघटनेने हे सांगावे. सरकार करेल.
मुलांच्या डॉक्टरांची राष्ट्रीय संघटना आहे. तिचे नाव आहे, इंडियन अकादमी ऑफ पेडीआट्रिक्स.
तिचे दरवर्षी वार्षिक अधिवेशन होते. १९९१ मध्ये ते हैद्राबाद येथे झाले. त्यात आम्ही हा विषय मांडला. तेथे आम्ही सर्व साधारण सभेत ठराव मांडला की “आईला बाळंतपण + आईच्या दुधाची रजा ६ महिने हवी. अशी इंडियन अकादमी ऑफ पेडीआट्रिक्स शिफारस करते.” संस्थेच्या तज्ञ समितीने यावर वर्षभर अभ्यास केला. हा ठराव योग्य आहे असे सांगितले. मग ४ ते ७ जानेवारी १९९२ ला नागपूरला वार्षिक परिषद झाली. तेथे पुढील सर्व साधारण सभेत “बाळंतपण + आईच्या दुधाची रजा ६ महिने हवी. अशी इंडियन अकादमी ऑफ पेडीआट्रिक्स शिफारस करते” हा ठराव एकमताने मंजूर झाला. ही बातमी प्रसिद्ध झाली.
एका आठवड्याने पंजाब व हरियाना राज्य सरकारांनी त्यांच्या कर्मचार्यांना “बाळंतपण + आईच्या दुधाची रजा ६ महिने मंजूर केली. मग ती रेल्वे, एल.आय.सि., टाईम्स ऑफ इंडिया. स्टेट बँक आदी अनेकांनी त्यांच्या कर्मचार्याना दिली. आम्ही जे जे मोठे लोक भेटतील त्यांना हा विषय सांगत होतो. डॉ उदय बोधनकर, व अनेक लोक त्यासाठी काम करत होते.
आम्ही सर्व कर्मचार्यांना त्यांच्या संघटनांना गर्भवती स्त्रियांसाठी ६ महिने रजेची मागणी करायला नेहमी सांगत होतो. कर्मचार्यांच्या या मागणीमुळे केंद्राच्या ५
व्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचार्यांसाठी साडेचार महिन्याची रजा केली. पुढे ६ व्या वेतन आयोगाने ती ६ महिन्याची केली.
एकदा विरार जवळ उत्तण, येथे भाजपच्या ६ मुख्यमंत्र्यांची बैठक होती. त्यांना आम्ही भेटलो. हा विषय सांगितला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही आधीच दिली आहे.
एकदा चेन्नइला गेलो. तेथे निवडणुका होत्या. आम्ही जयललिता यांचे कडे गेलो. त्या भेटल्या नाही. त्यांचे साठी कागद ठेवले. निवडून आल्यावर १५ दिवसात त्यांनी ६ महिन्याची रजा कर्मचारयांना मंजूर केली.
असेच एकदा कलकत्याला ला गेलो होतो. तेथे निवडणुका होत्या. आम्ही ममता बॅनर्जी यांचे कडे गेलो. त्या भेटल्या नाही. त्यांचे साठी कागद ठेवले. निवडून आल्यावर १५ दिवसात त्यांनी ६ महिन्याची रजा कर्मचाऱ्यांना मंजूर केली.
भारत सरकारने संसदेत “आईला बाळंतपण + आईच्या दुधाची ६ महिने रजा देणारा ठराव मांडला. तो पास झाला. 27 मार्च 2017 ला राष्ट्रपतींची सही झाली. कायदा झाला.
धडा : आपण साध्या माणसांनी एखादा चांगला विचार लावून धरला. त्यासाठी निस्वार्थ पणे काम करत राहिले तर कामे होतात.
नवा मुद्दा : ६ महिने आईचे दुध पुरते. त्यानंतर ते पुरत नाही. म्हणून बाळ ६ महिन्याचे झाल्यावर त्याचे उष्टावण करावे. उष्टावण हा संस्कार आहे. १६ संस्कार पैकी एक. यात बाळाला मांडीवर बसवून घरचा मऊ डाळभात त्याच्या ओठांना लावतात. त्यात तेल, तूप टाकतात. बाळ ते जिभेने चाटून खातो. यानंतर दर वेळी आईच्या दुधाच्या आधी घरचे मऊ अन्न, देतात. केळ, चिकू, पपई देतात. उपमा, शिरा, इडली, देतात.
हळू हळू वाढदिवसापर्यंत बाळ, घरचे सर्व अन्न खाते व छान वाढते. अन्नात व औषधात आईचे दुध मिसळले तर बाळ ते जास्त चांगले घेतो असा अभ्यास आहे.
बाळाच्या आहाराची गाडी आईच्या दुधावरुन, घरच्या सर्व अन्नावर नीट गेली, म्हणजे आपले काम पूर्ण झाले.
आपण बाळाला घट्ट अन्न देत नाही. वरण भाताचे पाणी, दुध असे पातळ अन्न देतो. पातळ अन्नाने बाळाची उपासमार होते. त्याची वाढ खुरटते. मेंदू, उंची, वजन सगळे घटते.
“२ वर्षाखालील १० पैकी ९ मुलांना रोज पुरेसे अन्न मिळत नाही. दर दुसऱ्या बाळाला नीट ६ महिने आईचे दुध मिळत नाही. असा महाराष्ट्राचा NFHS 5 राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण – 5 चा अहवाल आहे. हा डिसेंबर २०२० मध्ये प्रसिद्ध झाला. देशभर असेच आहे .
बाळाचे अन्न एका चमच्यात घ्या. तो वाकडा करा. त्यातील अन्न त्यातून सांडणार नाही एवढे घट्ट हवे. ते सांडले म्हणजे त्यात पाणी जास्त आहे, हे समजावे.
बाळाच्या निकोप वाढीसाठी आईच्या दुधाचे अतोनात महत्व ओळखून बाळाला स्तनपान देण्याची शपथ बाळांच्या मातांनी घ्यावी हे या निमित्ताने कळकळीचे आवाहन आहे. कारण आजचे बालक देशाचे भावी नागरिक आहे. आपली भावी पिढी सशक्त असणे ही केवळ आपली वैयक्तिक गरज नाही तर ती देशाची गरज आणि म्हणूनच आपली जबाबदारी आहे.

– लेखन: डॉ अर्चना जोशी, डॉ हेमंत जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
डॉ. जोशी आपण नोकरदार महिलांना त्यांच्या नवजात बालकास, आईचे दूध म्हणजे अमृत आहे, हे पटवून हक्काची रजा मिळवून दिलीत.आपल्या कार्यास मनापासून सलाम।
डॉ. अर्चना आणि डॉ.हेमंत जोशी फार मोठे कार्य करीत आहात. अनेक बालकांचा दुवा तुम्हाला असेल. ALL THE BEST FOR FUTURE WORK.