Sunday, June 1, 2025
Homeकलाचित्र सफर : ५०

चित्र सफर : ५०

“ऑस्कर पुरस्कार”

नमस्कार मंडळी.
चित्र सफर च्या सुवर्ण महोत्सवी भागात आपलं स्वागत आहे. हे सदर सुरू करताना, या सदराचे इतके भाग प्रसिद्ध होतील, याची काही कल्पना नव्हती. पण या सदरासाठी वेळोवेळी अनेक जण देशविदेशातून लिहित राहिले, आपल्यालाही सदर आवडत गेले त्यामुळेच या सदराचा आज सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सर्व लेखक, वाचक यांचे मनःपूर्वक आभार.

आजच्या या सुवर्ण महोत्सवी भागाचे औचित्य साधून, साहित्य, संशोधन, शांतता आदी क्षेत्रात नोबेल पुरस्कार जसा सर्व श्रेष्ठ समजला जातो, तसा चित्रपट क्षेत्रासाठी ऑस्कर पुरस्कारसर्वोच्च समजला जातो. तर आज आपल्याला ऑस्कर पुरस्काराविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, अशी आशा आहे.

ऑस्कर पुरस्काराविषयी मी पहिल्यांदा ऐकले होते, तेव्हा मी मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत होतो. जर्नालिझमचा माझा वर्गमित्र डॉ बाबासाहेब काझी याच्यामुळे माझी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून प्रशिक्षण घेऊन आलेल्या किरण कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. काझी आणि कुलकर्णी हे दोघेही मूळ कोल्हापूरचे. त्यामुळे त्यांची तिथेच मैत्री झालेली होती.

माझी आणि किरणची पहिल्यांदा भेट झाली, ते साल असावे १९८७/८८. तेव्हा तो नुकताच मुंबईत नाट्य चित्रपट सृष्टीत अभिनयात कारकिर्द घडवण्यासाठी आला होता. त्याला अभिनयाचे काम देण्यालायक काम माझ्याकडे नव्हते. पण त्याचवेळी आम्हाला अंगणवाडी च्या जनक पद्मश्री अनुताई वाघ यांच्या जीवन कार्यावर आधारित “तुफानातील दिवे” हा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी आम्हाला संहिता लेखक हवा होता. त्या विषयी किरण ला विचारणा केल्यावर तो लगेच तयार झाला आणि त्याने पुढे सुंदर संहिता लिहून दिली. पुढे आमच्या अनेकदा भेटी होत राहिल्या. तर हे सर्व सांगायचे कारण म्हणजे, मी पहिल्यांदा ऑस्कर पुरस्काराविषयी ऐकले ते किरण कुलकर्णी यांच्याकडून. कारण तो हे नेहमी बोलून दाखवायचा की, ऑस्कर पुरस्कार मिळविणारा तो मराठीतील पहिला कलाकार ठरू इच्छितो. पण दुर्दैवाने किरणचा अकाली अंत झाला आणि त्याचे ऑस्कर पुरस्कार मिळविण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. इतकेच काय, आज पर्यंत कोणताही मराठी कलाकार ऑस्कर पुरस्कार मिळवू शकला नाही, इतका हा पुरस्कार अप्राप्य आहे. असो…

तर आता आपण जाणून घेऊ या ऑस्कर पुरस्काराविषयी, तो देण्याच्या कार्य पद्धती विषयी. जगभरातील चित्रपट सृष्टीत कार्यरत असणाऱ्या प्रत्येक महत्वाकांक्षी अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, चित्रपट कलेशी संबंधित इतर कलाकारांचे, तंत्रज्ञांचे हे स्वप्न असते की त्यांना एकदा तरी ऑस्कर पुरस्कार मिळाला पाहिजे कारण आजही जगभरातील चित्रपट सृष्टीत ऑस्कर पुरस्काराच्या तोडीचा दुसरा पुरस्कार निर्माण होऊ शकलेला नाही. ऑस्कर चे स्थान अबाधित आहे.

अमेरिकेतील मेट्रो-गोल्डिन- मेयर स्टुडिओचे मालक लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची अमेरिकेची चित्रपट सृष्टी असलेल्या हॉलिवूड येथे स्थापना केली. याच संस्थेतर्फे पहिल्यांदा १६ मे १९२९ रोजी पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. तेव्हा हा पुरस्कार समारंभ हॉलिवुड मधील रुझवेल्ट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला २७० जण उपस्‍थि‍त होते. या
समारंभाला पाच डॉलरचे तिकिट ठेवण्यात आले होते. पहिलाच समारंभ असूनही त्याला पुरेशी प्रसिद्धी दिल्या गेली नव्हती. शिवाय आत्ताच्या समारंभासारखे अत्यंत आकर्षक, कोणता पुरस्कार कुणाला मिळणार, याचीं उत्कंठा वाढविणारे, प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे स्वरूप या समारंभाला नव्हते. इतकेच काय पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची नावे समारंभाच्या तीन महिने आधीच जाहीर करण्यात आली होती. या समारंभात पुरस्कार दिले गेले होते. हे पुरस्कार पुढील प्रमाणे होते.

१) सर्वोत्कृष्ट अभिनेता : एमिल जॅनिंग्ज
२) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेनेट गेनर
३) चित्रपट निमिर्ती : वॉर्नर ब्रदर्स यांना जॅझ सिंगर चित्रपटासाठी.
४) सर्कस चित्रपटाचे निर्माता, लेखक आणि अभिनेते म्हणून चार्ल्स चॅप्लिन.

१९३० वर्षापासून मात्र ऑस्कर विजेत्यांची नावे पुरस्कार समारंभ होईपर्यंत गुप्त ठेवण्यात येऊ लागली. समारंभाच्या आधीच विजेत्यांची यादी वर्तमानपत्रांकडे पाठवली जायची आणि ती समारंभाच्या दिवशी रात्री ११ वाजता वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करायची, असे ठरवण्यात आले. ही पद्धत १९४० पर्यंत सुरू राहिली. पण लॉस एंजेलिस टाइम्स या वृत्तपत्राने ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची यादी सायंकाळीच प्रसिद्ध केली. त्यामुळे समारंभाला येणाऱ्या सर्वांना सर्व नावे सहज कळाली. त्यामुळे पूर्वीची पद्धत बंद करून १९४१ साला पासून बंद पाकिटात विजेत्यांची नावे देण्याची पद्धत सुरू झाली.

ऑस्कर पुरस्कार प्रदान समारंभ १९५३ मध्ये प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये दाखविण्यात आला. तर १९६९ पासून तो जगभर च्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे आता हा पुरस्कार समारंभ २०० पेक्षा अधिक देशात थेट पाहता येतो.

कोणत्या श्रेणीत कुणाला ऑस्कर पुरस्‍कार मिळणार याकडे सर्व जगाचे लक्ष असते. जगातील सर्व प्रमुख वृत्‍तवाहिन्‍या, रेडिओ वाहिन्या, वर्तमानपत्रे, समाज माध्यमे या पुरस्कार समारंभाला भरपूर प्रसिद्धी देत असतात.

असा हा विश्व चित्रपट सृष्टीतील अत्यंत सन्मानाचा पुरस्कार आतापर्यंत पुढील भारतीय व्यक्तींना मिळाला आहे.

श्रीमती भानू अथय्या

१) १९८३- रिचर्ड अटेनबरो निर्मिती, दिग्दर्शित “गांधी” चित्रपटातील वेशभूषेसाठी श्रीमती भानू अथय्या.

विशेष म्हणजे, कोल्हापूर येथे जन्मलेल्या भानू या पूर्वाश्रमीच्या भानू राजोपाध्ये. त्यांचे वडील अण्णासाहेब हे स्वशिक्षित कलाकार आणि फोटोग्राफर होते. त्यांनी बाबुराव पेंटर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. भानू अवघ्या अकरा वर्षांच्या असताना त्यांचे निधन झाले. पुढे भानू यांनी १९५१ साली सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी मिळविली. तसेच त्यांच्या “लेडी इन रिपोस” या कलाकृतीसाठी उषा देशमुख सुवर्णपदक मिळविले. भानू यांनी लेखक सत्येंद्र अथय्या यांच्याशी विवाह केला आणि त्या भानू राजोपाध्ये च्या भानू अथय्या झाल्या. ही सर्व माहिती चित्रपट सृष्टीशी अत्यंत जवळून निगडीत असलेल्या, ज्येष्ठ लेखिका यशोधरा काटकर यांनी मूळ लेख वाचून पुरविली आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

२) १९९३- भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल थोर चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांना मानद पुरस्कार.
३) २००९- स्लमडॉग मिलियनेर चित्रपटाच्या संगीतासाठी ए आर रहमान, याच चित्रपटाच्या ध्वनी मिश्रणासाठी रेसूल पुकुट्टी, गीत रचनेसाठी गुलजार.
४) २०२३- चित्रपट RRR मधील नाटु नाटु गीतासाठी एम एम केरवाणी आणि चंद्रबोस
५) २०२३- दि इलेफंट व्हिस्पर्स या लघुपटाच्या उत्कृष्ट विषयासाठी कार्तिकी गोंसालवीस आणि गुणित मोंगा.

दुर्दैवाने भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके या मराठी माणसाने महाराष्ट्रात रोवली असली तरी अजून एकाही मराठी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी साधे नामांकन सुद्धा मिळू शकलेले नाही. याबाबतीत बोलताना जेष्ठ चित्रपट समीक्षक, अभ्यासक, लेखक श्री दिलीप ठाकूर म्हणाले, “२००४ साली जेव्हा श्वास चित्रपटाची प्रवेशिका ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात आली होती, त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, ऑस्कर पुरस्काराविषयी मराठी चित्रपट जगतात चांगलीच जाणीव, वातावरण निर्मिती झाली. पुढे हरिश्चंद्राची फॅक्टरी, कोर्ट या आणखी दोन मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका फक्त ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात आल्या. परंतु दुर्दैवाने आजही ऑस्कर पुरस्काराच्या तोडीचे मराठी चित्रपट बनत नाहीत, ही आपली मोठी शोकांतिका आहे.” श्री दिलीप ठाकूर यांच्या निरिक्षणाशी आणि अपेक्षांशी आपण सर्वच सहमत होऊ, असेच ते आहे.

श्री दिलीप ठाकूर

नाही म्हणायला, आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे श्री उज्ज्वल निगुडकर हे चित्रपट संवर्धक ऑस्कर पुरस्काराच्या तांत्रिक निवड समितीचे सदस्य म्हणून गेली काही वर्षे कार्यरत आहेत. या संदर्भातील कामासाठी वरचेवर ते तिकडे जात सुद्धा असतात. असो.

या निमित्ताने आपण आशा करू या की, ऑस्कर पुरस्कार मिळविण्याचे किरण कुलकर्णी याचे स्वप्न जरी अपूर्ण राहिले असले तरी लवकरात लवकर मराठी चित्रपट ऑस्कर पुरस्कार नक्कीच मिळवतील, अशी आशा करू या.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम