Sunday, June 1, 2025
Homeयशकथापद्मश्री जसवंतीबेन जमनादास पोपट

पद्मश्री जसवंतीबेन जमनादास पोपट

१५ मार्च १९५९ … नेहमीसारखाच एक दिवस. परंतु त्या दिवशी दुपारी जसवंतीबेन जमनादास पोपट यांच्या मार्गदर्शनाखाली, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन.एन.तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन व्ही.विठ्ठलानी, दिवाळीबेन लुक्का या त्यांच्या सहा मैत्रिणी गिरगावातील लोहाना निवासच्या गच्चीवर जमल्या होत्या.

त्याचे असे झाले की, जसवंतीबेनचे लग्न फक्त १७ व्या वर्षी झाले आणि ती तिच्या सासरी बहुतेक भारतीय महिलांप्रमाणे, कुटुंबाची सेवा करण्यात गुंतलेली होती. मुले शाळेत जाऊ लागल्यावर दुपारच्या थोड्याशा रिकाम्या वेळी या महिला एकत्र जमून गप्पागोष्टी करीत. एक दिवस, आपण अशा नुसत्या गप्पा करण्यापेक्षा एखादा छोटासा व्यवसाय करू या असे जसवंतीबेनने सुचविले आणि ‘नक्को, दुपारच्यावेळी थोडा आरामच करू या, दिवसभर नुसते काम आणि काम’.. असा एक सूर लागला पण गुजराथी रक्त असलेल्या बेननी गप्पा मारता मारता काम करूया, थोडा हातभार घरखर्चाला… असे पटवून दिले आणि त्यांच्याच सल्ल्याने दुपारचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते छगनलाल करमसी पारेख यांच्याकडून ८० रुपये कर्ज घेऊन त्या पापड बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आल्या होत्या. त्या दिवशी ४ पॅकेट पापड बनवून त्यांनी ते भुलेश्वरमधील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला विकले. त्या दिवशी त्यांना माहित नव्हते की संसाराला थोडाफार हातभार लागावा म्हणून सुरु केलेला हा छोटेखानी उपक्रम एक दिवस प्रचंड मोठा व्यवसाय बनणार आहे.

छगनलाल पारेख, ज्याला छगनबापा म्हणून ओळखले जाते, ते त्यांचे मार्गदर्शक बनले. गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये हे सांगून त्यांनी त्यांना व्यवसाय म्हणून चालवितांना योग्य हिशेब ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सुरुवातीपासूनच, महिलांनी ठरवले होते की संस्थेचे नुकसान झाले तरी त्या देणगी किंवा मदतीसाठी कोणाकडेही जाणार नाहीत.
पापडांची चव चांगली होती, ते लगेच विकले गेले. दुकानदाराने आणखी मागितले आणि मग व्यवसाय सुरू झाला. पंधरा दिवसांत कर्ज फेडले गेले. हळूहळू, परिसरातील बहीणीही सामील झाल्या. (हो, येणाऱ्या सर्वजणी बहिणी … हे तत्व आजही पाळले जात आहे.) दररोज दुपारी सामूहिक पापडाचा कार्यक्रम होऊ लागला. लवकरच त्यांनी व्यवसायासाठी काही उपकरणे खरेदी केली, जसे की भांडी, कपाट, स्टोव्ह इ. पहिल्या वर्षी, संस्थेची वार्षिक विक्री ६१९६ रुपये होती. (त्या काळात ही फार मोठी रक्कम होती. ५० रुपयांत ६/७ जणांच्या कुटुंबाचा महिन्याचा उदरनिर्वाह होत असे.) तुटलेले पापड शेजाऱ्यांमध्ये वाटण्यात आले.

मात्र पहिल्या वर्षी, पावसाळ्यात महिलांना चार महिने उत्पादन थांबवावे लागले कारण पावसामुळे पापड सुकत नव्हते.परंतु समस्येवर उपाय शोधणे हा प्राणिमात्रांचा नैसर्गिक गुण असते. त्यानुसार त्यांनी डोके चालवून पापड खाटांवर आणि खालून चुलीची धग देऊन ही अडचण दूर केली.
मौखिक जाहिराती आणि स्थानिक वर्तमानपत्रांमधील लेखांद्वारे गटाला बरीच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीमुळे त्यांचे सदस्य वाढण्यास मदत झाली कारण आजूबाजूच्या गावांतून गरजू बहीणीही येऊ लागल्या. होय. ५०/६० च्या दशकात मुंबई हे छोट्या /मोठ्या गावांची वस्ती होती. तीन महिन्यांत सुमारे २५ महिला पापड बनवू लागल्या. त्याच्या स्थापनेच्या दुसऱ्या वर्षी, १०० ते १५० महिला गटात सामील झाल्या होत्या आणि तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस त्याचे ३०० हून अधिक सदस्य होते.

यावेळेपर्यंत, सात संस्थापकांच्या इमारतीच्या गच्चीवर सदस्य आणि साहित्य सामावून घेणे शक्य नव्हते, म्हणून मळलेले पीठ सदस्यांमध्ये वाटले जायचे, जे ते त्यांच्या घरी घेऊन पापड बनवत असत. त्यानंतर पापड वजन आणि पॅकेजिंगसाठी परत घेऊन येत. १९६२-६३ पर्यंत, पापडांची वार्षिक विक्री ₹१८२,००० पर्यंत पोहोचली आणि त्यांनी या व्यवसायाचे नामकरण करण्याचे ठरविले त्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली आणि धीरजबेन रूपारेल यांनी सुचवलेले लिज्जत (= गुजरातीमध्ये चवदार) हे नांव निवडले गेले आणि संस्थेचे नांव “श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड” असे ठेवण्यात आले.

जुलै १९६६ मध्ये, लिज्जतने सोसायटी नोंदणी कायदा १८६० अंतर्गत स्वतःची नोंदणी केली. त्याच महिन्यात, छगनबापाच्या शिफारशीवरून केव्हीआयसीचे अध्यक्ष यू.एन. ढेबर यांनी लिज्जतची वैयक्तिकरित्या पाहणी केली. केव्हीआयसी किंवा खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोग ही ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी भारत सरकारने स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. सप्टेंबर १९६६ मध्ये, केव्हीआयसीने लिज्जतला खादी आणि ग्रामोद्योग कायद्यांतर्गत “तृणधान्ये आणि डाळींच्या प्रक्रिया उद्योग गटाशी संबंधित” एक युनिट म्हणून औपचारिक मान्यता दिली. त्याला “ग्रामोद्योग” म्हणून देखील मान्यता देण्यात आली. १९६६ मध्ये, केव्हीआयसीने त्याला ८००,००० रुपये) चे खेळते भांडवल मंजूर केले आणि काही कर सवलतींना परवानगी दिली.त्यानंतर लिज्जतने गगनभरारी घेतली. त्याची भरभराट हा एक स्वतंत्र लेख होऊ शकेल.

टीमवर्क हे ब्रीद असलेला हा उद्योग देशभर पसरला असून संस्थेचे कामकाज अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन सचिव आणि दोन कोषाध्यक्षांसह एकवीस सदस्यांच्या व्यवस्थापन समितीकडे असते. संचालक विविध शाखा आणि विभागांचे प्रभारी असतात. व्यवस्थापकीय समितीचे पदाधिकारी आणि संचालक दर तीन वर्षांनी सदस्य- भगिनींमधून निवडले जातात. प्रत्येक शाखेत अकरा सदस्य- भगिनींची एक समिती असते, जी पुन्हा एकमताने निवडली जाते. सर्व शाखा समान सूचनांचे पालन करतात आणि त्यांची लेखा प्रणाली समान असते. प्रदेश किंवा राज्यातील विविध शाखांचे समन्वय साधण्यासाठी, राज्यातील विविध शाखांच्या शाखा समन्वय समित्या आणि क्षेत्रीय बैठका असतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला संपूर्ण भारतातील शाखा आणि विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य-भगिनी उपस्थित राहतात.

सध्या, लिज्जतच्या शाखा भारतातील आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या
सतरा राज्यांमध्ये आहेत.

भारताच्या विविध भागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेमुळे पापडांची गुणवत्ता बदलू शकते. कोणत्याही विसंगती टाळण्यासाठी, अंतिम उत्पादनांची चाचणी लिज्जतच्या मुंबईतील प्रयोगशाळेत केली जाते. मासिक बैठकांमध्ये, गुणवत्तेचा मुद्दा आणि सुधारणा तपासल्या जातात. अंतिम उत्पादनाची गुणवत्ता राखण्यासाठी केंद्रीय कार्यालय सर्व घटक खरेदी करते आणि वितरित करते. उदाहरणार्थ, हिंग अफगाणिस्तानमधून आयात केला जातो, काळी मिरी केरळमधून येते. समिती अनेकदा विविध शाखांना अचानक भेटी देते जेणेकरून उत्पादन केंद्रे स्वच्छ आहे याची खात्री होईल. जेव्हा लिज्जतची नवीन शाखा उघडण्यात येते तेव्हा शेजारची लिज्जत शाखा नवीन सदस्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन मदत करते. सर्व सदस्य-भगिनींना हिशेब पुस्तके सहज उपलब्ध आहेत, ज्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होते. लिज्जत स्वतःच्या आर्थिक जबाबदारीच्या तत्त्वाचे पालन करते. संस्थेमध्ये कामकाज चालविण्यासाठी कोणतीही क्रेडिट पद्धत नाही. कच्च्या मालाच्या बाहेरील पुरवठ्याशिवाय प्रत्येक पेमेंट दररोज केले जाते. दिलेल्या शाखेच्या सदस्यांमध्ये नफा आणि तोटा समान प्रमाणात वाटला जातो.

लिज्जतच्या सुरुवातीच्या काळात, पहिल्या सहा महिन्यांचा नफा सोन्याच्या स्वरूपात सर्व बहिणींमध्ये समान वाटला जात असे. ही वाटणी पद्धत अजूनही लागू आहे, परंतु आता नफा सोन्यात वाटायचा की रोखीने वाटायचा याचा निर्णय शाखा स्तरावर घेतला जातो. राष्ट्रीय स्तरावरील जाहिरातींचा खर्च सर्व शाखा आणि विभाग त्यांच्या वैयक्तिक उत्पादन क्षमतेनुसार उचलतात.
एखाद्या शाखेने पापडांच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेच्या आणि उत्पादनाच्या तत्वज्ञानाचे पालन करण्यात सलग अपयशी ठरल्यास, केंद्रीय समिती तिच्या सदस्यांचे दैनिक वेतन १ रुपयांनी कमी करते. सदस्य-भगिनींना अतिरिक्त प्रयत्नांसाठी देखील बक्षीस दिले जाते. उदाहरणार्थ, २००२ मध्ये, राजकोट शाखेतील सदस्य-भगिनींना प्रत्येकी ४,००० रुपये बोनस म्हणून मिळाले, तर मुंबई आणि ठाणे शाखेतील सदस्य बहिणींना प्रोत्साहन म्हणून ५ ग्रॅम सोन्याचे नाणे मिळाले.

लिज्जत पत्रिकेच्या अनेक अंकांमध्ये सदस्य-भगिनींच्या नावे/नंबरांची यादी दिली आहे, ज्यांना त्यांच्या अतिरिक्त प्रयत्नांसाठी रोख रक्कम किंवा सोने देण्यात आले होते.
हे सर्व सविस्तर सांगण्याचे कारण जसवंतीबेन यांनी व्यवसाय उपक्रम म्हणून सुरु करतांना जी तत्वे अंगिकारली ठरविले त्याचा एव्हढा प्रचंड विस्तार झाला तरी मूलभूत तत्वे आजही काटेकोरपणे पाळली जात आहेत. पहिल्यापासून त्यांनी यांत्रिकीकरणास विरोध केला कारण जसा व्यवसाय वाढू लागला तसा त्याच्या साहाय्याने समाजातील गरजू स्त्रियांना काम देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबिकरण मिळावे याचा ध्यास घेतला. त्याप्रमाणेच, आजही प्रत्येक पापड हाताने लाटला जातो आणि अंतिम ठिकाणी पोहोचताच महिलांना रोख स्वरूपात पैसे दिले जातात. याचा अर्थ असा की प्रत्येक बहिणीला काम सोपवल्यानंतर तिसऱ्या दिवशी पैसे दिले जातात, ही त्यांची पद्धत आजही कायम आहे.

समाजातील हजारो गरजू, निराधार स्रियांनी पापड लाटून आपली मुले उच्चशिक्षित केली. लिज्जतच्या आजच्या अध्यक्ष, स्वाती पराडकर यांचीच कहाणी वानगीदाखल सांगता येईल.त्या या त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी उपक्रमांत १० वर्षे आल्या. “माझी आई संस्थेसाठी पापड बनवायची. माझ्या वडिलांच्या निधनाने तिला खूप धक्का बसला, ती घराबाहेर पडण्यासही तयार नव्हती. तेव्हा माझ्या शेजाऱ्याने मला मदत करण्यास आणि आईला हे काम हाती घेण्यास सांगितले कारण आमच्याकडे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते,” त्या सांगतात. कालांतराने, त्यांची क्षमता शाखा संचालकाने (प्रभारी) लक्षात घेतली आणि त्यांना वेतन वाटण्यासाठी डेस्कवर बसण्यास सांगितले. हळूहळू, त्या स्टोअरकीपर आणि नंतर शाखा संचालक; सचिव होत संस्थेच्या अध्यक्ष झाल्या. अर्थात आपली जडण घडण कायम लक्षात असल्याने त्यांचाही मदतीचा हात सर्व महिलांसाठी कायम पुढे असतो. या उदाहरणावरून हेही लक्षांत येते की, केवळ काम दिले, करून दिल्यावर पॆसे दिले की संपले असे या संस्थेत न होता, ज्याचे-त्याचे गुण पारखून त्यांना योग्य ती संधीही इथे दिली जाते.
“माझ्या बहिणी, आई आणि मी एकत्रितपणे नियमितपणे ३५ किलो पापड बनवायचो. आमच्याकडे जे काही आहे ते लिज्जतचे आहे. मी गेल्या ५० वर्षांपासून या पापडाशी जोडलेली आहे !” पराडकर भावनाविवश होऊन सांगतात. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, लिज्जतच्या जवळजवळ सर्व महिलांचे … बहिणींचे अनुभव अशा प्रकारचेच आहेत, त्यापैकी बहुतेकजणी लहानपणापासूनच या पापडाशी जोडल्या गेल्या आहेत.

संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाच्या वेळी जसवंतीबेन यांनी माध्यमांना सांगितले की, “मला हे सारे स्वप्नवत वाटते. जेव्हा आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला तेव्हा तो इतका विस्तारला जाईल अशी अजिबात कल्पना नव्हती. आज, १,६०० कोटी रुपयांच्या व्यवसायात पापडा व्यतिरिक्त इतर अनेक वस्तूंचा समावेश आहे, ज्या जगभरातील १५ हून अधिक देशांमध्ये निर्यात केल्या जातात. हे सर्व केवळ बहिणींच्या अथक परिश्रमातून आणि सहकार्यातून होते. दररोज पहाटे ४.३० वाजता काम सुरू होते, जात, पंथ किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही अडथळा न येता. त्या समानतेच्या कल्पनेवर कार्य करतात, ज्यामध्ये मानसिक समानता देखील समाविष्ट आहे.”

पराडकर यांच्या मते, या बहिणींना घरी मिळालेला आदर अवर्णनीय वाटतो. “महिलांना अभिमान आहे की आम्हांला घरी आदर मिळतो. आम्ही सामान्य पार्श्वभूमीतून आलो आहोत आणि जरी आमचे पती नेहमीच कमावणारे राहिले असले तरी, आम्हीही काही करू शकतो हा विश्वास लिज्जतने आम्हांला दिला.”

लिज्जतने १९७९ मध्ये, युनिसेफसोबत मिळून मुंबईत आंतरराष्ट्रीय बाल वर्षाच्या उत्सवाचा भाग म्हणून “बाल संगोपन आणि मातृ कल्याण” या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले. ऑक्टोबर १९८४ मध्ये, भद्राबेन भट्ट यांनी एनआयटीआयई, पवई येथे आयोजित “तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमाच्या आत्मसात आणि प्रसारात महिलांची भूमिका” या विषयावरील युनेस्को प्रायोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत लिज्जतचे प्रतिनिधित्व केले.

मदर तेरेसा यांच्या सूचनेनुसार सदस्य- भगिनींनी आशाधन या निराधार महिलांची काळजी घेणाऱ्या संस्थेच्या काही उपक्रमांमध्येही भाग घेतला.

जसवंतीबेन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रसंगी, लिज्जत सदस्य- भगिनींनी गरीब मुलांसाठी पौष्टिक अन्न वाटप करणे, सामुदायिक विवाह आयोजित करण्यासाठी पैसे देणगी दाखल देणे, प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी बक्षीस रक्कम सुरू करणे, रक्तदान मोहीम राबविणे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण मोहीम आयोजित करणे आणि सरकारी संस्थांना देणगी देणे असे सामाजिक सेवा उपक्रम हाती घेतले जे अजूनही कार्यरत आहेत. लिज्जततर्फे त्यांनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गांव चिंचोली (जोगन) चे पुनर्वसन केले. संस्थेने गांवातील लोकांसाठी अठ्ठावन्न घरे बांधण्यासाठी वित्तपुरवठा केला आणि देखरेख केली. सदस्य-भगिनींनी त्यांच्या दैनंदिन वनाई (मजुरी) मधून पैसे देणगी म्हणून दिले.

गुजरात मध्ये २००१ मध्ये झालेल्या भूकंपानंतर, लिज्जतच्या सर्व शाखांनी एकूण ४.८ दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली. कच्छ जिल्ह्यातील भुजपूर (भचौ) येथील लोकांच्या पुनर्वसनासाठी लिज्जतने चाळीस घरे बांधली.

लिज्जतला १९९८-९९ ते २०००-०१ या कालावधीसाठी केव्हीआयसी कडून “सर्वोत्कृष्ट ग्रामोद्योग संस्था” पुरस्कार मिळाला. २००२ मध्ये, द इकॉनॉमिक टाईम्स अवॉर्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्समध्ये जसवंतीबेन यांस “द वुमन बिहाइंड लिज्जत पापड” ला “इयर बिझनेसवूमन ऑफ द इयर” पुरस्कार देण्यात आला.
९१ वर्षीय जसवंतीबेन यांच्या या अद्वितिय कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २०२१ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना व्यापार आणि उद्योग श्रेणीतील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

घरखर्चाला हातभार लावण्यासाठी, शून्यातून ..नव्हे त्यावेळी घेतलेल्या ८० रुपये कर्जातून… म्हणजे मायनसमधून आज व्यवसाय १६०० कोटी रुपयांच्या घरात नेणाऱ्या (हा २०१९ मधील. पुढचा मला नाही कळला) विशेष शालेय शिक्षणही न घेतलेल्या जसवंतीबेन ! व्यवसाय केवळ पापडांपुरता मर्यादित न ठेवता, डिटर्जंट, धान्याची तयार पिठे, ठेपला, चपाती, ढोकळा, सर्व प्रकारचे मसाले… अशा विविध उत्पादनात विस्तारला आहे. देशात तर सर्वत्र उपलब्ध आहेच परंतु अमेरिका, सिंगापूर, इंग्लंड, थायलंड आणि नेदरलँड्स या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. २०२१ च्या अहवालानुसार देशभरातील ४५,००० महिलांना रोजगार मिळाला आहे. जसवंतीबेन यांनी केवळ व्यवसाय सुरु न करता त्यांची आचारसंहिता मजबूत बनविल्यामुळे सर्व महिला एकमेकींना बहिणी म्हणून संबोधितात आणि तद्वत आचार करतात. दोन बायका एकत्र राहू शकत नाहीत म्हणून खिल्ली उडविणाऱ्यासाठी हा एक अविस्मरणीय धडा आहे. जसवंतीबेन यांची ही गरुडभरारी सर्वांनाच थक्क करणारी आहे.

मला आठवते, लहानपणी आजी घरी पापड करायची पण लिज्जतच्या कररम कुर्रम.. या जाहिरातीमुळे मी एकदा ते पापड आणण्याचा हट्ट केला होता आणि दादाने आणि मी खिदळत कररम् कुर्रम्. म्हणत, ते खाल्ले होते. त्या काळात वर्तमानपत्रातून जाहिराती बघायला मिळत. लहान मुलांना ससुल्या अतिप्रिय आणि लिज्जतचा ससुल्या सर्व बालगोपाळांचा आवडता झाला होता. आईने केलेल्या चकल्या, शेवही आम्ही कररम् कुर्रम् म्हणत खायचो. ही जाहिरात (कृष्ण-धवल) माझ्या वहीत कितीतरी वर्षे जपून ठेवली होती. माझा मुलगाही पापड दिसला की … कररम् कुर्रम्… सुरु.. तीन पिढ्यांचा आवडता, आता पुढील पिढीही बाजारात अनेक चटपटीत पदार्थ असूनही कररम् कुर्रम् करतांना घरोघरी दिसतात.

१९३० मध्ये जन्म झालेल्या, वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत कार्यरत असलेल्या महनीय जसवंतीबेन यांची आठवण सदैव कुरकुरीत पापडासारखी, खास गुजराथी स्वादिष्ट ठेपला, ढोकळ्यासारखी!
सर्वसामान्य गृहिणी ते व्यापार आणि उद्योग श्रेणीतील पदमश्री हा पुरस्कार… जसवंतीबेन.. नमो नमः !!

नीला बर्वे

— स्रोत : आंतरजाल
— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम