जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लढाखमधील भ्रमंती तसेच गिर्यारोहणाचे ललितरम्य अनुभव शब्दांकित करणारे प्रल्हाद जाधव यांचे ‘हिमाक्षरे‘ हे पुस्तक ग्रंथालीने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. ‘ट्रॅव्हलॉग’ आणि ‘ट्रॅव्हल लिटरेचर’ यांचा अनोखा संगम असणारे हे मराठीतील एक अनोखे पुस्तक म्हणता येईल.
‘हिमाक्षरे’ मधील लेखन चार विभागात विभागलेले आहे. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ हा पहिला भाग वाचकाला रौद्र-भीषण आणि तितक्याच नितांत सुंदर हिमाचलाची साक्षात्कारी सफर घडवून आणतो.
‘दुनिया रैन बसेरा’ या दुसऱ्या भागात सिक्कीम-दार्जिलिंग, लडाख, आणि स्पिती व्हॅलीचे रेशीमजाल वाचकासमोर उलगडत जाते.
‘ह्या गंगेमधी गगन वितळले’ हा तिसरा भाग म्हणजे रोजची पळापळ, यंत्रवत जगणे, बधिर संवेदनांचा झाकोळ या पार्श्वभूमीवर वाचकाच्या मनाच्या तळाशी पोहोचत आतील पाझर जागवणाऱ्या काश्मीर-खोऱ्याचे दर्शन.
तर ‘गगनघटा गहरानी’ हा अखेरचा भाग म्हणजे शरीर-मनाची परीक्षा घेत, निसर्गाच्या हात हातात घालून जगायला शिकवणारा आणि साक्षात्काराच्या क्षितिजावर माणसाच्या अस्तित्व- भानाची सोनेरी किरणे उजळून काढणारा उत्तराखंड !
हे लेखन केवळ पुस्तकी स्वरूपाचे नाही. एका मनस्वी लेखकाचे स्वानुभव आणि त्याला असणाऱ्या त्याच्या सखोल चिंतनाची जोड यामुळे ते वाचकाला आनंदाच्या एका आगळ्या शिखरावर घेऊन जाणारे ठरले आहे. जगणे आणि फिरणे या दोन समांतररेषा आत्मप्रत्याच्या क्षितिजाजवळ एकत्र आणण्याची किमया साधणारा हा प्रवास सर्वांनी पुन:पुन्हा अनुभवावा, स्मरणाच्या कुपीत जपून ठेवावा आणि त्यापासून रोजच्या जगण्यासाठी प्रेरणा घेत राहावी असा झाला आहे.
सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि ‘द हिमालयीन जर्नल’चे माजी संपादक राजेश गाडगीळ यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत ते म्हणतात : ‘मला गिर्यारोहणाची आवड असल्याने पर्वत, निसर्ग असे त्या संबंधीचे खूप वाचन मी आत्तापर्यंत करत आलो आहे. त्यात अजून एक भर या भावनेने ‘हिमाक्षरे’ वाचायला घेतले पण हळूहळू त्यात कधी गुरफटून गेलो हे कळलेच नाही. थंडी खूप वाजली की तंबूमध्ये माणूस जसा स्लीपिंग बॅगमध्ये आत आत शिरत जातो तसा मी या पुस्तकात खोलवर रुतत गेलो. आणि तसतशी ‘हिमाक्षरां’त दडलेली हिमचित्रे हळूहळू डोळ्यासमोर उलगडायला लागली. एखाद्या कसलेल्या गायकाने एका संथ अशा लयीत बंदिशीची सुरवात करावी आणि हळूहळू त्या मैफिलीने आपल्याला बेहोश करत न्यावे अगदी तसा अनुभव या वाचनाने दिला.’
सुप्रसिद्ध ॲडगुरु गोपी कुकडे यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि रेखाटने केली असून तेही या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
‘प्रवासाला जाताना घ्यायची काळजी’ हे परिशिष्टातील प्रकरण म्हणजे वाचकांना मिळालेला एक प्रकारचा बोनस ठरला आहे. प्रवासाच्या अनुषंगाने नमूद केलेल्या अनेक छोट्या-मोठ्या सुचना आणि संबंधित गमती-जमतीमुळे वाचकाचे प्रबोधन तर होतेच पण प्रवासाला निघण्याच्या दृष्टीने त्याची मनोभूमिका तयार होण्यासही मदत होते.
भारताच्या कानाकोपऱ्यात आपण जेथे जेथे जाऊ तेथे तेथे मराठी पर्यटकांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर जाणवते. याचे श्रेय मराठी माणसाच्या भ्रमंतीवरील प्रेमासाठी आहेच पण त्याला विविध ठिकाणी सुखरूपपणे घेऊन जाणाऱ्या टूर कंपन्यांनाही आहे. या पार्श्वभूमीवर रसिक पर्यटकांना एक संस्मरणीय अशी भेट म्हणूनही हे पुस्तक आपले स्थान निर्माण करू शकेल अशी खात्री ते देते.
प्रल्हाद जाधव हे माहिती संचालक म्हणून मंत्रालयातून निवृत्त झाले. एक कार्यक्षम अधिकारी तसेच सर्जनशील ललित लेखक आणि नाटककार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. ‘कोरोना’च्या दोन वर्षाच्या संभ्रमित काळात त्यांनी भ्रमंती आणि लेखन दोन्ही सुरू ठेवले. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, ‘अंबे गोंधळाला ये’ आणि ‘जरा हळू…’ ही तीन नाटके तसेच ‘पाझर’ या चित्रपटाचे लेखन केले. ‘अखेर कवितेने गाठलेच !’ हा त्यांच्या साठ निवडक कवितांचा संग्रहसुद्धा त्यांनी हातावेगळा केला आणि तो आता ‘कॉपर कॉइन’तर्फे प्रसिद्ध होत आहे.
तीस वर्षांच्या शासकीय नोकरीत अनेक जाहिराती, जिंगल, गाणी, माहितीपटांचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, ‘लोकमत’मध्ये स्तंभलेखन तसेच अन्य विविध नियतकालिकातून, वेधक आणि मोजके ललित लेखन केले. वाचन, लेखन, जंगलभ्रमण, गिर्यारोहण, पक्षिनिरीक्षण या छंदांच्या अनुषंगाने आपले विविधांगी लेखन त्यांनी आजही सुरू ठेवले आहे. त्याच लेखन-साखळीतील हिमाक्षरे हे त्यांचे नवे प्रसन्न पुस्तक! त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, चौफेर वाचन आणि ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालू पाहणारा ‘वाचक-स्नेहबंध’ यामुळे २५० इतकी पृष्ठसंख्या असलेले
हे पुस्तक रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील असे झाले आहे.
‘हिमाक्षरे’मधील ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ या विभागातील ‘फुलणारे जीवन’ हे प्रकरण येथे देत आहोत.
फुलणारे जीवन …
सकाळी साडेपाचला उठलो. हिमाचल प्रदेशात, समुद्र सपाटीपासून ९००० फूट उंचीवर असणाऱ्या किलाड गावच्या वाटेवर पाय मोकळे करुन आलो. तेथील ‘चिमुकला एस.टी. स्टँड’ पुन्हा पाहिला. हॉटेलच्या वरच्या माळ्यावर जाऊन तेथे सुरू असलेले विस्तारित बांधकाम पाहिले. पर्यटनाच्या व्यवसायाला इकडे कायम चांगले दिवस असतात त्याचेच ते लक्षण होते. वरून फोटो काढून झाले. मग खाली येऊन गॅलरीत बसलो. टीम लीडर आत्माराम कॅमेरा घेऊन आले आणि फोटो काढू लागले. पाठोपाठ त्यांनी आपल्याकडचे चहाचे साहित्य आणले. ‘प्रोटोकॉल’ ठरलेला असावा त्याप्रमाणे आधी त्यांचा आणि पाठोपाठ हॉटेलचा चहा आला. हे हॉटेल हे ९००० फुटावर तर साच पास १४५०० फूट उंचीवर. आम्ही जेथे बसलो होतो तेथून दूरवर त्या शिखराचे दर्शन घडत होते. तुषार म्हणाला, “ते जे समोर शिखर दिसत आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचे आहे.” पुन्हा काळजाचा ठोका चुकवणारा थरकाप. पण तीच उत्सुकता, तीच हुरहूर. आश्चर्यचकित करून टाकणारे वास्तव अनुभवण्यासाठी तीच असोशी !
निघेपर्यंत जो वेळ मिळाला तेवढ्या वेळात गॅलरीत बसून निसर्गाची विविध रूपे डोळ्यात भरून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. समोरचे मोकळे आकाश, विस्तीर्ण दरी, सळसळणारी झाडे आणि पहाटेच्या सोनेरी किरणांचा नयनरम्य उत्सव पहायला मिळाला. वेगवेगळ्या आकारांचे ढग एकीकडून तरंगत येत होते आणि दुसरीकडे जात होते. त्यांचे सतत बदलणारे आकार, वेगवेगळ्या रंगछटा आणि उलट-सुलट चाललेली पळापळ बघतांना देहभान हरपून जात होते. उजवीकडच्या शिखरामागून सूर्य वर येऊ लागला तसतशी त्या शिखराची सावली डाव्या बाजूच्या दरीवरून हळूहळू मागे सरकत चालली… झाडाचे शेंडे, लहान-मोठी टेकाडे, दगड-माती क्रमाक्रमाने प्रकाशित करत जाणारा ऊनसावलीचा तो लडिवाळ खेळ डोळे भरुन पाहून घेतला.
सोनसळी ऊन हलत असताना पहायला मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही. लाखो रुपये मोजले तरी तो अनुभव पदरी पडणे अवघड. शिखरावरून खाली आलेल्या सूर्याच्या पहिल्या सोनेरी किरणाने दरीतील नदीच्या पाण्याला स्पर्श केला तो क्षण अंगावर रोमांच उठवून गेला. तेज आणि आप या दोन तत्त्वांचे ते अद्भुत मीलन सृष्टीच्या सृजनशील वृत्तीशी माणसाला जोडू पहात होते. त्यातच भर म्हणून की काय समोरच्या पॉप्लरच्या झाडांची सळसळ आणि त्याच्या पानावर पडणाऱ्या कोवळ्या किरणांची प्रभा जीवाला पिसे लावून जात होती…
मनालीला ‘शुरू कॉटेज’च्या टेरेसवरून मी खालून वर ढग बघत होतो. आता ते नजरेला समांतर आणि नजीकच्या अंतरावर दिसत होते. हेच ढग पुढे ‘साच-पास’ वरून खालच्या कोनातून बघायला मिळणार आहेत याची मला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती. ही श्रीमंती याच जन्मी अनुभवायला मिळावी हा ‘भाग्ययोग’ नाहीतर दुसरे काय ?
आंघोळ, नाश्ता वगैरे आटपून, गाडीत सामान भरून, नऊ वाजता बाहेर पडलो. येथून ‘साच’ चाळीस कि.मी. म्हणजे किमान चार-पाच तास प्रवासात जाणार हे ठरलेले होते. वाटेत चेकपोस्ट. चौकशी. परवानगी, पावती. मग प्रवास, प्रवास, प्रवास… गाडीत पुन्हा सकाळची ती थंड शांतता, पाळण्यासारखी आंदुळणारी गाडी, मिटू मिटू डोळे, अपुऱ्या निद्रेने पुन्हा टाकलेले जाळे… डोक्यात भरून राहिलेले रंग. झाडांचे हिरवे, खडकांचे काळे, मुरुमाचे तपकिरी-पिवळे, खळाळत्या पाहण्याचे स्फटिकवत … ते एकमेकात मिसळत होते, वेगवेगळ्या आकारात पुनर्जन्म घेत होते आणि रंगांचा एक नवीनच विभ्रम निर्माण करीत होते. मेंदूतील स्मरणाच्या निगेटिव्हवर हा सारा प्रवास आपोआप आणि अनिवार्यपणे मुद्रित होत होता. जगण्याचे जणू एक ‘ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग’ उभे-आडवे चितारले जात होते…
आत्माराम यांनी गाडीतील टेपवर अचानक मराठी गाणी लावली. ‘विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले…’ ही ओळ कानावर आली आणि मग एकदम मेंदूतही दृश्यबदल व्हावा तसे झाले. खरेतर अशा प्रवासात गाणी ऐकणे हा प्रकारच कधी माझ्या डोक्यात बसत नाही. मुंबईला कंटाळून बाहेर पडल्यावरही सोबतीला असणारी तीच ती बॉलिवूडमधील घिसीपिटी गाणी ऐकावी लागणे ही बऱ्याचदा एक शिक्षा ठरते. ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’ किंवा ‘मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू’ अशी गाणी मोठ्या आवाजात सुरू झाली आणि सहप्रवाशांचा त्यावर गोंधळ सुरू झाला की, ‘हेची फल काय मम तपाला’ असा प्रश्न पडतो. बऱ्याचदा ती माणसे इतकी फिल्मी झालेली असतात की त्यांना जर काही आपण सांगायला गेले तर ती आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे ती गाणी सहन करणे, किंवा आवाज थोडा कमी करा असे नम्रपणे सांगणे हा एकच मार्ग समोर असतो…पण आता अगदी या उलट घडले होते. कानात प्राण गोळा करून ऐकावे असे मराठी गाणे कानावर पडत होते…
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले
अवघेचि जाले देह ब्रह्म
आवडीचे वालभ माझेनि कोंदाटले
नवल देखिले नभाकार गे माये
बाप रखुमादेवीवरू सहज नीटू जाला
हृदयी नीटावला ब्रह्माकारे …
ज्ञानेश्वरांच्या शब्दांनी आणि लताबाईंच्या सुरानी मनात एकदम काहीतरी विश्वात्मक भाव उदयाला येत असल्याचा प्रत्यय दिला. त्याचा उत्कर्षबिंदू होता ‘सहज नीटू जाला…’ ही ओळ ! तिचा अर्थ-एखादी गोष्ट अगदी सहजगत्या होऊन जाणे. कोणतीही ओढाताण, छेडछाड न करता मनापासून केलेली कृती. एखादे फुल फुलावे तशी सहज होऊन गेलेली गोष्ट ! प्रत्येक क्षणी सजग राहून, निसर्गाच्या प्रवाहात सहभागी होऊन समतोल वृत्तीने जगणे म्हणजे ‘सहज नीटू जाला’चा अनुभव ! या प्रवासातला अखेरचा टप्पा म्हणजे आपणच ‘ब्रम्हाकार’ होऊन जाणे. ब्रह्माकार हा शब्द अध्यात्मिक अर्थाने नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात आपले स्वतःचे अस्तित्व लोप पावताना अनुभवणे, या अर्थी वापरला आहे…’मोगरा फुलला’ हे सदाबहार गाणे अर्थातच पाठोपाठ लागले.
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरू कळियांसी आला
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेला गगनावेरी
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरू विठ्ठले अर्पिला…
पुन्हा ज्ञानेश्वरांचे शब्द आणि लताबाईंचा आवाज! मन एकदम प्रसन्न होऊन गेले. ही दोन्ही गाणी व्यक्त आणि अव्यक्तामधील पूल जोडणारी ! आतील आणि बाहेरील दोन्ही प्रवासांशी संबंधित…एक प्रवास रस्त्याने होणारा. शिखरावर नेणारा. दऱ्यांखोऱ्यांची रौद्रभीषणता आणि सौंदर्य दाखवणारा. तर दुसरा मनातला. मोहमायेच्या किती शिखरांचा तुम्हाला साक्षात्कार झाला याचा हिशेब करायला लावणारा. दंभ, अहंकार, क्रोध इत्यादीच्या किती दऱ्याखोऱ्या तुम्ही पार केल्या याचा ताळमेळ घालायला उद्युक्त करू पाहणारा ! वा क्या बात है ! मी स्वतःशीच म्हणालो. जगण्याचे रूक्ष हिशेब आणि कठोर दैनंदिन व्यवहार या भूमीवरून पाय आपोआप सुटले आणि मी एकदम एका वखवखशून्य, उन्मनी अवस्थेत गेलो. ‘सुखिया जाला’च्या परिघात विरघळत गेलो !
निसर्ग जणू शिकवणी घेत होता. सुखामागून दुःख, दिवसामागून रात्र, क्षणोक्षणी घडणारे बदल, अनित्यता, क्षणभंगुरत्व, पुढे काय होईल याची खात्री नसणे… याला जीवन ऐसे नाव ! मी कोणीतरी आहे किंवा मी परिपूर्ण आहे असा समज करून घेणे म्हणजे केवळ अज्ञान. त्या अज्ञानातून बाहेर पड आणि आहे या क्षणाचा आनंद घे… मीच मला जणू समजावून सांगत होतो. पण पुन्हा त्यातही ‘मी’ होताच ! डोक्यातील गुंता वाढत गेला… नकोच ते विचारात अधिक गुंतत जाणे असे म्हणत मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो.
काही क्षणांनी पुन्हा बाहेरच्या प्रवासाशी सांधा जुळला.
वाटेत ठिकठिकाणी थांबत, फोटोग्राफी करत, मनातील कधीही न संपणाऱ्या निगेटिव्हवर निसर्गाचे विविध विभ्रम कसे मुद्रित होत आहेत याची अनुभती घेत पुढे निघालो.
काळजाचा थरकाप उडवणारा पण तितकाच सुंदर प्रवास. एकीकडे खाचखळगे, डोंगरदऱ्या, वेडीवाकडी वळणे आणि त्याबरोबर दुसरीकडे मनावर गारुड करणारी ज्ञानेश्वरांच्या शब्दांची सौंदर्यानुभूती !
उंचावर अरुंद ठिकाणी बऱ्याचदा कातळ फोडून रस्ता तयार केलेला असतो. डोक्यावर कोरून काढलेले कातळाचे छत आणि त्याच्या पोटातून गाडीचे हळूहळू पुढे जाणे हा थरार शब्दातीत असतो. ‘साच’कडे जाताना असे अनेकदा घडले. एका ठिकाणी डोक्यावरचा रस्ता ओलांडून धबधबा कोसळत होता आणि त्याच्या पोटातील रस्त्याने आम्ही पुढे जात होतो. एक विलक्षण थरार तेथे आम्ही अनुभवला. थांबलो. पाण्याचे तुषार अंगावर घेतले. मनसोक्त फोटोग्राफी केली. निसर्गाचा तो चिंब सोहळा पोटभर अनुभवला.
निसर्ग आमच्यावर जणू प्रसन्न झाला होता. वरून एक मेंढपाळ मेंढ्याचा कळप घेऊन खाली उतरताना दिसला. फोटोग्राफरच्या दृष्टीने असा योग म्हणजे एक मोठी मेजवानीच असते. मग काय ! तो मेंढपाळ, त्याच्या त्या निरागस मेंढ्या आणि तो उत्फुल्ल निसर्ग यांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढणे सुरू झाले. मी आणि रेखाने हातात एक कोकरु घेऊन फोटो काढले…असे फोटो प्रत्येकालाच आवडतात, दीर्घकाळ स्मरणात राहून जातात.
थंड-बोचरी हवा, प्रसन्न वातावरण, निळे आकाश, त्यातील पांढरे ढग आणि वरून खाली पडणारे स्फटिकासारखे पाणी असा अद्भुत अनुभव निसर्गाने पदरात टाकला होता. सुनीलने यावेळी आमच्या दोघांचे एक मूव्ही चित्रीकरण करून दिले. ते आमच्या मित्रमंडळींना इतके आवडले की त्यांना आमचा हेवाच वाटला असेल. आम्ही ते आता कायमस्वरूपी आमच्या स्मरणाच्या पोतडीमध्ये जतन करून ठेवले आहे.
रस्त्याच्या वरून वाहणाऱ्या त्या धबधब्याच्या पुढच्या बाजूला येऊन आम्ही उभे होतो. बिनीचे पक्षिनिरीक्षक आणि हाडाचे छायाचित्रकार असलेल्या तुषार निदांबूर
मनात कल्पना आली की गाडी धबधब्याखालून येत आहे असे एक दृश्य चित्रित करून घ्यावे. कल्पना खूपच आकर्षक पण तितकीच धोकादायकही होती कारण त्यासाठी विकीला गाडी रिव्हर्समध्ये घ्यावी लागणार होती. मात्र विकीने लगेच ती तयारी दर्शवली.गाडी घेऊन तो हळूहळू मागे जाऊ लागला. दरम्यान भटकबहाद्दर
सुधीर धर्माधिकारी यांनी आपला कॅमेरा सज्ज करून एका बाजूने या घटनेच्या चित्रीकरणास सुरुवात केली. एक क्षण असा आला की गाडी मागे नेता नेता तिचे एक चाक दरीच्या अंगाला असे काही धसले की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने पुढच्या क्षणी गाडी स्थिर झाली आणि हळूहळू पुढे येऊ लागली. तुषारला हवा होता तसा शॉट मिळाला. पण भलतेच काही घडले असते तर त्या धाडसाची किंमत किती मोजावी लागली असती याची आज कल्पनाही करवत नाही !
गाडीचे चाक घसरण्याचा धर्माधिकारी यांनी टिपलेला तो क्षण, पुनःपुन्हा पाहताना आजही अंगावर काटा येतो, काळजाचा ठोका चुकतो.असे धाडस पर्यटकांनी न करणे कधीही उत्तम! गाडीचे चाक दरीच्या बाजूने धसण्याचा ‘तो क्षण’ त्यांनी कसा टिपला याचे उत्तर त्यांचा प्रदीर्घ अनुभव, दूरदृष्टी आणि अर्थातच त्यांच्या फोटोग्राफीच्या ध्यासाला आहे. तो दिवस धर्माधिकारी यांचा होता एवढे नक्की !
पाहता पाहता साच पासच्या दिशेने सरकत सरकत आम्ही बर्फाच्छादित प्रदेशात शिरलो. डोंगरावरून वाहता वाहता; रुसून बसलेल्या मुलासारखा मध्येच अडकलेला बर्फ अधून मधून दिसायचा. कोणत्याही क्षणी खाली कोसळेल अशा अवस्थेत. त्याची एक वेगळीच दहशत आणि गंमतही वाटायची.आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बर्फ वाढत गेला. दोन्ही बाजूच्या बर्फाच्या भिंती उंच होत गेल्या. त्यातली एखादी जर आमच्यावर कोसळली असती आणि त्याखाली आम्ही जर गाडले गेलो असतो तर कोणाला आमचा पत्ताही लागला नसता. ‘शुभ्र काही जीवघेणे’ ही मर्ढेकरांची कविता वेगळ्या अर्थाने अनुभवावी लागली असती…
विस्तीर्ण-प्रशांत माथ्यावर गाडी थांबली. उतरलो…जणू सृष्टीच्या आणि स्वतःच्या उगमापाशी पोहोचलो होतो !
देशातील सगळ्यात अवघड आणि खडतर अशा साच पासवर आम्ही पाय ठेवला होता. पीर-पंजाल पर्वतरांगेतील ४४१४ मीटर अर्थात १४ हजार ४८२ फुटांवरील हे शिखर आम्ही गाठले होते. पांगी आणि चंबा या दोन खोऱ्यांना हस्तांदोलन करायला लावणारे हिमाचलमधील अद्भुत ठिकाण ! हात लावता येईल इतक्या जवळच्या अंतरावर तरंगणारे ढग. सोसाट्याचा वारा. जबरदस्त थंडी. काही वर्षांपूर्वी आम्ही लडाखमध्ये ‘चद्दर ट्रेक’ला गेलो होतो, त्या वेळेला उबदार कपड्यांची बरीच खरेदी केली होती. ते सगळे कपडे अंगावर होते म्हणून आमचा तेथे टिकाव लागू शकला.
एका मोक्याच्या ठिकाणी उभा राहून मी आसमंत न्याहाळू लागलो… आपण आणि आकाश यात मध्ये दुसरे कोणीही नसावे ही किती सुंदर गोष्ट आहे ! अंतर्मुख करू पाहणारी, आत वळवू पाहणारी, मुक्तीची जाणीव करून देणारी जणू शब्दातीत अनुभूती. अशा साक्षात्कारी क्षणी सारे जग आपल्यात आणि आपण जगात सामावलेले असतो. माझे-तुझे, राग-लोभ, द्वेष-अहंकार या साऱ्याच्या पल्याड घेऊन जाणऱ्या आनंदाचे धनी झालेले असतो. त्या क्षणीच्या या विलक्षण अनुभूतीने आपले जगणे विश्वात्मक करून टाकलेले असते…मी अंतर्बाह्य पुलकित होऊन गेलो.
मनाली आणि किलाड येथे खालून वर दिसणारे ढग आता चक्क हात लावता येतील इतक्या अंतरावर आणि ‘वरून खाली’ अशा कोनातून मी पहात होतो.असा क्षण आयुष्यात पुन्हा कधी अनुभवायला मिळेल याची खात्री नव्हती. पाहता-पाहता देहभान हरपून गेले… समोर पाहिले. दोन ढग तरंगत तरंगत एकमेकांच्या भेटीसाठी पुढे पुढे येत होते. काही क्षणातच ते एकमेकात विरघळून गेले. जणू जिवाशिवाची भेट ! त्यांच्या गळाभेटीचे ते चिंब क्षण हिमकणांत रूपांतरित होऊन हळूहळू खाली ओघळायला लागले. एकेक थेंब खाली जाऊन जमिनीला, समुद्राला मिळणार होता. पुन्हा वाफ होऊन वर येणार होता. ती घटना सांगत होती, जीवनाचे चक्र सतत सुरू आहे त्याला शेवट माहीत नाही. मृत्यू नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. आहे ते फक्त सातत्य, निरंतरता, रूपांतरण, फुलत राहणे आणि अखंडपणे पुढे जात राहणे…..
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
आपण केलेलं परीक्षण इतके विलोभनीय तर प्रत्यक्ष पुस्तक किती विलक्षण, विलोभनीय असेल असे हे वाचल्यावर वाटले.
निसर्गाशी तादात्म्याचा अनुभव हे या पुस्तकाचे मर्म आहे.
गिर्यारोहणाचे अनुभव अभिव्यक्त करणारे अनोखे पुस्तक- हिमाक्षरे .यातून निसर्गवर्णनाबरोबरच लेखकाचे चिंतन पुस्तकाच्या सौंदर्यात भर टाकते.
व्वा. प्रतिभावंत शब्दप्रभू यांच्या शब्दात लालित्यपूर्ण शैलीत हिमशिखरे अनुभवायला आणि त्या सान्निध्यात थोरो सारख्या विचारवंताप्रमाणे केलेले भाष्य एक वेगळ्याच अनुभूतीच्या उंचीवर घेऊन जाईल असे हे पुस्तक आहे. वाचनाची अगदीच उत्सुकता लागली आहे. एक सुंदर पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल न्यूज स्टोरी टुडे टिमचे खूप खूप आभार