चालते व्हा ….
एक पुनर्जन्माची केस म्हणून उत्तरा हुद्दार यांची केस जागतिक स्तरावर अभ्यासली जाते म्हणून मला त्यांना भेटायची इच्छा होती. तसेच एक कुलकर्णी म्हणून कुटुंब होतं यांचा पत्ता मला आणि माझ्याबरोबर असलेल्या मनीष घाडगेला बराच वेळ सापडत नव्हता. डोक्याला रुमाल बांधून आम्ही कसे तरी गरम झळा चुकवत त्यांच्या घराचा पत्ता शोधत होतो. शेवटी घर सापडले आणि दरवाजा उघडला.
‘नाडी विषयाच्या संदर्भात भेटायला आलो आहे’ म्हटल्याबरोबर दरवाजा आपटून बंद करून टाकला गेला. आतून मला उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्ही चालते व्हा. मला काहीही तुमच्याशी बोलायचं नाहीये’.
माझा चेहरा पडला. मनीष थोडासा रागावला आणि त्यांनी पुन्हा बेल दाबली तर त्यांच्या मिसेस आल्या. ‘ही अशी दारात आलेल्या माणसाला परत पाठवण्याची विदर्भातली रीत नाही. आम्ही दुपारच्या वेळेला रणरणत्या उन्हातून आलोय, निदान आत बसून आम्हाला तुम्ही पाणी तरी दिलं असतं’! असे म्हटल्याचा प्रभाव पडला.
आम्हाला आत बोलावले गेले. पाणी आणले गेले. ते पिताना मी विचारले, ‘तुमचा मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये होता, तो मिसिंग आहे, परंतु अजून तो मेलेला नाहीये. नाडी भविष्यात त्याच्याबद्दल असे लिहुन आलेले होते. ते तांबरम केंद्रातील एका भाषांतरकाराने सांगून तुमचा पत्ता आणि तुमची केस आम्हाला सांगितली होती. म्हणून नक्की केस समजून घ्यायला आम्ही तुम्हाला मुद्दाम शोधत शोधत घरी आलो’.
‘आमचा मुलगा आता आम्हाला कधीच भेटणार नाही. मर्चंट नेव्हीच्या बोट कंपनीने पैसे आम्हाला दिलेले आहे. त्याच्याबरोबर असलेले आणखीनही काही मित्र तेही आता कॉम्पेन्सेशन मिळवून घरी बसलेले आहेत. आमचे नशीब फुटके. मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. त्याची मिसेस आमच्या मुलाला मिळालेले खूप मोठ्या रकमेचे पैसे तिच्या हातात पडताच आपल्या माहेरी निघून गेली आणि आता तिचा दुसऱ्याशी विवाह झाला आहे असे ऐकून आहोत. आम्हाला एक पैसा सुद्धा त्यांनी दिला नाही. तिला पैसे मिळणे योग्यच होते, परंतु तिने मोठ्या मनाने आमच्या हातात त्यातले काही पैसे दिले असते तर ती एक चांगली घटना झाली असती. सौ कुलकर्णी मनापासून बोलत होत्या.
श्री कुलकर्णी आम्ही बोलत असताना, ‘नाडी भविष्यावर विश्वास नाही असं नाही परंतु मला आलेला अनुभव तितकासा चांगला नाही, म्हणून आतल्या खोलीतून एक बाड घेऊन आले. ‘आता नक्की काय झालं ते मी तुम्हाला सांगतो असं म्हणून त्यांनी बाड उघडलं !
‘बोट कुठून कुठे चालली होती, ती चाललेली असताना काही अशा विशिष्ट घटना घडल्या किंवा वादळ आले होते नक्की काय झाले होते माहीत होत नव्हते. या दरम्यान आमचा दुसरा मुलगा जो हवाईदलात आहे त्या मुलाला आम्ही तांबरमला पाठवले होते आणि त्यांनी त्याच्या पट्टीमध्ये समजून घेतलं की तुझा मोठा भाऊ अजूनही एका बेटावर जीवंत आहे. जगाच्या दृष्टीने जरी तो मेला असला तरी तो जिवंत आहे आणि तो काही विशिष्ट काळानंतर परत येईल. तो केव्हा येईल हे आता काही सांगता येत नाही. परंतु ते भविष्य नंतर सगळं मागे पडले. कारण ऑफिशियल मार्गाने अमूक वर्ष उलटल्यावर आता यांची येण्याची शक्यता मावळली असं समजून सगळ्यांना कॉम्पेन्सेशन वगैरे जे काही पैसे मिळायला हवे ते मिळाले. त्या बोटीचं काय झालं हे अजूनही आम्हाला गुढ आहे. नंतर आमचा ग्रह झाला की नाडी भविष्य खरे येत नाही’!
सांत्वना करत मी त्यांना असं म्हटलं की तेंव्हा तुमची मानसिकता कष्टी होती. तुम्हाला एक मानसिक आधार मिळावा म्हणून महर्षींनी तुम्हाला त्या वेळेला असा दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला. तसे करताना महर्षींना दिशाभूल करणे आवश्यक होते.
श्री कुलकर्णी म्हणाले, ‘खरे आहे तुम्ही म्हणता ते’ आमची मानसिक अवस्था इतकी खराब होती की आम्ही कदाचित आत्महत्या केली असती ! अशावेळी आमचा बाळ कुठे का असेना जीवंत आहे. या कारणाने आम्ही प्रतीक्षा करत राहिलो. कालानुसार आता आम्ही सावरलो. तुम्ही असे सांगितल्यामुळे आमचा महर्षींवरचा रोष संपला. त्यांनी जे केले ते योग्य होते’.
बोलता बोलता वेळ कसा गेला कळलं नाही. आम्ही जेऊन उठलो तेंव्हा दुपारचे चार वाजून गेले होते. आमच्या तोंडावर बंद झाला होता त्या दरवाजाला पुन्हा एकदा बंद व्हायला मधे तीन चार तास गेले. आम्ही परत जाताना ते म्हणाले,’ आम्हाला नाडी भविष्य महर्षींना धन्यवाद द्यायचे होते की त्यांच्या त्या खोट्या का असेना कथनामुळे आम्हाला एक मानसिक आधार मिळाला. त्यांना धन्यवाद कसे द्यावेत हे कळत नव्हते, परंतु तुमच्या रूपाने आम्हाला आमच्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग मिळाला असे म्हणून त्यांनी महर्षींच्या वरील कृतज्ञता आमच्या समोर व्यक्त केली.
आज इतक्या वर्षांनी ही घटना आठवली. नाड़ी ग्रंथ भविष्य हे महर्षींच्या कथनातून फक्त पुढे काय होणार हे सांगणारे नाही. तर दुःखी मनाला सांत्वन करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आहे. हा संदेश ते देतात. असे अनेक लोक आवर्जून सांगतात की आज जो मी तुमच्या समोर आहे. हे वैभव, सत्ता, मानमरातब त्याचे श्रेय नाडी भविष्य कथनाच्या मार्गदर्शनाला आहे. अन्यथा मी कामातून गेलेले म्हणून समाजातून बहिष्कृत झालो होतो. असो.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800