सुप्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. जगावे कसे ? हे स्वतःच्या जीवनातून दाखवून दिलेले रमेश देव यांच्या विषयी च्या आठवणी जागवल्या आहेत,त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आलेले, अबू धाबी येथील आपले चित्रपट समीक्षक श्री प्रशांत कुळकर्णी. त्यांच्या आठवणीतील पहिला भाग पुढे देत आहे.
श्री रमेश देव यांना आपल्या पोर्टलतर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
2 ऑक्टोबर 1972 ला मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले आणि मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे एक नवे दालन घर बसल्या मिळाले.
त्या काळात मराठी सिनेमा- नाटक,हिंदी सिनेमा,रेडिओ एवढीच मनोरंजनाची साधने उपलब्ध असताना दूरदर्शन ने तेव्हाच्या अनेक दिगग्ज मराठी कलाकारांना हाताशी धरुन वेगवेगळे नावीन्यपूर्ण कार्यक्रम रसिकांना दिले जे आजही त्यांच्या आठवणीत आहेत. प्रतिभा आणि प्रतिमा, गजरा, अशा मराठी कार्यक्रमांसोबत छायागीत सारखे काही हिंदी कार्यक्रम देखील लोकप्रिय झाले.
त्यातील असाच एक हिंदी कार्यक्रम ज्यात लोकप्रिय हिंदी कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जायच्या. हिंदीतील या कलाकारांना बोलते करायचे काम करायची सुप्रसिद्ध अभिनेत्री तब्बसुम. “फुल खिलें है गुलशन गुलशन” नावाच्या या कार्यक्रमात एकदा हिंदी-मराठी सिनेमातील यशस्वी जोडी रमेश देव आणि सीमा देव यांना बोलावण्यात आले होते. शाळकरी वयात ही मुलाखत बघत असताना असा विचार पण कधी मनात आला नाही की याच जोडीची मुलाखत घेण्याचा प्रसंग आपल्या वर 35 वर्षा नंतर येणार आहे आणि तो देखील परदेशी भूमीवर !
पण 2-3 वर्षा पूर्वी जेव्हा अबुधाबी महाराष्ट्र मंडळाच्या त्या वर्षीच्या कमिटी ने रमेश आणि सीमा देव यांना बोलावायचे ठरवले तेव्हा त्यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपावली.
एकदा माझ्याकडून होकार गेल्यावर मात्र मुलाखतीसाठी त्यांची माहिती मिळवण्यासाठी माझी धावपळ सुरू झाली. सीमा ताई नी त्यांचे “सुवासिनी” नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे, हे मला माहित होते. पण ते कोणाकडेच उपलब्ध नव्हते. भारतातून येणाऱ्या मित्राकडून रमेश देव यांचे ‘या सुखानो या’ हे पुस्तक मिळाले. ते वाचून आणि स्वतःला अवगत असलेली माहिती लिहून मुलाखती साठी प्रश्नावली तयार केली, ज्या मध्ये दोघांच्या पन्नास-साठ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला होता.
मुलाखत जवळपास 2-3 तास रंगणे आवश्यक होते. त्या पेक्षा आवश्यक होते ते या दोघांशी योग्य तो संवाद साधणे. मग त्यांना मुंबईला फोन केला.
हळू हळू फोन वरून त्यांची ओळख व्हायला लागली. काही दिवसातील फोन वरील बातचिती वरूनच त्यांनी मला पूर्णपणे आश्वस्त केले. मुलाखतीचे स्वरूप ठरवल्या गेले आणि त्यांचा अबुधाबीत येण्याचा दिवस उजाडला.
कार्यक्रमाच्या आधल्या दिवशीच त्यांना भेटायला गेलो. फोन वरून ओळख झाली होतीच. प्रत्यक्ष भेटल्यावर रमेशजींनी पहिला प्रश्न विचारला, अच्छा, तुम्ही आमची मुलाखत घेणार तर ? म्हणजे तुम्ही आमचा पोपट करणार ? मिश्कीलपणे रमेशजी म्हणाले. मला काय उत्तर द्यावे ते समजेना. मी चाचरतच म्हणालो, नाही हो रमेशजी, मी काय पोपट करणार ? ही प्रश्नावली जरा नजरेखाली घालून घ्या. त्यांना मी काढलेले प्रश्न दाखवले. ते वाचल्यावर संतोषाने त्यांनी मान डोलावली आणि सीमाताई कडे बघत म्हणाले, बराच अभ्यास करून यांनी तयारी केलेली दिसतेय.
मग प्रश्नांची अदलाबदल, आम्ही मुलाखतीसाठी तयार केलेल्या ऑडिओ-विडिओ क्लिप्स याची त्यांना कल्पना दिली आणि दोघांना नमस्कार करून मी निघालो.
रात्री प्रश्नांची ऊजळणी करतच झोपायला गेलो. पण झोप कसली येतेय ? उद्याची मुलाखत व्यवस्थित होईल ना ? आपल्या कडून चुकून एखादा गैरलागू प्रश्न विचारला जाणार नाही ना ? आणि चुकून असे झाले तर त्यांच्याकडून अपमान तर होणार नाही ना ? एक ना अनेक चिंतानी निद्रेच्या आहारी गेलो.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रम स्थळी देव दाम्पत्याचे स्वागत ओवाळून करण्यात आले. ज्यांनी त्यांना ओवाळले त्यांच्या ओवाळणी च्या तबकात रमेशजींनी खिशातून शंभर रुपयाची नोट घालून ओवाळणी भेट दिली.
मग मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. वयाची नव्वदी पार केलेले रमेशजी आणि सत्तरी पार केलेल्या सीमाजी प्रत्येक प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देत होते. कधी सीमाजी बोलत असताना मधेच त्यांना थोपवून, रमेशजी सूत्रे हातात घेत. त्यांची थट्टा मस्करी करत. कधी जुन्या आठवणीत रंगून जात. आपल्या मोठेपणाचा अजिबात बडेजाव न दाखवता, कुठल्याही प्रकारचे दडपण न जाणवू देता दोघे ही एकमेकांची फिरकी घेत गप्पात सहभागी झाले होते.आधल्या रात्री बोलताना मी सहज त्यांना विचारले होते की रमेश जी, तुमचे ‘सूर तेचि छेडिता’ हे गाणे आम्ही वाजवणार आहोत, तुम्ही त्यावर एकदोन स्टेप्स कराल का ? खरे तर त्यांचे वय बघता असा आग्रह करणे चुकीचे होते पण त्या वयातील त्यांचा उत्साह बघता ते निश्चित करु शकतील, असा विश्वास वाटत होता. रमेशजी म्हणाले, बघू,मुड असला तर करू !
प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी सूर तेच छेडिता गाणे सुरू झाले आणि बाजूला बसलेले रमेशजी एकदम उठले आणि त्या स्टेप्स वर नाचू लागले. या वयातील त्यांचा उत्साह आणि ऊर्जा पाहताच प्रेक्षकांनी देखील उभे राहून, टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. शेवटी कलाकाराला काय पाहिजे असतं ? मायबाप प्रेक्षकाच्या या प्रतिसादासाठी तर तो आसुसलेला असतो. अशावेळी वयाची बंधने शिथिल होतात. मन भूतकाळातील तारुण्याच्या उंबरठ्यावर घुटमळायला लागते.या वयात देखील रसिक प्रेक्षक आपल्याला विसरले नाहीत, ही भावना सुखावून जाते.
असे अनेक कलाकार वृद्धावस्थेमुळे विस्मृतीच्या पडद्याड गेलेले असतात.पण आपले चाहते अजूनही आहेत आणि आपल्यावर अजूनही तितकेच प्रेम करतात याचा आनंद मनाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठे तरी निश्चित वाटत असतो.याज साठी अभिनेता होण्याचा केला होता अट्टाहास याचे सार्थक झाल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
वेळेअभावी कार्यक्रम लवकर संपवावा लागला. माझे अनेक प्रश्न प्रश्नच बनून राहिले. रमेश आणि सीमाजी यांची मिळून शंभर वर्षाची कारकीर्द, माझे 20-25 प्रश्न आणि वेळ फक्त दोन तास !
पण रमेशजी च्या अघळपघळ, काहीही हातचं राखून न ठेवण्याच्या वृत्तीमुळे ते दोन तास कसे निघून गेले हे समजले देखील नाही.
कार्यक्रमानंतरच्या जेवणाच्या वेळी सीमाजींच्या केसात मोगऱ्याचा गजरा माळताना त्यांच्यातला रसिक नवरा जागोजागी दिसत होता. या रसिकतेनेच या वयात देखील वृध्दत्वावर मात करत तारुण्य टिकवून ठेवले होते.
या कार्यक्रमाचे मानधन देखील ते चालवत असलेल्या एका सामाजिक संस्थेला जाणार होते. निरोप घेताना ते फक्त त्यांच्या चाहत्यांचे प्रेम मात्र भरपूर घेऊन गेले.
लहानपणी शाळेत असताना रेडिओ वर एक गाणे वारंवार ऎकायचो, देव जरी मज कधी भेटला…. त्या देवाचे माहीत नाही पण हा देव मात्र पहिल्याच भेटीत हृदयात घर करून बसला. देवासारखी माणसे जिथे घर करून राहतात ‘देवघर’ यालाच म्हणत असतील का ?
क्रमशः

– लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800