‘जागतिक सर्कस दिन’
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिस-या शनिवारी साजरा केला जातो. त्यानुसार आज, १९ एप्रिल रोजी जागतिक सर्कस दिनानिमित्त वाचू या, थोर देशभक्त प्राणी प्रशिक्षक तथा सर्कशीतील रिंग मास्टर श्री दामू धोत्रे यांची रंजक आणि प्रेरक जीवन कहाणी.
श्री दामू धोत्रे यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
सर्कस हा शब्द सर्क्युलस ह्या लॅटीन शब्दापासून बनलेला आहे. सर्क्युलस म्हणजे रिंगण. आधुनिक सर्कशीचा उदय अठराव्या शतकात झाला. इंग्लिश अश्वारोहणपटू फिलिप स्ट्ली (१७४२-१८१४) हा आधुनिक सर्कसचा जनक मानला जातो. रिंगणात कौशल्यपूर्ण कसरती व घोड्यांवरील खेळ करून दाखविणारा तो पहिला खेळाडू होय. अठराव्या शतकातील युरोपीय सर्कशींचे प्रयोग एकाच ठिकाणी, कायमचा तंबू लावून वा बंदिस्त हॉलमध्ये केले जात. मोठ्या कायमस्वरूपी इमारतींमध्येही त्यांचे प्रयोग केले जात.
अमेरिकन सर्कसचालकांनी सर्कशीचे प्रयोग ग्रामीण भागात नेण्यासाठी फिरत्या सर्कस कंपन्यांची पद्धत सुरू केली. ह्या सर्कसमंडळ्या त्यांच्या साऱ्या लवाजम्यासह एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवासी वाहतुकीद्वारा नेल्या जात. हळूहळू जगात सर्कसने खूपच लोकप्रियता मिळवली. रशियामध्ये तर चक्क सर्कससाठी शाळा सुरु झाली.
आपल्या भारतात देखील सर्कस सुरु झाली. १८८२ मध्ये चर्नी विल्सन ह्यांनी मुंबईमध्ये सर्कस आणली होती. त्या सर्कशीचा खेळ विष्णुपंत छत्रे ह्यांनी पाहिला. विष्णुपंत छत्रे हे आपल्या भारतीय सर्कसचे पितामह आहेत. त्यांनी २६ नोव्हेंबर १८८२ रोजी ग्रँट इंडियन सर्कस सुरु केली. मुंबईत सर्कशीचा जन्म झाल्याने पुढे आपल्या महाराष्ट्रातील अनेक गावांत सर्कसचे कलाकार तयार झाले, ज्यांनी परदेशात जाऊन देखील नाव कमावले.

देवल, कार्लेकर आणि ‘परशुराम लायन’ या त्या काळातल्या भारतातल्या सर्वांत मोठ्या तीन सर्कस होत्या. ‘परशुराम लायन सर्कस’ ही परशुराम माळी यांनी १८९०च्या सुमारास तासगावला सुरू केली. लोकमान्य टिळकांनी परशुराम माळी यांना ‘द लायन ऑफ द सर्कसेस’ ही मानाची पदवी दिली आणि त्यावरून त्यांच्या सर्कसला ते नाव पडलं. या सर्कसमध्ये वाघ, सिंह, हत्ती, घोडे इत्यादी जनावरांचा मोठा भरणा होता. परशुराम लायन सर्कस १९५५ ला मिरज इथं बंद पडली.

कार्लेकर सर्कसमधील शेलार यांनी स्वत:ची ‘शेलार्स रॉयल सर्कस’ १९१० मध्ये सुरू केली. ताराबाई शिंदे (सु. १८७५-१९८५) ही भारतातील पहिली महिला सर्कसपटू मल्ल होत्या. कार्लेकर ग्रॅण्ड सर्कसमध्ये शक्तिप्रदर्शनाची आणि साहसाची कामं त्या करीत असत, तसंच वाघ-सिंहांबरोबर कुस्तीसारखे धाडसी खेळ, झुल्यावरील कसरती इत्यादी करीत असत. पुढे त्यांनी स्वतःची ‘ताराबाई सर्कस’ स्थापन केली. नारायणराव वालावलकर यांनी ‘दि ग्रेट’ भागीदारीत सुरू केली. त्या भारतात आणि परदेशांतही प्रेक्षणीय खेळ करून दाखवत असत.

यात २० व्या शतकात ‘देवल सर्कस’ अत्यंत नावारूपाला आलेली प्रसिद्ध सर्कस होती.मिरजेजवळ म्हैसाळ गावी १८९५ च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर महादेव देवल आणि त्यांच्या अजून २/३ भावांनी ‘देवल सर्कस’ ची स्थापना केली. पाहता पाहता तिची प्रसिद्धी आणि आवाका प्रचंड वाढला आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारताबाहेर अफगाणिस्तान, सिंगापूर, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा आदी ठिकाणी खूप मोठा यशस्वी दौरा झाला. त्याकाळी आशिया खंडातील ही सर्वात मोठी सर्कस समजली जात असे ! सफाईदार कसरती, नेत्रदीपक रोषणाई, चित्तथरारक खेळ यासाठी ‘देवल सर्कस’ प्रसिद्ध होती !

स्व. दामू धोत्रे हे प्रख्यात वन्य प्राणी प्रशिक्षक आणि सर्कशीत रिंग मास्टर होते. ते सर्कशीत वाघ, सिंह इत्यादि प्राण्यांचे खेळ घ्यायचे. त्यांची बहुतांशी कारकीर्द युरोप खंडातील सर्कसमध्येच गेली.
दामू धोत्रे हे उतार वयात पुणे येथील टिळक रस्त्यावर “सर्कस व्हिला” नावाचा बंगला बांधून स्थायिक झाले. सुमारे १९७० च्या आसपास एकदा पुणे येथे त्यांना भेटायला गेलो असता त्यानी मला चक्क दोन तास वेळ दिला. सर्व तिकडची कागदपत्रे, प्रेक्षकांची पत्रे, मिळालेले पुरस्कार सर्व काही दाखवलं, आपले अनुभव सांगितले. त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं ते त्यांनी मला भेट दिलं. पुस्तकाचं नाव होतं “वाघ सिंह माझे सखे सोबती.” अतिशय सुंदर पुस्तक होतं.

या पुस्तकात दामू धोत्रे यांनी एक चित्त थरारक, जीवघेणा अनुभव लिहिला आहे. एकदा रात्री सर्कशीचा खेळ चालू असताना अचानक वीज गेली. त्यावेळी रिंगणात चार-पाच वाघ, चार-पाच सिंह, हत्ती आणि इतर अनेक प्राणी यांचा खेळ सुरु होता. दामू धोत्रे स्टुलावर उभे राहून प्राण्यांना आज्ञा देत होते. एकाएकी वीज गेल्याने काहीच दिसेना. प्रेक्षकांत गोंधळ होऊ लागला. दामू धोत्रे यांना वाटलं की आता आपला अवतार संपला. प्राणी गोंधळून जाऊन आपल्यावर हल्ला करणार, रिंगणातून बाहेर पडून प्रेक्षकामध्ये घुसणार. रिंगणातून बाहेर पडायला काही दिसतही नव्हतं आणि त्याच स्थितीत जनावरांना सोडून आपण बाहेर आलो आणि जनावरं बाहेर पडली, प्रेक्षकात घुसली तर हलकल्लोळ झाला असता. दामू धोत्रे जिवाच्या आकांताने ओरडत होते, “आय वॉन्ट लाईट, आय वॉन्ट लाईट.” अर्थात सर्कशीचा कर्मचारी वर्ग लगबगीने पेट्रोमॅक्स बत्ती लावून ते रिंगणापर्यंत आणायचा प्रयत्न करीतच होते. पण त्यात जो काही वेळ गेला, जी भीषणता आणि तणाव निर्माण झाला होता, तो आयुष्यात विसरण्यासारखा नव्हता.
थोड्याच वेळात पेट्रोमॅक्स बत्या (दिवे) आल्या. पाठोपाठ वीज देखील आली. त्यांनी समोर पाहिलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एकाही प्राण्याने आपली जागा सोडली नव्हती. ते तसेच्या तसेच उभे होते आणि वाट बघत होते रिंग मास्टर पुढील आज्ञा का देत नाही म्हणून! खेळ पुन्हा सुरू झाला आणि व्यवस्थितपणे संपला. पण घडलेल्या प्रसंगाने दामू धोत्रे यांच्यावर एवढा ताण आला होता की जर रिंगणातून प्राणी बाहेर पडले असते तर किती प्रेक्षक जखमी झाले असते, केवढा हाहाकार माजला असता ? मात्र काही झालं नाही. हे प्राणी जागच्या जागीच का थांबले हा विचार करत असताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की प्राण्यांना रात्री पण दिसतं. त्यामुळे वीज गेली तरी त्यांना दिसतच होतं. म्हणजे प्राण्यांच्या लेखी वेगळं काही घडलं नव्हतं, त्यामुळे ते प्राणी जागच्या जागी स्तब्ध होते. यातला आणखी भाग असा की “आय वॉन्ट लाईट” म्हणून दामू धोत्रे ओरडत असताना एका प्रेक्षकाने आपल्या जवळचा सिगरेट लायटर पेटवला आणि क्षणार्धात प्रेक्षकांमध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे सिगरेट लायटर होते ते त्यांनी पेटवले आणि जो काही थोडा थोडा प्रकाश निर्माण झाला त्याने देखील धोत्रे यांना धीर आला. त्यांनी लिहिलं आहे, “तो जो कोणी अनामिक होता ज्याला पहिल्यांदा लायटर पेटवायचं सुचलं त्याला माझे कोटी कोटी प्रणाम !”
एखाद्या प्राण्याचा दोन मिनिटांचा खेळ आपण पाहतो पण त्याला तेवढं शिकवण्यासाठी किती मेहनत घ्यायला लागते, ते सांगताना एका रेड्याचे उदाहरण देताना दामू धोत्रे म्हणतात, “रेड्याच्या शिंगाना दोन दोऱ्या बांधून दोन्ही बाजूला एक एक माणूस दोरी धरून उभा असतो. रिंग मास्टर रेड्याच्या समोर उभा राहून लेफ्ट असं ओरडतो आणि त्याच वेळी रेड्याच्या डाव्या बाजूला उभा असलेला माणूस दोरी खेचतो म्हणजे रेड्याचं तोंड डाव्या बाजूला वळले जाते. नंतर रिंग मास्टर राईट असे ओरडतो. त्यावेळी उजवीकडे उभा असलेला माणूस दोरी खेचतो आणि मग रेड्याचं तोंड उजवीकडे वळत. अशाप्रकारे सात-आठ वेळा करून झालं की मग रेड्याला काहीतरी खायला देतात त्याच्या आवडीचं. अशाप्रकारे 12 ते 15 दिवस रोज केल्यानंतर रेड्याला तशाच प्रकारे दोरी बांधून उभं केलं जातं. मात्र त्यावेळी दोन्ही कडची माणसं दोरी खेचत नाहीत फक्त हातात धरून राहतात, पण रेड्याला सवय झाल्यामुळे जणू काही त्यांनी दोरी खेचली आहे असं समजून लेफ्ट म्हटल्यावर तो डावीकडे तोंड वळवतो. राईट म्हटल्यावर उजवीकडे वळवतो. अशा प्रकारे सात आठ दिवस तालीम केल्यानंतर दोरी न बांधता रेड्याला उभं केलं जातं आणि लेफ्ट राईट तालीम करून त्याच्या आवडीचा पदार्थ खायला दिला जातो. केवळ लेफ्ट राईट या दोन शब्दांसाठी इतकी मेहनत करावी लागते. त्यानंतर मग इतर कमांडस् शिकवायच्या ! “यावरून प्राण्यांना शिकवणं हे किती कष्टाचं काम आहे ते कळतं.
दामू धोत्रे यांचे औपचारिक शिक्षण फक्त चौथी पास होतं. मात्र सुमारे 35 वर्ष युरोप खंडात राहिल्यामुळे त्यांचे इंग्रजी बोलणे एकदम फर्डे होतं. सर्कशीतले रिंग मास्टर म्हणून त्यांचं काम पाहून प्रेक्षकांनी पाठवलेली प्रशंसेची पत्र त्यांचेकडे हजारोंच्या संख्येने होती. तथापि आपल्या देशात अशा प्रकारे प्रशंसेची पत्र पाठवणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अतिशय नगण्य असते ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
दुसरी एक मजेशीर गोष्ट दामुजीनी सांगितली. ते म्हणतात की, जगातील प्रत्येक सर्कशीत रिंग मास्टरच्या हातात चाबूक असतो आणि अंगावर काटा येईल असा त्या चाबकाचा आवाज तो काढीत असतो. त्या आवाजाला घाबरून प्राणी रिंग मास्टरची आज्ञा पाळीत असतात. दामूजी पुढे सांगतात की, आजवर कुठल्याही रिंग मास्टरने प्राण्याला चाबूक मारलेला नाही. तो फक्त चाबूक दाखवून त्यांना घाबरवीत असतो. जर का वाघाला चाबूक मारला तर त्या क्षणी वाघाला कळून चुकेल की याच्या तथाकथित शस्त्रात काही दम नाही आणि तो पुढच्या क्षणी रिंग मास्टरवर हल्ला करील. किती सूज्ञपणाचे बोल आहेत हे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कुणीही त्यांची स्वाक्षरी घ्यायला आला तर ते “दामू धोत्रे ऑफ इंडिया” अशी स्वाक्षरी करीत असत. केवढं हे देशप्रेम !
काही वर्षांपूर्वी मी पुणे येथे एका व्याख्यानाला गेलो असताना भाषणात दामू धोत्रे यांचा मी उल्लेख केला. योगायोगाने प्रेक्षकांमध्ये त्यांचा नातू बसलेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो मला भेटायला आला आणि आपल्या आजोबांची मी एवढी आठवण ठेवल्याबद्दल त्याने खूप समाधान व्यक्त केलं.
अत्यंत धाडसी, प्रखर देशभक्त आणि परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दामू धोत्रे यांना विनम्र अभिवादन.

— लेखन : चंद्रशेखर ठाकूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दामू धोत्रे यांची चित्तथरारक कहाणी.