अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून विजयाची पताका रोवणारे धडाडीचे सेल्फमेड उद्योजक म्हणजे अनिल नागपूरकर …….
वर्धा जिल्यातील ‘आर्वी ‘ हे अनिलभाऊ यांचे मुळगाव. वडील मधुकरराव व आई मालतीबाई यांना तीन मुले व एक मुलगी. वडिलांचा कापसाचा व्यवसाय होता. तोही सिजन पुरता मर्यादित असायचा. त्यामुळे घरात अठराविश्वे दारिद्र्य होते.
अनिलभाऊना सात रुपये रोजंदारीवर काम करत शिक्षण घ्यावे लागले. मुळातच धाडसी स्वभाव व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले. आर्वी येथील शिवसेना स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दादा कोंडके, उषा चव्हाण, सदाशिव अमरापूरकर अशा अनेक कलाकारांच्या विविध कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन त्यांनी केले. सर्वांशी दृढ संबंध तयार झाले. पुढे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांना आमंत्रित करून आर्वी येथे भव्य सभेचे वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भव्य सभेचे त्यांनीआयोजन केले.
मात्र…….पुढे उत्पन्नासाठी त्यांना गाव सोडावे लागले. प्रथम अकोला व अमरावती येथे टायर रिमोल्डींगच्या कारखान्यात ते नोकरीस लागले. त्यांची कामावरची निष्ठा पाहून त्यांची बदली नागपूरला करण्यात आली. जम बसल्यावर त्यांनी आपल्या दोन्ही भावांना नागपूरला बोलून घेतले.
पुढे अतिशय धाडसी निर्णय घेऊन त्यांनी कमिशन बेसिसवर लक्झरी बसचे काम सुरू केले . थोड्या अवधीतच म्हणजे तीन वर्षात त्यांनी मोठी मजल गाठली व मित्रासह भागीदारीत तीन बसेस घेतल्या.
आज महाराष्ट्रातील जवळपास सर्व महत्त्वाच्या शहरात ‘अनुराग ट्रॅव्हल्स‘ च्या अनेक बसेस धावत आहेत. दहा वर्षांपासून ‘नागपूर बस ट्रान्सपोर्ट युनियन’ या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
ट्रान्सपोर्ट व्यवसायाबरोबरच त्यांनी पर्यटन व्यवसायात पदार्पण केले. अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचे ‘वेदांत व्हॅली‘ हे विस्तीर्ण रिसॉर्ट साठ एकर मध्ये आहे. जवळच दुसरे ‘टायगर व्हॅली रिसॉर्ट‘ आहे. चिखलदरा येथे तिसऱ्या रिसॉर्टचे काम जोमाने चालू आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असल्याने अनेकांशी त्यांचे मैत्रियुक्त संबंध आहेत. मैत्री जपणे, नवीन ओळखी करणे हा त्यांचा छंद आहे. इतके प्रसिद्ध व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून त्यांना त्याचा कोणताही गर्व अथवा अहंकार नाही हा त्यांच्यात दुर्मिळ गुण पहायला मिळतो. त्यामुळेच साहित्य, पत्रकारिता, क्रीडा, सिने, नाट्य व राजकारण अशा विविध क्षेत्रातील त्यांचे चांगले संबंध आहेत.

सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कार्यक्रमाचे उकृष्ठ नियोजन करणे हा जणू त्यांचा हातखंडा आहे. ‘वेदांत व्हॅली’ या रिसॉर्ट वर दर वर्षी समाज बांधवांसाठी कुठलाही मोबदला न घेता उत्तम नाश्ता, जेवण व दोन दिवस राहण्याची सोय केली जाते. यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
‘होलीकाउत्सव’ गेल्या दहा वर्षात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. नाच, गाणी, खेळ, जंगल सफारी मुळे हे दोन दिवस अविस्मरणीय होऊन जातात.
अनिलभाऊ एक उत्तम गायक व गझलकार असून नृत्य, गायन, कविता, साहित्य असे विविध छंद त्यांनी जोपासले आहेत. ते कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे विदर्भ विभागातील अध्यक्ष आहेत. त्यांचा नागपूर येथील महिला मेळावा हा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा असतो. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उतुंग भरारी घेणाऱ्या महिलांना पुरस्कृत केले जाते. न भूतो न भविष्यती अशी महिलांची उपस्थिती असते. संपूर्ण महाराष्ट्रातुन अभ्यासपूर्वक ‘महिला रत्न‘ पुरस्काराच्या योग्य मानकरी निवडल्या जातात. सोहळ्याचे उत्तम नियोजन केले जाते. राहण्याची, नाश्ता व जेवणाची उत्तम सोय असते. अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित राहतात व ह्या अविस्मरणीय सोहळ्याचा अनुभव व आनंद घेतात.
संतश्रेष्ठ अडकोजी महाराजांवर अनिलभाऊंची नितांत श्रद्धा आहे. आज जी प्रगती ते करू शकले ती केवळ महाराजांच्या कृपेने, असे ते मानतात.
विदर्भातील जनतेचे खऱ्या अर्थाने ‘पॉवर हाऊस‘ असलेले श्रीक्षेत्र वरखेड येथे जातांना नागपूर हायवेवर जी भव्य कमान उभारली आहे, ही त्यांनी वयाच्या २४ वर्षी १९९३ साली जेव्हा ते दुसरीकडे नोकरी करत होते, स्वतःच्या प्रपंचाचा गाडा कसातरी ओढत होते, त्यावेळी उभारली आहे. रात्री स्वतःजवळ असलेल्या जुन्या स्कुटरवर सिमेंटच्या गोण्या वाहत रात्री तेथे काम करवून घेत रस्त्यावर झोपून अक्षरशः रात्रंदिवस काम करीत ही भव्य कमान त्यांनी उभारली आहे. यावरून आडकोजी महाराजांवरील त्यांची असलेली निसिम श्रद्धा व भक्ती याचे दर्शन होते.
अनिलजी नागपूरकर हे अतिशय प्रभावशाली सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व आहे. त्यांची सकारात्मक विचारसरणी, सर्वांशी जोडून राहण्याची कला, योग्यवेळी घेतलेले धाडसी निर्णय, बिकट परिस्थितीवर आत्मविश्वासाने केलेली मात यामुळेच त्यांनी शून्यातून जग निर्माण केले व स्वतःचे ध्येय गाठले व यशस्वी झाले. त्यांचे कार्य सर्व युवा पिढीसाठी आदर्श असे आहे. अनिलभाऊंच्या कार्याला मानाचा मुजरा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अनिलराव आपली कार्यप्रणाली, जिद्द, आणि समाजभान ठेवणारी वृत्ती, यामुळेच आज आपण यशवी वेक्ती आहात, आपले भविष्य सतत उजवल राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना , श्री जय आडकूजी महाराज
*सेल्फ मेड धडाडीचे उद्योजक श्री अनिल भाऊ नागपूरकर* यांच्या जीवनातील संघर्ष करून एक यशस्वी उद्योजक आणि सामाजिक जीवनातील भान ठेवून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या अनिलभाऊ बद्दल रश्मी ताई हेडे यांच्या सकस लेखणीतून आणि सन्मा. देवेंद्र भुजबळ साहेबांच्या कल्पक संपादनातून समाजातील होतकरू आणि जाणीव ठेवणा-या भाऊंची कहानी अतिशय प्रभावी व प्रेरणादायी अशीच आहे. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!
राजाराम जाधव
दिनांक ०३.०८.२०२१