Sunday, June 1, 2025
Homeलेखआहेर : काही विचार !

आहेर : काही विचार !

आपल्या पोर्टल च्या नियमित लेखिका, कवयित्री प्रा अनिसा सिकंदर शेख मॅडम यांनी लिहिलेला “आहेर : काही विचार” हा सामाजिक सुधारणा घडवू इच्छिणारा लेख पुढे देत आहे.
विशेष म्हणजे शेख मॅडम केवळ लेख लिहूनच थांबल्या नाहीत तर लवकरच होऊ घातलेल्या त्यांच्या मुलाच्या लग्नात देखील त्यांनी कुणाकडून काही आहेर न स्वीकारण्याचे ठरविले आहे. तसेच मुलीकडून त्यांनी काहीच घेतले नाही. लग्नही फार खर्चिक न करता, मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत होत आहे. या सर्व प्रागतिक विचारसरणीबद्दल आणि ती प्रत्यक्ष आचरणात आणीत असल्याबद्दल शेख मॅडम आणि त्यांच्या सर्व परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन. या शुभविवाहासाठी न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

लग्न, मुंज, वास्तुशांती आणि इतर विविध समारंभांमध्ये आहेर देणे आणि घेणे ही एक जुनी प्रथा आहे. परंतु, या प्रथेमुळे केवळ खर्चच वाढत नाही, तर विना कारण वेळही जातो. मनाप्रमाणे मानपान झाले नाहीत तर आयुष्य भरासाठी नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होतो.वास्तविक पाहता, हे आहेराचे कपडे कोणी परिधानही करत नाहीत. बऱ्याचशा वस्तूही कुणी वापरीत नाही.त्यामुळे या कालबाह्य प्रथेच्या निमित्ताने काही गोष्टींवर विचार करणे आवश्यक आहे.

आहेर हा एक वेळ खाऊ आणि पैशाची नासाडी करणारा प्रकार आहे असं मला वाटतं.उदाहरणार्थ, कपड्याच्या स्वरूपात दिला जाणारा आहेर ! आपण किती लोक आहेरात मिळालेले कपडे प्रत्यक्षात घालतो, वापरतो ? त्याचा फक्त मानपानाशी संबंध असतो. हे खरे की, मानपानाचा एक भाग म्हणून हा आहेर दिला आणि घेतला जातो. परंतु त्यामध्ये दिलेल्या वस्तूंचा व्यक्तीच्या आयुष्यात किती उपयोग होतो ?

मला असे वाटते की, आपल्या समाजातील आजच्या गरजा बदलल्या आहेत. आपण एकमेकांच्या सुखात सामील व्हावे, आपली मदत काही करता आली, तर करावी. हल्ली कोणाला कोणाशी बोलायला किंवा कोणाकडे जायला वेळ नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी होतात, एकमेकांसोबत वेळ घालवणे, शुभेच्छा देणे, आशीर्वाद देणे हेच खरे महत्त्वाचे आहे.

प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो. जेव्हा गरज असते, तेव्हा कोणीही धावून येत नाही. गरजेच्या वेळेस धावून जाणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्याशी बोलणे,त्यांना मानसिक आधार देणे हेच खूप महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाच्या वेळेस आपण आहेर घेऊन जातो. वास्तविक पाहता, आहेर देणारी आणि आहेर घेणारी व्यक्ती दोन्ही हा आहेर वापरत नाही, पण प्रत्येकाची पसंती वेगळी असते. आपली पसंती दुसऱ्यावर लादणे हे कितपत योग्य आहे ? समोरच्या व्यक्तीला बऱ्याच वस्तूंची, कपड्यांची गरज नसते. ती फक्त आपल्याकडून प्रेम, आनंद, आधार शोधत असते. समारंभाच्या निमित्ताने एखाद्याला आहेर दिला जातो. ती व्यक्ती पुन्हा देणाऱ्याला दुसरा स्वतःकडचा आहेर देते. मग ज्याच्या घरी कार्यक्रम आहे त्याला आहार देऊन काय उपयोग ? आहेर परत देणे घेणे, यामुळेच एक चक्र निर्माण होते, आपण ज्याच्या घरी कार्यक्रमाला जातो या सर्व पध्दती औपचारिकतेचे पालन ठरते, जे कार्यक्रमाच्या आनंदाला बाधा आणते. त्याऐवजी आपण त्या व्यक्तीस शुभेच्छा, आशीर्वाद देऊन, कार्यक्रमामध्ये भाग घेऊन, छान वेळ घालवावा.

अशा कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा पाहुणे काहीही सक्रिय योगदान न देता फक्त उपस्थित राहतात. त्याऐवजी, कार्यक्रमामध्ये सहकार्य करणे, त्या ठिकाणी मदतीला येणे, हे खरे महत्त्वाचे आहे. यामुळे कार्यक्रम अधिक आनंददायी होईल. तसेच आहेर, इतर औपचारिकता टाळता येतील.

किती जरी छोटा कार्यक्रम असला तरी माणसाला दडपण येते. हे बरोबर होईल का ? ते बरोबर होईल का ? कार्यक्रमात बनवले जाणारे जेवण, धार्मिक विधी असेल तर त्याला लागणाऱ्या वस्तू, अन्य कितीतरी महत्वाची कामे असतात. ते सोडून ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे त्याला आवर्जून वेळ काढून तो आहेर घेण्यासाठी बाजारात जावे लागते. पुन्हा ते कोणाला द्यायचे, त्यांच्या नावाच्या पिशव्या तयार करा आणि आठवणीने ते आल्यावर त्यांना द्या. हे किती वेळ खाऊ काम आहे ! बरं त्यातून काही निष्पन्नही होत नाही. आहेर कितीही हलका घेतला तरी त्याला पैसा लागतोच. सर्व लोकांना महाग आहेर घेणे हे परवडत नाही, मग सरसकट आहेर घेतला जातो. केवळ प्रथा म्हणून तो एकमेकांना दिला – घेतला जातो. नंतर त्या कपड्यांना कोणी घालत देखील नाही. तो आहेर एका घरातून दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात अशा प्रकारे चक्र चालू असते. ही पद्धत कुठेतरी थांबली पाहिजे. कोणी नावे ठेवली तरी चालेल. पण कोणीतरी हे पाऊल उचलले पाहिजे. या बुरसट, रूढी परंपरा थांबल्या पाहिजे. आहेराची ही परंपरा बंद करताना त्रास जरूर होईल, पण या प्रथा कायमच्या बंद होणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

तसेच, आहेराच्या वस्तू घेतल्यावर रुसवेफुगवे होणे, कायमचा अबोला धरणे हे एक मोठे आणि अनावश्यक दडपण निर्माण करते. हा मुद्दा इतरांवर दबाव आणणारा आणि नकारात्मक ठरतो.हे सहसा सासर कडील लोक आवर्जून करतातच. हे फारच निरर्थक ठरते. “मी त्यांना चांगला आहेर घेतला होता, पण त्यांनी मला किती हलका आहेर दिला ?” याशिवाय, जो व्यक्ती कार्यक्रम आयोजित करत आहे, त्यालाही तो कार्यक्रम एन्जॉय करण्याचा हक्क आहे. पण आहेराच्या आणि इतर औपचारिकता पूर्ण करताना ती व्यक्ती, त्याचे कुटुंब इतके मेतकुटीस येते की, त्यांनाच त्यांच्या घरच्या शुभ कार्याचा आनंद घेता येत नाही. कधी कधी असेही होते की एखाद्याशी आहेर देण्या घेण्याच्या गडबडीत साधे बोलणेही होत नाही. नंतर असे ऐकायला मिळते की, बघा ना काय एवढी गूंग होती ती, माझ्याशी बोलली देखील नाही. मुलीची आई असेल आणि नवरदेव छान असेल तर मग ऐकायला मिळते, “जावई चांगला भेटला कुठेच मावत नाही. बाई बोलायला तयार नाही”. अन जर मुलाची आई असेल तर असेही ऐकायला मिळते “सून देखणी, छान कमावती मिळाली आहे. त्यामुळे बाई अजून जास्त तोऱ्यात चालायला लागलीय. तिला कुणाशी बोलायला वेळ नाही !”असेही ऐकायला मिळते.

लग्न समारंभात तर नवरदेव किंवा नवरीच्या जवळच्या व्यक्तींना, तर कार्यक्रमाची मजाच घेता येत नाही. ते बिचारे फक्त आहेर देण्यातच गुंतून राहतात. मला स्वतःला माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या लग्नात हा अनुभव आलेला आहे.

अलीकडे मात्र काही लोक विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेत असे आवर्जून लिहितात की, “कोणत्याही प्रकारचा आहेर स्वीकारला जाणार नाही.” असे स्पष्टपणे लिहून सुद्धा काही मंडळी प्रथा आणि परंपरा म्हणून आहेर घेऊनच येतात. मग समोरच्याला प्रश्न पडतो, आपण त्यांचा आहेर घ्यायचा अन मग परत त्यांना कसा नाही द्यायचा ? म्हणून परत ते चक्र चालू होते. एक तर असे करावे की, त्यांनी आहेर जरी आणला आणि कितीही आग्रह केला तरी आहेर घेऊच नये. स्पष्टपणे सांगावे, “मुलांना फक्त आशीर्वाद द्या.”

अखेर, हे आहेराचे दुष्टचक्र, खर्च आणि वेळ याबद्दलचे विचार घेऊन, मला असे वाटते की, आहेर देणे किंवा घेणे किती अयोग्य आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार कपडे घालते. त्याच्या मनाप्रमाणे वागते. त्यामुळे, आहेराच्या कपड्यांवरून रुसवे फुगवे, तंटे निर्माण होणे यामुळे कार्यक्रमाचे आनंदी वातावरण विस्कटून जाते.

अलीकडे उच्चभू लोकांमध्ये अजून एक नवीन फॅड आले आहे, ते म्हणजे रिटर्न गिफ्ट देण्याचे ! “अहो, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही हे करता. गरिबांनी कसं करायचं ?” पण ते लोक करतात म्हणून आपल्यालाही करावे लागेल. मग गरिब लोक उसनवारी किंवा व्याजाने पैसे घेऊन हे सर्व करतात आणि उगाचच कर्जबाजारीं होऊन जातात. त्यामुळे ज्यांची ऐपत नाही, त्यांनी अशा प्रकारचा दिखावा अजिबात करू नये असे मला मनापासून वाटते.

समारंभांमध्ये लोकांनी एकमेकांना शुभेच्छा देणे, जेवणाचा आनंद घेणे आणि एकमेकांसोबत वेळ घालवणे, याहून अधिक महत्त्वाचे काहीच नाही. त्यामुळे, आहेर देण्याची आणि घेण्याची ही जुनी प्रथा आपण बदलू शकतो. यामुळे, आपला वेळ आणि पैसा वाचेल, तसेच आपल्याला अनावश्यक रुसवाफुगव टाळता येईल. एकमेकांच्या सहकार्याने समारंभांमध्ये भाग घेणे, वधू-वरांना शुभेच्छा देणे, आशीर्वाद देणे हे अधिक योग्य ठरेल. तुम्हाला काय वाटते ?

प्रा.अनिसा शेख

— लेखन : प्रा.अनिसा सिकंदर शेख. दौंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम