मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, शहाजी राजे यांच्या अर्धांगिनी.. एक विलोभनीय, कर्तव्य परायण व्यक्तित्व. ज्यांच्या विषयी निष्ठा, स्नेह, श्रद्धा कायम आपल्या मनात ओसांडून वाहत असते अशा जिजाऊ, जिजामाता ज्या महाराष्ट्राच्या राजमाता, राष्ट्रमाता म्हणून गौरविल्या जातात. त्यांच्या आज असलेल्या स्मृतिदिनानिमित्त भावविभोर होत मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे.
म्हाळसाबाई आणि लखूजी जाधवांची कन्या लहान वयातच वेरूळ मधील मालोजी भोसल्यांची सून बनून दौलताबादला आली. तिथे वास्तव्यास असताना यवनांच्या हुकूमशाहीचे भयंकर प्रकार जिजऊंच्या पाहण्यात येत होते. लुटालूट, जाळपोळ, धार्मिक स्थळांची तोडफोड, मंदिरातील मुर्त्यांची अवहेलना…असे काळजावर घाव घालणारे अनेकानेक भयंकर प्रकार पाहायला, ऐकायला मिळायचे.
इतकेच काय घराघरातील पोरी बाळीही सुरक्षित राहू शकत नव्हत्या. माणुसकी, भावना, स्वातंत्र्य, हक्क प्रत्येक गोष्टींची पायमल्ली केली जायची. १६२३ मध्ये दौलताबादला असताना खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित होऊन लोकांना पायदळी तुडवू लागला होता. यावेळी जिजाऊंचा सख्खा भाऊ दत्ताजी जाधव हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचे, भाल्याचे, तलवारीचे वार करू लागले. हे पाहून शहाजीराजेंचे चुलत भाऊ संभाजी आणि खेलोजी भोसले दत्ताजीवर तुटून पडले. जाधव भोसले यांच्यात युद्ध पेटले होते . त्यात संभाजीने दत्ताजीला ठार मारले. याचा सूड घेण्यासाठी लखूजी जाधव जिजाऊंचे पिता भोसल्यांवर चालून गेले. त्यांनी संभाजीला ठार केले.
जिजाऊच्या सासर माहेरची लढाई चालू होती. एखाद्या साधारण स्त्रीला सहज पडणारा प्रश्न अशा वेळी कोणाची बाजू घ्यायची ? कोणासाठी रडायचे ? इथे जिजाऊही रडत होत्या पण अख्या महाराष्ट्रासाठी.. ना की सासर माहेरसाठी. इतकं त्यांचं मन मोठं होतं जे माया, वात्सल्याने ओतप्रोत होतं.
आजूबाजूच्या परिस्थितीमुळे जिजाऊ तळमळायची, व्याकुळ व्हायची. लढणारा कोण होता मराठी माणूस ! कोणाविरुद्ध लढत होता तर मराठी माणसाच्याच. तेही दुसऱ्याच्या आधिपत्याखाली आणि दुसऱ्यांसाठीच.. पण मराठी माणसाच्या घर संसारसाठी, त्याच्या कुटुंबिंयांसाठी लढायला कोणच नव्हते.. अगदी तो स्वतःही.. काही करू शकत नव्हता.. जिथं देवच सुरक्षित नव्हते तिथं माणसांची काय कथा ?
देवाधर्माची, मराठी माणसांची, मराठी मातीची होणारी विटंबना जिजाऊंना पाहवत नव्हती. सर्वसुखे पायाशी लोळत असतानाही तिचे हळवे मन आक्रंदन करायचे.आणि हेच त्यांचे वेगळेपण होते.. त्यांच्या हृदयात आभाळाएवढी माया होती. स्वतःपुरता विचार न करता महाराष्ट्राच्या रयतेसाठी मराठी माणसासाठी काही तरी कर म्हणून तिचे मन तिला बजावायचे.. स्वराज्याचे स्वप्न दाखवायचे. पण हे खरंच शक्य होते का ? यवनांची सत्ता असताना आपल्या मराठ्यांनी किती साथ दिली असती त्यांना ?
मराठी शूर होते, धाडसी होती, जीवास जीव लावणारे होते.. पण त्यांना एकत्र आणणे गरजेचे होते, संघटन, एकजुटीचे महत्व जाणवून देणे प्राथमिक नड होती. स्वतःच्या हिकमतीची, अस्तित्वाची जाणीव करून देणे काळाची गरज होती. त्यावेळची भीषण परिस्थिती पाहता असे करण्यास कोणीही धजावले नसते पण जिजाऊंची निर्मळ वृत्ती, सामाजिक जाणीव त्यांना बळ देत होते. देवी भवानीची निस्सीम भक्त होत्या जिजाऊ.. तिच्या मनोभावे भक्तीमुळे शक्ती मिळत होती. आपले रामायण, महाभारत हे महाग्रंथ जिजाऊंना प्रेरणा द्यायचे. कधीही काही विधायक कार्य करायचे असते तेव्हा संयम राखणे, संधीची वाट बघणे, विवेक बुद्धीने वागणे अपरिहार्य असते. उतावीळपणा करून आपल्या मनसूब्यावर आपणच पाणी फेरायचे नसते.
मुळात जिजाऊ हुशार होती, चाणक्ष होती. कान आणि डोळे उघडे ठेवून वर्तमानातील गोष्टी न्याहाळत होती. सरदार शहाजीराजे सतत मोहिमेवरती असल्यामुळे वतनांची जबाबदारी पाहत राजकारणातले बारकावे शिकून घेतले होते. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत अगदी धीराने प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करत होत्या.
राजकारभरात जातीने लक्ष देत होत्या. शिवाजी महाराजांचा सख्खा थोरला भाऊ संभाजीराजे अफजल खानाच्या दुष्ट कृत्यामुळे ठार झालेला. या स्थितीत अफजल खान ला भेटायला महाराज जाणार ही गोष्ट जिजाऊंना त्रासदायक, धक्का दायक होती. अशा वेळी एका मातेची काय मनस्थिती असू शकते ते जिचे तिलाच ठाऊक. एकच पुत्र जिवंत आणि त्यालाही मृत्यूच्या दाढेत पाठवायला कुठली आई तयार झाली असती ?? आईचे काळीज आईच जाणो ! मात्र इथे शिवबा फक्त आईचाच लेक नव्हता तर तो पूर्ण महाराष्ट्राचा होता. शिवबाने गेलेच पाहिजे हे त्या जाणून होता.. दुसरा पर्यायच नव्हता.. त्या वात्सल्याच्या मूर्तीने लेकाला आशीर्वाद दिला.. ” राजे जाणे ! संभाजीचे उसणे घेऊन येणे. मज कुंतीच्या पंगतीस बैसवणे.”
आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन शिवबांनी प्रतापगडाकडे प्रस्थान केले. अशा या जिजामाता.. आऊसाहेब अवघ्या महाराष्ट्राच्या राजमाता.. राष्ट्रमाता.
स्वार्थी वतनदारांची वर्तणूक आणि पिडीत जनतेची अबोल साद जिजाऊंचा स्वराज्य स्थापनेचा निग्रह अजूनच दृढ करत होती .
जिजाऊ एक संसारिक स्त्री होती. जाधवांची कन्या, भोसल्यांची सून.. मानमरताब पद, प्रतिष्ठा, सासर माहेरचा लौकिक या सगळ्या गोष्टी जपायच्या जाणून होती. दोन्ही कुळाला कसलाही धक्का लागू देऊ शकत नव्हती.
एक स्त्री म्हणून तिलाही काही मर्यादा, बंधने होतीच ना.. पण तरीही.. जिजाऊंचा निर्णय, स्वराज्याचे स्वप्न दिवसेंदिवस आकार घेऊ पाहत होते. सामान्य माणसाला माणूस म्हणून जगू देण्याची इच्छापूर्ती करण्यासाठी पंख उभारी घेत होते आणि ते त्यांनी करून दाखवले. फक्त विलासी साधनात न रमता सदसद्विवेकबुद्धीने हिमतीने प्रयत्न करत राहिल्या. श्रद्धेचा पाया इतका भक्कम होता की आई भवानीनेही जिजाऊंना जणू आशीर्वाद दिला होता.
या मातेने छत्रपती शिवाजींना असे घडविले की साऱ्या जगतात त्यांना आज मानले जाते, पूजले जाते. या वात्सल्याच्या मूर्तीने मराठी माणसाला मराठी मातीवर प्रेम करायला शिकवले. कौटुंबिक बंध सांभाळत जिजामाता थोर प्रशासक झाल्या, न्यायिक शासक झाल्या. ज्ञान, संघटन, आत्मविश्वास, समर्पण, नीतिमत्ता, चतुराई, पारखी नजर, वैचारिक कौशल्य, खंबीरपणा, इतरांचे मन उमगणे नि मन जपणेही .. अशा अनेक सुगुणांनी राजमाता परिपूर्ण होत्या. आदर्श लेक, पत्नी, माता तर त्या होत्याच पण सर्वोत्तम व्यक्ती होत्या. ज्यांनी महाराष्ट्राला स्वराज्य स्थापनेसाठी सर्वोत्कृष्ट
नेतृत्व दिले. स्वतःचा विश्वास सार्थ करुन दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला. देशाच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली ही घटना आहे. या सुवर्णसोहळ्याचे साक्षीदार झाल्यानंतर लगेच १७ जूनला आऊसाहेब अंनतात विलीन झाल्या. राजमाता निर्वतल्या.
मराठी मातीसाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी ज्यांनी आयुष्य पणाला लावले त्या जाताना काही न देता रिकाम्या हाती कशा जातील ?
जिजाऊंना त्यावेळी तनखा मिळायची. ती तनखा त्या आपल्या वैयक्तिक तिजोरीत साठवून ठेवायच्या महाराजांसाठी. त्यांना स्वराज्याच्या सुकार्यात उपयोग करण्यासाठी. त्या गेल्यानंतर त्या तिजोरीतून थोडी थोडकी नाही तर चक्क करोड रुपये मिळाले होते. इतके मोठे मन होते माउलीचे. जाता जाताही त्या लक्ष्मी ठेवून गेल्या होत्या.
काय करू शकत नाही स्त्री ? जाण आणि भान ठेवले तर काहीही अशक्य नाही.
एक स्त्री काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वंदनीय जिजामाता. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वास मनापासून अभिवादन करत शेवटी मी इतकेच म्हणेन..
“सोनपावलांनी आलेली समृद्धी
कर्तव्यदक्ष सर्जनशील लक्ष्मी
संस्कारी स्थितप्रज्ञ वागेश्वरी
निर्भय तेजस्वी करारी दुर्गा माता
ऐसी न होणे पुन्हा जिजामाता
ऐसी न होणे पुन्हा जिजामाता.

— लेखन : सौ मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800