आत्महत्या एक गंभीर विषय आहे. गंभीर अशासाठी की जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात दरवर्षी अंदाजे सात लाखांपेक्षा अधिक व्यक्ती आत्महत्या करून जीवन संपवतात. म्हणजे ४० सेकंदाला एका आत्महत्येची नोंद होत असेल तर ही एक गंभीर सामाजिक समस्याच आहे.
आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २००४ पासून १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. यावर्षीचे ब्रीदवाक्य आहे “Creating Hope through Action” मराठीत “कृतीतून आशा फुलवु या“. भारतात मागील वर्षी, म्हणजे २०२१ साली १,६४,०३३ आत्महत्यांची नोंद झाली. हा आकडा २०२० सालापेक्षा ६ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच १८ वर्षांखालील ११,३९६ मुलामुलींच्या आत्महत्यांची नोंद आहे.
कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून आणि हुंड्यासाठी झालेल्या पराकोटीच्या छळामुळे होणार्या विवाहीत स्त्रियांच्या आत्महत्यांचा आलेख नेहमी चढताच असतो. २०२१ साली भारतात ४५०२६ महिलांच्या आत्महत्यांची नोंद नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या अहवालात करण्यात आली असून त्यात २३१७८ गृहिणींच्या आत्महत्या आहेत. या चढत्या आलेखात महाराष्ट्र राज्याचा तिसरा नंबर असून २०२१ साली महाराष्ट्रात २८६१ महिलांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या हा सुध्दा एक गंभीर विषय असून याचे राजकारण केले जाते ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. सामान्यतः या अप्रिय विषयावर चर्चा होणे तर नाहीच पण कोणी बोलणं ही पसंद करत नाही.
या सामाजिक समस्येला प्रतिबंध करण्यासाठी शासनातर्फे मुंबईतील के.ई.एम. आणि सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात २४ तास सेवा देणाऱ्या हेल्पलाईन चालवण्यात येतात. एखादी व्यक्ती जेव्हा आत्महत्येचा विचार करते तेव्हा कळत नकळत इशारा देत असते तो इशारा ओळखून सर्वांनी या दुर्दैवी जीवांना अशा विचारांपासून परावृत्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहायला हवे. या विषयावर आज, विलेपार्ले पूर्व येथील पु. ल.देशपांडे सभागृह,
लोकमान्य सेवा संघ, राम मंदिर मार्ग येथे मानसोपचार तज्ञ परिसंवादातून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. हा गहन प्रश्न सर्वांनी समजून घेणे नक्कीच आवश्यक असून, त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

– लेखन : आशा कुलकर्णी विलेपार्ले, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

मनापासून धन्यवाद, आशाताई…!
हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
आत्महत्यांना आळा घालण्यासाठी लोकांमध्ये आशेचं जागरण होणं महत्त्वाचं आहे.
आशा आणि हिम्मत यांचं वाण वाटण्यासाठीच तर गुरुकृपा संस्था हिम्मत का तराना हा उपक्रम चालवते.
तुम्ही आम्ही सारे मिळून या विषयावर नक्कीच प्रयत्न करू यात…
.. प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007