नमस्कार, मंडळी.
काही गाणी अशी असतात ना, की ती आपल्या जीवनावर सखोल परिणाम करून जातात. अशी गाणी केवळ मनोरंजन म्हणून न राहता जीवनाचं, जगण्याचं तत्त्वज्ञान सांगत असतात. कठीण परिस्थितीत हीच गाणी जगण्याचं बळ देतात.
अशाच काही भावलेल्या गाण्यांवर आजपासून, दर सोमवारी लिहिणार, बोलणार आहेत तनुजा प्रधान. त्यांचा अल्प परिचय पुढे देत आहे.
मूळ पुणे येथील असलेल्या तनुजा प्रधान यांचं सध्याचं वास्तव्य चालस्टन, साऊथ कॅरोलिना, अमेरिका येथे आहे. तनुजा प्रधान यांनी बी.ए. ला मानसशास्त्रात
(क्लिनिकल सायकॉलॉजी) प्रथम आणि विद्यापीठात तिसरा क्रमांक, तर एम्.ए. लाही विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळविला आहे.

लॉकडाऊनपासून सुरू केलेल्या लिखाणात त्यांनी विविध राज्यस्तरीय स्पर्धांमधून चारोळी, कथा, कविता, लेख यासाठी सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, भावस्पर्शी, प्रथम, उत्तेजनार्थ अशी विविध २५ पारितोषिके मिळविली आहेत. नुकतेच शोपिझन वरच्या बालकथा स्पर्धेत उत्कृष्ट बालकथेचे पारितोषिक, बारा ऑनलाईन कवी संमेलनात सहभाग, पैकी दोन आंतरराष्ट्रीय कवी संमेलनांचे साकव्य परदेशी विभाग प्रमुख म्हणून आयोजन, साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या पाक्षिक कट्टा क्र. १६ मध्ये सहभाग, ललित लेख, तसेच कोट्स लेखन, दिवाळी अंक, मासिक व ऑनलाईन पोर्टल्सच्या माध्यमातून कविता आणि ईबुक्स तसेच ऑनलाईन वृत्तपत्रात लेख व कविता लेखन अशी त्यांची साहित्यिक कारकीर्द असून लवकरच प्रातिनिधिक काव्य संग्रहात त्यांच्या कविता प्रकाशित होणार आहे.
२०२२ मधील हिंदी दिवसाच्या कार्यक्रमात अमेरिकेत अटलांटा येथील भारतीय दूतावासात त्यांनी हिंदी कवितेचे व्हिडिओ सादरीकरण केले आहे.
एक कवितांचे (माझ्या मनातले My Musings मेरे दिल से), दुसरे खाद्य पदार्थांचे (Sunshine Flavours) अशी त्यांची दोन यू ट्यूब चॅनल्स आहेत.
या पूर्वी आपल्या न्यूज स्टोरी टुडे वर त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. तनुजा प्रधान यांचे सदर लेखिका म्हणून स्वागत करून आज त्यांच्या “भावलेली गाणी” चा पहिला भाग वाचू या, पाहू या …. संपादक.
सफ़र…….
आयुष्यावर बोलू काही
नेहमीच वाटे मला
जीवनातल्या रंगांची
ओळख व्हावी मनाला
आणि झालेही अगदी तसेच ! गेल्या चार दशकांहून अधिक जगलेल्या आयुष्यात जीवनाचे अनेक पैलू आणि रंग बघितले आहेत. आता केस पिकले म्हणून त्यावर अगदी अधिकार वाणीने नव्हे तर अनुभवातून येणारे बोल शब्दांत उतरतात.
पण लहानपणी तसे काही नव्हते ना ! आपले आपले खायचे-प्यायचे, खेळायचे, अभ्यास करायचा, मजा करायची हेच फक्त आयुष्य होते. पण जसे वय वाढू लागले तसे एकेक अनुभव येत गेले आणि आयुष्यावर विचार करायला लागले.
त्यातच रेडिओवर रोज गाणी ऐकण्याची हौस असल्याने त्यातूनही माझे विचार प्रगल्भ होत गेले. मला लहानणापासूनच आयुष्यावर बेतलेली गाणी खूप आवडतात. कारण माणूस हा केवळ आयुष्य जगत जात असतो. ही गाणी किंवा अभंग, भजने, इत्यादी ऐकून ऐकून तो अधिक जाणीपूर्वक जगायला लागतो.
माझ्याही बाबतीत तसेच झाले. जेव्हा मी पहिल्यांदा किशोरदांच्या आवाजात ज़िंदगी का सफ़र हे गाणे ऐकले, तेव्हा मंत्रमुग्ध होऊन गेले होते. १९७० च्या ‘सफर’ सिनेमा मधले या गाण्याचे बोल लिहिले होते इंदीवरजींनी आणि संगीतबद्ध केले होते कल्याणजी आनंदजी यांनी.
एक एक शब्द त्यातला किती खरा होता ! आणि किशोरदांनी अगदी जीव ओतून ते गायले आहे. ऐकताना अक्षरशः डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहत नाहीत. राजेश खन्ना यांचा अभिनय त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.
ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नहीं कोई जाना नहीं
ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नहीं कोई जाना नहीं
है ये कैसी डगर चलते हैं सब मगर
कोई समझा नहीं कोई जाना नहीं
काय आपण करतोय ? कुठे जायचे आहे, आयुष्यात काय करायचे आहे, काही पत्ता नसतो. निदान त्या वयात तरी ही जाण नव्हती. अशा काही भविष्यासाठी योजना बनवायच्या असतात हे दहावी होईपर्यंत माहीतसुद्धा नव्हते. आताच्या पिढीला खूप लवकर याची जाण येते. आमच्याही पिढीत असतीलच माझ्यापेक्षा सुजाण लोक. पण मी तशी नव्हते. त्यामुळे हे गाणे अगदी मनात घर करून गेले. काहीतरी आपण ठरवले पाहिजे, हे कळत होते, पण काय करावे याचा गंधही नव्हता.
ज़िंदगी को बहुत प्यार हमने दिया
मौत से भी मोहब्बत निभाएँगे हम
रोते रोते ज़माने में आए मगर
हंसते हंसते ज़माने से जाएँगे हम
जाएँगे पर किधर है किसे ये खबर
कोई समझा नहीं कोई जाना नहीं
पुढे मोठी झाले. लग्न, मूलबाळ, संसार यात बऱ्याच गोष्टी समोर येऊ लागल्या. मोठे होणे किती अवघड असते हे कळायला लागले. प्रेम मिळाले तरी त्यात त्यागाची अपेक्षा असते. त्यातच अनेक वेळा कुटुंबाला आणि वैयक्तिक रित्या मला मृत्यूशी लढा देण्याचे प्रसंग बेतल्यामुळे आपण जीवन भरभरून जगायचे राहूनच गेलो हे सरणाऱ्या प्रत्येक दिवसाला कळत गेले आणि या गाण्याचा अर्थ रोज नव्याने उलगडत गेला.
ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं
जिनको जीने से पहले ही मौत आ गयी
फूल ऐसे भी हैं जो खिले ही नहीं
जिनको खिलने से पहले फ़िज़ा खा गई
सहन करण्याच्या पलीकडे कधी कधी गोष्टी गेल्या की माणूस आयुष्यासमोर, देवासमोर गुडघे टेकून देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे प्रसंग येतातच जेव्हा आपल्याला वाटते की बास आता देवा, काय हे आयुष्य आहे आणि कसे या संकटांना तोंड देणार ? अशा दुःखाच्या वेळेस आपली अवस्था समजून घेणारे कोणी नसते आणि तेव्हा फक्त या गाण्याच्या बोलांचा आणि किशोरदांच्या दर्दभऱ्या आवाजाची साथ असते, असे वाटायचे मला. वाटायचे की या गाण्याच्या कुशीत शिरून रडून मोकळे व्हावे. या सुरांना, त्या शब्दांना आपली कहाणी सांगावी कारण त्यांना बरोबर समजतंय माझं दुःख.
है परेशान नज़र तक गये चारागार
कोई समझा नहीं कोई जाना नहीं
ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नही कोई जाना नहीं
या गाण्याने मला समजून घेतले. प्रत्येक वेळी आधार दिला की मी एकटीच अशी एका दिशाहीन बोटीमध्ये जीवनाचा प्रवास करत नाहीये. माझ्यासारखे इतरही लोक आहेत. आणि तोच आधार मला प्रत्येक संकटाचा सामना करायला ताकद द्यायचा.
मग हळूहळू या न समजण्यातून जीवनाबददल काही गोष्टी समजत गेल्या. तरीही अजून बऱ्याच गोष्टी समजायच्या बाकी आहेत. हा शिकण्याचा प्रवास असाच अखंड चालू राहणार आणि माझ्या आयुष्यातल्या या गाण्याचे स्थान अबाधित राहणार !
आता, प्रत्यक्ष मी आपल्याशी संवाद साधतेय. या साठी कृपया पुढील लिंक वर क्लिक करा.
हा प्रयोग आपल्याला कसा वाटतो, या विषयी आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
धन्यवाद.

– लेखन : तनुजा प्रधान. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
छान👌
प्रयोग फारच छान आहे
आपल्या आयुष्यतल्या घडामोडिशी निगडीत गाण्याचा अर्थ
खूप आवडला
छान लिहिलंय
खूप धन्यवाद सर!🙏🌷🌿
It’s realy nice article, hats of you Tanuja mam . Keep writing, best of luck for your literary ahead 👍
Thank you so much, Ma’m!🙏🌷🌿
Very nice
Thank you so much, Sir!🙏🌷🌿