Tuesday, June 17, 2025
Homeयशकथाअसामान्य कचरावेचक : सुमन मोरे

असामान्य कचरावेचक : सुमन मोरे

माणूस जगण्यासाठी सतत संघर्ष करत असतो. कुटुंबाचे, मुलाबाळांचे पालनपोषण करण्यासाठी माणूस कोणते काम योग्य, कोणते काम अयोग्य असा विचार करत नाही. गरजेपोटी आयुष्यात जे काम पडेल ते तो करण्यासाठी तयार असतो. त्या कामाची लाज बाळगत नाही. कारण कोणताच पर्याय उरत नाही तेंव्हा काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्याठिकाणी एक आई असेल तर ती मागे हटत नसते. अशाच एका जिद्दी आईची, स्त्रीची गोष्ट वाचूया, ‘सुमन मोरे‘ नावाच्या एका महिलेची .

दुष्काळामुळे सुरु झालेला पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी बीडवरून पुण्याला सुमन मोरे आणि त्यांचे कुटुंब पायी निघाले. प्रवास करत पुढे आपले काय भविष्य आहे याची जराही कल्पना नसतांना पोटासाठी काहीतरी काम मिळतं का ? या अपेक्षेने शोध घेत होते.

1980 साली पुण्यात पोहोचल्यावर काहीतरी काम सुरु करावें असे वाटत होते. पण पैसा तर नव्हता. मग करावे तर काय करावे हा प्रश्न भेडसावत होता. त्यावर मार्ग काढत पोतं घेऊन कचराकुंडीवर, कंटेनरवर जाऊन कचरा वेचून त्यातील कागद, प्लास्टिक, भंगार वेगवेगळे काढून ते विकायचे. ते रात्री विकून त्यातून जो पैसा येई त्यात जेवणाची सोय बघायची. नंतर त्यांचे पती सुद्धा यात सामील झाले. हे काम करतांना त्यांना खूप अडचणी आल्या. लोकं इतर नागरिकांसारखी वागणूक देत नसत. कचरा उचलताना हात, कपडे घाण होत, अंगाचा वास येत असे. असे असले तरी त्यांनी धीर सोडला नाही. कारण मुलांना कसे मोठे करावे हा प्रश्न समोर होता, शिक्षण देण्याची तळमळ होती. कचऱ्यात वह्या सापडायच्या त्यात काही कोरी पाने असायची ती फाडून एकत्र करून ती शिवून वही बनवायची आणि मुलांना लिहिण्यासाठी द्यायच्या. ती पाने उलटी का सुलटी हे सुद्धा माहिती नव्हते. अक्षरओळख नव्हती. असे करत त्यांनी मुलांना मोठे केले. रोजचा असा त्यांचा दिनक्रम असायचा. कचरा विकायचा आणि पैसे कमवून स्वयंपाक करायचा.

काही दिवसांनी त्यांनी बाबा आढाव यांच्या ‘कागद, काच पत्रा कष्टकरी’ संघटनेचे सभासदत्व घेतले. त्या संघटनेच्या बैठकीला जायच्या परंतु त्यांना काहीच समजायचे नाही. एका वस्तीची प्रतिनिधी म्हणून त्या काम पाहत होत्या. हळूहळू काम जसे वाढत गेले तसतसे त्या बोलायला, गरजा सोडवण्याचे शिकल्या.

साधारण 3600 महिला या संघटनेच्या स्वच्छच्या अंतर्गत काम करतात. दारोदारी जाऊन कचरा गोळा करणे, त्यातून ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आणि मग तो कचरा महानगपालिकेच्या घंटागाडीला देणे असे काम प्रामुख्याने चालते. त्यात ओल्या कचऱ्यापासून कंम्पोस्ट खत तयार करणे, ते उद्यानांना देणे, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्निर्मितीसाठी देणे असे काम स्वच्छ करते, त्यातून पर्यावरण सुरक्षित राहायला मदत होते.

नंतर महानगरपालिके सोबत 5 वर्षांचा करार कचरावेचकां सोबत झाला. कामाचे स्वरूप वाढत असतांना त्यांना नेपाळला पाठवण्यात आले. तेंव्हा त्या म्हणाल्या की त्यात काय जाईल की, मी बीड ला जाते तशी जाईल. कारण नेपाळ कुठे आहे हे माहितीच नव्हते. जेव्हा घरी ही गोष्ट समजल्यावर सुरुवातीला मुले नको म्हणाले दूर आहे वगैरे परंतु तू जाऊ शकतेस म्हणून पाठिंबा दिला. जाताना संघटनेची एक मुलगी सोबत होती ती जिथे जिथे जाते ते लक्षात ठेवले.13 दिवसांचा प्रवास होता. नेपाळला पर्यावरण या विषयावर बोलायचं होते. परत येताना ती मुलगी सोबत नव्हती. ती तिथेच थांबली. येताना जसे आल्या तसे लक्षात ठेऊन, आपल्याला तोंड आहे याचा वापर करू असे म्हणून त्या परत निघाल्या. लिहिता वाचता येत नसल्याने फॉर्म भरण्यास अडचणी आल्या. एका बाईंनी त्यांना मदत केली.

पुढे स्विझरलंड (जिनिव्हा) ला पाठवले. एकदा नव्हे तर दोनदा पाठवले. तोही प्रवास त्यांनी धीटपणे केला. तिथे त्यांनी जे भाषण दिले त्याचे प्रसारण टीव्हीवर दाखवले. तिथून परत येताना एअरपोर्टवर कोणीच मराठी बोलणारी व्यक्ती सापडेना. एक व्यक्ती आपल्या आईसोबत मुंबईस निघालेली असतांना त्यांना काउंटरजवळ साडीत बसलेल्या सुमनताई दिसल्या. त्यांनी सुमन ताईंना विचारले मावशी कुठे जाताय, हे ऐकून सुमनताईना बरे वाटले. कोणासोबत आहात, काय करता, कशासाठी आलात ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्यावर त्या व्यक्तीनी सुमन ताईंचा फोटो काढून मुंबई च्या वर्तमानपत्रास पाठवला कारण एक न शिकलेली स्त्री ना तिला लिहिता येत ना वाचता येत ती परदेशात जाऊन पर्यावरण विषयावर भाषण देते ही मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांचे कार्य सर्वत्र पोहचले. ती व्यक्तीही मुंबईला येणार होती.

आता सुमनताई कचरावेचक नसून कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शिका आहेत. हे कार्य एक असुशिक्षित स्त्री करू शकते तर निश्चितच सुशिक्षित वर्ग करूच शकतो. कोरोना काळात सुद्धा त्या घरी नव्हत्या. रोगराई पसरू नये यासाठी त्या काम करत होत्या. आज जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्याकडे बघण्यासाठी कोणाला वेळ नाही नव्हे नव्हे महत्व राहिले नाही असे वाटते. स्वतःच्या कुटुंबासोबत समाजालाही आरोग्यदायी ठेवण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी त्या आणि त्यांची संपूर्ण टीम काम करते आहे. येथे आवर्जून म्हणावेसे वाटते की सामान्य कचरावेचक महिलेचा असामान्य प्रवास. सुमनताईंना मनाचा मुजरा 🙏

रश्मी कुलकर्णी

— लेखन : रश्मी कुलकर्णी. छत्रपती संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments