हुकलेल्या भेटी
2011 च्या 11 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध, सुमारे 150 विनोदी पुस्तके लिहिणारे, विनोदी लेखक आणि माझे ज्येष्ठ मित्र वि. आ. बुवा यांचं निधन झालं. लगेच मे महिन्याच्या ‘ ललित ‘ मध्ये माझा त्यांच्यावर सुमारे 2,200 शब्दांचा दीर्घ लेख प्रसिद्ध झाला.
काही दिवसांतच, मला बोरिवलीच्या वर्षा लिमये यांचा, हा ‘ ललित ‘ मधील बुवांवरचा लेख वाचून तो आवडल्याचे कळवणारा फोन आला॰ माझा त्यांच्याशी प्रथमच संपर्क होत होता॰ त्या म्हणाल्या की, बोरिवलीला त्यांचा 12 – 13 जणींचा एक ग्रुप आहे॰ त्या दर महिन्याला पुस्तके विकत घेतात॰ दर महिन्याच्या दुसर्या शनिवारी, आधी ठरवून त्यावर चर्चा करतात॰ या लिमये मॅडम SNDT मधून कार्यालयीन अधीक्षक म्हणून स्वेच्छा निवृत्त झाल्या होत्या॰ क्वचित एखाद्या लेखकाला बोलावतात॰ त्यावर मी त्यांना म्हटले की, कधी तरी मी या गप्पांत सहभागी होईन॰
त्या म्हणाल्या की, मग परवाच शनिवारी या ना॰ आम्ही तुमचाच बुवांवरचा लेख वाचून दाखवणार आहोत; आणि त्यावर चर्चा करणार आहोत॰
त्यामुळे मी 14 मे च्या शनिवारी बोरिवलीला त्यांच्या ग्रुपमध्ये गप्पा मारण्यासाठी गेलो होतो॰ जवळ जवळ सव्वा तास मी त्यांना बुवांच्या आठवणी, गमती – जमती सांगितल्या॰ त्या सर्वांना आवडल्या॰ त्या मैत्रिणींनी मला प्रभाकर पेंढारकर यांचे ‘ रारंग ढांग ‘ हे पुस्तक भेट दिलं॰
2010 च्या जुलैमध्ये मी याच प्रभाकर पेंढारकरांचे ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त ‘ पुस्तक वाचले॰ ते वाचून मी पेंढारकर यांना त्या पुस्तकात न आलेली काही माहिती कळवणारे पत्र पाठवले॰ त्यांचा मला फोन आला की, पत्राला उशीर झाला॰ दुसर्या आवृत्तीची छपाई पूर्ण झाली॰ त्यांना फोनवर बोलतांना खूप त्रास होत होता॰ मी त्यांना म्हटले की, पुढच्या आठवड्यात पुण्याला येत आहे; त्यावेळेस मी आपल्याला भेटेन॰ पण जेमतेम 5 – 6 दिवसांतच त्यांचे निधन झाले॰
या प्रभाकर यांच्या नावावरूनच भालजींनी आपल्या चित्रपट स्टुडिओचे नाव ‘ प्रभाकर स्टुडिओ ‘ ठेवले होते; आणि चित्रपट निर्माण करणार्या संस्थेचे नाव
‘ प्रभाकर चित्र ‘॰ हा ‘ प्रभाकर स्टुडिओ ‘ गांधी हत्त्येनंतर झालेल्या जाळपोळीत जाळला गेला॰ ही जाळपोळ चालू होती तेव्हा भालजी त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह पन्हाळा गावात होते. तेथून कोल्हापूर मध्ये चाललेली जाळपोळ स्पष्ट दिसत होती.
‘ या सर्व ज्वाळांत उंच असलेल्या ज्वाळा या आपल्या स्टुडीओच्या ज्वाळा आहेत ! ‘ भालजी उद्वेगानं उद्गारले. हे बोलताना त्यांना किती यातना झाल्या असतील ! तेथे त्यांनी नवा स्टुडिओ उभारला; त्याचे नाव ‘ जयप्रभा स्टुडिओ !
या जळलेल्या प्रभाकर स्टुडीओत त्यांचा संपूर्णपणे चित्रित झालेला ‘ मीठ भाकर ‘ हा चित्रपट, लेखनाच्या वह्या आणि तयार प्रिंट यांसह जळला ! पण भालजी डगमगले नाहीत.
सर्व कलाकारांना त्यांनी संवादाच्या वह्या दिल्या होत्या, त्या वरून नव्यानं सर्व चित्रपट लिहून काढला; आणि वेगानं चित्रितही केला !
हा प्रभाकर चांगला लेखक होता॰ 1991 च्या डिसेंबरमध्ये ‘ रूपारेल ‘ मध्ये झालेल्या ‘ चतुरंग ‘ च्या वार्षिक सम्मेलनात आमची भेट झाली होती॰ मी माझी मुलगी अदितीला ते भालजी पेंढारकरांचे सुपुत्र आहेत, हे सांगितल्यावर तिने त्यांची स्वाक्षरी घेतली होती॰ अदितीचे नाव कळताच, ते हसले॰ कारण त्यांच्याही मुलीचे नाव अदितीच आहे!
1965 मध्ये ‘ दीपावली ‘ मासिकाने एक कादंबरी स्पर्धा घेतली होती॰ त्या स्पर्धेत त्यांच्या ‘ प्रतीक्षा ‘ कादंबरीला पहिले बक्षीस मिळाले होते॰ ती कादंबरी मी त्यावेळेस वाचली होती; आणि मला बर्यापैकी ती आठवतही होती॰ ते मी प्रभाकरांना सांगताच ते खूप आनंदित झाले॰ त्यांनी प्रेमभराने माझा हात दाबला॰ मात्र, या कादंबरीची सुरुवात, कंटाळवाणी आहे॰ नंतर ती पकड घेते; वाचकाला गुंगवून टाकते; असे आगाऊपणे सांगितले॰ 26 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची कादंबरी माझ्या सारख्या एका सामान्य वाचकाला आठवते आहे, याचेच त्यांना अप्रूप वाटले असावे; आणि म्हणूनच बहुधा या माझ्या आगावू आणि कदाचित मूर्ख टीकेकडे त्यांनी उदार मनाने दुर्लक्ष केले असावे; असे मला तरी वाटले !
या प्रभाकरची सावत्र बहिण म्हणजे माधवी देसाई. ‘ स्वामी ‘ कार रणजीत देसाईंची द्वितीय पत्नी; आणि ‘ नाच ग घुमा ‘ या आता 14 आवृत्त्या निघालेल्या आत्मकथनाच्या लेखिका !
पद्माकर गोवईकर नावाचा अभिनेता, गायक, लेखक होता. यानं ‘ संत निवृत्ती ज्ञानदेव ‘ या चित्रपटात मोठ्या ज्ञानेशवरचे काम केले होते॰ यानं ‘ दोन नाद ‘ या पुस्तकात त्याच्या आठवणी लिहिल्या आहेत॰ ग.दि.मा., व्यंकटेश, मा॰ विनायक यांच्या त्या आठवणी तशा चक्रावून टाकणार्या आहेत !
ते पुस्तक वाचून मी त्यांना पत्र पाठवले॰ 8 दिवसांनी त्याच्या केळकर नावाच्या मित्राचा मला फोन आला की, तुमचे ( म्हणजे माझे ) हिरव्या शाईत, सुंदर अक्षरात लिहिलेले माहितीपूर्ण पत्र पद्माकरला अतिशय आवडले॰ तो दोन तीन दिवस तुमच्या पत्राबद्दलच सर्वांशी बोलत होता ! तो पत्र पाठवून तुम्हाला बोलावून घेणार होता; पण त्या नंतर एका आठवड्यातच त्याला अर्धांग वायुचा झटका आला आणि आता तो दुर्दैवाने बोलू, लिहू शकत नाही॰ हे ऐकून मला खूप वाईट वाटले॰
नंतर एक दीड महिन्यातच या गोवईकरांचे निधन झाले॰ हे गोवईकर गायक असल्यामुळे ते ‘ गीत रामायणा ‘ चे कार्यक्रम करत असत॰ ते चांगलेच लोकप्रिय झाले होते॰ यांनी 1973 चा सुमारास ‘ रातराणी ‘ नावाचे नाटक लिहिले होते॰या हुकलेल्या भेटींची आठवण झाली की अजून मन हळहळते !

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान आठवणी आणि सुरेख लेखन.