“शिवनेरी”ची जेष्ठ महिलेस उद्धट वागणुक… या शनिवारी आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या अनुषंगाने प्राप्त झालेली प्रतिक्रिया पुढे देत आहे. एस टी बाबत आपलेही काही चांगले वाईट अनुभव असल्यास आम्हाला अवश्य कळवा.सामूहिक प्रयत्नांतून एस टी अधिकारी, कर्मचारी यांच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरतील.
— संपादक
सर,
“शिवनेरी”ची जेष्ठ महिलेस उद्धट वागणुक” ही बातमी वाचली आणि माझ्या डोळ्यापुढे मला आणि माझ्या पत्नीला सामोरे जाव्या लागलेल्या जीवघेण्या अनुभवाची आठवण आली.
मागच्याच महिन्यात,२७ मार्च २०२५ रोजी आम्ही दोघेही अलिबाग येथे जाण्यासाठी ठाणे शहरातील खोपट बस डेपोतून सुटणाऱ्या ठाणे – अलिबाग या ई बस च्या वाहक – चालकाचा विदारक आणि प्रवाश्यांना शुल्लक लेखणारा अनुभव आला.
अलिबागला जाण्यासाठी मी, ई बस ची दुपारी दोन ची दोन तिकिटे आरक्षित केली होती. ट्राफिकमुळे खोपट डेपोत दोन ला पाच मिनिटे कमी असताना पोहोचलो.
वाहकाने मला फोन केला आणि विचारले,
कुठे आहात ?
मी म्हटले तुमच्या समोरच आहे. एक मिनिट लागेल जास्तीत जास्त.
रिक्षा आतच घेतो आहे.
हे ऐकताच तो वाहक म्हणाला,
“आता तुम्ही येऊ नका. आम्ही बस अर्धा मिनिट सुद्धा थांबवणार नाही.”
मी म्हटले, साहेब ठीक आहे, मी त्याच रिक्षाने पुढच्या स्टॉप ला पोहोचतो. कारण तुमची बस माझ्या रिक्षाच्या पुढेच आहे. रस्त्यात थांबवू नका.
मी ऐरोलीच्या स्टॉप येऊ का? “आता आमची बस फक्त पनवेल ला थांबेल. मध्ये कुठेच थांबणार नाही. मी बसचा पाठलाग करत होतो, बस थांबवा म्हणून हाथ दाखवत होतो. पण चालक अतिशय बेदरकारपणे बस चालवीत होता. आमच्या रिक्षाला हाथ दाखवून परत जा, मी थाबणार नाही,
असे हसत हसत इशारे करीत होता.पण मी पण निर्धार केल्याप्रमाणे रिक्षा चालकाची मदत घेऊन बस च्या मागे मागे होतोच. शेवटी रिक्षा चालक म्हणाले की,
“भाईसाब कहा तक उसके पीछे जाओगे” ? ओला कर लो.
दरम्यान माझी पत्नी मला सारखे सांगत होती की, 400 रुपयासाठी कश्याला आटापिटा करताय ? सोडून द्या पैसे.मी पण त्याचं विचारात असताना ऐरोलीच्या पुढे बस अचानक थांबली. तेथील बस स्टॉप वर काही प्रवासी बस मध्ये चढले. त्या संधीचा फायदा घेऊन मी पत्नीला बसमध्ये चढायला सांगितले. रिक्षाचे 250 रुपये बिल देऊन मी बसमध्ये चढायच्या आधीच चालकाने बस सुरु केली. बस अचानक सुरु झाल्यामुळे माझी पत्नी बस मध्ये पडता पडता वाचली. इतर प्रवाश्यानी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी चालकाने बस थांबवली. मी शांतपणे बसमध्ये चढून माझ्या सीटवर बसलो. पण बस मध्ये चढल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना त्या दोन सीटवर पनवेल नंतर इतर प्रवाशांना पैसे घेऊन बसवायचे होते. चालक आणि वाहक यांची मिलिज्युली लक्षात येत होती. पण प्रवासात वाद नको म्हणून शांत राहिलो.
इतकी मग्रुरी या चालक आणि वाहकांमध्ये येते कुठून ? याचा शोध घेण्याची गरज आहे.
सर्वत्र तेच आणि तसेच अनुभव येत आहेत. ज्या सेवेमुळे माझे कुटुंब चालते, मुलांचे शिक्षण होते, समाजात मानाने मी जगू शकतो, ती कृतज्ञता नाहीशी झाली आहे.
त्यामुळे सौ.अलका भुजबळ मॅडम यांना आलेला असंवेदनशील अनुभव अतिशय त्रासदायक आहे. अश्या वाहकाची चौकशी करून त्याला समज देण्याची गरज आहे.

— लेखन : प्रा डॉ संतोष राणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800