Wednesday, June 18, 2025
Homeलेखयोग : मन, शरीर करते प्रसन्न

योग : मन, शरीर करते प्रसन्न

अष्टांग योग साधनेचा अभ्यास का करायचा ? माझ्या मनात असलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले, ते योगा केंद्रात गेल्यानंतरच. “मनाला निर्मळ व शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अष्टांग योग साधना केली जाते.” असे आमच्या योग शिक्षकांनी सांगितले. मी विचारले, “मन कशासाठी निर्मळ करायचे ?” त्यावर गुरुजी म्हणाले, “मन शुद्ध कल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.’

“मनात कोणती घाण असते ?” हा मी व्याख्यानाच्या दरम्यानचा विचारलेला प्रश्न. याचे उत्तर मिळाले, विकारांची घाण, राग, लोभ, मोह, माया हे शत्रूं मनातच राहतात ना…! ते बाहेर काढल्याशिवाय मन निर्मळ होणार नाही.

सांताक्रूझ येथे योगा अकॅडमीमध्ये मी टीचर कोर्स केला. त्या वेळेला मन निर्मळ करण्यासाठी प्रथम अष्टांग योगसाधना शिकले. कारण योगाचा सगळा पायाच पतंजलींनी अभ्यासपूर्ण रचला आहे. सर्व साधु संतांनीही अष्टांग योग साधनेचा वापर करून स्वतःचे जीवन बदलवले व समाजाचे कल्याण करण्याचे मार्ग दाखविले.

योग म्हणजे जोडणे. शरीर व मनाला जोडतो तो म्हणजे योग. महर्षी पतंजली यांनी मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी अष्टांग योगसाधना सांगितली. त्याला महर्षी पतंजली यांचे योगसूत्र असे म्हणतात. फक्त शरीर निरोगी ठेवलं तर आपण निरोगी आहोत असं म्हणता येणार नाही. त्याबरोबरच मनही निरोगी ठेवणे गरजेचे आहे.

महर्षी पतंजली यांनी योगसूत्राच्या माध्यमातून जीवनाचे संपूर्ण कल्याण साधण्याचे मार्ग सांगितले आहेत. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी आठ अंगांसह योगाचा मार्ग विस्ताराने वर्णन केला आहे. हा आठ-आयामी मार्ग आहे. यामध्ये आठ परिमाणे एकत्रित केली जातात.
हे योगाचे आठ भाग असे आहेत.
१ ) यम
२) नियम
३) आसन
४ ) प्राणायाम
५ ) प्रत्याहार
६ ) ध्यान
७) धारणा
८) समाधी.
यम आणि नियम हे मन शुद्ध, निर्मळ होण्यासाठी आहेत. यामध्ये मन निरोगी राहण्यासाठी मनातील विकार दूर करून चांगल्या संस्कारांचे रोपण कसे करावे हे सांगितले आहे. त्यासाठी मनाला नित्य चांगल्या सूचना देऊन सकारात्मक विचारांचा
अभ्यास करायला शिकविला पाहिजे, असे पतंजली सांगतात.

त्यामध्ये सत्य बोलावे, चोरी करू नये, दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावू नये, प्रामाणिकपणाने कर्म करावे, परमेश्वराची साधना करावी असे सांगितले आहे. अशा अभ्यासामुळे मनाला चांगल्या सवयी लागतील. मनातील विकार नाहीसे झाले तर मन आपोआप निरोगी राहील. सकारात्मक विचार करून आपल्याला यशापर्यंत पोहोचविण्याचे कार्य मन करते.

आसनं आणि प्राणायाम:
शरीर निरोगी ठेवून मन आणि शरीराचा योग्य ताळमेळ घालून आसन करताना सर्व चित्त जर आसनाच्या ठिकाणी असेल तर त्याचा जास्त फायदा होतो. प्राणायाम केल्यामुळे आतील इंद्रियांचा व्यायाम होतो, त्यामुळे पचनक्रिया, श्वासांची लय, रक्तपुरवठा, फुफ्फुसाचे व्यायाम असे अनेक प्रकारचे फायदे होतात. आसनांमुळे शरीर लवचिक होते. सांध्यांचा व्यायाम होतो त्याचप्रमाणे शरीर सुदृढ राहते. चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आसनाचा जास्त फायदा होतो. सुंदर दिसण्यासाठी कोणतीही सौंदर्यप्रसाधनं वापरण्याची गरज भासत नाही. नियमित एक तास प्राणायाम आणि आसनं करणे आवश्यक आहे.

ध्यानधारणा :
मन एकाग्र करण्यासाठी, मनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ध्यानधारणा केली जाते. ध्यानधारणेमुळे आपल्या शरीरातील दैवी शक्ती असलेली केंद्र उघडतात आणि आंतरिक शक्तीचा वापर करू लागतात. जेव्हा आंतरिक शक्ती जागृत होते त्यावेळेला कोणतीही व्यक्ती असाध्य ते साध्य करू शकते.

सुप्त गुणांचा विकास होतो. सर्जनशीलता कल्पनाशक्ती, प्रतिभा या दैवी शक्ती जास्त प्रभावशाली काम करू शकतात. अशा प्रकारे जर रोज प्राणायान व आसनं केले तर मन आणि शरीर निरोगी राहून आपली प्रतिकार क्षमता निश्चित वाढेल. सकारात्मक विचारांमुळे आपल्या जगण्याची दिशा आणि दशा निश्चित बदलेल.

अष्टांग योगसाधनेमुळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. आपल्याही जीवनात होईल अशी आशा करते.

लता गुठे

– लेखन : लता गुठे. विलेपार्ले, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?