राज्यात सध्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून, तज्ज्ञांच्या मते El Niño या हवामान प्रक्रियेचा परिणाम जाणवू लागला आहे. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने वाऱ्यांचे व पावसाचे चक्र बदलते आणि त्याचा परिणाम भारतासह अनेक भागांवर होत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. ही प्रक्रिया नवीन नसली तरी यंदाच्या उन्हाच्या झळा अधिक तीव्र भासत आहेत.
एप्रिल-मे महिन्यात दुपारच्या सुमारास उष्णतेचा प्रकोप वाढत असून, नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मात्र या कडाक्याच्या उन्हातही शेतकरी, कामगार आणि चाकरमानी यांचे दैनंदिन जीवन थांबत नाही. उगवत्या सूर्याच्या साक्षीने सुरू होणारा त्यांचा दिवस मावळत्या सूर्यापर्यंत कष्टातच व्यतीत होतो. शेतात घाम गाळणारा शेतकरी, बांधकामावर श्रम करणारा कामगार आणि रोजंदारीसाठी फिरणारा चाकरमानी — प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करताना दिसतो.

तापत्या उन्हाच्या झळा सहन करत असतानाही “उद्या पुन्हा सूर्य उगवेल” या आशेवर त्यांचे आयुष्य पुढे सरकत आहे. कष्ट, जिद्द आणि जबाबदारी यांच्या बळावर संसाराचा गाडा चालवणाऱ्या या हातांची कहाणीच आजच्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अधिक ठळकपणे समोर येत आहे.

— छायाचित्रकार : विजय होकर्णे .नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
