पंढरीची वारी हे शब्द वाचताच डोळ्यापुढे उभे राहतात वारकरी ! धोतर नेसलेले, डोक्यावर टोपी किंवा पागोटे, हातांत टाळ, चिपळ्या घेतलेले, कपाळावर गंध लावलेले, अनवाणी चालणारे, मुखातून विठ्ठल नामाचा गजर करणारे आणि त्यांच्या बरोबरीने नऊवारी साड्या नेसलेल्या, डोईवर तुळशीच्या कुंड्या घेऊन नाचत नाचत हसतमुखाने विठुरायाचा गजर करीत वारी पार करणा-या नारी ! गांवागांवांतून आषाढ सुरु होण्यापूर्वीच पंढरीचा लांबचा पल्ला एकादशीला गाठण्यासाठी संत तुकाराम, ज्ञानेश्र्वर माऊली, सोपान, मुक्ताई, नामदेव यांच्या पालख्या टाळ, मृदुंगाच्या नादात निघतात. जणुं काही या वारक-यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे सारे संत या रुपात हजर असतात.
घराघरांमधून वारीसाठी फक्त तरुणच नव्हे तर अगदी वृध्द झालेले लोक सुध्दां विठ्ठल नामाचा जप करीत वारीत सहभागी होतात. या वारकरी समुदायात आजकाल परदेशांतील लोकही सहभागी होऊ लागले आहेत. त्यांनाही या सोहळ्याची ओढ लागली आहे.

आषाढाच्या पावसात चिंब भिजलेल्या वारक-यांना गांवागांवातील लोकांची मदत मिळत असे. भक्तीभावनेने गांवकरी त्यांना अन्न, निवारा देत असत. वारकरी सांप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात गरीब, श्रीमंत तसेच धर्म, जात-पात यांचा काडीचाही संबंध नसतो. सर्वजण समान एकाच वारकरी या पंथाचे !
कांही ठराविक जागांवर रिंगण हा प्रकार असतो. म्हणजे येथे वर्तुळात घोडे धावतात. वारकरी टाळ, चिपळ्या, ढोल वाजवत, भगवा ध्वज फडकवत आनंदाने विठ्ठल, विठ्ठल असा गजर करत गोल गोल फिरतात. असं म्हणतात की विठ्ठल विठ्ठल हा शब्द व्यवस्थित जोरात म्हटला तर सर्व शरीरात उर्जा निर्माण होते, रक्तप्रवाह शरीरभर व्यवस्थित वाहतो. कदाचित् वारकऱ्यांना त्यामुळेच इतक्या लांबवर अनवाणी जाण्याची क्षमता मिळत असावी.
नामोच्चारात तल्लीन असलेले वारकरी जेव्हां देवाचिये द्वारी पंढरपुरी पोहोचतात तेव्हां विठुरायाचे दर्शनच होते. चंद्रभागेमध्ये स्नान करुन मंदिराच्या कळसाकडे डोळे लावून बसतात वाट बघत कळस हलण्याची. असं म्हणतात की कळस हलला म्हणजे विठुरायाचे दर्शन झाले. मनाने तर प्रत्येकजण कधीच विठुराया जवळ पोहोचलेला असतो.
बोला, ‘पुंडलिक वरदे हारीविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ असा पुकारा करून वारकरी आनंदाचे डोही तरंगत विठ्ठलचरणी विसावतो.
एक महत्वाची सेवा विठुरायाच्या भक्तांची संघस्वयंसेवकांकडून केली जात आहे. पूर्वी गांवकरी अन्न, निवारा देत असत पण कुठेही शौचालयांची सोय नव्हती. त्यामुळे गांवांच्या आसपास घाणी होत असत. ही गोष्ट लक्षांत येतांच मदतीसाठी धावून आले संघसेवक. आज फिरती शौचालये घेऊन गांवोगांवी वारक-यांची उत्तम सोय केली जाते. तिथून वारकरीमेळा पुढे गेला की गांवाची साफसफाईही हेच सेवक करतात.
प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन नाही पण त्याच्या दर्शनासाठी निघालेल्या वारक-यांची सेवा ही सुध्दां विठूचरणी सेवाच होय.
या वारक-यांच्या सेवावृत्तीचं, निष्काम कर्मयोगाचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच पडेल. विवेक, विचार, वैराग्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या वारकरी भक्तांना माझे त्रिवार वंदन !
‘जय जय रामकृष्ण हरी !
विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल !
विठोबा, माऊली तुकाराम’ !

— रचना : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800