नवी मुंबई च्या पत्रकारिता, साहित्य, समाजकार्य क्षेत्रातील एक सदाबहार, चैतन्यशील, तत्वनिष्ठ, निःस्पृह व्यक्तिमत्व म्हणून श्री राजेंद्र घरत यांना सर्व ओळखतात. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या राजेंद्र घरत यांना शिवतुतारी प्रतिष्ठान तर्फे नुकताच तिसरा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबई येथील साहित्य संघ मंदिरात पार पडलेल्या एका शानदार समारंभात हा पुरस्कार त्यांना कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते व शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.रविंद्र पाटील, ‘साहित्य मंदिर’चे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, प्रा प्रवीण दवणे, समाजसेवक परशुराम ठाकूर यांच्या उपस्थितीत सपत्नीक प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, शिवमुद्रा, पुष्पकुंडी असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सत्काराला उत्तर देताना श्री घरत म्हणाले की, ‘आपण तीस वर्षाहुन अधिक काळ पत्रकारिता करीत आहोत. हा पुरस्कार वयाच्या ६३ च्या वर्षी आपणाला प्रदान करण्यात येत आहे. तथापि ‘अशा प्रकारचे पुरस्कार हे योग्य वयातच द्या, गलितगात्र झालेल्या अवस्थेत सत्कारमूर्तीला मुलासुनांनी व्यासपीठावर आणण्याची वेळ आणू नका; मरणोत्तर बहुमान हे केवळ सीमेवर लढलेल्या जवानांनाच योग्य वाटतात’ असे त्यांनी नमूद केले.
प्रा. शंकर गोपाळे व नारायण लांडगे यांनी प्रारंभीची बतावणी व नेटके निवेदन सादर केले. बाल कवी-कवयित्री तसेच निमंत्रित कवींचे संमेलनही कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पार पडले.

प्रा. रविंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर श्री अमोलकुमार वाघमारे यांनी आभार मानले.
यावेळी प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रांचे सुरेख रेखाटन प्रख्यात सुलेखनकार विलासराव समेळ यांनी केले होते. तर आकर्षक असे नॅपकिन बुके गोरखनाथ पोळ यांनी बनविले होते.
शिवतुतारीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविश्रांत मेहनत घेतली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800