१३ मार्चला रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. योगायोगाने माझ्या लक्षात आले की मी ऑस्ट्रेलियाला शिवजयंती उत्सवाचे चित्रीकरण करण्यासाठी गेले होते आणि आता मी लँड झाले तो विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव दिलेला आहे !
सिडनीमध्ये असताना भव्य शिवजयंती उत्सवाचे चित्रीकरण करून मी एक तासाचा विडिओ तयार होईल एवढी सामग्री आणली होती. तसेच सिडनीतील संगीतकार किरण प्रधान यांच्या साऊंड स्टुडिओत देखील त्यांच्या मुलाखतीचे दिवसभर चित्रीकरण केले होते. आता या सामग्रीतून संपादन करून ई प्रसारण – इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन या चॅनेलसाठी मला दोन एपिसोड बनवायचे होते. प्रत्यक्ष एडिटिंगला बसले नव्हते. तरी मनात एपिसोडचे स्क्रिप्ट तयार झाले होते. आता भारतात आल्यावर कधी एकदा वैशाली मेहेत्रे (प्रकाशिका आणि संपादक) यांच्या ऑफिसला जाऊन भेटते असे झाले होते. आम्ही दोघी आमच्या एडिटिंगच्या आयडीयाज लढवून त्यावर सुंदर काम करू असा विश्वास होता.
घरी आल्यावर जेट लॅग वगैरेचा बाऊ न करता सर्व शॉट्स एका पेन ड्राइव्हमध्ये एकत्र केले. मग वैशाली मॅडमची अपॉइंटमेंट घेतली. तेवढ्यात माझ्या पीएच. डी. च्या गाईडचा फोन आला, “थेसिसचे पहिले प्रकरण पूर्ण झाले आहे का ? एक एप्रिलपर्यंत विद्यापीठात दाखवायचे आहे. तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून माझी सही घ्यायला या.” मला आठवले की सिडनीला जाण्यापूर्वीच मी पहिले प्रकरण पूर्ण केले होते आणि माझ्या मिस्टरांनी ते टाईपही करून ठेवले होते. पण काही संदर्भ मिळवायचे राहिले होते. ते पडताळून पहाण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची फेरी करणे आवश्यक होते. म्हणून एडिटिंचा विचार बाजूला ठेवून दुसऱ्याच दिवशी मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जाऊन बसले. अर्धा दिवस तिथे बैठक मारून हवी ती पुस्तके चाळली, संदर्भ मिळवले. ग्रंथालयाच्या उमा नाबर मला पुस्तक मिळावे म्हणून मदत करतात. सर्व संदर्भ लिहून घेऊन मी आनंदाने दादर स्टेशनकडे परतत होते. तेवढ्यात’ ई प्रसारण’च्या संचालकांचा म्हणजे अतुल वैद्य यांचा फोन आला. मी चित्रीकरण केलेले एपिसोड सव्वीस मार्चच्या आत दिल्यासच ते ‘ई प्रसारणा’ला अपलोड करू शकणार होते. पुढे ते परदेशात स्थलांतर करणार होते. म्हणून महिन्याभराचे काम अपलोड करून जाणार होते. सतरा एप्रिल आणि एक मे चा स्लॉट मला मिळू शकणार होता. मी दादर ब्रिज चढता चढता थांबले. एक मे ला महाराष्ट्र दिन असल्याने शिवजयंती उत्सवाचा एपिसोड प्रसारित झाल्यास ते संयुक्तिक ठरणार होते. शिवाय एक मे हा ई प्रसारण चॅनेलचा वर्धापनदिन देखील असतो. त्यामुळे ही तारीख मिळाल्यामुळे मी अतिशय आनंदित झाले. सतरा एप्रिलचा स्लॉटही मला किरण प्रधान यांच्या मुलाखतीसाठी हवा होता. पण त्यासाठी आठ दिवसात मला दोन्ही एपिसोड्स एडिट करून मेल करावे लागणार होते.
मग मी कामाची आखणी केली ती अशी – सकाळी साडेदहापर्यंत घरातील सर्व कामे म्हणजे स्वयंपाकपाणी, बाजारहाट, नातलगांशी फोनाफोनी वगैरे आटपून नंतर अकरा वाजता वैशाली मॅडमच्या ऑफिसला जाऊन एडिटिंग करायचे. दीड वाजता जेवायला घरी यायचे. मग दुपारभर पीएच. डी. चे काम करायचे. संध्याकाळी सहा ते आठ पुन्हा एडिटिंगचे काम करायचे आणि आठच्या पुढे घरातील काम करायचे. असे केले तरच माझी सर्व कामे वेळेत पूर्ण होणार होती. त्यातच आम्हाला ज्येष्ठ नागरिक संघाचा एक कार्यक्रम आला होता. त्याची तालीम आणि प्रयोग यासाठी वेळ द्यायचा होता. कार्यक्रम मिस्टरांचा असो की माझा, मनाने आम्ही दोघेही त्यात गुंतलेलो असतो. खरं तर आमचा मुख्य व्यवसाय कार्यक्रम करणे हाच असल्यामुळे तो आनंदाचाच भाग होता. अठरा मार्चला ज्येष्ठोत्सवात सकाळी हेमंत साने आणि समूह यांचा गाण्याचा कार्यक्रम होता तर सायंकाळी त्याच सभागृहात ‘राज्ञी वेल्फेअर असोसिएशन’च्या संमेलनात मला एक पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा सत्कार होता. तो संपूर्ण दिवस आम्ही आनंदात घालवला. दुसऱ्या दिवशी अंबरनाथला जाऊन माझ्या पीएच. डी. च्या गाईडची भेट घेतली.
एकंदर या सर्व धावपळीने मला ताप भरला. पण एपिसोड बनविण्याच्या कैफात तापाला कोण विचारतंय ? औषधे घेऊन मी एडिटिंगला जाणे चालूच ठेवले. अखेर सव्वीस तारखेपर्यंत आमचे दोन्ही एपिसोड तयार झाले. एपिसोड उत्तम व्हावा यासाठी, सोळा ते सव्वीस मार्च या दरम्यान, ऑस्ट्रेलियाला त्यांची वेळ सांभाळून अनेकदा संपर्क करावा लागला. निलीमा बेर्डे, सर्जेराव पाटील, के. डी. जोशी यांनी केलेले काही चित्रीकरण मला पाठवले. मी ऑस्ट्रेलियात असताना ‘आकाशवाणी सिडनी’ चे प्रणेते डॉ. सावरीकर यांची रेडिओ विश्वास साठी मी मुलाखत घेतली होती. ती देखील रेडिओ स्टेशनच्या डायरेक्टरना पाठवली.
शिवजयंती उत्सवावर एपिसोड बनवणे तेवढे सोपे नव्हते. जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर शॉट्स आम्ही घेतले होते. त्यातून तो समारंभ उभा करायचा होता. विटलाम सेंटरच्या प्रांगणात आणि भव्य सभागृहात अर्धा दिवस चाललेला तो कार्यक्रम आणि ‘सह्याद्री सिडनी’ च्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती एक तासाच्या एपिसोडमध्ये भरायच्या होत्या. मी आणि वैशाली मॅडमने काळजीपूर्वक आणि कष्टपूर्वक दोन्ही एपिसोड्स पूर्ण केले. सव्वीस तारखेला एपिसोड पाठवता यावेत म्हणून वैशाली यांनी आदल्या दिवशी रात्रभर जागून काम केले. आणि अखेर ते दोन्ही एपिसोड्स ई प्रसारणला वेळेत पाठवले. हा सातवा भाग लिहिण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियातील संगीतकार किरण प्रधान यांच्यावर बनवलेला सुंदर एपिसोड ई प्रसारण वर प्रकाशित झाला सुद्धा! अजूनही दोन आठवडे तुम्ही तो पाहू शकता.
सोळा ते सव्वीस मार्च अशी ही माझी खूप धांदल चाललेली असताना मला ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ यांचा फोन आला, “माझी ऑस्ट्रेलियाची सफर” यावर तुम्ही लेखमाला लिहाल का ? तेथील निसर्ग, तेथील माणसे, तुमचे काम आणि सामान्य माणसाला आलेल्या अडचणी हे सगळं त्यात यावं.”
मला ही कल्पना फार आवडली. आपल्याला कुणी छान ऑफर दिली तर आपण खूप बिझी आहोत हे कधीच सांगायचं नसतं. म्हणून मी म्हटलं, “लिहिते ना ! बहुधा एकाच लेखात मावेल सगळं.” तर ते म्हणाले, एकाच भागात बसणार नाही. तुम्ही भागांची चिंता न करता नैसर्गिकपणे लिहित रहा.
मंडळी, मी जेव्हा लिहायला बसले तेव्हा मला कळलं की ऑस्ट्रेलियाच्या सफारीतील प्रत्येक क्षण मनात जिवंत होत आहे. साठलेलं खूप आहे आणि मी एकटीच फिरत असल्याने ते कुणाशी शेअरही झालेलं नाही. मग लिहीत गेले. पहिला लेख या वेब पोर्टलवर अठ्ठावीस मार्चला प्रकाशित झाला. अलकाताईंनी फोटोंनी लेख सुंदर सजवला होता. वाचकांच्या अनेक ठिकाणांहून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. मला बळ चढले. माझी लिखाणाची वेळ असते पहाटे ५ ते ७. या वेळात दुसरे काहीच काम नसते. शांतपणे सारे आठवता येते.
या लेखमालेत पहाता पहाता सहा भाग सहज लिहून गेले. अनोळखी लोकांच्याही प्रतिक्रिया मिळत गेल्या. ‘छान फिरवताय आम्हाला. आम्हाला वाटतंय की आम्हीच ऑस्ट्रेलियाला चाललोय.’ माझे अमरावतीचे वर्गमित्र, कोमसाप चे सभासद, माझ्या मिस्टरांचे वर्गमित्र, सोसायटीचा गृप सगळीकडून छान प्रतिसाद येत होता.
या लेखांचे भाग मी ऑस्ट्रेलियातील संबंधित व्यक्तींनाही पाठवीत गेले. तसेच ते अमेरिकेतही वाचले गेले.
आम्ही तयार केलेला शिवजयंती उत्सवाचा एपिसोड आपण १ मे ला दुपारी महाराष्ट्र दिनी पाहू शकता. त्यासाठी https://eprasaran.com/ वर जाऊन ‘Gappa Goshti’ या शीर्षकावर क्लिक करा. हा चॅनेल १३० देशांमधील हिंदी मराठी बांधव बघतात.
संपादक देवेंद्र भुजबळ आणि अलकाताई भुजबळ यांनी मला लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. वाचकहो, आपणा सर्वांचे आभार मानून, सर्वांचा निरोप घेऊन आता मी या लेखमालेला विराम देत आहे.

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम लेख मालिका मेघना ताई खूप खूप आभार तुम्ही फुकटात आमची सफर घडवून आणलीत पुढील लेखनासाठी भरपूर शुभेच्छा 🌹