Tuesday, June 17, 2025
Homeलेखमाझी शाळा

माझी शाळा

सदा हसतमुख, कार्य तत्पर, महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली येथे माहिती अधिकारी असलेल्या, आपल्या पोर्टल वर नियमित लेखन करणाऱ्या सौ अंजू कांबळे यांनी त्यांना घडविणाऱ्या शाळे विषयी लिहिलेला लेख पुढे देत आहे.

आज सौ.अंजू कांबळे यांचा वाढदिवस आहे. आपल्या पोर्टल तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

नागपुर मधील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल ही माझी शाळा आहे. या शाळेने माझेच नाही तर, हजारो, लाखो मुलींचे जीवन घडविले आहे.

अशा या आमच्या शाळेत जुन्या विद्यार्थ्यांच्या भेटीचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 1952 पासून ते 2017 -18 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.या भेटीचा इतका आनंद झाला की, तो शब्दात व्यक्त करता येणार नाही !

आमची शाळा ही 1857 मध्ये सुरू झाली. त्यावेळी आमच्या शाळेचे नाव कुपर स्कूल होतं. मराठी माध्यमाने या शाळेचे सुरूवात झाली. विशेष म्हणजे विदर्भातील ही सर्वात जुनी मुलींची शाळा आहे. पुढे या शाळेचे नाव सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल असे झाले. आता ही शाळा ज्युनिअर कॉलेज पर्यंत झाली आहे.

पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्याच्या अवघ्या दहा वर्षानंतर आमची शाळा सुरू झाली, ती ही मुलींसाठीच! म्हणजे जो पुण्यातला धागा आहे तो नागपूरपर्यंत ओढत गेला म्हणायचा. नागपुरातली ही मुलींची शाळा आजही मुलींचीच आहे.

जेव्हा मी शाळेत होती, तेव्हा इथे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम होते. माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये तोपर्यंत तरी ही एकमेव अशी शाळा होती, जिथे इतकी माध्यमे होती.

आमची ही शाळा माझ्यासारख्या मुलींसाठी वरदानच ठरली. म्हणजे शिक्षणाचे वारे जेव्हा वाहत होते आणि मुलींना पण मुलांसारखे शिक्षण असावं असं घरच्यांनाही वाटत होतं आणि विशेष म्हणजे शाळेची फी पण खूप कमी होती, ते सर्व सेंट उर्सुला शाळेमुळे शक्य होऊ शकले.

मुलींची शाळा असल्यामुळे सर्वच धर्मातील तसेच आर्थिकरित्या सक्षम आणि आर्थिकरित्या सक्षम नसणाऱ्या अशा सर्वच मुलींसाठी आमची शाळा वरदान ठरली.

मला आठवते माझ्या शाळेत गड्डी गोदाम, इंदोरा, लष्करी बाग, कुंभारपुरा येथील निम्न वर्गातील म्हणजेच अनुसूचित जातीतील मुलीही सहज ऍडमिशन घेऊ शकत होत्या. परवडणारी फी असल्यामुळे सर्वांना शाळा परवडण्यासारखीच होती.

या शाळेने आम्हाला काय नाही दिले ? आमची शाळा ख्रिश्चन असल्यामुळे रोज बायबल रीडिंग व्हायचं त्यामुळे एका प्रकारे स्वभावात उदारताच निर्माण झाली.

नैसर्गिक आपत्ती आली, शाळेतील मुलींच्या कुटुंबांसोबत एखादी दुर्घटना झाली त्यावेळी विशेष प्रेयर व्हायची. हे इतकं सहज अंगात भिनत गेलं की भेदभाव काय असतो, ते कळलच नाही. अशा या काही बाबी शाळेचा उंबरठा पार केल्यावरच लक्षात आल्या .

अभ्यासात रस नसेल त्यांना पण शिस्त, डिसिप्लिन हा शब्द माहिती होता आणि तो पाळण्याचा प्रयत्नही होत होता. शाळेत जाताना नखे कापलेलीच असावी, कपड्यांना इस्त्री असावीच त्यासाठी त्यावेळी शेगडीतले कोळसे अक्षरशः गडव्यामध्ये ठेवून कपड्यांना प्रेस करायचो. दोन वेण्या असल्याच पाहिजे. नीटनेटकेपणा दिसलाच पाहिजे आणि तो पाळण्याचा प्रत्येक कुटुंबातून प्रयत्न होत असे. या साध्या साध्या गोष्टी ज्या रोजच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत या माझ्यासह अनेकांच्या अंगी शाळेमुळेच भिनल्या.

किमान दहावीपर्यंत शिक्षण मुलींना शाळेमुळे मिळाले आणि आजही ते मिळते. आज शाळेत ज्युनिअर कॉलेजही आहे त्यामुळे अधिक शिकता येते.

रियुनियनच्या कार्यक्रमात मला शिकवलेल्या शिक्षकांची भेट झाली आणि डोळे आपोआपच पाणवले. शेरले मिस, सबनीस मिस, मायकल मिस वाकचौरे मिस आणखी हिंदी, इंग्रजी माध्यमांना शिकवणाऱ्या मिस पण आलेल्या होत्या. आम्ही शिक्षिकांना मिस म्हणायचो आणि आजही मिस म्हणण्याचीच सवय आहे. असो

माझ्या आईवडिलांना अनेक धन्यवाद की, त्यांनी त्या काळात घरापासून किमान आठ-दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेंट उर्सुला शाळेमध्ये मला प्रवेश देण्यासाठी धडपड केली. माझ्या सुरक्षेसाठी मला दुसऱ्या वर्गापासून ते आठव्या वर्गापर्यंत सायकल रिक्षा ही लावून दिला. म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी मी शिकली पाहिजे असं वाटत होतं. त्यांनी कधीही माझ्यात आणि माझ्या भावांमध्ये भेदभाव केलेला नाही. किंबहुना माझ्या भावांपेक्षा मला थोडं अधिकच मिळालं असे मी म्हणेल. मला खूप खूप ऋणी असल्यासारखं वाटते. मी आज जे काही आहे,ती केवळ त्यांच्याचमुळे आहे. मी आई बाबांच्या मागे लागून सेंट उर्सुला मध्ये प्रवेश मिळविला होता.

आजही मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो. पाऊस येत होता. बाबांनी छत्री घेऊन शाळेत सोडले होते. थोरले मिस माझ्या पहिल्या वर्गाच्या शिक्षिका होत्या.
पहिल्या दिवसापासून सुरू झालेली माझी ही शाळा मी दहावी पास होईपर्यंत कायम राहिली.पुढे साहजिकच मी कॉलेजमध्ये गेले आणि शाळा सुटली. पण अशा या माझ्या शाळेची मी सदैव ऋणी राहील.

अंजु कांबळे

– लेखन : अंजु कांबळे.
माहिती अधिकारी. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. शाळेविषयी आदरणीय प्रेम कांबळेच्या लेखातून जाणवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?