“जीजी”
जीजी म्हणजे आमची आजी. वडिलांची आई. तिने आम्हाला हे अनेकवेळा सांगितलं असेल, “तुमची आई गरोदर असायची तेव्हां, मी घरात नाही असे पाहून गल्लीतल्या कोपर्यावरची ती आजी तुमच्या आईकडे गुळ आणि बिब्बा मागायला यायची. म्हणूनच तुमच्या आईला प्रत्येक वेळी मुलगीच झाली. मुलगा झालाच नाही.”
हे सांगताना जीजीचा सावळा, ओघळलेला चेहरा, काहीसा उदास, कसातरीच व्हायचा.
तिच्या गालावरचा चामखीळही त्यावेळी अधिक लोंबल्यासारखा वाटायचा. मग मी हळूहळू जीजीच्या मांडीवर जायचे आणि तिला विचारायचे, “तुला आम्ही नको होतो का ? आम्ही सार्या मुलीच झालो म्हणून तुला वाईट वाटतं कां ? उगीच जन्माला आलो आम्ही.”
मग मात्र ती चिडायची.
“चल,अभद्र कार्टी कुठली ?
तू तर माझ्या जनाचा मुलगाच आहेस हो !”
जीजी आणि आम्ही तिच्या पाच नाती. तिच्याशी आमचं विलक्षण जमायचं. जन्म आईने दिला पण आमचं संगोपन जीजीनेच केलं. तिच्याच खांद्यावर आम्ही वाढलो. आपल्या एकुलत्या एक मुलाला मुलगा झाला नाही, त्याचा वंश बुडाला, भविष्यात त्याचं नाव लावायला कुणी नाही म्हणून तिला सदा दु:ख वाटायचं. पण आम्ही अभ्यास करावा, खूप गुण मिळवावेत, मोठं व्हावं आणि अशा रीतीने तिच्या विद्वान मुलाचं नाव वाढवावं असंही तिला वाटायचं.
परीक्षेचा निकाल असला की आम्ही शाळेतून परत येईपर्यंत जीजी पायरीवर बसलेली असायची. वरचा नंबर आलेला असला की तिला तिच्या वयाचंही भान रहायचं नाही. ती उड्याच मारायची.
“माझा बाबा, माझा हुश्शार बाबा.” म्हणत आमचे पटापट मुके घ्यायची. इतकी आनंदी व्हायची आणि दिवसभर स्वत:शी हसत बसायची आणि जर का आमचा नंबर घसरलेला असला की लगेच म्हणायची, “जाऊदे ! त्या बाई जरा पक्षपातीच आहेत. तुला मुद्दामच कमी गुण दिले असतील. त्यांची मुलगी आहे ना तुझ्या वर्गात ? तिला पुढे आणण्यासाठी तुला ढकलली असेल मागे. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस..”
अशी जीजी ! आभाळागत माया तिची. ती बोलायची ते सारं बरोबरच असायचं असं नव्हे पण या सर्वामागे असायचं ते तिचं निरागस, निर्मळ प्रेम !

आईनं आम्हाला शिस्त लावली, चांगले संस्कार केले, पपांनी आम्हाला जीवनाकडे पाहण्याची अभ्यासात्मक दृष्टी दिली पण जीजीने आम्हाला आधार दिला. त्या कोमल बालपणी, कुठल्याही भयावह क्षणी आम्हाला शिरावसं वाटलं ते जीजीच्या सुरकुतलेल्या कुशीत. तिच्या लुगड्याचा वास आणि तिच्या हाताच्या थोपटण्याने आमची उदासीनता त्या त्या वेळी नक्कीच दूर व्हायची.
तसं आमचं स्वतंत्र कुटुंब. फारसे नातेवाईक नाहीत. आई, पपा, जीजी आणि आम्ही पाच बहिणी हेच आमचं सिमीत विश्व आणि आमच्या कुटुंबावर जीजीचा तसा पहिल्यापासून प्रभाव.
कळत नकळत ती सगळ्यांना तिचं ऐकायला लावायची. पपांचं व्यक्तीमत्व इतकं जबरदस्त, हट्टी पण अनेक वेळा त्यांनाही तिच्यापुढे नमावं लागायचं. तशी ती देवधर्म करणारी नव्हती. उलट तिनं वयाच्या सोळाव्या वर्षापासून इतकं जग पाहिलं आणि इतके कटु अनुभव घेतले की देवाविषयी ती फार भोळी नव्हती. पण घरातून बाहेर जाताना मात्र देवाला नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही हा तिचा शिरस्ता होता. त्यासाठी ती आम्हाला पायरीवरुन परतायला लावायची.
“देवाला नमस्कार केलास ?
आधी कर आणि मग जा.”
पपांनी मात्र तिचा हा नियम कधी पाळला नाही. पण पपा बाहेर पडले की बापूडवाणी होऊन दिवाणखान्यातल्या खिडकी जवळच्या शंकराच्या तसबिरीसमोर पाच मिनीटं हात जोडून काहीतरी पुटपुटत उभी रहायची.
जीजी जशी प्रेमळ, तशी त्रासदायकही होती. तिचं कुणी ऐकलं नाही की ती त्या गोष्टीचा इतका पिच्छा पुरवायची की शेवटी कंटाळून तिचं ऐकावंच लागायचं. एकदा आठवतंय, पावसाळ्याचे दिवस होते पण म्हणावा तसा पाऊस पडत नव्हता. त्या दिवशी तर चक्क ऊन पडलं होतं. आभाळ अगदी मोकळं, निरभ्र होतं. तरीही घरातून निघताना जीजी म्हणाली,
“छत्री घे.”
“काय तरी काय ? इतक्या कडक उन्हात मी छत्री घेतली तर माझ्या मैत्रीणी मला हंसतील आणि मी छत्री कुठेतरी विसरेनही.”
पण गंमत झाली. संध्याकाळी वातावरण एकदम बदललं. आकाश काळंकुट्ट झालं. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस. ओली झालेली मी कशीबशी बसमधून टेंभी नाक्यावर उतरले तर बस स्टाॅपवर जीजी डोक्यावर एक आणि हातात एक छत्री घेऊन उभी !!
ते चित्र कायम माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या दिवसाची तिची ती काळजीभरली प्रेममय नजर मनात कोरली गेली आहे.
“अगं,तू कशाला आलीस इतक्या पावसात ?”
“कार्टे तुला सकाळी छत्री घेऊन जायला सांगितलं तर ऐकलं नाहीस. हट्टी, द्वाड.
किती भिजली आहेस ! न्युमोनिया झाला तर ? परीक्षा जवळ आली आहे.” रस्ताभर ती बोलत होती. घरात शिरल्याबरोबर स्वत:च्या पदरानेच तिनं माझं डोकं खसाखसा पुसलं. गरम पाण्यातून चमचाभर ब्रांडीही पाजली. कितीतरी वेळ नुसती अस्वस्थ होती.
लहानपणी मला वरचेवर सर्दी, खोकला ताप यायचा. डांग्या खोकल्याने मी दोन महिने आजारी होते. कितीतरी औषधे, इंजेक्शने झाली पण खोकला काही थांबायचं नाव घेत नव्हता. एक दिवस कंटाळून मी जीजीला म्हटलं,
“जीजी आता तूच मला बरं कर. तू दिलेलं कितीही कडू औषध मी पिईन पण हा खोकला थांबव. नाहीतर मी मरुन जाईन. “तिच्या अंत:करणातला मायेचा झरा, तिच्या डोळ्यातून ठिबकला. एरवी मला सतत ‘कार्टी भामटी’ म्हणणारी… तिनं मला पदरात वेढून घेतलं.
“असं बोलू नकोरे बाबा ! संध्याकाळच्या वेळी कसलं हे अभद्र बोलणं. मी कशी मरु देईन तुला ?” अन् तिने माझे मटामट मुके घेतले. मग ती सकाळीच घराबाहेर पडली. कुठे गेली कोण जाणे ? पण परत आली तेव्हा तिच्या हातात हिरवीगार अढुळशाची पानं होती. तिनं ती स्वच्छ धुवून पाट्यावर वाटली आणि त्याचा रस काढला. आणि तो कडू रस, “अच्च्युताय नम: गोविंदाय नम:” असं म्हणत माझ्या घशात उतरवला. लागोपाठ सात दिवस या धन्वंतरीची ट्रीटमेंट मी याच पद्धतीने घेतली आणि खरोखरच माझा तो जीवघेणा खोकला बरा झाला.
तिची श्रद्धा, तिची मेहनत आणि तिच्या ममतेपुढे तो रोग नमला. तिला इतकी आयुर्वेद उपचारपद्धती कशी माहीत होती, ते गुपीतच होतं पण तिने केलेले लेप, गुट्या, चाटणे, काढे यांच्यामुळे आमच्या व्याधी झटकन् बर्या व्हायच्या.
जीजी सार्यांसाठी झटायची. तिला आमच्यापैकी कुणाचंही काही करताना कधीही कंटाळा आला नाही. तिच्या मनात आमच्याबद्दल अत्यंत माया होती. ओलावा होता.
जीजीची तिसरी नात छुंदा. आमच्या सर्वांपेक्षा हुशार, अत्यंत अभ्यासू. जीजीला तिचा फार अभिमान.
“हा माझा अर्जुन हो !” असं सगळ्यांना सांगायची.
पण जीजीची ही नात फार रडकी आणि खेंगट. शाळेत जाताना रडायची. म्युनिसीपालिटीची बारा नंबरची शाळा तिला आवडायची नाही पण घराजवळची शाळा म्हणून आमचं सर्वांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. आम्ही कुणीच शाळेत जाताना त्रास दिला नाही पण छुंदाने खूप त्रास दिला. जीजी रोज तिच्याबरोबर शाळेत जायची. शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसून रहायची. ना भूक, ना तहान. छुंदा वर्गातून बाहेर येऊन खात्री करुन घ्यायची, जीजी पायरीवर असल्याची. छुंदा पाचवीत जाईपर्यंत ही जोडगोळी शाळेत जायची. छुंदा वर्गात अन् जीजी पायरीवर. पुढेपुढे तर छुंदाच्या वर्गबाईंनाही जीजीची सवय झाली. ही एवढी म्हातारी बाई नातीसाठी ५—६ तास पायरीवर बसून राहते याचं त्यांनाही प्रचंड कुतुहल वाटायचं. कधी कधी तर बाईंना काही काम असलं तर त्या जीजीलाच वर्ग सांभाळायला सांगायच्या. वर्गातल्या सार्यांचीच ती आजी झाली होती.
पुढे छुंदा ऊच्च श्रेणीत केमीकल इंजीनीअर झाली. आजही ती म्हणते.”जीजी नसती तर मी शिकले असते का ?” इंजीनीअरींगचं पदवी प्रमाणपत्र जीजीच्या हातात देत ती म्हणाली होती.
“खरं म्हणजे ही पदवी तुलाच दिली पाहिजे.”
त्याक्षणी तिच्या चेहर्यावरचा आनंद, डोळ्यातलं पाणी अतुलनीय होतं.
मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही महिनाभर ग्रँटरोडला आजोबांकडे रहायला जायचो. जीजी आणि पपा फक्त घरी. पपा तर दिवसभर बाहेरच असायचे. म्हणजे जीजी एकटीच घरात. कधीकधी पपाही आमच्याबरोबर असायचे. म्हणजे जीजी अगदी एकटीच. रात्री आमच्या नात्यातला एक काका तिच्या सोबत असायचा. पण ती आम्ही परत घरी यायची वाट बघायची. ती आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या घालून ठेवायची. त्यावेळी ठाण्याजवळ जंगलात रहाणार्या कातकरी आदिवासी बायका आमच्या घरी आंबे घेऊन यायच्या. प्रत्येक आंबेवालीशी हुज्जत घालून निवडून ती आंबे विकत घ्यायची. त्यांनाही सांगायची,
“आता माझ्या नाती येतील. त्यांना आंबे लागतील. त्या येईपर्यंत पिकलेल्या आंब्यांची अढी तयार होईल. “तिचं सारं विश्वच आमच्यात सामावलेलं होतं. आम्ही परत आलो की, माळ्यावर ढीगभर पसरलेले आंबे पाहून आनंदून जायचो.
तसे आजोबांकडेही आम्ही आंबे खात असू पण आजोबांकडे सगळं शिस्तीत, नियमात, वेळेत. जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. भरपूर, केव्हांही, कधीही आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता.
आता वाटतं, आम्ही जीजी ला एकटीला टाकून जायचो. कशी राहिली असेल ती एकटी ?
आमच्याशिवाय किती सुनी सुनी झाली असेल ती !
कधी सांगायची,”अगं, त्या दिवशी वेणू आली होती. या एवढ्या मोठ्या करपाल्या कोलंब्या घेऊन. पाठीसच पडली. “घेच गं म्हातारे ! तुला द्यायच्या म्हणून कुणालाच दिल्या नाहीत.”
“पण कुणासाठी घेऊ बाई ? माझी नात नाही खायला. ती आली की आण पुन्हा नक्की. आता दे त्या चित्रेबाईला.”
पण बिंबाला किती आवडतात या तळलेल्या कोलंब्या, म्हणून तिचा जीव हळहळायचा.
रविवार असला की, पाट्यावर नारळ वाटून जीजी त्याचं दूध काढायची आणि नहाण्यापूर्वी ती केसांना छान लावून द्यायची. त्यावेळी मिक्सर नव्हते. केसांना शांपू लावणे अथवा बाजारात मिळणारे केसांचे साबण लावणे तिला अजिबात मान्य नसायचे.
सगळ्या नातींचे केस दाट आणि काळेभोर. आता या सगळ्याचे श्रेय जीजीलाच जाते पण त्यावेळी तिचा रागच यायचा. तिची ही साग्रसंगीत औषधं लावण्याचा आम्हाला कंटाळा यायचा म्हणून आम्ही तिच्याशी वाद घालायचो, भांडायचेही. पण ती ऐकून घ्यायची आणि तिला जे करायचे तेच करायची. कधी चिडून दांतओठ खायचीही, म्हणायची, “कार्टीला अक्कल नाही. चांगलं कळत नाही. दळभद्री कुठली.”
जीजीची गंमत वाटायची. एव्हढं आयुष्य तिनं उन्हात काढलं. सोळाव्या वर्षी विधवा झाली. पदरात चार महिन्याचं मुल. त्यावेळचा सामाजिक काळही चांगला नव्हता. विधवा बाईला खूप पीडा. तिला तिच्या सासरच्या माणसांनीही खूप त्रास दिला. कधी ती सांगायची,
“मला जीवनाचा कंटाळा आला होता. मी जनाला घरीच पाळण्यात ठेवले आणि तळं गांठलं. आता जीवच द्यायचा. तळ्याजवळच्या शंकराच्या देवळात घंटा वाजत होत्या. पाण्यात खूप कमळं फुलली होती. का कोण जाणे ! मला एकदम वाटलं, पाळण्याच्या दांड्यात माझ्या बाळाचा पाय अडकलाय, माझं बाळ रडतंय्, त्याच्याजवळ कुणीच नाही आणि मी झपाट्याने घरी धावत आले. बाळ पाळण्यात शांत झोपला होता.
गुटगुटीत, गोरागोमटा, भव्य कपाळ, काळंभोर जावळ. मी त्याला छातीशी कवटाळलं आणि ठरवलं याला मी वाढवेन, मोठा करेन, चणे दाणे खाईन, खूप कष्ट करेन.”
कष्टच केले तिने. आयुष्यभर, तेव्हांही, नंतरही, या ना त्या कारणाने, अथक, कंटाळा न करता. पप्पा एव्हढाले कोहळे आणायचे. ते कीसायचे. त्याचा रस काढायचा. पातेल्यात साखरेच्या पाकात शिजवून वड्या करायच्या. टोपलीभर कमळाचे देठ आणायचे, ते गोल कापायचे. तिखट मीठ, जीरपूड लावून वाळवायचे आणि तळून खायचे. त्याला कमळाची भिशी म्हणत. ही भिशी करणं अपार कटकटीचं होतं. गवारीच्या शेंगा ताकात भिजवून नंतर वाळवायच्या. बरण्या भरुन लोणची, मुरंबे करायची. दिवाळीच्या दिवसात, सुगंधी उटणे ती घरी बनवायची. अनारशाचे ओले तांदुळ जात्यावर दळायची. आम्हाला म्हणायची,
“येगं ! जात्याला हात लाव. माझे हात दुखतात. तुझ्या आईलाही भरपूर कामं असतात.”
पण आम्ही तिला कधीतरीच मदत करायचो. खरं म्हणजे हे ती सर्व आमच्यासाठीच करत होती. आता तिच्या हातचे जाळीदार कुरकुरीत सोनेरी अनारसे आठवले की वाटतं, ती गोडी अवीट होती आणि आता कायमची दुरावली.
पपांची आणि जीजीची भांडणं व्हायचीच. कधीकधी तर दोघेही मागे हटायचे नाहीत. आपला मुलगा आपल्याला बोलतो याचं तिला खूप दु:खं होत असलं पाहिजे आणि आम्हीही तिची बाजू उचलून धरायचे नाही. मग ती पिळवटून म्हणायची,
“जाते रे बाबा, मी आता देवळात बसते तिथे जाऊन. आता या घरात माझी गरज नाही उरली.”
आणि ती खरंच जायची कुठेतरी. भांडण संपायच पण घरातलं वातावरण गढुळ व्हायचं. जीजीला आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. ती जाणार तरी कुठे होती ?
त्यादिवशी दिवसभर शाळेत उदास वाटायचं. मन हळहळायच. उगीच बोलतात पपा तिला. पपांची तत्वं कठोर. न पटणार काहीही ते कधीच करायचे नाहीत.
जीजीनं तरी कशाला अट्टाहास करावा ? जाऊ द्यावं ना ! काय करायचं आता आपण ?
पण शाळेतून घरी आल्यावर, मधल्या खोलीत जीजी पांघरुण घेऊन झोपलेली असायची. रात्री सगळे झोपले की मी हळुच तिच्या जवळ जायची. ती जागीच असायची मग डोळ्यात पाणी आणून मला जवळ घेत म्हणायची,
“मला एखादी तरी मुलगी हवी होती. मुलीची माया वेगळी असते !!” खरं सांगू तेव्हां तिच्या जखमा आम्हाला दिसल्याच नाहीत. त्याही वेळी तिने मला लपेटून घेत म्हटलं होतं..
“तू जेवलीस ना ? फडताळ्यात तुझ्यासाठी तळलेली सुरमई ठेवली होती. आईनं तुला वाढली कां.?”
किती विलक्षण प्रेमाचं नातं हे ! याची जात कुठली ? याचा रंग कुठला ? या ओबडधोबडपणातही गुलाबपाण्याचा स्पर्श होता. जीवनातली ती शीतलता होती.
जीजी आजारी पडायची. इतकी आजारी पडायची की आम्हाला वाटायचं आता ती यातून वाचणार नाही. पपा तिचे हात पाय दाबायचे आणि त्यांच्या टपोर्या डोळ्यांतून अश्रु गळायचे.
एका मे महिन्यात आमची काश्मीरची सहल ठरली होती आणि नेमकी जीजी आजारी पडली. खूपच आजारी होती ती. सहल
रद्दच करायची वेळ आली होती. पण ती डाॅक्टरना सांगत होती,
“डाॅक्टर, या वेळेस कसंही करुन मला बरं करा. नाहीतर माझ्या नातींचा हिरमोड होईल. त्यांची काश्मीर सहल सुखरुप पार पडू देत. मग माझं काही होऊ देत.”
डाॅक्टर हसायचे. त्यांना जीजीची चमत्कारिक प्रकृती माहीत होती. ते म्हणायचे,”आजी तुम्ही आज आजारी आहात. पण उद्या ओकांच्या घरी जास्वंदीची फुलं द्यायला जाल.”
जीजी मला म्हणाली होती,
“हे बघ ! माझं काही बरं वाईट झालं तरी तुम्ही सहलीला जाच बरं ! माझं काय मेलं महत्व ? मी म्हातारी. कधीतरी मरणारच. पण तुम्ही जा.
इतके पैसे भरलेत, हौस केलीय्. जाच बरं !
लोक काय म्हणतील याचा विचार नका करु ?”
पण ती जगतच राहिली. प्रत्येकवेळी तिच्या जगण्याला कारणच मिळायचं जणु.
आजारपणात ती देवाला विनवायची, “बाबारे ! या निशाचं एव्हढं बाळंतपण होऊ दे !
पहिल्या खेपेस तिचं ऑपरेशन झालं. आतां काय होतंय् कोण जाणे ? सारं सुखरूप होऊदे रे बाबा ! तिला धडधाकट पाहू दे मग ने मला.”
पपांना पहिला हार्ट ॲटॅक आला तेव्हांही जीजी अशीच आजारी होती. गादीत पडल्या पडल्याच पुटपुटायची,
“माझा जना असा गादीवर. माझं काही झालं तर हा उठेल, खांदा देईल मग नंतर याला काही झालं तर ? नको आधी माझ्या जनाला बरं कर मग मला ने”.
जीजीच्या आयुष्याची दोरी अशी वाढतच गेली. ती इतकी लांबली की तिच्या आयुष्यातली एक शोकांतिका टळली नाही. पपा गेले.
ती राह्यली. देवळातला घंटानाद आणि तळ्यातल्या कमळांना साक्षी ठेवून तिनं तिच्या बाळाला वाढवायचं व्रत घेतलं होतं. ते व्रत तिने आयुष्यभर पाळलं. ती आम्हाला अनेक गोष्टी वारंवार सांगायची. त्यातलीच एक गोष्ट ही होती.
“जना लहान असताना त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं. आपली आई सोडून गेली. मग तो स्वप्नातून जागा व्हायचा. माझ्या कुशीत शिरुन म्हणायचा, “आई तू मला सोडून कधीही जाऊ नकोस. “मग ती म्हणायची” नाही रे बाबा, मी तुला अगदी जन्मभर पुरेन ! घाबरू नकोस.”
जणुं जीजीचे शब्द खरे ठरले की पपांना दिलेलं वचन तिने पाळलं ?
पण आमचे पपा गेले आणि आम्ही दु:खात बुडालो. पपा आमचे सर्वकाही होते. वडील, मार्गदर्शक,मित्र,आम्हां सगळ्यांना शोकाकुल बघून ती कळवळली. तिनं आम्हां सार्यांना जवळ घेतलं.
“बाबांनो ! वडीलांच्या मृत्युचे दु:ख नका करु. पिकलं पान गळणार. मुलांच्या आधी बापानं जावं हाच जगाचा नियम. माझा बाबा गेला. मी मागे उरले, उलटं झालं. माझ्या मरणाचं दु:ख बाबाला सहन झालं असतं का ? माझ्यात दु:ख सोसण्याची ताकद आहे. त्याला नसतं सोसलं म्हणून मी राहिले.”
जीजी ९७ वर्षाची होती, ती पण हिंडती फिरती होती. मी माहेरी येणार असले की तिची फार धावपळ असायची. माझ्यासाठी माझ्या आवडीचे खाद्यपदार्थ करण्याचा तिचा केव्हढा आटापिटा असायचा.
पहाटे दारात रिक्षा थांबली तर लगबगीने दार उघडायला तीच त्याची यायची. दारातच विळखा घालायची, पापे घ्यायची. इतकी कृश झाली होती ! नजरही अंधुकली होती.
पण आम्हाला ती डोळ्यांच्या पलीकडे बघू शकत होती.
जातांना निरोप घेताना तिला म्हणावं,
“येते हं जीजी.”
“नीट जा हं !
परत कधी येशील ?”
मनात यायचं परत येईन तेव्हां ही असेल का ?
ती म्हणायची, “आता देवानं मला न्यावं ग ! कधी मरेन मी ?”
तिचा हा प्रश्न किती केवीलवाणा असायचा.
ती गेली.
त्यादिवशी मला दार उघडायला ती नव्हती.
दाराला लटकलेलं तिच्या अस्थींचं गाठोडं पाहिलं अन् प्रवासात धरून ठेवलेला बांध तुटला.
जाणवलं.
आयुष्यातला एक निस्सीम प्रेमाचा कोनाडा रिकामा झाला !! अशी आभाळा एव्हढी माया आता कोण करेल ?

२०२२ साली मी जीजीचं आत्मवृत्तपर पुस्तक, ”जीजी” प्रकाशित केलं. तिचं ऋण तर कधीच फेडू शकणार नाही पण पुस्तकरुपात मी तिचं अस्तित्व आमच्यात टीकवण्याचा फक्त प्रयत्न केला.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800