इंग्रजांना मोगलाई संपवित असतानाच पेशवाईशी सामना करावा लागला. त्यावेळी महार शुर वीर कामी आल्याने सरंजामशाही संपुष्टात आली. भीमा कोरेगाव हे पेशवे आणि इंग्रज यांच्या लढाईचे एक महत्त्वाचे ठिकाण होते.पेशवे पराभुत झाले, ब्रिटिशांचा विजय झाला. पेशव्यांची राजवट केवळ सरंजामी नव्हती,तो वर्णवर्चस्वाचा कळस होता आणि विजयी ब्रिटिशांचा वसाहतवाद केवळ साम्राज्यवादच नव्हता तर त्याच्या तळात सामाजिक समता, न्यायाचा पहाट प्रकाश होता. म्हणून प्रबोधन युगात या लढाईला फुले आंबेडकरी चळवळीने महारांच्या शौर्यगाथेचा आशय दिला.
ह्या लढाईत जे लढले ते इंग्रजांच्या लेखी “परवारी” (अस्पृश्य) होते.तर भारतीय समाजातले हे महार कुणबी होते, असे प्रतिपादन करीत ज्येष्ठ विचारवंत प्रा. दत्ता भगत यांनी आजच्या जातीय तणावातले गैरसमजाचे निराकरण केले. ते नांदेड उत्तर शहराच्या तिरंगा नगर तरोडा खुर्द येथे आयोजित भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक कैलास धुतराज हे होते.
महार बटालियन हा विषयच इंग्रज राजवटीत नव्हता तर तो भीमा कोरेगाव च्या विजयस्तंभाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अवलोकन करून मागणी लावून धरल्याने विजयस्तंभास महत्त्व प्राप्त झाले, असे सांगताना ते म्हणाले की, अपुर्ण ज्ञानामुळे सवर्ण-बौध्द दरी निर्माण झाली, ती कमी झाली पाहिजे.
प्रारंभी प्रा दत्ता भगत यांनी विजयस्तंभ प्रतिकृतीस पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले.
प्रास्ताविक व आभारप्रदर्शन निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांनी केले. या अभिवादन कार्यक्रमास शाहिर संदिप राजा, प्रतिष्ठित उपासक सुरेश मोरे, तुकाराम सरपे, अशोक पाटील, विश्वनाथ लांबसोंगे, बी.सी.गोणारकर, के.एम.कोकरे दयानंद घुले इत्यादी उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
भीमा – कोरेगांव या घटनेचे इतके स्पष्ट विश्लेषण आज पर्यन्त कुणी ही केलेले नाही.या लढाईचे समर्थन करतांना प्रत्येक विचारवंतांनी सवर्ण दलित दरी कशी वाढेल असेच प्रतीपादन केले.त्यामुळे सामाजीक सौहार्दता संकुचीत होत गेलेली आहे.गुरुवर्य प्रा.भगत सरांनी नेमका हा भाग आपल्या आपल्या वक्तव्यातून अधोरेखीत केला.