भावनांची वादळे ही लाट येता सागरा
तळ सारा ढवळतो नि लाट जाते अंबरा
तटपटी आंदोलने ती गाज येते गर्जना
मन:पटली गलबला तो पूर येई लोचना…
माणसाचा सूर आहे माणसाचा नूर तो
खुट्ठ झाले की जरासे माणूस तो हुरहुरतो
भांडे लागे भांड्याला नी दार वाजे खडखडा
तोंड आहे म्हणूनी का वाट्टेल ते हो बडबडा…
भावना हळूवार असती डोळ्यांतुनी ओसांडती
का अचानक मग ऐसी मिळते तयांना दुर्गती
“मी” असा नि “मी” तसा हो अहं तेथे गर्जतो
आणि घोटाळाच सारा तोल तेथे बिघडतो…
विश्व आहे हे अनंत कोण तू नि मी कुठे ?
मी पणाची लाट खोटी जेथे तिथे हो का फुटे ?
समोरचा माणूस आहे मन त्यासी भावना
सुज्ञ असूनी माणसाला वाटतो का कमीपणा…?
माणसा माणूस हो तू वाहून जाऊ नको असा
क्षणिक असती भावना त्या आहे स्वीकार जसा
वाहून गेले मोठमोठे अश्वत्थामा दुर्योधन
अफाट आहे सागर हा वाळूतील मी “एक कण”…

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800