द्रष्टे क्रांतिकारक, इतिहासकार, लेखक व प्रतिभावंत कवी असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे संपूर्ण व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांनी देशासाठी केलेला त्याग व भोगलेल्या हालअपेष्टा यामुळे त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच राजभवन येथे काढले.
डॉ विक्रम संपत लिखित “सावरकर : अ कनटेस्टेड’ लेगसी” या इंग्रजी पुस्तकाचे तसेच “सावरकर : विस्मृतीचे पडसाद १८८३-१९२४” या त्यांच्याच इंग्रजी पुस्तकाच्या मराठी खंडाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते येथे झाले त्यावेळी ते बोलते होते.
‘सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची संभावना, ब्रिटिशांनी शिपायांचे बंड अशी केली असताना तो पहिला स्वातंत्र्य संग्राम होता हे सावरकरांनी निक्षून सांगितले’ असे राज्यपालांनी सांगितले. ‘काही लोकांनी स्वतःला मोठे दाखविण्यासाठी सावरकरांसारख्या महान क्रांतिकारकाला, जाणीवपूर्वक लहान दाखविण्याचा प्रयत्न केला, मात्र लेखक विक्रम संपत यांच्या लिखाणामुळे सावरकर यांचा वारसा ‘विवादास्पद’ न राहता तो ‘निर्विवाद’ सिद्ध होईल’ असे राज्यपालांनी सांगितले.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना योजनाबद्ध रितीने बदनाम करण्याचे षड्यंत्र आपल्या देशात रचले गेले’ असे सांगून, ‘ग्रंथाच्या माध्यमातून सच्चा इतिहास पुढे येईल’ असे माजी राज्यपाल राम नाईक यांनी सांगितले.
यावेळी लेखक डॉ विक्रम संपत यांनी पुस्तक लिखाणाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मूळ इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर रणजित सावरकर व मंजिरी मराठे यांनी केले आहे.
कार्यक्रमाला लेखक डॉ विक्रम संपत, शिर्डी संस्थांनचे विश्वस्त राजेंद्र प्रताप सिंह , संपादक चेतन कोळी, लेखिका शोभा डे व इतर मान्यवर उपस्थित होते.
– टीम एनएसटी, 9869484800