Tuesday, June 17, 2025
HomeUncategorized'आणि, मी पोलिस अधिकारी झाले !' ( १५ )

‘आणि, मी पोलिस अधिकारी झाले !’ ( १५ )

 

नमस्कार, मंडळी.
विशेष शाखा 2 चे पोस्टींग वरून वाहतूक विभाग येथे नेमणूक झाल्यानंतर मी वाहतूक विभागात हजर झाले. आदरणीय डाॅ.उपाध्याय (भापोसे) सह पोलिस आयुक्त यांचे कडे रिपोर्ट केला व सहाय्यक पोलीस आयुक्त  (प्रशासक) यांनी मला वाहतूक शिक्षण विभागात काम करणार का ? असे विचारताच मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला कारण वाहतूक पोलिस असताना शिक्षण विभागात काम करण्यामुळे माझ्या ज्ञानात भरच पडणार होती. त्यामुळे मी आनंदाने भायखळा ट्रेनिंग येथील शिक्षण विभाग येथे हजर झाले.

तो 2014 चा जुलै महिना होता. तोंडावर गणेशोत्सव आला होता. संपूर्ण मुंबईतील गणेशोत्सव वाहतुकीचे नियमन सर्व गणेश मंडळे, गणेशोत्सव कमिटी, सर्व मिडीया यांचेशी समन्वय असे त्या कालावधीतील सर्व कामकाज शिक्षण विभाग पहात असे.

त्याचप्रमाणे मुंबईतील अंदाजे 500 शाळांमधून रोड सेफ्टी पेट्रोल (आर.एस.पी) हा शासन पुरस्कृत 3 वर्षांचा अभ्यासक्रम 50 मार्क्स साठी असतो. शिक्षण विभागातील अंमलदार शाळांवर जावुन मुलांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देत. एवढेच नाहीतर त्यांची परेड प्रॅक्टीस घेवुन जानेवारीचे दरम्यान झोनल संचलन स्पर्धा आयोजन करून 26 जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथील संचलनात स्काॅड निवड होत असे. शालेय विद्यार्थी अतिशय मेहनत पूर्वक संचलन करत.

या संचलनात माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली कि बीएमसीचे स्क्वाड खाजगी शाळांच्या तुलनेत ग्राऊंडवर ऊन्हात टिकाव धरतात पण खाजगी शाळांचे काही विद्यार्थी मैदानावरील उन्हातान्हाला सामना करू शकत नाहीत, चक्कर येवुन पडतात !

वाहतूक विभागाचे सह. पोलिस आयुक्त आदरणीय डाॅ.भूषणकुमार उपाध्याय अत्यंत सज्जन व ॠजु व्यक्तीमत्व असलेले आहेत. त्यांना संपर्क साधून सवडीनुसार ते आवर्जुन काॅलेज आदि ठिकाणी येवुन विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे प्रेझेंटेशन सहीत मार्गदर्शन करत. त्या अनुषंगाने काही नविन संकल्पना सांगितली कि सहकार्य करत. त्यांचे मार्गदर्शनामुळेच मला शिक्षण विभागात काम करताना उत्साह वाटे व आरएसपीचे घोषवाक्य “आपुले जीवन सेवेसाठी” याचा खोल परिणाम नव्याने स्फुर्ती देत असे.

दरम्यान वाहतुकीचे सह.पोलिस आयुक्त म्हणून आदरणीय मिलिंद भारंबे साहेब बदलून आले. त्यांची कामाची पध्दत अतिशय टेक्नाॅलाॅजी ओरिएंटेड होती. ते सर्व कामासाठी जास्तीत जास्त लेटेस्ट संकल्पना राबवत. त्यांच्यामुळेच दादर येथील व्हर्च्यअल क्लास वरून एका वेळी 500, 1000 बीएमसी विद्यार्थीना रस्ता सुरक्षेबाबत शाळांवर मार्गदर्शन करता आले. त्याच प्रमाणे भारंबे साहेबांचे प्रयत्नाने बीएमसी शाळेचा स्काॅड 26 जानेवारीच्या शिवाजी पार्क वरील संचलनात समाविष्ट केला गेला.

मला आता नक्की आठवत नाही पण 1947-50 प्रपोगंडा शाखा चे दरम्यान सर्व प्रथम भरडा हायस्कूल ने आरएसपीची सुरूवात केली होती. त्याकाळी शालेय विद्यार्थी पोलिसांना त्याच प्रमाणे शाळा भरताना व सुटताना होणारी ट्रॅफिक सुरळीत करत व तेंव्हाचे मिडियामधून त्यांचे कौतुक होत असे. आता सुध्दा शाळांना तो पर्याय वापरता येईल. शाळा भरताना व सुटताना टॅफिक आरएसपीचे विद्यार्थी सुरळीत करू शकतील. अर्थात त्यास शाळा व पालक यांची इच्छाशक्ती पाहिजे. असो….

दरम्यान मार्च महिन्याचे आसपास शाळा परीक्षेचे धांदलीत असलेले आरएसपी चे काम थंडावले. शिक्षण विभागात काम करताना पोलिस उपायुक्त आदरणीय कुंभारे सरांचे (भापोसे) सुध्दा खूप सहकार्य मिळाले. मी आदरणीय भारंबे (भापोसे) सह.पोलिस आयुक्त यांना भेटले व सध्या शिक्षण विभागात काम नसल्याने मला कोणत्याही वाहतूक विभाग येथे नेमणूक करण्याची विनंती केली. त्यानुसार सरांनी माझी नेमणूक वडाळा डिव्हीजनला केली.

डिव्हीजनला काम करणे हा एक अत्यंत चांगला अनुभव असतो कारण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आपल्याला काम करावे लागते. मुंबई सारख्या काॅस्मापाॅलीटीन शहरात तर ते आव्हानच आहे. सर्व प्रथम मी डिव्हीजनला काम करताना हाताखालच्याच 70 ते 100 चे आसपास अधिकारी, अंमलदार यांना अवगत केले. विशेषता फ्री वे व बरकतअली नाका येथील वाहतूक कोंडी वर मार्ग काढला. कारण सकाळी 8 ते 8:30 दरम्यान दक्षिणेकडे कडे जाणारी वाहतूक व संध्याकाळी 4:30 ते 9:00 दरम्यान उत्तरेकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करणे हे अगदी दगदगीचे काम असते.

मला एक आश्चर्य वाटे, वायरलेस वर काही ठराविक शब्दप्रयोग उदाहरण म्हणजे ‘चौकात कैची पडली आहे’ मी हे ठामपणे सांगू शकते कि, चौकातील स्टाॅपलाईनचे मागे वाहने थांबली तर चौकाचे मध्ये मोठी रिकामी जागा मिळते व ट्रॅफिक नियमन करणे चांगल्या प्रकारे शक्य होते व कैची पडण्याचे कारण नाही. वाहतूक विभागात काम करताना प्राणांतिक अपघाताची आकडेवारी पाहिली तर दुचाकी स्वार हेल्मेट न घातल्यामुळे वा हेल्मेट घातले पण बक्कल न लावल्यामुळे हेड इंज्युरी मुळे दगावतात. माझी तरूणवर्गाला कळकळीची विनंती आहे कि हेल्मेट शिवाय व बक्कल न लावता दुचाकी चालवू नका. पोलिसांचे करवाई पोटी नाही तर स्वतःचे अनमोल जीवनासाठी व प्रियजनांची तुमचे पाठी होणारी परवड याचा तरी विचार करा.असो.

दुसरी आवर्जुन सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे सर्व अधिकार अंमलदार यांना दिले. सूचना नुसार नियम तोडणारे विषेशतः अवजड वहाने यांचेवरील कारवाई मुळे दंडाची रक्कम सहा महिन्यातच मागील पूर्ण वर्षाच्या आकडेवारी पेक्षा 14, 15 लाखानी वाढली होती. अपघातांची संख्या कमी झाली होती. बरकतअली नाका व फ्रि वे वाहतूकीचे नियमन चांगले चालले होते. अगदी शून्यावर आलेली ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई देखील समाधानकारक वाढली होती.

उपायुक्त आदरणीय कुंभारे साहेबांचे प्रयत्नाने फ्रि वे वर डिजिटल नियंत्रण करणारी सुविधा व दोन्ही केयाॅस (चौकी) चे काम पूर्ण झाले होते. त्याच प्रमाणे गोदरेज कंपनीने उस्फूर्त दोन दुचाकी दिल्याने पेट्रोलिंगचे काम उत्तम चालले होते.

दरम्यान आमच्या पदोन्नती होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. वडाळा चौकी मध्ये पिण्याचे पाण्यासाठी ऍक्वागार्ड कंपनी कडून वाॅटर प्युरिफायर, पोलिसांचे वेल विशर अमोल टोपे यांनी कूलर लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. महिला अंमलदारांचे साठी महिला रूमची डागडुज्जी झाली.

माझ्या वाहतूक विभागातील अविस्मरणीय अनुभवांचे श्रेय आदरणीय डाॅ.उपाध्याय साहेब, सह पोलिस आयुक्त आदरणीय भारंबे साहेब, सह पोलिस आयुक्त, आदरणीय कुंभारे सर, उपायुक्त, वडाळा डिव्हीजन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले, पोलिस उपनिरीक्षक मुरकुटे साहेब व पोलिस उपनिरीक्षक राजे, अर्जुन साहेब व सर्व अंमलदार व चालक मुलाणी व कर्पे यांना जाते .कारण ही टीम पारदर्शीपणे काम करत असल्यानेच माझा ट्रॅफिक कालावधी संस्मरणीय झाला.

दरम्यान 2016 च्या सप्टेंबर मध्ये आमचे प्रमोशन आले. माझी बदली अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून झाली.  क्रमशः

सुनीता नाशिककर

– लेखन : सुनिता नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुनिता नाशिककर यांचे सर्वच लेख मला आवडतात.सर्व लेख
    आवर्जून वाचावेत असेच आहेत.पोलीस खात्यांविषयी असलेले
    अनेक समज गैरसमज दूर होऊ शकतात.त्यांच्या विवीध कामांविषयी माहिती मिळते.नाशिककर यांच्यासारख्या निष्ठेने काम करणार्‍या व्यक्ती गोंधळलेल्या सामान्य माणसांसाठी
    आशादायी,प्रेरक आणि दिलासा देणार्‍या वाटतात.
    चौकात कैची पडली आहे अशा तर्‍हेच्या सांकेतिक भाषेबद्दल
    वाचताना खूपच मजा वाटली.
    वाहतुक नियम का पाळायचे हेही त्या वारंवार सांगत असतात.
    एक जागृत नागरिक म्हणून मला असे वाटते की सार्वजनिक
    जीवनातले नियम पाळले गेले तर शासकीय काम करणार्‍यांनाही
    सुलभ सहज विनासायास काम करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments