देशात अणिबाणी लागू करण्यात आली होती, त्या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जेष्ठ लेखक श्री नागेश शेवाळकर यांनी लिहिलेल्या आणि इसाप प्रकाशन, नांदेड प्रकाशित करीत असलेल्या “लालकृष्ण अडवाणी : भारतीय राजकारणातील भीष्माचार्य” या पुस्तकातील “अणिबाणी” हे प्रकरण पुढे देत आहे. भारतीय लोकशाही चिरायू होवो.!
— संपादक
व्यक्ती कितीही उच्चविद्याविभूषित असो, कोणत्याही मोठ्या पदावर असो, देश-विदेशात ख्यातकीर्त असो त्याच्याकडून कळत-नकळत किंवा कधी स्वार्थापोटी अशी एखादी चूक घडते जी त्यालाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना वर्षानुवर्षे त्रास देते. अशीच एक चूक एका लोकप्रिय भारतीय पंतप्रधानांकडून घडली. त्या घटनेला पन्नास वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही त्याबद्दल त्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आजही त्याबद्दल ऐकून घ्यावे लागते, तो विषय निघाला की, मान खाली घालावी लागते. विशेषतः गेली दहा वर्षे ‘तो’ विषय संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित केल्या जातो.

होय ! मी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांनी देशात अणिबाणी लागू करण्याविषयी चर्चा करीत आहे. अलाहाबाद न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द केली आणि श्रीमती गांधी यांनी तो अभूतपूर्व निर्णय घेतला. रात्रीतून गल्ली ते दिल्लीत असणाऱ्या विरोधकांना तुरुंगात पाठवले गेले. लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, प्रचार स्वातंत्र्य अशा बाबींवर बंदी घालण्यात आली. ‘जो अणिबाणीचा विरोधक तो देशाचा शत्रू…’ असे वातावरण निर्माण झाले. मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, चंद्रशेखर, मधु लिमये, मधु दंडवते इत्यादी शेकडो नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. देशभरात हाहाकार माजला, मोठा गोंधळ उडाला. काही नेतेमंडळी आणि कार्यकर्ते भूमिगत राहून, बाहेर राहून गुप्त बैठका, चर्चा, सभा, आंदोलनं इत्यादी माध्यमातून सरकार विरोधात जनजागृतीचे कामही करू लागले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारही सज्ज होते. श्रीमती गांधी जारी यांनी जारी केलेल्या निवेदनात त्या म्हणाल्या, “अणिबाणी ही जनतेच्या आणि देशाच्या हितासाठी आहे. कठोर कायद्याचा आणि नियमांचा धाक दाखविल्याशिवाय सामाजिक शिस्त निर्माण होत नाही. जनतेसोबत अनेक सरकारी यंत्रणांमध्येही शिस्तीचे पालन व्हावे म्हणून हा उपाय अंमलात आणला आहे.”
परंतु अणिबाणीची अंमलबजावणी करताना सरकार आणि पोलीस यांची भूमिका वेगळीच होती. त्यामुळे ‘नागरिकांना शिस्त लावण्यासाठी अणीबाणी लावली, परंतु अंमलबजावणी करताना खुद्द सरकार आणि पोलिसच बेशिस्त झाले…’ अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, अनेकांना पोलीस अधिकारी आणि तुरुंगाधिकारी यांच्याकडून चांगली वागणूक मिळाली असल्याचे अनुभव आहेत.
तुरुंगवास भोगत असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आलेल्या कडू- गोड अनुभवांची थोडक्यात चर्चा करून आपण आपल्या चरित्र नायकास काय यातना भोगाव्या लागल्या, कसे अनुभव आले ते पाहूया…
मराठवाड्यातील समाजवादी पक्षाचे नेते सदाशिवराव पाटील यांचे ‘सदाबहार’ हे चरित्र अस्मादिकाने लिहिले असून त्यातील काही आठवणी…
नाशिक येथील तुरुंगात एका शिक्षकांस ठेवले होते. काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचे त्यांना पत्र आले. त्यात लिहिले होते, ‘घरात धान्याचा कण नाही. मुलांचे भुकेने बेहाल होताहेत. त्यांचे हाल मला पाहवत नाहीत. तिन्ही मुलांची भूक भागविण्यासाठी मी एक विचार करीत आहे, एका मुलाचे तुकडे तुकडे करून दुसऱ्या मुलाचे सरपण करून ते शिजवायचे आणि तिसऱ्या मुलास खाऊ घालायचे त्यामुळे निदान एक तरी मुल जगेल. कोणत्या मुलाला जगवायचे ते तुम्ही कळवा.’ काय वाटले असेल त्या शिक्षकास आणि असे पत्र लिहिताना त्या मातेला ?
तुरुंगात असलेल्या एका तरुणाचा विवाह ठरला. त्याने स्वतःच्या लग्नासाठी पॅरोल मागितला परंतु अधिकाऱ्यांनी नकार दिला. तो तरुण निराश झाला. तेव्हा इतर काही आंदोलकांनी वेगळीच युक्ती शोधली. त्यानुसार एका आंदोलकाला रंगीबेरंगी लुंगी नेसवून, लुंगीचा पदर डोक्यावर घेऊन नवरी बनवले. दुसऱ्या युवकाला नवरदेव बनवले. अगदी वरात काढून, थाळ्या वाजवून लग्न समारंभ पार पडला.
तुरुंगात असलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आंदोलकांची भेट घेण्यासाठी बरेच निर्बंध होते. एका आंदोलकाच्या लहान मुलीने थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एका ओळीचे पत्र लिहिले….
‘ने मजसी ने परत पितृ भेटीला, इंदिरे प्राण तळमळला !’
आंदोलक गमतीजमती करत, विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन तुरुंगवास सुसह्य करीत. मध्यंतरी सरकारने असा डाव टाकला की, आंदोलकांना सुटका हवी असेल तर त्यांनी ‘यापुढे अणीबाणीच्या विरुद्ध बोलणार नाही, लिहिणार नाही, चर्चा करणार नाही.’ असे हमीपत्र लिहून द्यावे. आंदोलकांमध्ये चलबिचल सुरू झाली. तशात एका आंदोलकाच्या कुटुंबीयांनी पत्र लिहिले,
‘आपण शासनाच्या अटी मान्य करून ते हमीपत्र लिहून देत आहात असे समजले. आम्हाला त्रास होतोय म्हणून तशी कृती करू नका. आमची काळजी करू नका. हमीपत्र देऊ नका. हेही दिवस जातील.’
अणिबाणी एक प्रमुख विरोधक जयप्रकाश नारायण यांना बिहार राज्यातील एका तुरुंगात ठेवले होते. त्यांची तुरुंगात असताना प्रकृती बिघडली. तेव्हा त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरविण्यात आली. त्यावेळी तुरुंगातील आंदोलकांनी मोठे आंदोलन केले.
अणिबाणीच्या अशा अनेक घटनांचे हृदयाला पीळ पाडणारे तर काही गमतीदार अनुभव आंदोलकांना आले आहेत. त्यातून लालकृष्ण अडवाणी हेही सुटले नाहीत. स्वतःच्या चरित्रात त्यांनी अशा आठवणी सविस्तर लिहिल्या आहेत…
जेव्हा बाणीची धरपकड सुरू झाली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या खास अंदाजात केलेली कविता…
धरे गए बंगलौर में, अडवाणी के संग;
दिन-भर थाने में रहे, हो गई हुलिया तंग;
हो गई हुलिया तंग, श्याम बाबू भन्नाए;
‘प्रातः पकड़े गए, न अब तक जेल पठाए?’
कह कैदी कविराय, पुराने मंत्री ठहरे;
हम तट पर ही रहे, मिश्र जी उतरे गहरे।
देशभरात तुरुंगवास भोगत असलेल्या लोकांना नानाविध प्रकारच्या यातना भोगाव्या लागत असल्या, कुटुंबीयांना भेटता येत नसले तरीही तुरुंगात असणारी मंडळी त्या जीवनातही आनंद शोधत असे. लालजी ज्या तुरुंगात होते तिथे एक गमतीदार घटना घडली. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी सायंकाळी तुरुंगाधिकाऱ्यांनी लालजी आणि इतरांना विचारले, “उद्या महाशिवरात्र आहे. तुरुंगातील इतर कैदी उपवास करणार आहेत. तुम्ही काय करणार ?”
यावर कुणीतरी म्हणाले, “इथले अन्नच असे असते की, आम्हाला रोजच उपवास घडतो. त्यामुळे वेगळा उपवास करण्याची गरज नाही.”
महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना उपवास होता त्यांच्यासाठी छान हलवा बनवला होता ते पाहून उपवास नाकारणारांना पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक तुरुंगाधिकाऱ्याकडे जाऊन म्हणाले, “आज आमचा उपवास आहे. चांगली नि आवश्यक ती व्यवस्था करा.”
त्यावर अधिकाऱ्याने आश्चर्याने विचारले, “महाशिवरात्र तर काल झाली आणि आज कोणता उपवास ?” तुरुंगवास भोगणाऱ्या व्यक्ती काही कमी नव्हत्या. एकजण म्हणाला, “जी शैव मंडळी आहे, त्यांचा उपवास काल होता. आम्ही वैष्णव आहोत, आम्ही आज उपवास करणार आहोत.” ते ऐकून अधिकारी तिथून हसत गेला आणि त्यांनी हलवा बनविण्याचा आदेश दिला.
कारागृहात असताना तिथल्या ग्रंथालयाचा लालजींनी खूप छान उपयोग करून घेतला. त्या वाचनालयातील भरपूर आणि उत्तमोत्तम पुस्तकांचा खजिना लालजींच्या हाती लागला. तिथल्या शांत वातावरणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या आणि उपयुक्त पुस्तकांचे वाचन केले. तुरुंगातील बरचसे कैदी कर्नाटकी होते. त्यांची भाषा कानडी होती. लालजी यांच्या मनात कानडी भाषा शिकण्याची लालसा उत्पन्न झाली. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली, काही दिवसातच ते वृत्तपत्रातील कानडी भाषेचे मथळे वाचू लागले. सहकाऱ्यांशी छोट्या छोट्या वाक्यातून संवाद साधू लागले. तुरुंगातील मैदानावर बॅडमिंटन, टेबल टेनिस इत्यादी खेळांची मजा लालजी आपल्या सहकाऱ्यांसह लुटत.
अखेर एकोणवीस महिन्यांनंतर तो क्षण आला. लालजी आणि इतर काही लोकांना तुरुंगातून सोडण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लालजी बाहेर आले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या स्वागतासाठी त्यांची पत्नी कमला आणि दोन्ही मुले हजर होती. एकीकडे हा आनंदाचा क्षण होता तर दुसरीकडे ‘मिसा’खाली तुरुंगात असलेल्या इतर जवळपास शंभर राजकैद्यांना सोडण्यात आले नव्हते ही सल लालजींना टोचत होती. त्यामुळे ते स्वतः बाहेर यायला उत्सुक नव्हते. तेव्हा कमला म्हणाल्या, “सरकारने जसं तुम्हाला सोडलंय, तसेच ते इतरांनाही निश्चितच सोडतील.”

यथावकाश सर्व राजकीय बंदी कारागृहाच्या बाहेर आले. नंतर झालेल्या निवडणुकीसाठी जनसंघ प्रमुख पक्ष असलेल्या जनता पक्षाला भरघोस यश मिळाले. २४ मार्च १९७७ रोजी मोरारजी देसाई यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. जनसंघातील अटलजी, ब्रिजलाल वर्मा आणि लालजींचाही मंत्री म्हणून शपथविधी झाला. अटलजींकडे परराष्ट्र हे महत्त्वाचे खाते आले तर वर्मा यांची उद्योग मंत्री म्हणून वर्णी लागणार लागली. मोरारजी यांनी लालजींना हव्या असणाऱ्या खात्याची विचारणा करताच लालजी तत्काळ म्हणाले, “माहिती आणि प्रसारण खाते मिळावे.” मोरारजींनी त्यामागचे कारण विचारताच लालजी म्हणाले, “अणिबाणीच्या कालखंडात कॉंग्रेस सरकारने वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर बंदी घातली आहे. अणिबाणी राजवटीनं वृत्तपत्र नियंत्रणासाठी जी कायदेशीर व प्रशासकीय यंत्रणा उभारली होती, ती पूर्णतः जमीनदोस्त करण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने नव्या सरकारला ज्या विविध आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे त्यासाठी हे खातं मला महत्त्वाचं वाटतं”
माहिती आणि प्रसारण खाते दुसऱ्या एका कारणासाठी लालजींना हवे होते ते म्हणजे ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’ ला स्वायत्तता मिळावी अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी राज्यसभेत मागणीही केली होती. अर्थातच लालजींना त्यांच्या मनासारखे खाते मिळाले. ….

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आणीबाणीच्या कालखंडाचा योग्य शब्दांत आढावा घेतला आहे.