लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अपचुंदा या छोट्याशा गावातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाच्या जोरावर नव्याने सुरूवात झालेल्या औसा येथील कुमार स्वामी महाविद्यालयात हिंदीचे पहिले प्राध्यापक आणि विद्यार्थी वसतिगृहाचे संचालक म्हणून १९७१ साली प्रा सुरेश पुरी सर रूजू झाले तेव्हा साऱ्या गावाला त्यांचे कौतुक वाटले. अनेक जण सुरेश कॉलेजात लेक्चरर झाला म्हणून त्यांना पाहण्यास व भेटण्यासाठी कॉलेजात येत असत.
नव्याने स्थापन झालेल्या कालेजमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, त्याचबरोबर गरीब होतकरू, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमातींच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देण्याची जबाबदारी संपूर्णपणे महाविद्यालयाने पुरी सरांवर सोपवली असल्याने खेड्यापाड्यातील मुलं आणि पालक यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क व संवाद होत होता. अनेक पालक आणि मुलांनी सरांना कायम लक्षात ठेवले होते.आणि सरांनी सुद्धा ! मुलाचं गाव, नाव, आडनांव, पालकांसह. अशा प्रकारे जनसंपर्क वाढला आणि पहिल्याच वर्षी विद्यार्थी प्रिय व पालक प्रिय प्रा. सुरेश पुरी झाले.
या महाविद्यालयाने कला, वाणिज्य, विज्ञान पदवी पूर्व तिन्ही शाखा व कला प्रथम वर्ष पहिल्याच वर्षी सुरूवात केले. एकाच प्रांगणात तीन वेगवेगळ्या इमारतीत महाविद्यालयाची सुरूवात झाली. काही शहरातून काही खेड्यातून आलेल्या प्राध्यापकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था पुरी सरांना करावी लागत असे. संस्था अध्यक्ष चरमूर्ती महंत स्वामी पुरी सरांना छोटे महाराज म्हणत असत.आणि त्यांचा पुरी सरांवर प्रचंड विश्वास होता.
औसा तालुक्यातील दोन मुलं प्रा. सुरेश पुरी आणि प्रा. गुरूलिंग औटी प्राध्यापक झाल्याचं कौतुक औसा व परिसरातील पालकांना झाले होते. प्रत्येक जण सुरेश आणि गुरूलिंग असे संबोधायचे, महाविद्यालयाचे प्राचार्य तोंडारे सर व सर्व प्राध्यापक सुरेश नावाने बोलत असत. तोंडारे सर कॉमर्सचे प्राध्यापक उदगीर हुन आलेले होते. पुरी सरांचा त्यांच्याशी फार निकटचा संबंध. पुरी सरांना विचारात घेऊनच ते निर्णय घेत असत. कॉलेजला अत्यंत उत्साही क्वालीफाईड स्टाफ मिळाला होता. औसा धड शहर ना धड गांव !सर्व सुविधा तेथे उपलब्ध नव्हत्या. लातूर तेथून जवळ असल्यामुळे त्या तिथे मात्र सहज उपलब्ध होत असत.
महाविद्यालयाचे पहिले शैक्षणिक वर्ष अत्यंत उत्साहात जात होते. विद्यार्थी जीवतोड अभ्यास करीत होते. प्राध्यापक प्रचंड मेहनत घेत होते. त्याच साली महाराष्ट्रात १९७१- ७२ चा प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे विद्यापीठाला नाईलाजाने परीक्षा लांबवाव्या लागल्या. विद्यार्थ्यांना पत्र पाठवून परीक्षा अवेळी घ्याव्या लागल्या. परीक्षेत थोडासा गोंधळ झाला.परीक्षा फार सुरळीत पार पडल्या नाहीत. काही दिवसांत अपेक्षित निकाल आला. खुप उत्साही वातावरण निर्माण झाले होते. पण काही कारणास्तव विद्यार्थी आणि कॉलेजचे स़ंचालक मंडळ यांच्यात कमालीचा ताणाव निर्माण झाला. काही प्राध्यापक विद्यार्थी हित लक्षात घेऊन त्यांचें बाजूने उभा राहिले. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापकाना हे महाविद्यालय नाईलाजाने सोडावे लागले.त्यामुळे पुरीसर, इंग्रजीचे थोंटे सर आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हे कॉलेज सोडले. सरांबरोबर विद्यार्थी औरंगाबाद येथील वसंतराव नाईक कॉलेज मध्ये आले.पुरीसर येथे हिंदी विभाग प्रमुख, वसतीगृहातचे रेक्टर आणि उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते.अजब नगर मध्ये भगवान बाबा वसतीगृहात राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली होती. कॉलेज जवळच खोकड पुऱ्यात बंजारा कॉलनीत होते.
महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण तीव्रता वाढत होती. तरीही ग्रामीण भागातील मुलांची ही दुसरी पिढी अत्यंत जिद्दीने मन लावून शिकत होती. कॉलेजच्या विविध उपक्रमात हिरीरीने सहभागी होत होती. अनेक नवीन संकल्पना त्यावर सर्वंकश चर्चा विचारविनिमय आणि लागलीच अंमलबजावणी. दरवर्षी कॉलेजच्या ग्यादरींगसाठी पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचे, वार्षिक विशेषांक काढणे, सहलीचे आयोजन, कमवा शिका योजना, राष्ट्रीय सेवा योजना, उदबोधन शिबिरं, वसतीगृहात भोजन सहभाग, विविध कला क्रीडा मधील सहभाग, व्हॉलीबॉल, फुटबाल, कबड्डी, खो खो, कुस्ती, टेनिस, कॅरम, व्यायामासाठी डबल बार, सिंगल बार, जातीने लक्ष घालून उपलब्ध करून दिले जात असे. काही प्राध्यापक यांमध्ये सहभागी असायचे.
पुरी सरांचा अधिक वेळ वसतीगृह, कमवा शिका आणि शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, अध्यापन यातच जात असे. ते सतत विद्यार्थ्यांत मिळून मिसळून असायचे.
कॉलेजच्या वार्षिक विशेषांकात विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे, प्रत्येकाचा सहभाग नोंदविला जायचा, प्राध्यापकाना “हिरवे क्षितीजे” त्रैमासिकामध्ये लिहिते करायचे. त्याशिवाय “विमुक्तजन” त्रैमासिक सर स्वतः भटक्या विमुक्त जाती, जमातीचे संशोधन पर स़ंकलन आणि प्रत्येक जातीची इत्यंभूत माहिती अगदी पालावर जावून स्वतः प्राध्यापकाकरवी गोळा करीत असत. त्यातून बंजारा विशेषांक, कैकाडी विशेषांक असे दोन सलग विशेषांक निघाले. वैदू आणि गोसावी समाज अंकाची योजना केली होती. “भटक्या विमुक्ताचे डाक्यूमेंटेशन” विमुक्तजन या त्रैमासिक नियतकालिकातून करीत होते. सर या मासिकाचे मुख्य संपादक मालक होते. हे सारे ब्यांकेचे स्वतःच्या पगारावर लोन काढून करीत असत. त्यावेळी लोनवर,
“कोणी औरंगाबाद खरेदी देत असेल तर ते आम्ही विकत घेऊ” अशी म्हण रूढ झाली होती.
! जी जात नाही ती जात !

महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील विद्यार्थी या कॉलेजात शिकत होते. पुसद, किनवट, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाना, नागपूर, गोंदिया, नांदेड, देगलूर, मुखेड, अशा दुर्गम भागातील दऱ्या खोऱ्यातून विविध समाज घटकातील मुलं राहत होती. मुल लांबून आल्यामुळे वर्षातून दोन वेळा सुट्टी झाल्यावर गावाकडे बस कन्शेशनवर ये जा होत असे. त्यात महाराष्ट्रात महाभयंकर दुष्काळ पडला होता. मुलांना खर्चासाठी पैसे उपलब्ध व्हावे म्हणून स्वावलंबन, कमवा व शिका योजना, त्याशिवाय पारंपरिक व्यवसायातील मुलांना इस्त्री, कटींग साहित्य, गवंडी काम करणारे त्यांचे साहित्य कॉलेजने मुलांना घेऊन दिले. तेथेच काम करावे असे सक्तीचे केले. त्यामुळे मुलांच्या हातात पैसा येऊ लागला. कपडे, साबण, तेल, मुलांना भूक लागली तर पोटापाण्याची व्यवस्था झाली. मुलाचे राहणीमान बदलले. विचार बदलत होते. ते विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळवित होते. विविध क्षेत्रात सहभागी होत होते. कॉलेज प्रोत्साहन देत होते. मुलाचा उत्साह वाढत होता जिकडे तिकडे पुरी सरांचा बोलबाला होत होता.
मुक्टा संघटना, मुक्टाचे सेक्रेटरी पुरी सर, प्राध्यापक संघटन जबरदस्त होते. त्यामुळे जातीय द्वेष, बंधन, अप्रत्यक्ष विरोध निर्माण होत होता. ही प्रामाणिक काम केल्याची पावती, अंतरविरोधातून मिळत होती. ज्या जातीचे कॉलेज त्याचा पलडा भारी. अप्रत्यक्ष जात बंधने येत होती. मनाप्रमाणे काम करता येत नसेल तर काम करण्यात मन रमत नाही. अशा वैचारिक मतभेदांमुळे सरांच्या मनाने उचल खाल्ली.
“योग्य वेळी योग्य निर्णय” ही सरांची हातोटी होती. लवकरच तशी संधी चालून आली. मराठवाडा विद्यापीठात “ॲडल्ट एज्युकेशन कोऑर्डिनेटर” ची जागा निघाली आणि सरांची सहज निवड झाली. विद्यापीठातील जनसंपर्क अधिक वाढला.
जिथे जातील तेथील क्षेत्राचा विकास विस्तार व लोकाभिमुख करण्याची सरांची हातोटी लक्षणीय असल्याने नोकरी एके नोकरी असे कधी झाले नाही. तर त्याच्या पलिकडे जाऊन विद्यार्थी केंद्र मानून त्यांनी सतत कार्य केले. त्यांनी वैयक्तिक, खाजगी अडचणींसह विद्यार्थ्यांना जवळ केले. त्यांना आत्मविश्वास दिला. म्हणून विद्यार्थी प्रिय, विद्यार्थी मित्र प्राध्यापक, मुलाची जवळीकता आणि सुप्त गुणांना वाव, आपलं कोणीतरी आहे. याची जाणिव मुलांना होत राहिली. त्यामुळेच स्मृती शेष प्राचार्य सदाविजय आर्य सरांच्या मनातले” सुरेख पुरी” झाले.
“पुस्तक आणि माणूस जन्मभर वाचल्याशिवाय समजत नाही” या उक्ती प्रमाणे औसा येथून गायी मागे वासरा प्रमाणे आलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काही उल्लेखनीय असलेले शिवाजी इंद्राळे, बाबू दंडगुले, रावसाहेब दंडगुले, देविदास भारती, अनंत चव्हाण, सुग्रीव धुमाळ, देविदास दुधभाते, पांडुरंग अडसुळे, व्यंकट कात्रे, बदाम सूर्यवंशी, रावसाहेब सोनकांबळे अशा विविध परिघातील मुलांचे आयुष्य सरांनी घडविले.सन १९७१ ते २०२५ आजही सराबरोबर आयुष्याच्या उतार चढाव सह आहेत.सन १९७७- ७८ नंतर सरांच्या सानिध्यात आलेली मुलं आजही त्यांच्या सानिध्यात आहेत.त्यांचे वयोमान ६५ ते ७२ झाले आहे.
“जिसका कोई नहीं उसका पुरी सर है यारो”
त्यातले एक पहिल्या पिढीतील शिवाजी इंद्राळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेला लाडका प्रामाणिक, हुशार, विद्यार्थी एमएसइबीच्या पीआरओ पदावरून सेवानिवृत्त होवून मुलं सुना नातवंडासह आनंदात आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करीत आहे. शिवाजी इंद्राळे याने सरांच्या अगोदर वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केला आणि लागलीच सहज नोकरी मिळाली.
अडल्ट एज्युकेशन को आर्डनेटर हे पद कागदी मेळ आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पत्रकारीता अभ्यासक्रम निवडला. या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढत चालली आहे हे लक्षात आल्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे म्हणजे समयसूचकतेचे नाव म्हणजे “सुरेश पुरी “सक्सेस “पासवर्ड” शब्द रूढ झाला.”
“नेक काम को देर किस बात की ?” प्रमाणे सरांनी लागलीच जर्नालिझम केले आणि ते तिथेच प्राध्यापक झाले “जनसंपर्क संकल्पना आणि सिध्दांत” या पुस्तकाच्या लेखकाबरोबर ते विद्यापीठात या विभागाचे प्रपाठक, विभाग प्रमुख झाले आणि या क्षेत्राचा विस्तार वाढत गेला. देशभर, देशाबाहेर जनसंपर्क वाढत गेला.
आज १९ में रोजी सरांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या नावाने एके काळी मराठवाडा विभागीय दैनिकात काम करत असलेले व शेतकरी संघटनेत सातत्याने आजही काम करणारे एकांडा शिलेदार व स्वतः सिध्द हस्त लेखक असलेले चळवळ्या अमर हबीब यांना सरांचे लाडके शिष्योत्तम वैजनाथ वाघमारे यांनी प्रथम पुरस्कार जाहिर करून सरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सरांचे उर्वरित भावी आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी, आरोग्यदायी व दिर्घायुष्यी जावो एवढी ईश्वर चरणी प्रार्थना.
जीवनाच्या आनंदी व खडतर प्रवासात साथ संगत व दृढनिश्चयी सोबत ज्यांनी सावली सारखी डोळ्यात तेल घालून ज्यानी केली त्या परम आदरणीय सौ. विजयमाला पुरी वहिनीचा या यशात खुप मोठा वाटा आहे. उभयतांचा हा सुखी संसार फुलला, बहरला आणि मोठ्या प्रमाणात विस्तारला वट वृक्षाच्या पारंब्या प्रमाणे, शुन्यातून जग निर्माण करणाऱ्या परम आदरणीय गुरुवर्य पुरी सरांना मनापासून त्रिवार वंदन आणि पंचाहत्तरव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

— लेखन : ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 986984800