आज रात्री उशीराच अंकलेश्वरल पोहचलो. उद्या समुद्र यात्रा करायची होती. सकाळी लवकरच निघायचं होतं.
लवकर उठून तयार झालो. रोज होणारी मैय्याची पूजा आज नाही होणार. सर्व परिक्रमावासीयांनी आज सफेद रंगाचे कपडे परिधान केले होते. पंडीत अनयजींच्या आज्ञेनुसार आम्ही लवकरच निघालो. उशीर झाला तर बलबला कुंडाचे दर्शन झाले नसते.
आम्ही बलबला कुंडा जवळ आलो. ही जागा अद्भुत आहे. ही महामुनी ऋषी कश्यप यांची तपोभूमी आहे. ज्या वेळी महामुनी कश्यप यांना वैद्य विद्या अर्थात आयुर्वेद विद्या प्राप्त करण्याची इच्छा झाली त्या वेळी ते ह्या स्थानावर आले आणि तपश्चर्येत लीन होऊन गेले आणि ह्याच स्थानी धन्वंतरी भगवान हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. ते प्रमुख पर्व होते धनत्रयोदशी.
बलबला कुंडा जवळ जाऊन तुम्ही बोला, “नर्मदे हर,” किंवा “हर हर महादेव” तर ह्या कुंडातील पाण्यात बुडबुडे यायला सुरुवात होते. हा प्रभाव रासायनिक आहे की दैवी हे परमेश्वराला ठाऊक, परंतु आम्ही तर हे प्रथमच पाहत होतो.

मला हा चमत्कार वाटला. आपल्या देशात इतकी शाश्वतता आढळते. आज कलियुगात पण ही स्थाने पुराणातील ग्वाही देत आहेत.
आम्ही दक्षिण तीरावरील अंतिम पडावा वर होतो. समुद्र पार करुन आम्ही उत्तर तीरावर परिक्रमा करायला पुढे जाणार होतो.
आज आम्ही तट परिवर्तन करणार होतो. आम्हाला दक्षिण तटावरुन उत्तर तटावर जायचं होतं. इथे रेवा नदी सागराला मिळते.
बलबला कुंडाचे दर्शन करुन आम्ही समुद्राकडे निघालो. खुप चालायचे होते रस्ता नव्हता तो खाडीतून चालायचं होतं. खुप चालल्या नंतर अर्धा तास थांबून बोटीवर चढायची वेळ आली. बोटीवर चढण्यासाठी एक कच्चा साकव आपलं भारी शरीर हा पूल पेलेल ? इथे सगळंच चमत्कारिक होतं. माझी श्रध्दा होती इथं पर्यंत मैय्या घेऊन आली पुढे तर तीच माझी नाव किनाऱ्यावर नेऊन ठेवेल.
त्या छोट्याशा लाकडी पूलावरुन आम्ही सर्व परिक्रमावासी त्या बोटीवर चढलो. समुद्र यात्रेला सुरुवात झाली. सगळे परिक्रमावासी नर्मदा अष्टक म्हणू लागले. प्रसन्न वातावरण होते. दोन तासानंतर आम्ही पोहोचलो रत्नासागर जिथे नर्मदा मैय्या समुद्राला मिळते असं पंडित अनयजी ने आम्हाला सांगितले.

ह्या बोटीतून समुद्र यात्रा करताना कोणतेही लाईफ जॅकेट नसते. मैय्या आपल्याला तारुन नेते. रेवा सागर संगमा वर आलो. ही यात्रा तीन तासांची असते. उत्तर तटावर पोहोचलं की सायबेरियन पक्षी तुमचं स्वागत करण्यासाठी येतात. आपल्या बोटीवर मस्त फेऱ्या मारतात.
आपल्या बरोबर आणलेले खाद्य पदार्थ परिक्रमावासी त्यांच्या दिशेने फेकतात आणि हे पक्षी ते झेलतात. मोठं विहंगम दृश्य दिसते.
आस्था श्रध्दा विश्वास आहे तर ही यात्रा आनंददायी अनुभव देऊन जाते. अन्यथा भितीदायक भासते. 30 किलोमीटर ची यात्रा आहे. ज्या नावाड्याने ही यात्रा सुखद केली तो नाव पार करणारा नावाडी (केवट) याचा परिक्रमावासी सन्मान करतात. त्याला एक पंचा आणि दक्षिणा देतात. ज्या प्रकारे प्रभु श्रीराम यांना गंगा पार करवली होती तसेच आमच्या साठी हे आमचे नावाडी (केवट) होते. उत्तर तटावर आलो भूक तर लागली होती. इथे चहा आणि फरसाण स्थानिक लोक वाटत होते.

नर्मदा मैय्या ला मैय्या का म्हणतात याचा प्रत्यय तुम्हाला परिक्रमेत वारंवार येत असतो. काही वेगळी कंपने ह्या वातावरणात आहेत. इकडची लोक इतकी चांगली आहेत त्यांना येणारी लोक ही आपली भावंड असण्याची भावना असते. म्हणून सगळ्यांची पोट पाण्याची व्यवस्था इथे आनंदाने आपुलकीने करणारी माणसं तुम्हाला इथे आढळतील.
चहा आणि फरसाण घेण्यासाठी आम्ही पुढे गेलो तर आमचं स्वागत करण्यासाठी लड्डू गोपाल उभे होते, जे प्रकाशाला आम्हाला भेटले होते. सगळे लड्डू गोपाल ला पाहून खूप खुश झाले. ज्यांनी त्या दिवशी लड्डू गोपाल बरोबर फोटो काढले नव्हते त्या सर्वांनी आज फोटो काढून घेतले. त्या दिवशी जे भाऊ त्याला घेऊन होते मी त्यांना म्हटले “मला तुमच्या सोबत एक सेल्फी काढायची आहे आणि मी सेल्फी घेऊन लड्डू गोपाल चा नंबर घेऊन निघाले. पुढे कधी लड्डू गोपाल ला आणावं लागले तर ? मला पाहिजे होता.

आम्हाला निघायची घाई होती म्हणून आम्ही निघालो. नंतर सहज मोबाईल गॅलरी मधे जाऊन फोटो पाहिले तर… मी, लड्डू गोपाल आणि ते भाऊ आम्ही जो एकत्र फोटो काढला होता त्यात फोटो काढताना अगदी एक मुलगा पोझ देईल तशी पोझ लड्डू गोपाल ने दिली होती. तो फोटो ह्या लेखा बरोबर शेअर करत आहे, आपण बघु शकता. आता आम्हाला अजून ओढ लागली लड्डू गोपालची. परत भेट होईल.
आम्हाला आता जायचे होते मिठी तलाई येथे, ह्या कुंडाच्या चारही बाजूंनी समुद्राचे खारे पाणी आहे परंतु ह्या कुंडातील पाणी गोड आहे. ह्याला परशुराम कुंड बोलतात. भगवान परशुमाची ही तपस्थली आहे. हे सामान्य कुंड नाही. ह्या स्थानावर महामुनी जमदग्नी माता रेणुका सोबत निवास करत होते. माता रेणुका चे भाऊ महिष्मती नगरी चे राजा होते.

कार्तवीर्य सहस्त्रार्जुन इथे सैन्य घेऊन आले. पुराणात याचा उल्लेख अगणित सैन्य होते असा आढळतो.
जमदग्नीने सहस्त्रार्जुनाला भोजनाचे निमंत्रण दिले. अरण्यात रहाणारा हा ऋषी, आपल्याला भोजन काय देणार ? हा विचार मनात आला. परंतु जमदग्नीने सहस्त्रार्जुनाला सैन्याला घेऊन या म्हणून निमंत्रित केले. लक्षावधी सैन्य घेऊन सहस्त्रार्जुन आला. त्याच्या स्वागतासाठी जमदग्नी ने पंचपक्वान्नाचे भोजन दिले. सहस्त्रार्जुनाने विचारले, “हे अश्या प्रकारचे भोजन इथे ह्या वनात कसं शक्य आहे ? जमदग्नीने उत्तर दिले “आमच्या कामधेनू मुळे.” सहस्त्रार्जुनाने कामधेनू ची मागणी केली. पण जमदग्नीने नकार दिला. सहस्त्रार्जुनाने साम, धाम, दंड, भेद साऱ्याचा उपयोग केला. परंतु जमदग्नी काही केल्या मानेना. मग सहस्त्रार्जुनाने जमदग्नी सोबत युद्ध केले आणि कामधेनू घेऊन गेला.
ज्या वेळी भगवान परशुरामांना ही बातमी समजली तेव्हा परशुरामाने सहस्त्रार्जुनाशी युद्ध करुन दोन भुजा ठेऊन त्यांच्या सहस्त्र बाहू (भुजा) कापल्या आणि फेकल्या, त्या सहस्त्र धारा. आपल्या आई वडिलांना कामधेनू परत केली आणि परशुराम निघून गेले. अपमानित सहस्त्रार्जुनाने आपली चीता रचली आणि आपला देह त्याग केला. त्यानंतर सहस्त्रार्जुनाचे हजारो पुत्र आले आणि कामधेनू चे पुन्हा हरण करुन जमदग्नी चा वध केला.
ही बातमी जेव्हा परशुरामांना समजली तेव्हा ते क्रोधित झाले. जमदग्नींचा मृतदेह पाहून घोर गर्जना केली ह्या मिठी तलाई चे जल हाती घेतले आणि संकल्प केला,
“कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाच्या वंशाचा मी समुळ नाश करीन”. भगवान परशुरामाने 36 वेळेस पृथ्वी नि:शस्त्र केली असे म्हटले जाते. परंतु सहस्त्रार्जुनाचा वंश समुळ नष्ट केला. ही कथा ऐकून लहानपणा पासून गणपती समोर म्हणत असलेल्या दशावताराची आरतीची आठवण झाली.
“सहस्त्रार्जुन मातला
जमदग्नीचा वध केला |
कष्टी ते रेणुका म्हणूनी
सहस्त्रार्जुन वधिला ||
नि:शत्री पृथ्वी
दान दिधली विप्राला |
सहावा अवतार
परशुराम प्रकटला ||
त्या स्थानी आम्ही उभे होतो. तिथेच आजची सकाळी राहिलेली पूजा आणि दान केले. असं अजून अद्भुत काय काय बघायला मिळणार आहे परिक्रमेत ?. आज तर परिक्रमेचा पाचवा दिवस आहे. ह्या सगळ्या आठवणी ह्र्दयात साठवून आम्ही निघालो. आज इथे आजचे लिखाण पूर्ण करते. परत भेटूच पुढील अनेक आठवणी सोबत.
“काल हर दुःख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर”
नर्मदे हर जिंदगी भर
क्रमशः

– लेखन : सुलभा दिवाकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800