“किंमत“
शेठ ब्रजभानूंनी स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासी बहुल क्षेत्रात एक फॅक्टरी उघडली. अविकसित क्षेत्र असल्याचे कारण सांगून सरकारकडून खूपशा सवलती पदरात पाडून घेतल्या. पंच, सरपंच, दलाल यांच्याकडून ज्यांच्या जमिनी घेतल्या होत्या, त्यांना ठेक्याचे, नोकरीचे अमीष दाखवले गेले.
विदेशातून कच्च्या माला शिवाय, तज्ञ, इंजिनियर्स मागविण्यात आले. त्यांच्यासाठी आरामदायी फ्लॅट, हेल्थ क्लब, रिक्रिएशन क्लब, स्विमिंग पूल इ. निर्माण करण्यात आले. गावातल्या लोकांसाठी प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
आता प्रश्न पुढे आला, तो ट्रान्सपोर्टचा. मोठ्या मोठ्या लोकांनी डोकी फोडली, पण स्वस्त असा रस्ता समोर आला नाही. सरपंच महोदयांनी सुचवलं, ‘गावातून फॅक्टरीपर्यंत येण्यासाठी दोन रस्ते आहेत. एका बाजूने येणारा रस्ता आहे, तो अरुंद आणि ओबड-धोबड आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दरी आहे. या खडकाळ रस्त्यावर माझी जुनाट तुटकी-फुटकी गाडी चालू शकते. दुसरा रस्ता पक्का आहे, पण लांबचा आहे. फॅक्टरीचा माल किमती आहे. त्यासाठा पक्क्या रस्त्याचाच वापर करायला हवा. गावातून येणाऱ्या मजुरांसाठी छोटा रस्ता ठीक आहे. देव न करो, मालाने भरलेली आपली एखादी गाडी दरीत पडली तर केवढं नुकसान होईल ? कशी भरपाई होणार ? या फुकटयांचं काय ? एक शिट्टी वाजवली, तर पन्नास फुकटे येतील.’
सरपंचाच्या बोलण्याप्रमाणे करायचे ठरले. तयार मालासाठी लांबचा आणि पक्का रस्ता नि मजुरांसाठी ओबड-धोबड रस्ता निर्धारित करण्यात आला. या योग्य सल्ल्यासाठी ट्रान्सपोर्टचा ठेका देखील सरपंच महोदयांना देण्यात आला.
जिल्हाधिकारी महोदयांना अशा प्रकारे माहिती कळवण्यात आली, ‘मजुरांचे हीत लक्षात घेऊन, त्यांना फॅक्टरीपर्यंत नेण्या- आणण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा ठेकादेखील गावातील एका स्थानिक व्यक्तीला देण्यात आला आहे. हे आपल्या महितीसाठी कळवत आहोत.’

— मूळ हिंदी लेखिका : उषा साहू.
— अनुवाद : उज्ज्वला केळकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मोठ्या प्रमाणावर अर्थिक प्रगती हवी असेल तर… मालदार दलाल, आणि सरकारी यंत्रणा सज्ज असते! नाव मात्र जनतेसाठी! म्हणून खपवून घेतले जाते!