माहित आहे मला,
टाकीचे घाव सोसल्या शिवाय
दगडाला देवपण प्राप्त होत नाही
देवाधिकांना सुटले नाही,
तिथं आपण क्षुद्र मानव
वाल्याचा वाल्मिकी असाच झाला का ?
उंच क्षितिज गाठणं
इतकं सोपं नाही ना ?
पण तरी माझ्या शब्दांना
आज पंख लाभले
आणि माझ्या या मूक भावनांना
एक वाट सापडली अलवार
अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची
इतकं सोपं आहे का हो ?
हा माझा मार्ग एकला
परदुःख खुप शीतल असतं
म्हणतात ते खोटं नाही.
जावे त्याच्या वंशा,
तेव्हाच येते त्याची प्रचिती…
माझ्या दुःखाची मीच साक्षीदार झाले आणि…..
विरहाच्या त्या काळ रात्री
झाले मी कवयित्री….
माझ्या भावनांची झाले मी राणी..
आणि पंख मिळाले शब्दांना मला त्याचक्षणी….
शब्दातून होत गेल्या
माझ्या भावना प्रकट..
त्याच मायेच्या पंखातून,
लिहीत गेले, लिहीत गेले,
माणसे वाचत गेले,
त्याच्यातूनच घडत गेले मी
असेन मी, नसेन मी,
पण आयुष्यात माझे लिखाण,
नक्कीच सगळे वाचतील,
हा अतुट विश्वास मज गवसला
त्याच विश्वासाच्या पंखावर,
साद घालते माझ्या अंतर्मनास,
लिहिता, लिहिता, हात तिथेच थांबू दे,
तुझ्याच पंखात मला सामावू दे,
तूझ्याचं पंखात मला सामावू दे…

— रचना : वाणी वेणूमाधव केरकलमट्टी. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
