Sunday, June 1, 2025
Homeयशकथासमाजभूषण उमाकांत रासने

समाजभूषण उमाकांत रासने

डोंबिवली येथील प्रॉपर्टी कंसल्टन्ट उमाकांत रासने उर्फ अप्पा यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी संघर्षातून समृद्धी कशी मिळविली, त्याच बरोबर ते समाजासाठी कल्याणासाठी कसे योगदान देत आले आहे, हे जाणून घेऊ या. अप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

मुंबईत येणाऱ्या लाखो तरुणांप्रमाणे,परंतु एकटे न येता १९९३ मध्ये पत्नी आणि २ लहान मुलांसह डोंबिवलीत पदार्पण केलेल्या उमाकांत रासने उर्फ अप्पा यांच्या डोक्यावर येतानाच २० हजार रुपयांचे कर्ज होतं. स्वत:ची जागा नव्हती.आल्या आल्या त्यांनी टीव्ही अँटेना लावण्याचे काम केले. ते करत असतांना इस्टेट एजेन्सीचा मार्ग त्यांना सापडला.

सुरुवातीला अप्पांनी भावाच्या दुकानातून व्यवसाय सुरू केला. भरपुर कष्ट केले. त्यामुळे त्यांना ६ महिन्यात स्वत:चा गाळा विकत घेता आला. १९९४ साली त्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर रासने ग्रुप नावाने फर्म चालु केली. सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत काम, प्रामाणिक व्यवहार, योग्य मार्गदर्शन या तत्वाने सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे थोड्याच कालावधीत त्यांचा चांगला नावलौकिक झाला.

आप्पांनी गेल्या ३० वर्षांत जवळपास ४००० लोकांना जागा दिल्यात. साधारण एकावेळी २०० घरांच्या चाब्या त्यांच्याकडे असतात. त्यांनी फसवणूक केली, अशी तक्रार आजपर्यंत कुणीही केली नाही, इतक्या सचोटीने ते व्यवहार करीत आले आहेत. ३० वर्षे पूर्ण झाल्याची ग्राहकांना भेट म्हणून या वर्षभरात त्यांच्याकडून विक्री होणाऱ्या जागेवर ते जागा मालकाकडून काही कमिशन घेणार नाहीत, असे त्यांनी ‘न्यूज स्टोरी टुडे’ शी बोलताना सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले ते डोंबिवली व्हाया धुळे, चाळीसगाव असा अप्पांचा प्रवास अत्यन्त खडतर राहिला आहे. अकोले येथे २१ मे १९५५ रोजी त्यांचा जन्म झाला. बालपण सुखात गेलं. शालेय शिक्षण तिथेच पूर्ण झाले. १९६५ साली वडीलांनी शेती घेतली. पण मूळ व्यवसायात दुर्लक्ष होत गेल्याने आर्थिक परिस्थिती खालावली.

१९७१ ला अकरावी उत्तीर्ण झालेल्या अप्पानी स्वतःची पुस्तकं विकून आलेल्या पैश्यातून बसभाड्याची व्यवस्था करून धुळे येथील आत्याचे घर गाठलं. तिथे रोज सकाळी ७ ते १० कॉलेज, १० ते १२ घरकाम, जेवण, दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत भांडी दुकानात काम, त्यानंतर जेवण करून रात्री १२ पर्यंत अभ्यास अशी त्यांची दिनचर्या असे. १९७५ साली ते अर्थशास्त्र घेऊन बी ए झाले. डिसेंबर १९७५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर खात्यात लिपिक म्हणून तात्पुरती नोकरी लागली. १९७६ साली बहिणीचा तर १९७७ साली मोठ्या भावाचा विवाह झाला.

दरम्यान सरकारी नोकरी करायची की व्यवसाय करायचा असा प्रश्न अप्पांपुढे निर्माण झाला. पण व्यवसाय करण्याची आवड लक्षात घेऊन त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडली तेव्हा त्यांचा शेवटचा पगार होता ४२१ रुपये.

अप्पांनी २८ फेब्रुवारी १९७८ रोजी मामांसोबत (आत्याचे पती) धुळे येथे काम सुरू केले. पगार होता एक हजार रुपये. पुढे इमारत बांधून झाल्यावर भागीदारी असा मूळ करार होता. रात्रंदिवस काम करून एक वर्षाच्या आत दुमजली इमारत उभी केली.

पुढे अप्पा १९७९ मध्ये डोंबिवली येथे वडिलबंधू रवी रासने यांच्याकडे आले. भावाच्या आर्थिक मदतीने त्यांनी न्यूज पेपर व्यवसाय सुरु केला.घरोघरी जाऊन पेपर टाकले. पण वर्षभरात डोंबिवली सोडली. १९८० साली चाळीसगाव येथे सख्या मामा बरोबर भागीदारीत भांडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. १९८३ मध्ये मामाची मुलगी अंजली समवेत त्यांचा विवाह झाला. १९८४ साली अश्विन तर १९८६ साली अमृत या मुलांचा जन्म झाला. पुढे आई, वडील, भाऊ, बहीण असे सात जणांचे कुटुंब त्यांनी चाळीसगाव येथे आणले. भावासही दुकान चालू करून दिले. एक भाऊ, दोन बहिणीचें विवाह करून दिले. १९९० ला दुकानाचा गाळा भाड्याने घेतला. मामासोबत भागीदारी सुरूच होती. भावाचे दुकान असलेल्या जागेत गणपती मंदिर होते.काही कारणांनी ती जागा सोडावी लागली. १९९२ पासून भागीदारीत वाद सुरू झाला. शेवटी जून १९९३ मध्ये भागीदारी तुटली. जागा मामांची असल्याने ती त्यांच्या ताब्यात दिली. १०० रुपये उसने घेऊन, पत्नी, २ मुलांसह अप्पा पुन्हा एकदा डोंबिवलीत आले आणि तेव्हापासून कायमचे डोंबिवलीकर झाले.

अप्पाना व्यवसायासोबत समाज सेवेची आवड आहे. ते २५ वर्षापासून रोटरी क्लब चे सदस्य आहे. २००७ मध्ये त्यांनी ‘रोटरी क्लब डोंबिवली अप टाऊन’ चे अध्यक्ष पद; २०१६ मध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२, ठाणे चे असि. गव्हर्नर पद भूषविले आहे. २०१९-२० या वर्षांसाठी ते रोटरी गव्हर्नर स्पेशल ऍडवाझर होते. कल्याण डोंबिवली रियलीटर्स असोसिएशनचे सल्लागार; अखिल भारतीय कासार मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत.

अप्पांचे थोरले चिरंजीव अश्विन वकील, तर सून सौ तृप्ती सिव्हिल इंजिनिअर असून शासकीय सेवेत आहे. द्वितीय चिरंजीव अमृत एमबीए असून एका खाजगी कंपनीत विभाग व्यवस्थापक आहेत. दुसरी सून सौ श्रद्धा एमसीए असून शैक्षणिक सल्लागार आहे. अप्पांची नात कुमारी यशस्वी दहावीत, नातु आराध्य तिसरीत तर शौर्या पहिलीत आहे. आजच्या काळाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आणि कौतुकास्पद बाब म्हणजे ही सर्व मंडळी एकत्र कुटुंबात राहतात.

अप्पांना आतापर्यंत २००३ मध्ये लोकसत्ताचा यशस्वी उद्योजक पुरस्कार; २०१७ मध्ये रोटरी स्टार अवॉर्ड; रोटरी क्लब बिल्डर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

आपल्या यशात सर्व डोंबिवलीकर आणि पत्नी सौ. अंजली चे मोलाचे सहकार्य आहे, असे अप्पा कृतज्ञतापूर्वक नमूद करतात.

अशा या समाजभूषण अप्पांना, त्यांच्या परिवाराला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूपच छान …भुजबळ सरांनी सखोल परिपूर्ण माहिती सकट जो लेख उमाकांतजी वर लिहिलेला आहे… तो आयुष्यभर लक्षात राहील… उमाकांजीचे कर्तुत्वच भरारी घेणारे असल्यामुळे, भुजबळजींच्या लेखनाने त्यास चार चाँद लावले आहेत धन्यवाद!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम