आजच्या घडीला वाचक आणि प्रेक्षक यांच्याकडे
मोठयाप्रमाणात प्रसारमाध्यमे ग्राहक म्हणूनच बघत असून आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदींनी विचारपूर्वक केलेल्या प्रबोधनाची अपेक्षा न करता काय वाचावे, काय पाहावे याचा निरक्षिर बुद्धीने आपणच विचार केला पाहिजे, असे परखड प्रतिपादन न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व फलटण शाखा यांच्यावतीने श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने फलटण येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनातील ‘महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे व साहित्यिक सद्यस्थितीत समाजप्रबोधनात कमी पडत आहेत कां ?’ या परिसंवादात ते बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले, प्रसार माध्यमांनी बातमी छापतांना किंवा दाखविताना समाज मन दुभंगनार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. प्रसार माध्यमातून आणि साहित्यातून सर्व सामान्य माणसाला जगण्याची उमेद मिळाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
परिसंवादात बोलताना सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री हरिष पाटणे म्हणाले, प्रसारमाध्यमांनी एकांगीपणे न जाता चोहोबाजूंचा विचार करुन व समाजाचे अवलोकन करुन बातमीची मांडणी केली पाहिजे. प्रसारमाध्यमे व साहित्यिक समाज प्रबोधनात कमी पडत नसून काळानुरुप बदलत्या परिस्थितीशी ते सामना करीत आहेत. यातून चांगल्या विचारांचे मंथन होणे गरजेचे आहे. प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे वारंवार त्याच बातम्या दाखवल्याने लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे बोलले जाते परंतु ती बातमी बिंबवून समाजामध्ये जागृकता निर्माण करण्याचे काम त्या ठिकाणी केले जात असते असे सांगून साहित्यिकांनी व्यावसायिक न होता सकस व समाजाला दिशा देणारे साहित्य निर्माण केले तर निश्चितच समाज प्रबोधन घडून येईल, असे पाटणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारती विद्यापीठातील प्रा.डॉ.वैभव ढमाळ म्हणाले, अलिकडच्या काळातील साहित्य संमेलनांमध्ये असे वास्तववादी विषय परिसंवादामध्ये घेतले जात नाहीत. सत्याला सत्य म्हणण्याची माणसांची मानसिकता बदलत चालली की काय अशी अवस्था आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका ठाम ठेवून समाज प्रबोधनात आघाडीवर असले पाहिजे. पत्रकार हा दैनंदिन साहित्यिक असतो. साहित्यिकांनी समाजामध्ये घडणार्या घटना यांचे डोळसपणे व संवेदनशील वृत्तीने लिखाण केले पाहिजे. पूर्वीचे साहित्यिक आणि अलिकडच्या काळातील साहित्यिक यांच्यामध्ये दरी दिसून येते. यासाठी वाचन संस्कृती वाढणे काळाची गरज आहे. साहित्यिक व प्रसारमाध्यमे हे दोन्हीही घटक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका समाजप्रबोधनात महत्त्वाची आहे.
प्रसारमाध्यमे व साहित्यिक हे समाजातील महत्त्वाचे घटक असून त्यांची भूमिका ही सकारात्मक असावी. जे समोर दिसते त्याचे योग्य पद्धतीने विवेचन केले तर समाजमनाचा आरसा सर्वांसमोर येतो. त्यामुळे साहित्यिक व प्रसारमाध्यमे यांनी समाजभान राखणे काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
श्री बेडकिहाळ पुढे म्हणाले, अलिकडच्या काळातील प्रसारमाध्यमे ही व्यावसायिक बनू पाहत आहेत. त्यामुळे खरे चित्रण पुढे येताना अडचणी निर्माण झालेल्या दिसतात. त्यासाठी व्यावसायिकेतबरोबर मानवी मूल्यांची जपणूक होणेही गरजेचे आहे. मानवी मूल्ये जपायची असतील तर पत्रकार व साहित्यिक यांनी नि:पक्षपातीपणे लेखन करुन योग्य त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे.
परिसंवादाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले. सूत्रसंचालन मसाप फलटण शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी मानले.
यावेळी संमेलनाध्यक्ष सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, संमेलन कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके आदींसह साहित्यिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– लेखन : अमर शेंडे. फलटण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान विषय. साध्या प्रसार माध्यमांनी कोणत्या विषयाला किती प्राधान्य द्यायचे याचे भान ठेवावे… सुंदर.
चांगलंच लिहिलंय… !
प्रसारमाध्यमांची सकारात्मक ताकद आज आपण खऱ्या अर्थाने वापरतो आहोत का , हा एक मोठा प्रश्न आहे …