Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यडॉक्टर म्हणजे देव

डॉक्टर म्हणजे देव

१ जुलै या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने केलेल्या आवाहनाला खूपच छान प्रतिसाद मिळाला. निवडक हृदयस्पर्शी अनुभव पुढे देत आहोत.

इम्यूनिटी बुस्टर !

आजच्या काळातला कॉमन शब्द, इम्युनिटी बुस्टर ! डॉक्टरांप्रती माझे अनुभव मी येथे देत आहे…
२०१७ साली मी, डॉ. रेखा डावर, स्त्रीरोगतज्ञ व प्रमुख वैद्यकीय शिक्षण, सर एच एन रिलायन्स हॉस्पिटल, गिरगाव यांच्याकडे चेकअपसाठी सगळे टेस्ट रिपोर्ट घेऊन गेले. त्यांनी अगदी डिटेल हिस्ट्री विचारत असताना असिस्टंट डॉक्टरना लिहून घ्यायला सांगितले आणि ती एक कॉपी मला दिली.

एक दिवस ठरवून ऍडमिट झाले ऑपरेशनला जाताना त्या स्वतः मला भेटायला आल्या. काय कसं वाटतंय, अगदी मैत्रिणीसारखं हात धरून, ‘घाबरू नको मी संपूर्ण ऑपरेशन होईपर्यंत तुझ्या सोबतच असेन‘, असं म्हणाल्या. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.

ऑपरेशन थिएटर मध्ये, त्या स्वतः, डॉ.परेश जैन, इतर असिस्टंट डॉक्टर, नर्सची ओळख करून दिली. सगळे जणु अगदी घरची मेंम्बर असल्यासारखे बोलत होते. बोलता बोलता मला कधी ग्लानी आली ते कळलेच नाही.

२० मिनिटं म्हणता म्हणता, ऑपरेशन साडेपाच तास चाललं. दरम्यान त्या बाहेर येऊन घरच्या मंडळींना सगळं रिपोर्ट करत होत्या. नंतर ८ दिवस हॉस्पिटलमध्ये असताना डॉ.रेखा डावर, डॉ परेश जैन, रोज राउंडला यायचे, डॉ. जैन रोज जोक्स सांगायचे, इतर विषयावर गप्पा व्हायच्या. जणू खरंच माझं ऑपरेशन झालंय का ? असेच वाटे. अगदी साधे सुधे प्रश्न मी त्यांना विचारायची पण तेव्हढेच शांतपणे आणि समजवून शंका निरसन करायचे. आरती नर्स सुध्दा इतकी एकेक विषयांवर बोलायची की खुप दिवसाची ओळख, परकेपणा नव्हताच.

नंतर डॉ रेखा डावर आणि डॉ परेश जैन माझ्या आजारचं निदान कसं करता येईल ह्या साठी माझ्याशी आणि घरातील मंडळी बरोबर बोलून व माझी केस हाताळण्यासाठी ठरवलेले डॉ.मोहन मेनन यांच्याकडे   डॉ रेखा डावर स्वतः घेऊन गेल्या. त्यांनी सुध्दा मला अगदी डिटेल समजावून सांगितल व माझी पुढील ट्रीटमेंटची भीती मनातून घालवली आणि कधीही फ़ोन करू शकता असे सांगितले. ट्रीटमेंट दरम्यान डॉ मेनन अमेरिकेला असतानाही मी त्यांच्याशी फोनवर बोलून मनात आलेल्या शंका विचारात होती, ते सुद्धा अगदी न चिडता मनाचं समाधान होई पर्यंत मला समजावून सांगत.

एका आणीबाणीच्या प्रसंगी, वैद्यकीय संचालक, डॉ. गुस्ताद डावर देवदूता सारखे मदतीला धावून आले.

हॉस्पिटल मधील ट्रीटमेंट साठी, डॉ.आनंद, सर्व नर्स जणू अगदी आपली लहान बहीण, मावशी, असल्याप्रमाणे वागत होते. ट्रीटमेंट संपल्यावर निघताना माझ्या डोळ्यात पाणी आले.

खरंच त्यांची तर कमालच असते. आपल्या मूड प्रमाणे, न दुखवता इतकी सेवा करतात की, आपण जणू गेल्या जन्मी पुण्य केलंय म्हणून एव्हढी सेवा मिळतेय. आज या डॉक्टर दिनानिमित्ताने मला, त्यांचे आभार मानावयास मिळते आहे.

ऑपरेशन आणि नंतरच्या ट्रीटमेंट मुळे, खूप अशक्तपणा आला होता, मी बाहेर जाऊ शकत नाही हे डॉक्टरसुध्दा जाणून असतात. पण माझ्या बाबतीत त्याच दरम्यान ८ मार्च या जागतिक महिलादिनी घरी मी एकटी होते. हा दिवस आमच्या सोसायटीत खूप उत्साहात साजरा करायचो. माझ्या पतीची औरंगाबाद येथे बदली झाल्यामुळे ते औरंगाबाद येथे होते. घरी माझ्या साठी पूर्णवेळ ठेवलेली कामवाली बाई होती. डॉ रेखा डावर एके ठिकाणी कार्यक्रमावरून परततांना, मला भेटायला फुलांचा मोठ्ठा पुष्पगुच्छ घेऊन आल्या. एवढ्या मोठ्या डॉक्टर स्वतः मला भेटायला आल्या. मला तर त्यांना कुठे ठेवू नि कुठे नको असे झाले होते. मी एव्हढी आनंदीत झाली होती की जणू मी पूर्णपणे बरी झाली असेच वाटलं आणि खरतर याच मुळे माझा आजार लवकर आटोक्यात आला, तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.

डॉ रेखा डावर समवेत

खरं तर सुरवातीला आमचे फॅमिली डॉक्टर, डॉ डेलीवाला यांना माझ्या आजाराची कल्पना आली होती. त्यांनी माझ्या मुलीला तसे सांगितले होते व मला काळजी करू नका असं आश्वासकपणे सांगितलं, उमेद दिली. तसेच रोज बदाम अक्रोड आणि खजूर खा आणि डॉ. रेखा डावर सांगतील तसे करा, कधीही काही वाटलं तर फोन करा, त्यामुळे मी मनातून खचले नाही. त्यांनी माझं मन जाणलं, तसेच डॉ डावर मॅडम मला भेटायला
आल्यामुळे मन उल्हसित झालं. म्हणूनच म्हणते माझ्या या कॅन्सर सारख्या आजारात मन जाणत
पेशंटला औषधापेक्षा मनानं पहिलं बर करतात मग औषधाचा असरही रोगावर चांगला होतो आणि पेशंट खणखणीत बरा होतो.

गेले सव्वा वर्ष, डॉ. रेखा डावर, कोरोनाच्या भयंकर परिस्थितीतही एकही दिवस रजा न घेता अविरतपणे रुग्णसेवा करीत आहेत.

आज 3 वर्ष होऊन गेली या सर्वांच्या उपचाराने मी पूर्णता: बरी आहे. मी त्यांची शतशः आभारी आहे. आज या डॉक्टर दिनानिमित्ताने मला, त्यांचे आभार मानावयास मिळते आहे.

– लेखन : अलका भुजबळ.

मानवरुपी देव

आपल्याला आजाराने विळखा दिला की आपणास डॉक्टरांची आठवण येते. तेही म्हणा खरंच आहे! अश्याच काही वेळी मला सुदृढ बनवणाऱ्या, डॉक्टररुपी देवांची महती.

डॉक्टर जेव्हा आपल्या कुटुंबातील एक भाग वाटू लागतो तेव्हा ती व्यक्ती ” फॅमिली डॉक्टर” होवून जाते. डॉ. एस. चौधरी, प्रेमळ बोलणे व स्पष्ट वक्तेपणा असा हा देवदूत.

माझ्या पतीना मुतखडयाचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांनी, जास्त दिवस न घालवता व खासगी रुग्णालय न सुचवता, केईएम रुग्णालयात उपचार घेण्यास सुचविले. वेळोवेळी महानगर म्यूनसिपल रुग्णालयांचे महत्व आमच्या मनावर बिंबवले. सत्य व प्रामाणिकपणाचे डॉ. चौधरी यांचे हे उदाहरण आहे.

डॉ. अनिल व्ही. दामले. त्यांच्याकडे पाहूनच अर्धा आजार दूर पळावा, अशी शांतचित्ती मूर्ती ! बोलणे अगदी हळूवार, जसे “काय वाटतं तुम्हाला ?” हा एकच प्रश्न. पुढे फक्त रुग्णांनी बोलत रहायचे. मग दहा मिनिटे लागो किंवा पंधरा मिनिटे लागोत. जणू मंदिरातील देवदर्शन व्हावे, असे मौनधारणी डॉ. दामले होय.

कोरोना महामारीत, अस्पर्श जाणिवेला दूर लोटून, माध्यमवर्गीयांच्या सेवेला, नवी मुंबई, नेरूळहून मुंबई-वडाळा शिवशंकर नगर, येथे रोज स्वतः च्या दवाखान्यात येवून, खरी माणुसकी दाखवली ते डॉ. अनिकेत पाटील होय. शासकीय नियमांचे पालन करत, माणुसकीचा ओलावा रुग्णास लाभला. न घाबरण्याची ताकद, नगरवासीयांना वेळोवेळी देत राहिले. स्व: कामाच्या मोबदल्याची तमा न बाळगता, अनेक रुग्णांना लढण्याचे बळ दिले. महामारीत डॉ. पाटील यांनी रुग्णास दिलेले जीवनदान, फार महान आहे. डॉ पाटील यांच्या कामगिरीला सलाम ! 🙋
डॉ. पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. आमच्या नगरवासियांना असेच लाभलेले डॉ. सागर कवठकर. माझ्या पतीना विविध औषधाबद्दलची माहिती यांच्या कडूनच मिळत असे. रक्तदाब नोंदणी मधे वर्षानूरूप कसा बदल होत गेला ! अशी बरीच असामान्य गोष्टींची माहिती, दिलखुलास डॉ.कवठकर यांच्या ज्ञानातून लाभली.

आज हया महामारीच्या भयावह स्तिथीत, डॉक्टर्स अहोरात्र लढा देत आहेत. माणुसकीचा खराखुरा देवमाणूस आपण मानव रूपात अनुभवत आहोत.

वर्षा भाबल.

– लेखन : वर्षा महेंद्र भाबल.

डॉ स्वाती व डाॅ अविनाश सुपे: देवदूत

समाजात काही व्यक्ती अश्या असतात की त्याचं बोलणं, असणं, अस्तित्व हे उत्साहित, प्रेरणा देणारे तर असतेच शिवाय आपल्या भोवती वलयांकित सुरक्षाकवच असते. अश्या व्यक्तीचं प्रतिबिंब ते तेज आपल्याही अंगावर  अलगद उमटतं, हो…, ते दिव्य प्रतिबिंब म्हणजे आरोग्यसेवेचा वसा घेतलेले ऊतुंग व्यक्तिमत्त्व दांपत्य डाॅ. स्वाती व डाॅ. अविनाश सुपे आमचे फॅमिली मित्र आणि आमचे फॅमिली डॉक्टर. आम्हा सर्वाचे अविकाका व सर्वाची माई डाॅक्टर.

कोरोनासारख्या विषाणूच्या विळख्यातून सामान्य  लोकांचे आयुष्य भयभीत व शंकाकुशंकाने भ्रमिष्ट व उद्वस्त होत असताना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ
डॉ. श्री व सौ सुपे देवदूत होऊनच नागरिकांमध्ये योग्य जागरूकता आणत उच्च कार्य करत आहे.

डॉ. अविनाश सुपे व डॉ. स्वाती सुपे.

डाॅक्टर अविनाश सुपे हे हिंदुजा हॉस्पीटल मध्ये हेल्थ कमिटीत डिरेक्टर आहेत व महाराष्ट्र राज्यातील ‘कोरोना टास्क फोर्स’ चे सदस्य आहेत. सरांनी कोरोना बाधित लोकांना मार्गदर्शन तर केलेच व परिस्थिती कशी हाताळायची याचेही वस्तूपाठ  दिले.

ओळखीचे जे रूग्ण  त्याच्याकडे विचारणा करत तेव्हा ते स्वतः प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय  साधून योग्य ते औषधोपचार कसे होतील त्यावर जातीने लक्ष ठेवत असे. कुणाला रात्रीबेरात्री बेड, ऑक्सिजनची गरज लागली तर तत्परतेने मदत करत.  त्यावेळेस ‘मनाचे संतुलन’ व ‘वातावरण’ महत्वाचे कसे ते सागंत. सर हे आम्हा सर्वासाठी आत्मविश्वास, आत्मबल, आत्मनिर्भरचे सुरक्षाकवचाचे वलय तयार करत देवदूत बनून होते.

उच्च पदावर  कार्यरत असून ते नेहमी समाजाप्रती दायित्व कधी नाकारले नाही त्यांनी अनेक वेळा रक्तदान केले आहे. अनेक नामांकित  वृत्तपत्रात, साप्ताहिक, मासिकात कोरोना, कोवीड, लाॅकडाऊन, लसीकरण, सामाजिक अंतर, मास  रोजचे व्यवहार कसे व कशी काळजी घ्यावी याबद्दल सतत लेख लिहिले आहेत. अनेक चॅनलवर टेलिव्हिजन वर, यु ट्युब वर, फेसबुक च्या माध्यमातुन अनेक मुलाखती दिल्या आहेत.

विविध श्रेत्रातून ‘मुंबई माॅडेल‘ च्या कोरोनाची परिस्थिती चांगल्या पध्दतीने हाताळली जात आहे याबद्दल ह्या योजनेसाठी त्यांचे  कौतुक  होत आहे.

डाॅक्टर स्वाती सुपे त्यांच्या अर्धांगिनी आहेत. कोविडच्या कालावधीत अनेक जणांवर त्यांनी उत्तम इलाज केले आहेत. आम्हां सर्वाच्या आधारस्तंभ आहेत.

नेहरूनगर कुर्ला पूर्वला त्यांचा दवाखाना आहे. चाळीस वर्ष अविरत रुग्णांना सेवा देत आहे. तिच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी नाही असे दृश्य दुर्मीळच म्हणायचे.
डाॅ स्वातीताई म्हणजे (आमची माई) प्रत्येक रुग्णाच्या आजारावर इलाज करतेच, पण मनावर पण चांगले संस्कार करते. सर्वांची आस्थेने चौकशी करतेच शिवाय समाजप्रती असलेले जबाबदारी ओळखून अडीअडचणीला मदतीचा हात देते.

मध्यंतरी माझा उजवा गुडघा प्रचंड दुखत होता. तिने एक्स रे बघून कुठले व्यायाम करायचे, कुठले कॅल्शियम, कुठला योगा, करायचे ते अचूक सांगतले. अचूक निदान व कमीतकमी औषधे व योग्य इलाज यात माई मातब्बर आहेतच. डाॅक्टर स्वातीताई महिन्यातून एकदा, कधी कॅल्शियम तर कधी थाईराईडचे शिबिर घेते व सर्वांनी त्याचा लाभ घेण्यास भर घालते.

सर्वात महत्वाचे आरोग्य आहे. स्वतःची प्रथम काळजी घ्या. प्रत्येकाचे सुप्तगूण ओळखून ते गुण वाढविण्यास मदत करते. माझे अनेक गुण हेरून मला तिने माझ्या आयुष्याला सोनेरी किनार  लावली.

डाॅक्टर स्वाती ताई नेहमी म्हणतात प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच आहेत त्या प्रत्येक वेळाचा सदुपयोग कसा करायचा, समतोल कसे राखायचे. मुलांवर कसे संस्कार करायचे,  प्रत्येक वयात कसे वाढवायचे अश्या अनेक गोष्टीं त्या शिकवतात.  खरंतर त्या आरोग्यदायी, निरोगी कसे राहायचे त्याहून आनंदी  कसे राहायचे ते शिकवतात. कोविड मध्ये सामाजिक जबाबदारीचे भान राखून आम्हा सर्वाचा एक what’s up group (clinic patients) केला व आम्हाला योगा, मेडिटेशन, ओमकार साधनाचे महत्व पटवून  देतात व करून घेतात हे विशेष.

प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निसर्गदत्त् बुद्धिवंत असे हे बहुगुणी दांपत्य डाॅ स्वाती व डाॅ अविनाश सुपे यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

पूर्णिमा शेंडे.

– लेखन : पुर्णिमा शेंडे.

डॉक्टर म्हणजे देवच

आज डॉक्टर दिनाच्या अनुषंगाने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली आहे.
सर्वप्रथम माझे जन्म गाव आणि काही थोडा काळ माझी कर्मभूमी राहिलेल्या नागपूर शहरात माझ्या निकटच्या संबंधात आलेली वैद्यकीय मंडळी म्हणजे डॉक्टर नटराजन आणि डॉक्टर उमा दंपती, डॉक्टर दिलीप वेचलेकर, डॉक्टर रवींद्र आणि ऊर्मिला क्षीरसागर, डॉक्टर सतीश आणि डॉक्टर कृष्णा काळे, डॉक्टर विजय माथने आणि इतरही अनेक.

डॉक्टर दिलीप वेचलेकर हे नागपुरातले प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ. श्रीरामकृष्ण मिशनशी निगडित. डॉक्टर नटराजन आणि डॉक्टर उमा देखील नागपुरातीलच. डॉक्टर नटराजन हे सर्जन, 1971 च्या युद्धात थेट सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत जास्तीत जास्त शल्यक्रिया करण्यासाठी विशेष पदकाने गौरवलेले.

डॉक्टर उमा ह्या भुलतज्ञ. हे दोघे ही रामकृष्ण मिशनशी निगडित. डॉक्टर क्षीरसागर दंपती हे देखील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या माध्यमातून दीर्घ काळ सेवाव्रती.

डॉक्टर सतीश आणि डॉक्टर कृष्णा काळे क्रमशः प्लास्टिक सर्जरी आणि भूलतज्ज्ञ म्हणून शासकीय सेवेत आणि डॉक्टर विजय माथने देखील शासकीय सेवेत संत तुकडोजी महाराजांचे भक्त. आपापल्या क्षेत्रात प्रथितयश आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक.

पुणे येथील कॅम्प मध्ये हॉस्पिटल असलेले आणि कुठलीही ओळख नसतांना पहिल्याच भेटीत मैत्र जुळून आलेले डॉक्टर पारीख. पहिल्या अपत्याच्या वेळेस आम्हाला घरातील अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती सारखी वागणूक देणारे प्रसूती त्यांच्या कडे होणार नसतानाही प्रसुतीपूर्व तपासणी दरम्यान बंडगार्डनला अगदी बोट क्लबवर आमचे आतिथ्य करणारे आणि मुख्य म्हणजे मी पोहणे शिकण्यात महत्वाची भूमिका बजावलेले. आज 27 वर्षां नंतर ही त्यांच्या आपलेपणाची वागणूक माझ्यावर बरेच सकारात्मक परिणाम करण्यास कारणीभूत ठरली.

मुंबईत प्रजापती ईश्वरीय ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय विचारधारेचे डॉक्टर मुकणे यांचा माझ्या मुलाच्या आजारपणामुळे संपर्क झाला आणि नंतर तो घनिष्ट स्नेहात रुपांतरीत झाला. गेली 20 वर्ष आम्ही ठाणे, नाशिक, नागपूर, दिल्ली कुठेही असो आमची टेली मेडीसिन उपचार पद्धती सुरू आहे. सुरवातीला त्यांना असा त्रास द्यायला वाटणारा संकोचही त्यांच्या अत्यंत सुहृदतेमुळे बराचसा नाहीसा झाला आहे.

जे जे रुग्णालयाचे मेडीसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय जोगळेकर आणि त्यांचे विद्यार्थी,
फॉरमोकोलॉजीचे विभाग प्रमुख डॉक्टर पटेल, स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर रेखा डावर किंवा त्यांच्या नंतर झालेले विभागप्रमुख डॉक्टर आनंद किंवा डीन राहिलेले पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि त्यांचा सर्व चमू यांच्या निर्हेतुक स्नेहामुळे आमची बरीच आजारपणं फारच सुखकर झाली आहेत. जात, पात, धर्म, सामाजिक पत कशाचीही आडकाठी न येता माझ्याप्रमाणेच हा अनुभव हजारो रुग्णांनी घेतला असेल हे मी खात्रीशीर पणें सांगू शकतो. या सर्वांनीच वैद्यकीय व्यवसाय करत असताना अंतरंगात सेवाभाव कायम जपला आहे.

असाच मार्ग चोखळणारे माझे मित्र आणि दंतशल्य चिकित्सक डॉक्टर उल्हास वाघ किंवा डॉक्टर जोगळेकर किंवा डॉक्टर सुधीर ढगावकर या सर्व मंडळीनी वैद्यकीय व्यवसायाचा व्यापार केल्याचे मला कधीही आढळले नाही. व्यवसाय करत असताना त्यांनी जपलेले सामाजिक भान अचाट करते.
“न त्वहम् कामये राज्यम् न स्वर्गम् न पुनर्भवम्।
कामये दु:खतप्तानम् प्राणिनामार्तिनाशनम्।।”

अर्थात मला राज्य नको, ना ही स्वर्गप्राप्तीची अपेक्षा आहे, पुनर्जन्म ही नको. मला दुःखदग्ध लोकांची पीडा दूर करण्यासाठी शक्ती मिळो ही संस्कृत उक्ती या सर्वांवर सार्थ ठरते.

नितीन सप्रे, नवी दिल्ली.

माणसातला देव

आपल्या घरातला रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असतो व त्या रुग्णाला जेंव्हा दवाखान्यात अँडमिट करुन त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यात येतात तेंव्हा आपल्याला त्या डॉक्टरांमधील देवपण लक्षात यायला लागते.

हा प्रसंग स्वतः माझ्यावरही उद्भवला. माझा मुलगा प्रमोद यास जेंव्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागली व तपासणीसाठी तो दवाखान्यात गेला तेव्हा त्याला कोरोना झाला असे लक्षात आले. त्यावेळी माझे जावई डॉ व्यंकटेश डूब्बे,(एम.डी. मेडिसिन), भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड यांच्याकडे तो ॲडमिट झाला. डॉक्टरांनी त्यावेळी त्याला धीर दिला व योग्य औषधोपचार सुरू केले. अवघ्या दोन दिवसात माझ्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

तसेच दुसरा अनुभव म्हणजे माझ्या सासूबाई श्रीमती वच्छलाबाई र्याकावार(Ryakawar) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या घरातील सर्व सदस्य कोरोनाग्रस्त झाले होते. त्यावेळी आम्ही अतिशय भयभीत झालो होतो पण डॉक्टरांनी आम्हाला प्रचंड धीर दिला व तात्काळ सर्वांवर उपचार सुरू केले. हळूहळू एक एक जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले.

वास्तविक तेंव्हाची परिस्थिती अशी होती की बेड मिळण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करावी लागत होती. माझेच एक मित्र प्रल्हाद राजकोंडावार यांच्या पत्नी यांना देखील त्या वेळी कुठेही बेड मिळाला नाही त्यांनाही डॉक्टरांनी बेड मिळवून दिला व उपचार केले. त्यानंतर माझ्या मित्राची अशी प्रतिक्रिया होती की माझी पत्नी आता माझ्या हातातून जाणार या समजुतीने मी वावरत होतो. पण तिला डॉक्टरांनी मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. मी त्यांचा खुप आभारी आहे. अशा या अनेक प्रसंगातून आम्हा सर्वांना माणसातला देव दिसला. अशा पद्धतीने नांदेड व आजू बाजूच्या परिसरातील लोकांसाठी डॉ व्यंकटेश डूब्बे फार मोठा आधार स्तंभ ठरत आहेत. या डॉक्टर दिनानिमित्त माझ्या त्यांना अनेक अनेक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा…..

– सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी.

फॅमिली डाॅक्टर

डाॅक्टर्स डे निमित्ताने मी आमचे फॅमिली डाॅक्टर डाॅ. निलेश धारूरकर यांचे आभार मानू इच्छिते. डाॅक्टर धारूरकर हे सांताकृझ येथे प्रॅक्टीस करतात.

आम्ही म्हणजे मी, माझे पती प्रकाश, आई, बाबा सर्वच त्यांच्याकडेच जातो. त्यांनी मेडीसिन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. जवळपास चाळीस वर्षांची तरी त्यांची प्रॅक्टीस असावी. ते खुप काळजीपूर्वक औषधं लिहीतात. त्यांनी दिलेल्या औषधाला म्हणूनच गुण येतो.

मला राज्यपाल यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असतांना अचानक त्रास जाणवायला लागला. राजभवनच्या डाॅक्टरने इसिजी वगैरे काढून बिपीची औषधं सुरू करण्याचा सल्ला दिला. तेव्हा डाॅक्टर धारूरकर यांच्या सल्ल्याने या गोळ्या सुरू केल्या तेव्हा पासून इतर कोणत्याही डाॅक्टर कडे न जाता नियमित त्यांचेकडे जाणे सुरू झाले.

माझे गायनिकचे प्राॅब्लेम असू देत, नाही तर आईचे कॅन्सरची ट्रिटमेंट. सगळ्याच औषधांसाठी त्यांचाच सल्ला घेतला जातो. आई बाबा गावाकडच्या डाॅक्टरांकडून औषधं लिहून आणत. त्यांनाही डाॅक्टर धारूरकरांची ट्रिटमेंट सुरू केली. एकदा बाबा अचानक आजारी पडले. रात्री बारा वाजता त्यांना सरला हाॅस्पीटलमधे दाखल केले. जवळपास मुर्छित अवस्थेत दवाखान्यात भरती झालेले बाबा दोन आठवड्यात आपल्या पायांवर चालत घरी आले.

आईचा तर त्यांच्यावर खुप विश्वास होता. कोरोना काळात घरी राहूनच ट्रिटमेंट सुरू होती. कोरोनाचा विळखा थोडा ढिला झाल्यावर तिला एकदा ॲडमिट केलं होतं रक्त चढवायला. आईने डाॅक्टरांना तेव्हाच रिक्वेस्ट केली होती. मला त्रास द्यायचा नाही. नंतर महिनाभरातच आई गेली. शेवटच्या क्षणी त्यांच्याच देखरेखीत. आईच्या वेदनादायक प्रवासाला पुर्णविराम मिळाला.

डॉ निलेश धारूरकर.

डाॅक्टर धारूरकर हे शांतपणे प्रत्येक क्रिटीकल कंडिशन हॅन्डल करतात. यांचे अचूक निदान, योग्य औषधोपचार आणि मुख्य म्हणजे पेशंटला कायम विश्वासात घेऊन त्याच्याचसाठी योग्य असलेला निर्णय घेण्याची क्षमता या मुळे डाॅक्टर धारूरकर यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

माझा मुलगा अप्रतिम आता काही वर्षात डाॅक्टर बनणार आहे. त्यानेही असेच रूग्ण स्नेही डाॅक्टर बनावे हीच माझी इच्छा.

अर्चना शंभरकर.

–  लेखन : अर्चना शंभरकर.

देवासारख्या डॉक्टर

मी सौ. आकांक्षा गोखले व माझे पती श्री. सचिन गोखले गेली जवळ जवळ 12-14 वर्षं, दाताची कुठलीही समस्या असली तरी डॉ. अलका खाडे यांच्याच क्लिनिकमध्ये जात आहोत.

डॉ. अलका यांचं निदान अतिशय योग्य व अचूक असते. दाताचा काय प्रॉब्लेम आहे हे त्या व्यवस्थित ऐकून घेतात. त्या खूप मितभाषी आहेत. काय उपचार करावा लागेल हे त्या नीट समजावून सांगतात. शक्यतो दात काढण्यापेक्षा वाचवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. उपचार पूर्ण झाल्यानंतर दाताची कशी काळजी घ्यावी हे पण त्या नीट समजावून सांगतात.

एकदा उपचार पूर्ण झाल्यानंतर परत त्याचा कुठलाही त्रास होत नाही. तेच काम परत करावे लागत नाही. एखादया वेळेस क्लिनिक मध्ये जाणे शक्य नसेल तर फोन वरून सुध्दा त्या औषधे सांगतात. त्यांचे सहकारी सुध्दा मितभाषी, मदत करणारे असेच आहेत.

आता तर डॉ. अलका यांचा मुलगा डॉ. रोनीत हे सुद्धा त्यांच्यासारखेच कुशल, योग्य निदान करणारे असेच आहेत.
आमच्यासाठी डॉ. अलका देवासारख्याच आहेत.
त्यांना व डॉ. रोनीत, दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा..💐💐
डॉ. अलका व डॉ. रोनीत यांना खूप खूप धन्यवाद….🙏🏻🙏🏻

– लेखन : आकांक्षा गोखले, नवी मुंबई.

आठवणीतील डाॅक्टर

जन्मापासून मरेपर्यंत एकच देव आपल्याला सातत्याने साथ देत असतो आणि तो म्हणजे डाॅक्टर !

लहानपणी या देवाला मी अतिशय घाबरायचो. मला आठवते, कुठूनतरी कर्णोपकर्णी वार्‍यावर झोप उडवणारी वार्ता आली की चौकातील भेंडीखाली लस द्यायला डाॅक्टर आलेले आहेत आणि ते गल्लीतील एकेका पोराला बखोटे धरुन उचलून उचलून तिथे नेत आहेत. झाले जो तो पोर इकडे लप तिकडे लप असा लपू लागला. त्यात मीही होतो. लांबूनच बघितले तर भेंडीखाली डाॅक्टरांच्या कचाट्यात सापडलेली पोरं दंडावरच्या डागण्यांनी अक्षरशः गुरासारखी ओरडत होती, थई थई नाचत पाय झाडत होते. ते पाहून तर छातीत धस्स झालेले होते.

लपायच्या नादात कुठूनतरी आई शोधत शोधत आली. तिने जवळजवळ झडपच घालून मला पकडले आणि ओढत ओढत भेंडीखाली डाॅक्टरांकडे घेऊन गेली. मरण जवळ आलेल्या डुकरासारखी माझी अवस्था झालेली होती. नाही नाही म्हणेपर्यंत आईने मला त्या डाॅक्टराच्या स्वाधीन केले तेव्हा मनात म्हटले आता संपले सगळे. तिथे बघितले तर स्टोववर छोट्या पातेल्यात पाणी थपथप उकळत होते. त्यात भल्यामोठ्या सुया बुडवून ठेवलेल्या होत्या. एकेक पोराला उचलून उचलून आणणे सुरुच होते. कोणीतरी दंड धरुन ठेवला आणि त्यावर गरम सुई जवळ जवळ डागली तसा मी गुरासारखा ओरडलो. ती खूण अजूनही दंडावर आहे. कळत नव्हते त्या वयातील हे सर्व दिव्य होते. नंतर कळाले की ती देवीची लस होती. ती घेतली नसती तर तोंडावर अंगावर देवीचे फोड येऊन चांगले मोठमोठे व्रण पडले असते. आज कळते की त्यावेळी कटू व कठोर निर्दयी वाटलेले डाॅक्टर देवच होते.

जस जसं वय वाढत होते तस तसे डाॅक्टरांचे भय वाढतच होते. कधी तापाने फणफणलो की तापापेक्षा मला सुईची भीती वाटू लागायची आणि मग दरदरुन घाम फुटायचा. नको नको म्हणत असतानाही आई मला डाॅक्टरकडे घेऊन जायची. बरं डाॅक्टरही असा एक पेशंट झाला की उभे राहून दुसर्‍या येणाऱ्या पेशंटसाठी सुई भरायच्या तयारीला लागायचा. अशी तयारी करीत असतानांच त्याच्याकडे जायची वेळ आली की पेशंटला पाहून डाॅक्टरला आणखीच उत्साह आलेला दिसायचा. गोळ्या औषधेच द्या असे बजावलेले असताना डाॅक्टर हटकून इंजेक्शनच द्यायचे आणि मग हट्टी ताप घरी जाईपर्यंतच झरकन उतरुन जायचा. तर अशारितीने बालपणात डाॅक्टरांचा मी धसका घेतलेला होता.

गल्लीत एक दंतवैद्याचा दवाखाना होता. काचेच्या शोकेसमध्ये कवळ्या औषधांच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या असायच्या. मित्र सांगायचे तिथे वैद्य म्हणे दात उपटून काढत असतात म्हणून घाबरुन मी तिथून पळ काढायचो. न जाणो वैद्य मागे लागायचा आणि दात उपटून घ्यायचा अशी भीतीही त्यावेळी वाटायची.
घरात त्यावेळी दम द्यायचा असला की ‘थांब तुला डाॅक्टरकडेच घेऊन जाते आणि मोठ्ठी सुई मारायला सांगते’ असा सज्जड दम भरला जायचा.

नंतर दरवर्षी जसा पाऊस सुरु व्हायचा तसा दवाखाना ठरलेला असायचा. १९९० मध्ये अति दगदगीने मी आजारी पडलो. वजन भराभर कमी होत गेले आणि अवघे ४६ किलो वजन झाले. डाॅक्टरचे नाव घेतले की मी हमखास नाही म्हणायचो. सहज फिरायला जाऊ म्हणून सासूबाईंनी हळूच मला नाशिकरोडच्या शिवगंगा हाॅस्पिटलला नेले. स्वतःला दाखवायच्या बहाण्याने हळूच डाॅक्टरांचा मोर्चा त्यांनी माझ्याकडे वळवला आणि मग मला घरच्यांचा कावा लक्षात आला. पण माझा नाईलाज होता. डाॅक्टरांनी मनसोक्त तपासणी केली आणि सांगितले की यांना लगेच हाॅस्पिटलमध्ये दाखल करुन घेतो. झालं. माझ्या डोळ्यापुढे तारे चमकले. सलग इंजेक्शनचे कोर्स सुरु केले. लोह वाढीच्या गोळ्या आणि टाॅनिकचा मारा सुरु झाला. रोज आलटून पालटून इंजेक्शन होते त्यामुळे मी अगदी जेरीस आलो. डाॅक्टरांच्या त्यावेळच्या प्रयत्नांमुळे मी मोठ्या गंभीर आजारातून बरा झालो. त्याबळावर मी मुंबईला अपडाऊन करुन सलग ३१ वर्षे सेवा केली.

नोव्हेंबर २०१८ मध्ये मला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मला तातडीने जे. जे हाॅस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. अॅन्जिओग्राफी व अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आणि पुन्हा एकदा डाॅक्टरांनी मला जीवनदान दिले. माझ्या या गंभीर जीवनमरणाच्या क्षणी डाॅक्टर देव म्हणून उभे राहिले.

इगतपुरी पाऊसाचे माहेरघर. तिथे तर मुले लहान असताना मला पावसाळ्यात हमखास डाॅक्टरांकडे धावपळ करावी लागायची. तेथील डाॅक्टर मी पहायचो अगदी अल्प फी मध्ये स्वस्त औषध लिहून देऊन बरे करायचे. पाठीवर स्टेथोस्कोप लावून नाडीचे ठोके मोजून ते अचूक निदान करायचे. त्यांच्याकडे बहुतांश आदिवासी उपचार घ्यायला येत असायची. एकदा मी बघितले एक आदिवासी आजी फि द्यायला म्हणून कमरेला पिशवीत चाचपडत होती. कशीबशी तिने जेव्हा घडीघडीची दोन रुपयांची नोट काढली तेव्हा तिच्याकडे पाहून डाॅक्टर म्हणाले ‘राहू द्या आजी. आधी बर्‍या व्हा.’ आणि एवढे बोलून त्यांनी आपल्या जवळची औषध गोळ्या तिला दिल्या व कसे वाटते ते दाखवायला परत या म्हणून बजावले. फी नसली तरी चालेल असेही सांगितले. असेही माणूसकी असलेले डाॅक्टर मी इगतपुरीमध्ये पाहिले.

आजच्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणात डाॅक्टर स्वतःच्या जीवावर उदार होऊन रुग्णांचे जीव वाचवत आहेत. अनेकांच्या आयुष्यात डाॅक्टर देवासारखा धावून जात आहे. अशा या देवाला कोटी कोटी प्रणाम !!!

विलास कुडके.

– लेखन : विलास आनंदा कुडके.

डाॅक्टरच्या रूपातील देव

माझ्या लहान मुलाचे रोहितचे नाकाचे हाड वाढले होते. त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. काही वर्षांपूर्वी डाॅक्टरांनी तो १८ वर्षांचा झाल्यावर आॅपरेशन करायला सांगितलेले होते. माझा जीव काही एवढ्या नाकावरील नाजूक आॅपरेशनसाठी तयार होत नव्हता. पण आॅपरेशन तर करायलाच हवे होते.

प्लॅस्टिक सर्जरीविषयी खूप ऐकले होते. मायकल जॅक्सन या पाॅपसिंगरने देखील प्लॅस्टिक सर्जरी केलेली होती. खूप अवघड असे हे आॅपरेशन असेल असे तेव्हापासून वाटत होते. शिवाय अशा आॅपरेशनला खूप खर्चही येत असेल असे वाटत होते.

रोहितला दिवसेंदिवस त्रास होतच होता. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला १८ वर्षे पूर्ण झाली आणि मी त्याला १३ मे, २०२१ रोजी कल्याण (पश्चिम) येथील डाॅक्टर अरविंद पांडे यांच्या बालाजी हॉस्पिटलला घेऊन गेली. त्याचे सीटीस्कॅन केले. त्याचे नाक वाकडे झालेले होते त्यामुळे आॅपरेशन करुनही ते सरळ होणार नाही त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असे डाॅक्टर म्हणाले. रोहितचे सगळे रिपोर्ट्स दाखवले. ईसीजी सोनोग्राफी केली. नाकाला आकार देणारे व भूल देणारे डाॅक्टरांची वेळ मिळाली की आॅपरेशनची तारीख मिळणार होती. १.७५ लाखाच्या आसपास खर्च सांगितलेला होता. एकूण पाच तास आॅपरेशन चालणार होते. शेवटी आॅपरेशनसाठी ११ जून, २०२१ ही तारीख मिळाली.

डॉ. पांडे.

जसजशी आॅपरेशनची तारीख जवळ येत होती तसतसे मनावर प्रचंड दडपण आले होते. कसे होईल असे सारखे वाटत होते. भीतीही वाटत होती. का कुणास ठाऊक पण कशातच मनही लागत नव्हते. तशात ९ जून, २०२१ रोजी सायंकाळी ६.३६ ला हाॅस्पिटलमधून फोन आला. १० जून, २०२१ रोजी रात्री ९ वाजता रोहितला हाॅस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले होते. ११जून, २०२१ रोजी सकाळी ८ वाजताच आॅपरेशन सुरु होईल असे हाॅस्पिटलमधून सांगण्यात आले. माझी तर धडधड खूपच वाढली. कसे होईल माझ्या रोहितचे म्हणून एकसारखी भीतीही वाटत होती. मनातल्या मनात मी देवाचा धावा सुरु केला. सगळे सुखरुप पार पडू दे म्हणून मी देवाला प्रार्थना केली. देव डाॅक्टरांच्या रुपाने हसर्‍या चेहर्‍याने ‘सारे काही ठिक होईल. घाबरु नका’ म्हणून जणू काही मला धीरही देत होते.

रोहितला १० जून, २०२१ रोजी रात्री ९ वाजता हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. रात्रभर मी रोहितजवळच राहिले. त्यालाही धीर देणे आवश्यक होते. त्याला काय हवे नको ते पाहणे आवश्यक होते.

शेवटी तो क्षण आला. ११ जून, २०२१ रोजी सकाळी ८ वाजता आॅपरेशन सुरु झाले. डाॅ. पांडे यांनी रोहितच्या नाकाच्या हाडाचे आॅपरेशन केले आणि डाॅ वीरेंद्र घैसास यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली. तब्बल चार तासानंतर ११.५९ ला आॅपरेशन थिएटरबाहेर आणले. डाॅक्टरांनी नंतर मला आॅपरेशन झाले त्याची सीडी दाखवली. माझे डोळे भरुन आले. किती कौशल्याने डाॅक्टरांनी रोहितच्या नाकावर नाजूक प्लास्टिक सर्जरी सुखरुपपणे केली होती. माझा जीव रोहितकडे पाहून भांड्यात पडला. खरोखर डाॅक्टरांच्या रुपाने देवच धावून आलेले होते. मी मनातल्या मनात त्या देवांना धन्यवाद देत हात जोडले.

डॉ घैसास

दोन दिवस आम्ही हाॅस्पिटलमध्ये होतो. १३ जून, २०२१ रोजी रोहितला डिस्चार्ज मिळाला. रोहितच्या नाकावर प्लास्टर होते. चेहरा हलला नाही पाहिजे याची काळजी घ्यायला सांगितले होते. जेवणात त्यामुळे फक्त खिचडी आणि तीही एकदम पातळ खायला सांगितली होती.

प्लास्टर काढल्यावर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. नाकाचे हाड वाढून वाकडे झालेले कुठल्याकुठे नाहिसे होऊन त्याजागी सुंदर आकारातील रोहितचे नाक व त्यामुळे त्याचा फुललेला सुंदर हसरा चेहरा मी पाहत होते. पुन्हा एकदा मी डाॅक्टरांच्या रुपातील त्या देवांना ज्यांनी माझ्या रोहितला एक नवे प्रफुल्लित हसणे मिळवून दिले आणि त्याच्या आईलाही मोठा दिलासा दिला त्यांना कोटी कोटी धन्यवाद देत हृदयापासून नमस्कार केला !
🙏🙏🙏💐💐💐

– लेखन : सौ प्रिया रामटेककर.

त्रिवार वंदन

आजकाल स्पेशालिस्ट डॉक्टरांची फी 500 ते 1000 रुपये नक्कीच असते. पण पुण्यातील डॉ गोडबोले यांनी ऐच्छिक फी ची पाटी लावली आहे.
पैशाला प्राधान्य न देता पेशंट बरा करण्याचं ध्येय आणि मनाचा मोठेपणा असल्या शिवाय हे शक्य नाही.
त्यांचा पत्ता पुढील प्रमाणे :
गोडबोले हॉस्पिटल, १३०१, सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिर शेजारी पुणे ३०.

समाजामध्ये असे डॉक्टर किंवा कोणतेही व्यावसायिक विरळाच. तरीही मला असे वाटते की आपल्या नोकरी/व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर किंवा एका विशिष्ट वयानंतर निवृत्ती घेऊन सामाजिक कार्यासाठी त्या व्यवसायिक ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग केल्यास समाज तुम्हाला वाऱ्यावर सोडत नाही.

तामिळनाडू मध्ये एका समाजसेवी संस्थेचे किंवा देवस्थानचे एक रुग्णालय आहे. त्या रुग्णालयातही बिलिंग काउंटर नाही. जे काही द्यायचे ते दान स्वरूपात. दानपेटीत लोकांनी आपणहून टाकायचे आणि त्यांचा अनुभव असा की त्यांना कधीही आर्थिक चणचण भासली नाही. समाजाकडून पैसे ओरबाडून घेण्यापेक्षा जर अशा पद्धतीने शुभेच्छा शुल्क या पद्धतीने आपल्या वयाच्या काही विशिष्ट टप्प्यानंतर जर सर्व व्यावसायिकांनी व्यवसाय करायचे ठरवले तर खूप मोठे समाजकार्य उभे राहू शकेल. उचलून पैसे देणे यापेक्षा स्वतः संपूर्ण आयुष्य बहाल करणे या गोष्टीत समर्पणाची भावना असल्यामुळे समाजाकडून या समर्पणाला नक्कीच प्रतिसाद मिळतो.

वैद्यकीय व्यवसायात माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि त्यामुळे तो व्यवसाय जास्त महत्त्वाचा ठरतो. या व्यवसायात जेव्हा एखाद्याला मृत्यूपासून परत जीवनात आणले जाते त्या वेळेला असे नवजीवन देणाऱ्या व्यक्तीला माणसे देवतुल्य मानतात. त्यामुळे या व्यवसाया सारखा लोकांना देवत्व बहाल करणारा दुसरा व्यवसाय नसल्याने येथेच माणसे समाजकार्याची जास्त अपेक्षा करतात. कारण या व्यवसायात जरी जीव वाचत असला तरी त्यासाठी बाकी सर्वस्व गमावावे लागण्याची शक्यता असतेच. खूप मोठे आर्थिक व्यवहार करावे लागत असल्याने जिवाच्या भीतीने ज्याला शक्य नाही असा माणूस सुद्धा आपले सर्वस्व पणाला लावून जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो. म्हणूनच या व्यवसायाबाबत माणसांच्या अपेक्षा जास्त असतात.

आमटे कुटुंबीय किंवा डॉ. कोल्हे किंवा डॉ. तात्याराव लहाने आणि असे अनेक समाजिक कार्याचा वसा घेतलेले वैद्यकीय व्यावसायिक समाजामध्ये आहेतच. त्यांना काही कमी पडले आहे असे काही जाणवत नाही. स्वतःचे राहणीमान साधे ठेवले आणि आर्थिक गरजा मर्यादित ठेवल्या तर हे अशक्य नाही. आर्थिक गरजांना किती वाढवायचे आणि त्या गरजेची हांव कशी बनू द्यायची नाही. हे प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारांवर अवलंबून आहे. (आदरणीय सुधाताई मूर्ती हे एक खूप मोठे उदाहरण आहेच परंतु ते वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित नाही त्यामुळे ते इथे देत नाही पण त्याचा उल्लेख केल्याशिवाय मोह आवरत नाही)

परंतु सद्भावनेतून काम करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांना सुद्धा चांगलेच अनुभव येतात असेही नाही. तरीही आपल्या वैचारिक भूमिकेपासून न ढळणाऱ्या या व्यवसायिकांना खरोखरच साष्टांग प्रणिपात. डॉक्टर्स डे च्या निमित्ताने या सर्व पुण्यवंतांचे स्मरण करून त्यांना साष्टांग प्रणिपात. त्याच बरोबर समाजातील काही विकृतींचा सुद्धा निषेध करणे व चांगल्या वैद्यकीय व्यवसायिकांना सुद्धा वाईट अनुभव देणाऱ्या घातक समाज प्रवृत्तींच्या विरोधात सामान्य नागरिक म्हणून उभे राहणे हेसुद्धा आपले कर्तव्यच नव्हे काय ? सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून, सब घोडे बारा टक्के असे समजून साप साप म्हणून भुई थोपटणाऱ्या व समाजामध्ये विकृती निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
अशा विकृत प्रवृत्तींचा धिक्कार करून माणसाला नवजीवन देणाऱ्या या श्रेष्ठ व्यवसायातील देवतुल्य व्यवसायिकांना त्रिवार वंदन !
त्रिवार वंदन !! त्रिवार वंदन !!!

– लेखन : सुनील देशपांडे..

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. सगळे लेख खुपच छान.
    अगदी मनाला स्पर्श करुन गेले.
    डाॅक्टर रूपी देव आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत.
    मंदिरातील सगळे देव सध्या डाॅक्टर च्या रूपात आले आहे असेच वाटतं आहे.
    डाॅक्टर दिनाच्या सगळ्या डाॅक्टरना मनापासून शतशः प्रणाम. 🙏

  2. मानव रुपी देव म्हणजे डॉक्टर्स! लेखात वाचावयास मिळालेले व प्रत्येकाने देवरूप डॉक्टर्स अनुभवातून येथे साकारले, त्या सर्व डॉक्टर्सना आजच्या “राष्ट्रीय डॉक्टर्स डे” च्या निमित्ताने माझे कोटी कोटी प्रणाम। सर्व लेख अप्रतिम। भुजबळ उभयतांस व त्यांच्या टीमला खूप शुभेच्छा।

  3. या जगात ईश्वरानंतर जर कोणाला देव मानायचे असेल तर ते म्हणजे डॉक्टर. असाध्य रोगातून जेव्हा एखादा रोगी बरा होतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म झालेला असतो.

    भुजबळ मॅडम आपण सकारात्मक विचार मनात ठेऊन कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करून कॅन्सर आजारातून ही आपण बरे होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहात. ते इतर कॅन्सर रुग्णासाठी प्रेरणादायी ठरेल.

    आपल्या आजारपणात आपले यजमान श्री भुजबळ साहेब तसेच आपली मुलगी यांचे खुप सहकार्य लाभले त्यांचे आभार 🙏

    आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून बऱ्याच मित्र, मैत्रिणी यांनी डॉक्टर बद्दल व त्यांना आलेल्या अनुभव बाबत उत्तम मनोगत व्यक्त केले आहे ते इतर रुग्णांना प्रेरणादायी ठरावे.
    डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…