माणसाचे बाह्य सौंदर्य, त्याचे शिक्षण, त्याची प्रतिष्ठा हे त्याच्या देह माध्यमाला जोडले गेलेले असतात. परंतु आत्मिक सौंदर्य तितकेच महत्वाचे असते. ज्यात गुण दोष, स्वभावदोष नसणे अपेक्षित आहे.
शुध्दात्मा म्हणजे नक्की काय ?
माणसांचे सौंदर्य हे बाह्यरूपीचं असते असे नाही, तर व्यक्तीचे आत्मिक सौंदर्य हे ही छान, सुंदर असणे गरजेचे असते.
फक्त संत महात्म्यांचे होते असे नाही तर सर्व साधारणपणे तुमच्या आमच्यात वावरणाऱ्या काही सामान्य व्यक्ती आपल्या शुध्द, पवित्र मनाच्या असतात..
अशा व्यक्तींचे मन निष्पाप, निरागस, निर्मळ, प्रेमळ लाघवी आणि सात्विक असते. ज्यामुळे सामान्य व्यक्ती देखील असामान्य होऊन जाते..
काही व्यक्तीं इतकी भली माणसे असतात. त्यांची मने उदार असतात. मृदु भाषी, लाघवी स्वभावाची, दुसऱ्याच्या सुखातचं नव्हे तर दुःखात ही सहभागी होणारी असतात. सदैव इतरांचे भले चिंतणारी, कौतुक करणारी दुसऱ्यांना प्रेरणा देणारी असतात.
त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच सुहास्य आणि प्रसन्न आणि तेजस्वी असा भाव असतो..जो इतरांना प्रेरीत करत असतो. ते सकारात्मकतेचा जणू अखंड स्त्रोत असतात.
अशा व्यक्ती स्वतःविषयी कधीही बोलत नाहीत. स्वतःच्या कर्तृत्वाचा डंका वाजवत नाहीत. त्यांच्यात मी पणा नसतो, अहंकार नसतो. ते कधीच कोणाचा द्वेश, मत्सर करत नाहीत.. त्यांची कोणाशी आणि कसलीच स्पर्धा नसते, ईर्षा नसते.. मिळालेले आयुष्य स्वतः सह इतरांच्या आनंदात आणि सुखात समाधानात जगणारी असतात..
जणू ह्यांच्या ह्रदयात मृदु, दैविक ध्वनीच अखंड वाजत असतो. त्याला धार्मिक, अध्यात्मिक विचारांची जोड असते. ते एक प्रकारचे कस्तुरी मृगचं असतात..
ज्यांच्या स्वगंधने इतर लोकं देखील आपोआपच सुगंधित होऊन त्यांच्याकडे आकर्षिली जातात..
शुध्द आत्मे शुध्दते कडेच खेचले जातात हा निसर्ग नियम आहे. असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. असे शुद्ध आत्मे हे या भूतलावरील दूतच असतात.

— लेखन : शलाका कुळकर्णी. नेदरलँड्स
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
माणसाच्या आंतर्गत सौंदर्याचे महत्त्व विषद करणारा उत्तम लेख.