मुंबईत झोपडपट्टीत जन्मलेला, वाढलेला, भीक मागणारा मुलगा, वाया न जाता मुंबई महानगरपालिकेत अधिकारी होतो, ही एका पाखराची मनस्वी झेप…..
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील साटवली हे सुरेश गोपाळे यांचे मुळगाव. गोपाळे यांचे वडिल मुंबई महापालिकेत होते. पण त्यांचे वडिल, सुरेश गोपाळे यांच्या लहानपणीच वारले.
उत्पन्नाचे काहीच साधन नसल्याने गोपाळे यांना अक्षरशः काही वर्षे भीक मागावी लागली. प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांची गाडी धुण्याचे काम त्यांनी काही काळ केले आहे. त्यावेळी परिस्थितीने खचून जाऊन गोपाळे आत्महत्येच्या विचारात होते. त्यांची विमनस्क अवस्था पाहून सुमनताईंचे यजमान नंदाशेठ यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. गोपाळे यांनी त्यांची बिकट परिस्थिती कथन केल्यावर नंदाशेठनी सुमनताईंचे “एक एक पाऊल उचली, चाल निश्चयाने, नको बावरूनी जाऊ नियतीच्या भयाने” हे गाणे ऐकविले आणि गोपाळे यांना जगण्याचे बळ दिले.

गोपाळे यांना आजही नंदाशेठ यांनी त्यावेळी दिलेल्या धीराबद्दल कृतज्ञता वाटते. गोपाळे यांनी अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत महात्मा गांधी विद्यालयातून अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. १९७७ साली ते मुंबई महापालिकेत शिपाई म्हणून कामाला लागले. पुढे पब्लिक हेल्थ आणि सॅनिटरी निरिक्षक ही पदविका त्यांनी मिळवली. त्यांना शिपाई संवर्गातून २१.०२.१९८२ रोजी बाजार निरिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. नंतर २००८ मध्ये मुख्य निरिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांच्यावर विशेष दक्षता पथकाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. २०१३ साली ३६ वर्षे सेवा करुन बाजार अधिक्षक पदावरून गोपाळे निवृत्त झाले.
गोपाळे यांनी महापालिकेत सेवा बजावत असतानाच, वृत्त पत्रलेखक म्हणूनही नाव लौकिक मिळविला. आतापर्यंत त्यांनी वृत्तपत्रातून विविध विषयांवर ४५० हून पत्रे लिहली आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा
उत्कृष्ट पत्रलेखक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. याशिवाय पोलीस मित्र, श्रमिक रत्न, ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचा पुरस्कार, मुंबई महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार व नागरी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबतर्फे गोपाळे यांची २०१४ साली
सामाजिक कार्याबद्दल निवड करण्यात आली. महात्मा फुले मंडईत २७ ऑक्टोबर १९९९ रोजी स्फोटके ठेवण्यात आली होती, ही माहिती गोपाळे यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आणि त्यामुळे तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त रॉनी मेंडोंन्सा यांच्या हस्ते त्यांना पोलिसमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईतील अतिवृष्टीत पालिकेच्या अंधेरी (प) येथील मंडईतील ३० मच्छीमार महिलांचे प्राण मंडईतील व्यापारी सर्वश्री अन्वर, रेहमान व इमरान यांनी जीवाची पर्वा न करता वाचविले ही बाब गोपाळे यांना कळताच त्यांनी या महिलांना सुरक्षितपणे मंडईच्या बाहेर काढले. गोपाळे यांच्या प्रसंगावधाने त्यावेळी त्यांची प्रशंसा करण्यात आली.
गोपाळे मरणोत्तर देहदान चळवळीतही भरीव कार्य करित आहे. गोपाळे यांनी आतापर्यंत ३०० जणांना देहदान, अवयवदान, नेत्रदान आणि त्वचा दानासाठी प्रवृत्त केले आहे त्याबद्दल त्यांना युवा प्रतिष्ठानतर्फे २००६ साली समाजरत्न पुरस्कार मिळाला.
गोपाळे यांचे एक पाखरू वेल्हाळ हे आत्मचरित्र प्रसिध्द झाले आहे. या चरित्रात त्यांनी रस्त्यावर भीक मागण्यापासून सुरू झालेला प्रवास काहीही लपवून न ठेवता जसाच्या तसा मांडला आहे.
आजही हे पुस्तक वाचताना झोपडपट्टीतील जीवन, त्यातील दाहकता आपल्या अंगावर काटा उभा करते. गोपाळे यांनी आजवर २५ कथांचे लेखनही केले आहे. त्यांच्या दक्षता मासिकातील कथेस राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय आर.आर.पाटील यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. २०१५ मध्ये त्यांचा प्रियजनांची मांदियाळी हा काव्य संग्रहही प्रकाशित झाला आहे. या काव्य संग्रहात जवळपास ४५ कविता आहेत. या काव्य संग्रहाचे रसिकांनी चांगले स्वागत केले आहे.
२०१८ मध्ये गोपाळे यांना मुंबईतील क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य पुरस्कृत करण्यात आलेल्या संघटने तर्फे साहित्यिक विभागाच्या जीवन गौरव पुरस्काराने तसेच जनसामान्यांसाठी अमूल्य कार्य केल्याबद्दल सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले.

१९८४ साली गोपाळे यांचा विवाह झाला. पत्नी सुप्रिया यांनी विवाहानंतरची १६ वर्षे झोपडपट्टीच्या संसारात साथ दिली. याबद्दल गोपाळे यांना आजही पत्नीविषयी कृतज्ञता वाटते. गोपाळे यांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा रोहन हा एका इंजिनियरिंग कॉलेजमध्ये वरिष्ठ व्याख्याता आहे तर मुलगी एम बी ए होऊन एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. दोघांचे विवाह झाले असून ते आपल्या जीवनात स्थिरस्थावर झाले आहेत.

निवृत्तीनंतर सुखासीन आयुष्य न जगता गोपाळे आता बिकट परिस्थितीत असणाऱ्यांना धीर देण्याचे, सर्वोतोपरी मदत करण्याचे उदात्त कार्य करीत आहेत.
गोपाळे यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.