Wednesday, June 18, 2025
Homeसंस्कृतीमराठी पाऊल पडते पुढे

मराठी पाऊल पडते पुढे

प्रत्येक व्यक्तीची कुटुंबापेक्षाही जास्त महत्वाची ओळख म्हणजे त्याचा समाज. आत्यंतिक वैविध्य असलेल्या आपल्या भारत देशात अनेक प्रकारची लोक राहतात. त्यांचे कपडे, आहार, चालीरीती भिन्न असतातच आणि मुख्य म्हणजे त्या समूहाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा.

यातीलच एक आपली हजार वर्षांहून प्राचीन अशी मराठी भाषा ! इतर बहुतेक भारतीय भाषांप्रमाणे संस्कृत तिची जननी. गेल्या बाराशे वर्षांच्या कालौघात मराठीचे रूप अनेकदा बदलले, तिच्या प्रवाहाला अनेक धारा येऊन मिळाल्या. नवीन विचार, शब्द आणि ज्ञान सामावून घेत भाषा विकसित झाली आणि आपल्याला परिचित असलेले मराठीचे रूप हे गेल्या दोन-तीन शतकात दृगोच्चर झाले. या भाषेच्या स्थित्यंतराशी मराठी समाजात झालेले परिवर्तन अत्यंत निगडित आहे. माणसाच्या विचारप्रक्रियेत आणि वर्तणुकीत झालेले बदल नेहेमी भाषेच्या माध्यमातूनच व्यक्त होत असतात.

मुंबईत १९६०-७० च्या काळात मोठे होताना मराठी भाषा किंवा समाज आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व अशी चिकित्सा मी कदापि केली नाही, त्याची कधी गरजही वाटली नाही. त्याकाळी यापेक्षा वेगळे काही आपण बोलू शकतो अथवा वागू शकतो अशी शंकासुद्धा मनाला शिवली नाही. आध्यात्मिकतेसाठी अभंग आणि मनाचे श्लोक, काव्यासाठी गदिमा व कुसुमाग्रज, साहित्यासाठी आचार्य अत्रे आणि पुल, हे आणि असे अनेक दिग्गज यांनी आमचे आयुष्य अगदी समृद्ध केले होते. मराठी कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांच्या सहवासात मन तृप्त व समाधानी होते.

आपण मराठी लोक म्हणजे महाराष्ट्रीयन हे निराळे आहोत याची सर्वप्रथम जाणीव मला अमेरिकेत आल्यावर झाली. माझ्या आईच्या घरी काम करायला येणाऱ्या बायकांची जात तपासली जात नव्हती पण त्या स्वच्छ आहेत ना याची चौकशी व्हायची. मुलगी म्हणून मला स्वयंपाक शिकण्याचा आग्रह झाला नाही तर मी आणि माझ्या सर्व मध्यम वर्गीय मैत्रिणींना पालकांनी मुलग्यांप्रमाणेच उत्तम शालेय शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. लग्नात हुंडा किंवा आहेर घेणे या प्रथा मराठी सुशिक्षित लोकात बहुतांश नष्ट झालेल्या दिसतात. या आणि अशा दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टीत मराठी माणसे आपले प्रगतशील आचरण दाखवतात.
माझ्या संशोधकी पेशाप्रमाणे मी हे असे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मग मराठी पाऊल पुढे का व कसे पडते याचे रहस्य उमगायला लागले.

आपले पाऊल पुढे न्यायचे असेल तर ते मुक्त असले पाहिजे. जर त्याच्यात शृंखला अडकवल्या तर ते पुढे कसे जाणार ? परंतु गेली कित्येक शतके भारतीय समाज परंपरा आणि रूढी यांच्या बेड्यांनी जखडून गेला होता. सुदैवाने महाराष्ट्रात या अंधारात पहिला तेजस्वी दीप प्रज्वलित केला ज्ञानेश्वरांनी. गीतेचे सार संस्कृतातून प्राकृतात आणून त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत तत्वज्ञान पोचवले आणि सवर्णांची मक्तेदारी संपवली.

यानंतर अनेक बऱ्यावाईट राजवटी आल्या पण मराठी जनमानसावर नकळत प्रभाव पडत गेला तो संत परंपरेच्या विचारांचा. गोरा कुंभार, चोखा मेळा, एकनाथ यांनी जातीभेदाच्या पलीकडची माणुसकी व भक्ती दाखवली. शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम यामुळे आपले स्वातंत्र्य अबाधित राहिले. बहिणाबाई, राणी लक्ष्मीबाई, पंडिता रमाबाई यांनी विभिन्न क्षेत्रात स्त्रियांचे समर्थपण सिद्ध केले. ज्योतिबा फुले व महर्षी कर्वे यांनी त्याही पुढे जाऊन स्त्री शिक्षणाचा पाय घातला आणि अज्ञानाच्या दलदलीतून बायकांची मुक्तता केली.

नंतरच्या स्वातंत्र लढ्यात कित्येक मराठी नेते अग्रेसर होते; लोकमान्य टिळक, वीर सावरकर आणि यात वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी वधस्तंभावर गेलेले माझ्या वडिलांचे सख्खे मामा श्री विष्णू गणेश पिंगळे हे देखील होते. या सर्व तेजस्वी व्यक्तींची नामावली इथे द्यायची नाही, ते शक्य नाही आणि तो माझा उद्देशही नाही. मला फक्त एवढेच दर्शवायचे आहे की महाराष्ट्रात हा एक प्रकारचा समाजसुधारणेचा यज्ञ फार पूर्वीपासून अखंड चालू होता. त्याचा खोल परिणाम मराठी समाजाचे आचार, विचार व व्यवहार यावर होत होता. आणि त्यामुळेच विलक्षण विचारवंत, धाडसी, कर्तबगार माणसे महाराष्ट्रात घडत होती आणि तत्कालीन मराठी लोकांचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नेतृत्व करत होती.

आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि सर्व क्षेत्रात, मराठी माणसे, पुरुष आणि बायकासुद्धा, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत. धोपट मार्गाची वहिवाट सोडून नवीन अपरिचित स्वप्नांचा व ध्येयांचा पाठपुरावा करत आहेत. फक्त डॉक्टर इंजिनीयर शिक्षक हे नेहमीच पेशे नाही तर गायन, मनोरंजन, क्रीडा अशा व्यवसायात देखील मराठी माणसांनी उत्तम यश संपादन केले आहे. हे शक्य होतेय कारण त्यांच्यावर कुठलीही मनाविरुद्ध जबरदस्ती झाली नाही, बहिष्कृतीची किंवा समाज रोषाची भीती त्यांना दाखवली गेली नाही किंवा कुठच्याही जाचक मर्यादा घालून त्यांना बंदिस्त केले नाही.

तुम्ही म्हणाल की हे कुठल्या युगातले बोलताय पण जर डोळे उघडून नीट पाहिलेत तर दिसेल ही वृत्ती अजूनही अनेक समाजात अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच मला माझ्या मराठी मानसिकतेचा गर्व आहे. हजार वर्षांच्या परंपरेने आपल्याला सणवार, खाद्यपदार्थ, चालीरीती हे सर्व दिलेच आणि ते सगळे आपल्याला अतोनात प्रिय आहे. परंतु मराठीपणाचा गाभा म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य. त्यामुळेच मराठी माणसाच्या पायाचे बंध निखळले, पंखात बळ आले आणि नुसते पाऊल पुढे टाकण्याचे नाही तर उडून गगनाला गवसणी घालायचे धैर्य मिळाले. स्त्री-पुरुष समानता, सहिष्णुता, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर ही समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक मूल्ये आहेत. या तत्वांचा मजबूत पाया महाराष्ट्राला मिळाला. एक स्त्री म्हणून या दूरदर्शी पूर्वजांची मी अपरंपार ऋणी आहे.

मला माझ्या मराठी मायबोलीबद्दल अतिशय प्रेम आहे. आजकाल चांगले शुद्ध मराठी बोलणे दुर्मिळ होतेय, इंग्लिश भाषेचा पगडा वाढत चाललाय. कधीतरी मन साशंक होते. तेव्हा मी स्वतःलाच समजावते की पुढे टाकलेले पाऊल पुन्हा मागे घ्यायचे नसते. भाषा बदलेल, पूर्वीदेखील अनेकदा बदलली आहे पण मराठी लोकांच्या योगदानाची नोंद मात्र इतिहासात अढळ राहील.

डॉ सुलोचना गवांदे

– लेखन : डॉ सुलोचना गवांदे. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. धन्यवाद. मला सामील व्हायला नक्की आवडेल. कृपया मला या मंचाबद्दल माहिती पाठवा. तुम्हाला माझ्याविषयी काही कळवू का?

  2. खूप सुंदर लेख.
    आपण जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूहात सामील व्हावे अशी विनंती करतो.
    विलास कुलकर्णी
    जनसंपर्क अधिकारी जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह
    WhatsApp number 7506848664

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments