“यंग इंडियाचा ग्रुप सेल्फी” ही श्री लक्ष्मीकांत देशमुख यांची २०१७ साली प्रकाशित झालेली कादंबरी म्हणजे समुहमनाचा एक चित्रपटच आहे, असे हे पुस्तक वाचताना वाटत राहते.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू या शहरवजा गावातील दहावीला असलेली तीस जणांची बँच. त्यात दहा बारा मुली. बाकीचे सर्व मुले. गेल्या बारा वर्षात प्रत्येकाची जीवनात आणि करियरमध्ये कशी भिन्नभिन्न वाटचाल होत गेली याचे वेगवान शैलीत, कँलिडोस्कोपिक पध्दतीने केलेले दर्शन म्हणजे ही अप्रतिम रसाळ कादंबरी !
कादंबरीतील मुख्य पात्र असणारा, संजय हा मुंबईत एका इंग्रजी दैनिकाचा मुख्य प्रतिनिधी आहे. तो
मनोहरच्या लग्नाच्या निमित्ताने बँचमधील सर्व मुलामुलींना अत्याधुनिक संपर्क साधनांद्वारे एकत्र आणण्याचे काम करीत असतो. हा मनोहर अमेरिकेत बड्या आयटी कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करीत असतो. त्याच्या मूळ कल्पनेनुसार संजय सर्वांना एकत्र आणण्याचे व लग्नाचे निमंत्रण देण्याचे काम जिवलग मित्र म्हणून करीत असतो.मनोहरचे लग्न मुंबईतील श्रीमंत डायमंड मर्चंट व मोठे फिल्म फायनान्सर श्री मखिजा यांची कन्या मिठू सोबत मुंबईत ताज हाँटेल मध्ये ‘हम आपके कौन है’ या चित्रपटाप्रमाणे आयोजित करण्यात आले असते. सर्व मित्रांच्या सपत्निक वास्तव्यासाठी ताजमध्ये ४ दिवस सुट्स बुक केलेले असतात.
धमाल फँमिली गेटटुगेदर करण्याचा प्रमुख हेतू असलेल्या या लग्नाला एखादा अपवाद सोडल्यास सर्वांनी हजेरी लावलेली असते.त्यात गाव पातळीवर काम तलाठी शंकर, आयएएस झालेला प्रवीण जो औरंगाबादचा कलेक्टर आहे, एन जी ओत काम करणारी मीनल, स्वतःची शिक्षण संस्था काढून शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम करणारी सुभद्रा, गृहराज्य मंत्री झालेला सागर, बाँम्ब स्फोटात अडकलेला जिहादी अस्लम काझी, त्यामुळे फरपट झालेली बीबी सायरा, संजयची एन.जी.ओत काम करणारी बायको ज्योती, कलेक्टर प्रवीणची आंतरधर्मीय पत्नी फरझाना, अमेरिकेत मनोहर बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये दोन वर्षे राहिलेली ज्युलिया, मनोहरकडून स्वतः घटस्फोट घेतलेली अनु, डाव्या मार्क्सवादी विचार सरणीचा माधव, युनोमध्ये महिला सक्षमीकरणाच्या जागतिक परिषदेत भाग घेतलेली आणि सतत घोड्यावरुन फिरणारी, विवाहानंतर पाडळी गावची धाडसी सरपंच सारिका भोईटे, दहाही बोटात सोन्याच्या अंगठ्या घातलेला भास्कर, सारिकाबरोबर अमेरिकेतून आलेला अजिंक्य,औरंगाबादेत कारकून असलेला समीर, माहेरीच राहणारी त्याची बायको रश्मी, सेलू जवळच येलदरी धरणाला लागून असलेली सागाची, सेंद्रीय शेती करणारा शेखर, भारतीय वन विभागात काही काळ अधिकारी असलेली त्याची पत्नी अनन्या,एक धनाढ्य व्यापारी मनसुख, बजरंग दलाचा अभिषेक, दलित जाणिवेचा सिनेमा निर्माण केलेला मुरली आणि फक्त लग्नाला येऊ न शकलेला गरीब शेतकरी संदिपान या पात्रांच्या जीवनाभोवती फिरणारी ही बोलकी कादंबरी आहे !
एका लग्नानिमित्त एकत्रितपणे त्यांच्या भावविश्वाचा खेळ रचला जात इंद्रियगम्य सुखाचा उरफोडी पाठलाग करणाऱ्या तरूणांच्या एन्जॉयफूल जगाचे मायाजाल उभे राहिलेले कादंबरीतून प्रकर्षाने दिसते.एकीकडे सुखाला लालसावलेले जग आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या पोटी जन्म नको म्हणत मरण पत्करणाऱ्या तरूणांचे जग तसेच ‘स्व’ प्रतिमेच्या निरंतर ग्लानीत असणाऱ्या समूहाशेजारी नकोसे, जळणारे जीवनही कादंबरीत ओघवत्या शैलीत कथन केले आहे.
आंतरविरोधातील चित्रविचित्र घटनांचा वेध लक्ष्मीकांत देशमुखांनी फार चांगल्या रीतीने घेतला आहे. जागतिकीकरण व उदारीकरणाच्या काळातील आजच्या तरुणांचा एक मोठा नागर-शहरी वर्ग या नव्या धोरणाचा लाभार्थी म्हणून समर्थक आणि बाजारी अर्थव्यवस्थेच्या तत्वज्ञानाप्रमाणे आत्मकेंद्री व उपभोगवादी झाला आहे. त्याचवेळी कांहीना मात्र संधी मिळत नाही. रोजगाराची समस्या आहेच.अभावाचे जगणे आहे. प्रवाहपतिताचे जगणे जगण्यासाठी तरुण मजबूर आहेत. मात्र समाधानाची बाब म्हणजे काही समाजभान असणारे, तत्व पाळणारे,स्वयंसेवी संस्था चालविणारे, तरूण नोकरशहा, नागरिक देखील आहेत.
आजची तरूणाई बहुढंगी बहूरंगी आहे हे सारं चित्रण या कादंबरीत लक्ष्मीकांत देशमुखांनी फार सुरेखपणे रेखाटले आहे. अगदी शेवटी क्लायमॅक्स मध्ये कादंबरी काहीशी शोकात्म करून वाचकांना एक धक्का देखील दिला आहे.
आजच्या तरुणाईचा एक क्राँस सेक्शन ‘स्नँप शॉट’ रुपाने मांडणी केलेली ही कादंबरी मला तर भावलीच, परंतु तरूणांना देखील निश्चितचपणे स्वागतार्ह वाटेल, अशी आहे.

– परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नासिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800