Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : १६

मी वाचलेलं पुस्तक : १६

‘प्रकाशवाटा’
मी ‘प्रकाशवाटा‘ या पुस्तकाची पहिली 2009 सालची
आवृत्ती वाचली आहे. तथापि नव्या पिढीची हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता शिगेला पोहचावी म्हणून जानेवारी  2022 मध्ये प्रकाशित झालेल्या तब्बल 40 व्या आवृत्तीच्या पुनर्वाचनाचा आनंद घेतला आणि तो आनंद मी आपल्या पुढे देत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जवळील हेमलकसा परिसर आज बघणाऱ्याना तेथील अगदी सुरुवातीच्या परिस्थितीची कल्पना येणार नाही. महाराष्ट्राच्या अतिशय दुर्गम भागात भागात एका ध्येयाने प्रेरित झालेल्या ‘आनंदवन‘ या तेव्हाच्या अविभाजित चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम वन भागातील कुष्ठरोग्यांची व आदिवासींची सेवा करण्यासाठी प्रसिद् समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ प्रकाश आमटे हे त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मंदा यांच्यासह हेमलकसा भागात 1973 मध्ये आले.

तिथे त्यांनी ‘लोकबिरादारी प्रकल्प’ सुरू केला़. तेंव्हा या भागातील मिडिया गोंड आदिवासी भूक, रोगरायी, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. भामरागडच्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहित नव्हतं. जगापासून पूर्णपणे तुटलेल्या समाजाला मुख्य प्रवाहाची ओळख करून देण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि गेले चार दशके तेथेच आपला संसार मांडून यशस्वी केलं !

प्रकाशजी येण्यापूर्वी तेथे नुसतं दाट जंगल होतं. झाडे एवढी मोठमोठी वाढलेली होती की, सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्यप्राण्यांचे. साप आणि विंचू यांचे अस्तित्व तर पावलापावलांवर होतं. गाव शहरापासून संपूर्णपणे तुटलेले आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्यादृष्टीने अतिशय प्रतिकूल असा भाग होता. रस्ते नव्हते, वीज नव्हती, पाणी नव्हते. रहायला जागा नव्हती. माणसं नव्हती. होतं फक्त एक जंगल, आणि त्यात लपून बसलेली माणसं आणि प्राणी !

त्यावेळी सोमनाथ शिबिरात सहभागी झालेले चार पाच शिबिरार्थी सहकारी मदतीला आले. (आणि आजपर्यंत येथेच सेवेसाठी राहिले.) सुरूवातीस प्रकाशजी सह सर्वांचा मुक्काम झाडाखालीच होता. नंतर एकदोन झोपड्या बांधल्या! पाण्यासाठी एका नाल्या जवळ एक तात्पुरती विहीर खोदली़. परिसर साफसुफ केला. आणि नंतर एक एक कामे सुरू करून नव्या आयुष्याला सुरूवात केली. जंगली प्राण्यांना ही त्यांनी आपलसं केलं. हा सारा तपशील या पुस्तकात नमूद केला आहे.

आज हेमलकसा येथे चाळीस खाटांचे हाँस्पिटल आहे़. तेथे उपचार करून घ्यायला लांबूनलांबून लोक येतात. इथल्या आदिवासींची मुलं आज शाळेत शिकून शहाणी होताहेत. बाहेरच्या जगात जाऊन नोक-या करताहेत. आज इथे हिरवीगार पिके गरजेपुर्ती घेतली जात आहेत. घनदाट जंगल मात्र अजूनही तसचं आहे पण पक्षांच्या किलबिटानं आणि माणसांच्या चाहूलीनं त्याला चैतन्य आलं आहे दळणवळणाच्या साधनांनी हेमलकसा आणि बाकीचे जग यात एक पूल बांधला गेलाय.

इथं पहिली १७ वर्षे वीज नव्हतीच. आता हा सगळा प्रवास “अंधारातून उजेडाकडे” असा आहे. प्रकाशजी यांनी आपल्या जीवन चरित्रात आनंदवनातील शिकवण, हेमलकसा मुक्कामातील कसोटीचे प्रसंग, त्यांचे वैद्यकीय शिक्षण, डॉ मंदांशी लग्न, उभयतांची या भागातील वैद्यकीय सेवा, जीवनाचे कठीण प्रसंग, जंगलातील आप्त, शाळेची सुरुवात, अनोखे प्रयोग, लोकअदालत, प्राण्यांचे गोकुळ, आमटे कुटुंबीय आणि समाजमान्यता या विषयासंदर्भात भरभरून लिहिलय ते अत्यंत वाचनीय झाले आहे.

डाँ प्रकाशजींना 2008 मध्ये मँगसेसे हा 50 हजार डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराला 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना तो फिलिपाईन्स मध्ये जाऊन घ्यावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांना, बाबा आमटे यांना 1985 साली मँगसेसे पुरस्कार मिळाला होता. परत एकाच कुटुंबात हा पुरस्कार देण्यात येणं ही भारतातील पहिलीच घटना ! त्यानंतर मात्र माध्यमातून प्रचंड प्रमाणात प्रसिद्धीमुळे अनेक देश विदेशातील नामवंत मंडळींनी हेमलकशाला भेटी दिल्या. देणग्यांनी प्रकल्पास हातभार लावला !

प्रसिद्धीपासून दूर राहून काम करत रहाणं हे त्यांच्या प्रकृतीला साजेसं होतं. पण प्रसिद्धी मिळायला लागल्यावर त्यांच्या कामाची महाराष्ट्रभर ओळख झाली. पण पहिला पुरस्कार मिळाला तो, साहित्य क्षेत्रातले मोठे नाव असलेले, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले कुसुमाग्रजांच्या कडून ! कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पहिलाच ‘गोदावरी गौरव‘ पुरस्कार ‘जनस्थान’ असलेल्या नाशिक शहरात प्रकाशजींना मिळाला. आणि तेथूनच त्यांना विविध पुरस्कार मिळाले, मिळत गेले. अगदी अमेरिका, कॅनडा आदि परदेशातून देखील ! त्यांच्या लोकबिरा़दारी प्रकल्पास भरपूर देणग्या मिळाल्यात. अगदी नाना पाटेकर यांनी यांनी आनंदवन, हेमलकशाला काही काळ वास्तव्य करून, कोणताही गाजावाजा न करता सात आठ वर्षात तीसेक लाख दिले !

2002 साली प्रकाशजींना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला़. मोनँको सरकारने प्रकाशजी व मंदाताई यांचे पोस्ट तिकीट प्रसारित केले. वन्य प्राणी संवर्धनाबद्दलचे ‘वेणूमेनन जीवनगौरव’ पुरस्काराने राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

“आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी”, असं बाबां आमटे यांच्या मनात होतं, या कामाची जबाबदारी डॉ प्रकाश आमटे यांनी घेतली़. त्यामुळेच हे काम इथवर येऊन पोहचलं. या परिसरातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची तीव्रता अजून खूप आहे. त्यादृष्टीने कामाची व्याप्ती वाढवण्याची गरज डॉ प्रकाशजी व त्यांचे सहकारी बोलून दाखवित असतात. ज्यांना आयुष्यातली काही वर्ष हेमलकशाच्या प्रकल्पासाठी काम करण्याची तयारी आहे असे डॉक्टर्स, शिक्षकांची आणि कार्यकर्त्यांची आजही तितकीच गरज आहे़ ही गोष्ट या पुस्तकातून निश्चितपणे लक्षात येते.

‘हेमलकशाची कथा’ म्हणून ‘प्रकाशवाटा’ त्यातील प्रामाणिक कथनामुळे आणि साध्या सोप्या भाषाशैलीमुळे अतिशय वाचनीय झाले आहे !

सुधाकर तोरणे

–  परीक्षण : सुधाकर तोरणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?