नमस्कार मंडळी.
महाराष्ट्रासाठी गेला आठवडा किती धक्कादायक ठरला, हे आपण सर्व जाणताच, त्यामुळे त्याची इथे पुनरुक्ती नको. त्याचे पडसाद आपल्या पोर्टलवर उमटलेच म्हणा.
आपल्या पोर्टल च्या दृष्टीने विशेष म्हणजे विश्व भरारी फौंडेशन आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते, मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रजासत्ताकदिनी आणि सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आलेले सत्कार म्हणजे, आपले सर्व लेखक, कवी आणि आपण सर्व वाचक यांचे सामूहिक श्रेय होय. आपणा सर्वांचे मनापासून आभार. आपला लोभ असाच कायम असू द्या. आपल्या कल्पना,सुचना स्वागतार्हच आहे.
आता पाहू या गेल्या काही दिवसांत प्राप्त झालेल्या ठळक प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
1
प्रा. डाॅ. विजय पांढरीपांडे सरांचा ”अर्धसत्य’चे पूर्णसत्य” हा लेख नुकताच वाचनात आला. वास्तवदर्शी सत्य लपवून जेव्हा अर्धसत्य स्वरूपात जनमाणसांची दिशाभूल केली जाते, तेव्हा त्या स्थितीस ‘फसवी’ स्थिती असं म्हणण्यास हरकत नाही. साधारण हाच विषय डाॅ. पांढरीपांडे सरांच्या लेखाचा मुळ विषय असून त्यांनी अध्ययन, संशोधन व अनुभव या त्रिसूत्रीची गुंफण साधत सदर विषयावरती डोळ्यात अंजन घालणारं लेखनकार्य सिद्धीस नेलं आहे. साध्या- सरळ दाखल्यांपासून ते थेट ‘हाय प्रोफाईल’ गोष्टींचे दाखले देत त्यांनी त्यांचं हे विधान ठामपणे वाचकांसमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सत्य’ आणि ‘असत्य’ यांचं हे भन्नाट मिश्रण निश्चितंच पचायला जड असतं. माणसांचंही तसंच आहे. दोन चेहरे, दुहेरी वावर, दुटप्पीपणा. बोलणे व वागणे यांतील गोड तफावत. ते म्हणतात ना, एका नाण्याला दोन बाजू असतात. अगदी तसाच काहीसा हा प्रकार होय. अर्थात, कलियुगात ही सर्रास दृष्टीस पडणारी वृत्ती होय. यावरती उपाय म्हणजे आपली सदसद्विवेकबुद्धी – सद् (चांगलं) व असत् (वाईट) यांतील नेमका फरक जाणून घेऊन, योग्य तो निर्णय घेण्याची मानवी क्षमता, अर्थातंच Conscience जागृत ठेवणे. डाॅ. पांढरीपांडे सरांनी अतिशय उत्तम विषय लेखनासाठी निवडल्याबद्दल व तो थेट शब्दांमध्ये वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन!
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा
2
साहित्य संमेलनाबद्दल दीपाली वझे यांनी दिलेली माहिती, आशाताई यांची प्रतिक्रिया वाचनीय आहे. माझ्या जाऊबाई देखील आपली कविता वाचून आल्या आहेत तेथे.छान वाटले. बाजरीचा चिवडा आवडला.
धन्यवाद स्नेहाताई..
जाधवजींची माझी शाळा खूपच आवडली. खरेच आपल्या लहानपणीच्या शाळा आणि आताच्या शाळा किती तफावत आहे !
— स्वाती वर्तक. मुंबई.
3
माझी शाळा..
खूप छान कविता👌🏻👍🏻👏🏻
— सौ स्नेहा मुसरिफ. पुणे
4
न्यू इरा शाळेच्या आठवणी हृद्य आहेत. एका यशस्वी संपादक आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या मुलाचे बालपण डोळ्यासमोर उलगडले आणि हे सुद्धा जाणवले की लहानपणापासून धडपड्या स्वभावाचा मुलगाच आयुष्यात पुढे काही कर्तृत्व गाजवू शकतो, जिद्दीने पुढे येऊन आपले आयुष्य घडवू शकतो. भुजबळ सर, तुमचे आयुष्य प्रेरणादायक आहे आणि म्हणूनच तुम्ही लिहिलेला लेख सच्चा आहे. हार्दिक अभिनंदन 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपुर
5
अक्षय जाधव यांची उद्योगातील गती बघून कौतुक मिश्रित आश्चर्य वाटले.. छान माहिती
डॉ कदम यांची साधी गरुड झेप नाही अक्षरशः स्तिमित करणारी विशाल झेप आहे हे विशालजींनी उत्तम रित्या सादर केले आहे
आजच्या विकृत,स्वैराचार च्या काळात अशा भावना समजून घेणे खरोखर कठीण आहे ..अनुराधाताईंचा लेख अतिशय तरल आहे
जीवन एक शाळा .. मोहनजींची कविता आवडली.
शैलेशजींचे सदर मला नेहमीच आवडते. अव्यक्ताला ही रूप देणारे एक श्रेष्ठ कवी आहेत. कधी कधी वाटतं. मधे किती समर्थपणे व्यक्त झाले आहेत ते…
आज तर मला गायत्री यांची फोटोतील पोज आणि त्यांच्या चित्रातील स्त्रीचे उभे राहणे यात देखील साम्य दिसत आहे .. दोन्हीही सुंदर. रवींद्रनाथ गांधीजींना म्हणत ….. सौंदर्य शोधण्यात असते, कुरूपता ही हिंसा आहे सौंदर्य ही अहिंसा…. सत्य तेच शिव शिव तेच सुंदर.
— सौ स्वाती वर्तक. खार, मुंबई.
6
हवा एक कृष्णसखा ललितलेखनाचा उत्कृष्ट नमुना. भारतीय परिस्थितीत प्रेमानीती शिकवणारा माणूस रूपातील देव. 👍🏻
अंधारातील काजव्यांच्या प्रकाशाला जगासमोर आणण्याचे कार्य भूजबळ सर करत आहेत. न्युज स्टोरी टुडे या वेब पोर्टलद्वारे हेच कार्य भुजबळ दांपत्य सातत्यपूर्ण करत आहे, ही बाब अभिनंदनीय आहे.
मुख कर्करोगावरील कार्यशाळेचा अहवाल असलेला माहिती पूर्ण वृत्तांत वाचनीय आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा लोकोपयोगी उपक्रमांना या वेबपोर्टलवरून प्रसिद्धी देण्याचे मोठे आणि राष्ट्रविकासाला उद्युक्त करणारे समाजकार्य आहे. ते जसे वाचनीय आहे, तसेच मार्गदर्शकही आहे.🙏🏻
— प्रा डॉ सतीश शिरसाट. पुणे
7
मधुकर करी गुंजारव
मधुकर करी गुंजारव असे एक नाट्यगीत होतं. त्याची आठवण यायचं कारण, म्हणजे मधुकर घोडविॅदे सर यांचा नुकताच 73 वा वाढदिवस झाला. अतिशय साधं सरळ आयुष्य जगणाऱ्या मधुकर सरांशी माझा संबंध माझ्या ‘पसायदान’ या एकपात्री कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. पसायदान या कार्यक्रमात त्यांनी सुरुवातीला गणेश पूजन, एक भजन सरस्वती स्तवन वगैरे काही सादर केले. पसायदानाच्या निरुपणाच्या वेळी पेटीवर (संवादिनी) वाजवून पद म्हटली होती. ज्ञानराज सभागृहाच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात तो कार्यक्रम झाला. त्यावेळी मधुकर सरांचा नम्र स्वभाव मला आवडून गेला. त्याच्यानंतर पुढचा एक कार्यक्रम पसायदान विषयीचा झाला तेव्हा देखील मधुकर सरांना साथीला बोलवायची इच्छा होती पण तो कार्यक्रम पुण्याला झाला. त्यांची वागणूक अतिशय नम्रतापूर्ण असते. म्हणजे पेटीसुद्धा त्यांनी स्वतःचे हाताने उचलून आणली. इतका त्यांचा स्वभाव सरळ आहे. अहंकाराचा लवलेशही त्यांच्याकडे नाही. गाण्याचा रियाज, पूर्वीच्या जुन्या आठवणी, अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी काम केले ते क्षण, कुटुंब आठवणी, चरईत ते राहायचे त्या घराच्या आठवणी, अशा अगणित आठवणींचा खजिना त्यांच्याजवळ आहे. चित्रकला, गायन आणि वाचन या तिन्ही आवडी ते जपतात. आपले आयुष्य त्यांनी अध्यात्म जपत संतोषात व्यतीत केलं. अनेक जुनी गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांच्याशी चर्चा केली तरी त्यांची कलासक्त वृत्ती जाणवते. त्यांच्याबद्दलचा लेख न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलवर वाचला. लेख अतिशय छान आहे. न्यूज स्टोरी पोर्टल ची रचना ऐसपैस असूनही डौलदार असते. मधुकर घोडविंदे सर आणि संपादक देवेंद्र भुजबळ सर दोघांनाही शुभेच्छा.
— शुभांगी पासेबंद. ठाणे
8
ज्येष्ठ कलाकार घोडविंदे यांना आमच्या तर्फे ही शुभेच्छा. असे शांत, सुरेल, सुश्राव्य गायक … त्यांची आपण ओळख करून दिलीत धन्यवाद
डॉ वेदप्रकाश मिश्रा यांनी मुख कर्करोगाची माहिती देणे, आनंदपीठ सारखे उपक्रम, कार्यशाळा राबवणे आणि त्यांची माहिती वाचकांपर्यंत पोचविण्याचे स्तुत्य कार्य आपण करीत आहात, बरे वाटते वाचून
शॉपिझिन तर्फे अनिसा सिकंदर यांचे .. काव्यसप्तक पुस्तक प्रकाशित झाले आहे वाचून आनंद झाला.
सुदेश हिंगलासपूरकर यांची माहिती वाचून थक्क झाले, आईने सहज म्हणून दिनकर गांगल यांना सोळा वर्षाच्या मुलासाठी नोकरीचे विचारले आणि तो गुणवंत तेथेच रमला, यशाचे सोपान चढत .. अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला.. कमाल आहे… खरेच तुम्ही लिहिता तसेच त्यांनी आता आत्मचरित्र लिहावे आणि ग्रंथाली लोकांनी आणखी समजून घ्यावी हीच सदिच्छा.
डॉ संजय गोरडे यांचा लेख अक्षरशः भावविव्हल करणारा, कटू सत्य सांगणारा आणि त्यावर उपाय ही सुचविणारा वाटला ..छान आहे
कांदे पोहे मधील नवीन गुणांचे वर्णन मस्त.. हलकं फुलकं ..
मोबाईलचा अती नाद
हरवत चालला आहे संवाद !
अगदी खरे आहे.. सुरेख काव्य.
डॉ संजय गोरडे यांचा लेख अक्षरशः भावविव्हल करणारा, कटू सत्य सांगणारा आणि त्यावर उपाय ही सुचविणारा वाटला ..
छान आहे
— स्वाती वर्तक. मुंबई
9
ग्रंथाली म्हणजे सुदेश…
आवडले. अंजनीगाव सुर्जीला, अमरावतीच्या पुढे आमची दुसरी देवी आहे. जिथे सुदेश हिंगलासपुरकरांचा जन्म झाला. तुमच्या लेखात उल्लेख आहे.
— शुभांगी पासेबंद. ठाणे
10
देवेंद्रजींचे कर्तृत्व कौतुकास्पद आहे, स्फूर्तीदायक आहे. शिवाय शब्दांत गुंफणे परिणामकारक आहे.🙏🏻
— वसुंधरा घाणेकर. ठाणे
11
👌 आम्हां सर्वांना आपला अभिमान आहे. 👌🌹🙏.
— मंगेश काळे.
12
नमस्कार सर, व मॅडम 🙏
आतापर्यंत आपणांस मिळालेल्या पुरस्कार यामध्ये आणखी एक मानाचा तुरा, पुरस्कार ची घोषणा झाली आहे. वाचून खूपच आनंद झाला आहे, आपण उभयता अत्यन्त परिश्रम पूर्वक, निष्ठेने करत असलेले कामकाज हे सामाजिक रित्या मानवतेचेचे अन अप्रकाशित गुणवंत व प्रतिभावंत कर्तृत्ववान अशा ध्यास पूर्वक ध्येया पर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तींसाठी दिशादर्शक द्विप सारखेच आहे. की ज्यामुळे अजून चांगले कामकाज करण्याची ऊर्जा प्राप्त होत आहे. खूप कौतुकास्पद अन् सार्थकी काम आपण निवृत्त काळाचा सदुपयोग करत अप्रकाशित हिरे यांना प्रकाशमान करत आहात. आपणांस यापुढेही असेच मानाचे तुरे मिळत राहो, हिच सदिच्छा 🌷
आपले मनस्वी हार्दिक अभिनंदन अन् अगणित शुभेच्छा 👏
— श्री.व सौ.घोडविंदे. ठाणे
13
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻💐
खूप खूप अभिनंदन !….
न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलचे संपादक मा.श्री. देवेंद्रजी भुजबळ साहेब …
आणि…न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलच्या निर्मात्या…
आमच्या आदरणीय ताई साहेबां …मा.सौ.अलकाताई देवेंद्र भुजबळ …. आपणां उभयतांचे… खूप खूप अभिनंदन !!…
— अनिल घरत. पिरकोण
14
सन्मा श्री भुजबळ साहेब,
आपल्या संपूर्ण शासकीय सेवेच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी तसेच “न्युज स्टोरी टुडे” वेब पोर्टलच्या माध्यमातून देत असलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मा.ना. आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
— राजाराम जाधव. नवी मुंबई.
15
नमस्कार सर,
आजच्या नूजपोर्टल वरचा आपला लेख वाचला. खरंच माननीय अजितदादा हे वरकरणी फटकळ वाटत असले तरी अंतःकरणातून ते अतिशय सहृदय होते. कुणाच्याही ध्यानीमनी नसणारे त्यांचे मरण अकाली तर आहेच पण उभ्या महाराष्ट्राला चटका लावणारे ठरले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
16
डॉ हलगेजीनी लिहिल्याप्रमाणे आमचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन.मन प्रसन्न होते अशी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करून पुरस्कार प्राप्त करणारे बघून. माझ्यातर्फेही सन्माननीय श्री देवेंद्र भुजबळजी आणि सौ अलकाजी यांना आभाळभर शुभेच्छा
बागेश्रीताईंबद्दल वाचून मनस्वी आनंद झाला. त्यांना मी भेटले तर आहेच पण त्यांच्या रांगोळ्या त्या पाठवत मला तेव्हा त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व बघून मी भरवू जात असे. त्यांच्यासाठीही खूप शुभेच्छा.
कान्डीन्सकी यांचे अपवर्ड चित्र जबरदस्त. त्यावरील शैलेशजींचे विश्लेषण आणखी जबरदस्त .. मस्त आहे ही रेषांमधील काव्यात्मक भाषा .. अभिनंदन
“नाती” कविता वास्तवदर्शी आहे.
चेतन वाघ यांचा लेख माहितीपूर्ण, प्रासंगिक आहे. आवडला
ऋचा यांची खिडक्या कविता अतिशय, भावपूर्ण, तरल, नेमकी सद्य स्थिती टिपणारी आहे, सुंदर.
— स्वाती वर्तक. मुंबई
17
खरंच सुनेत्रा पवार वहिनीच्या कर्तुत्वाला माझा सलाम. अल्लाह त्यांना अशीच शक्ती देवो अशी दुआ करते. त्यांचे धाडस, त्यांच्या सहनशक्तीला तोड नाही. खरंच ती वाघाची वाघीण शोभते. ही इतिहासात नोंद होणारी गोष्ट आहे.
— अनिसा शेख. दौंड
18
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री,
सुनेत्राताई पवार,
साष्टांग नमस्कार .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण मोठ्या धैर्याने, उपमुख्यमंत्री पदाचा, पदभार स्वीकारला त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक व आभार. डोंगरा एवढे दुःख पाटी टाकून, नवऱ्याच्या स्वप्नांची वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी आपण उचललेले हे पाऊल अगदी योग्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या हिताचे आहे.
अजितदादांना यामुळे आनंदच झाला असेल, ते कुठे असतील तेथून नक्कीच तुमच्याकडे कौतुकाने पाहत असतील. सत्तेच्या या राजकारणात अनेक गिधाडे टपली आहेत, धाड घालण्यासाठी, त्यांना निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्ची हवी आहे. पण पवार कुटुंब हे केवळ जनतेच्या हितासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी राजकारणात आहे यात वाद नाही.
आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात अश्या कितीतरी महिला येसुबाई, ताराराणी, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, अश्या कितीतरी महिलांनी, नवऱ्याच्या माघारी राज्यकारभार उत्तम रीतीने संभाळून, हिंदूधर्म, संस्कृती टिकवली होती. तेच धारिष्ट्य आज तुम्ही दाखवले आहे.
आम्हाला खात्री आहे, अजितदादा सारख्या झंझावाती वादळाला संभाळणाऱ्या तुम्हीं निश्चितच उपमुख्यमंत्री पदाला न्याय द्याल, आणि जनतेच्या हिताची कामे कराल, यात तिळमात्र शंका नाही.
नियतीची हस्तलिखिते बदलून, दादांनी पाहिलेले स्वप्न, मुख्यमंत्री पदाची माळ कदाचित आपल्या गळ्यात पडेल. या साठी आमच्या साऱ्यांच्या शुभेच्छा व तुमच्या घराण्याची पुण्याई तुमच्या सदैव सोबत असेल.
तुमच्या कार्यकर्तुत्वाने हे एक दिवस नक्की शक्य होईल अशी आम्हाला आशा वाटते. शेवटी इतकंच म्हणे “आता, रडायचं नाही आता लढायचं हाय.” स्त्रीच्या जीवनात सगळ्यात दुःखाचा प्रसंग म्हणजे “तिच्या पतीने पुढे जाणे असते” असं असतानाही धैर्याने, तिला पुन्हा मागच्यांसाठी उभे राहावेचं लागते आणि ती राहते ही, तेच तुम्हाला आत्ता करायचं आहे.
माझे दु:ख माझे दुःख
तळघरात कोंडल
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबरी टांगल,
असं बहिणाबाई सांगतात.
माझ्या कवितेची एक ओळ आहे,
माझं दुःख माझं दुःख
आता कुठवरी उगाळू
चला आता (लेकरांच्या) जनतेच्या
वाटा त्या उजाळू !!
चला तर मग उठा
सारा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
त्यांना निराश करू नका!
जनतेच्या कामात स्वतःला गुंतवून घ्या महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्या. हिच खरी दादांना श्रद्धांजली होईल..
खूप साऱ्या शुभेच्छासह 💐
— लेखिका, कवयित्री : आशा दळवी, सातारा
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

‘वाचक लिहितात’ हे सदर फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लिहिणारे लिहितात पण किती मोठ्या प्रमाणात ते वाचलं जातं आणि त्यांना ते आवडतं की नाही, हे या सदरामुळे कळतं.