एखादी व्यक्ती श्रीमंताच्या घरी जन्माला येऊनही, उच्च शिक्षित होऊनही, प्राध्यापक होऊनही केवळ हस्तिदंती मनोऱ्यातील
आयुष्य न जगता, आपण मूळ ज्या भागातून आलो आहोत, त्या भागातील आदिवासी बंधू भगिनींच्या कल्याणासाठी काम करीत असते, समाजातील गुणवान व्यक्तींना गौरवित असते, साहित्य क्षेत्रात, प्रसार माध्यमांमध्ये सतत सक्रिय असते, अशी अष्टपैलू व्यक्ती म्हणजे, प्रा डॉ सुचिता पाटील होय !
एम.ए., बी.एड., एम.फील. पी.एचडी, संगीत विशारद, वास्तूशास्ञ विशारद, मुंबई विद्यापिठाची पत्रकारितेतील पदविका अशा विविध पदव्या प्राप्त केलेल्या सुचिता यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील प्रसिद्ध उद्योजक, लेखक यांच्या घरी झाला. त्यांचे शालेय शिक्षण बोईसर येथील तारापूरच्या रा.ही.सावे विद्यालयात, महाविद्यालयीन शिक्षण पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात तर एम.फील चे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. त्यांच्या पी.एचडी च्या शोध प्रबंधाचा विषय होता “विद्रोही साहित्य”! आता अध्यापनाबरोबर त्या राजस्थान विद्यापीठात पी.एचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थांना मार्गदर्शनही करीत असतात. तसेच शिक्षक भारती संघटनेची कार्यवाह म्हणून त्या शिक्षक चळवळीत ही सक्रिय आहेत. त्यांना या वर्षी सर्वोच्च अशा डि.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
उच्च शिक्षण घेतल्यानंतर, मुळातच शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने तसेच मोठ्या बहिणीची देखील सुचिताने प्राध्यापिका व्हावे अशी इच्छा असल्याने त्या प्राध्यापक झाल्या. पण त्या केवळ वर्ग शिक्षक न राहता लोक शिक्षकही झाल्या. लेखिका, कवयित्री, सूत्र संचालक देखील झाल्या आणि म्हणून ठिकठिकाणी जाऊन व्याख्यानांद्वारे, कार्यक्रमाद्वारे जनजागृती करू लागल्या. शिवाय सर्वद ही स्वयंसेवी संस्था स्थापन करून प्रत्यक्ष समाज परिवर्तनाचं शिव धनुष्य देखील त्यांनी उचलले आहे. जणू काही वाणी, लेखणी, कृती ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्रीच आहे !
सुचिता मॅडम यांचे आजपर्यंत १४५ कथा, ६५० कविता आणि २०० हून अधिक ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे “ओज आठवांचे” आणि “स्मृती लहरी” हे कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांनी “निःशब्द भाव बोलती तव डोळे” या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.
सुचिता मॅडम यांनी आतापर्यंत २२२ माहितीपटांना आणि अनेक जाहिरातींना आवाज दिला आहे. “सोहम” चित्रपटासाठी त्यांनी डबींग केले आहे.

अक्राॕस स्टेट या यू ट्यूब वाहिनीवर त्यांनी आतापर्यंत ८०० बातमीपत्रे वाचली आहेत. अन्य काही टी.व्ही वाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे. आकाशवाणी वरही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सोमवंशी क्षञिय पाठारे समाजवृत्त पञिकेच्या, अक्राॕस स्टेट या वृत्तपञाच्या त्या सहसंपादक आहेत ; डिजिटल मिडिया पञकार परिषदेच्या कार्यवाह तर संपादक संघाच्या सरचिटणीस आहेत.
सुचिता मॅडम यांनी आतापर्यंत विविध आस्थापनांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनावर १०० व्याख्याने दिली आहेत. तर १ हजाराहून अधिक कार्यक्रमांचे सूत्र संचालन केले आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शिवरायांची कर्मभूमी आहे. अनेक शिक्षणतज्ञांनी, समाज सुधारकांनी महाराष्ट्रास संपूर्णपणे सुशिक्षित बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रचंड झेप घेणाऱ्या आपल्या देशात अजूनही गरिबी व अशिक्षितता यांनी आपला विळखा सैल केला नाही. म्हणूनच उच्च आकांक्षा व विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन सुचिता मॅडम यांनी आपल्या वाणी, लेखणी, सादरीकरणाला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये सर्वद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ब्रीद आहे…
‘दिल्या घेतल्या तेजाचे
दिव्यातील घटत्या वातीचे काही
हे एक आश्वासन सुखद
नाव त्याचे आहे सर्वद’

सर्वद फाउंडेशन महाराष्ट्रभर कार्य करीत असते. “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.” ज्या मुलांना कोणीच नाही त्यांना चांगल्या अनाथाश्रमात दाखल करून त्यांची काळजी घेणे, अनेकविध विषयांवर व्याख्याने आयोजित करणे, भाषण, निवेदन, सूत्रसंचालन व आवाजाच्या कार्यशाळा आयोजित करणे, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, तज्ञ डॉक्टरांचे मेडिकल कॅम्प, महिलांसाठी लघुउद्योग कार्यशाळा व मार्गदर्शन, आदिवासी महिलांना मधुमक्षिका पालन कार्यशाळा, गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना अधिक मदतीसाठी अशिक्षित मुलांचे सर्वेक्षण, तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांना ११ प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप, पावसाळ्यात गरीब विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप” अशा अनेकविविध उपक्रमांनी सर्वद समाजास उन्नत बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

सर्वद फाउंडेशनने गेल्या ३ वर्षांमध्ये जोरदार भरारी घेतली आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेताना एका शिक्षिकेस भेटलेल्या लहानगीस मदत करून सर्वद ने आपल्या कार्यास आरंभ केला.
आपल्या सर्व भारतीय भाषा टिकाव्यात यासाठी सर्वद प्रयत्नरत आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली आपली मायबोली मराठी टिकावी व त्यात पुन्हा नवनवोन्मेष प्रज्ञाने लिखाण होत रहावं, यासाठी सर्वद फाउंडेशन अनेक उपक्रम राबवत असते. यात मराठी साहित्यात भरघोस व विपुल लेखन करणारे कवी-लेखक आणि नव्याने लिहू लागलेले नवोदित कवी-लेखक यांच्यासाठी ‘सर्वद कवी कट्ट्या’चे आयोजन केले जाते. उत्कृष्ट लेखनासाठी राज्यस्तरीय सर्वद स्टार, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार समारंभाचे महाराष्ट्राच्या विविध भागातून आयोजन केले जाते. अनेकविध क्षेत्रात आपला ठसा समाजात उमटवणाऱ्या कलाकार, विशिष्ट्य व्यक्तींसाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन तसेच संबंध आयुष्य विशिष्ट ध्येयासाठी प्रेरित होऊन विशिष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.

आदिवासी भाषा दिनाचे आयोजन डहाणू या आदिवासी बहुल भागातील सारणी या गावात तारपा नृत्य स्पर्धा व आदिवासी कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आदिवासी भाषा दिनाचे आयोजन केले जाते. आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही शिक्षण पुरेशा प्रमाणात पोहोचले नाही. यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वद काम करीत आहे. हे कार्य हव्या त्या प्रमाणात करण्यास आर्थिक पायबंद बसतो, जागेचा अभावही आहे. अनेक समस्यांवर मात करून या विद्यार्थ्यांसाठी मोठी शैक्षणिक संस्था काढून त्यांच्यासाठी अजून मोठे कार्य करण्याचा सुचिता मॅडम यांचा मानस आहे. प्रत्येक सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान पोहोचण्याचीही सर्वद ची इच्छा आहे.
आपल्या घरातील मोठे आधारस्तंभ म्हणजे वृद्ध व्यक्ती ! त्यांच्यासाठी ‘आपले घर’ ही आगळीवेगळी संस्था सुरू करण्यासाठी, अनेक समस्यांवर तोडगा काढून ते स्वप्न साकारण्याच्या मार्गावर सर्वद प्रयत्नशील आहे.
दोघा-तिघांत सुरू झालेले कार्य आज अनेक लोकांच्या सहकार्याने झपाट्याने वाढत आहे. समाजकार्य म्हटले की अभाव, त्रुटी व उणिवा असणारच. त्यावर तोडगा काढून सर्वद फाउंडेशन प्राबल्याने मार्गक्रमण करीत आहे. प्रत्येकाच्या सहकार्याची व मार्गदर्शनाची गरज असणारच आहे.
अशा या अष्टपैलू सुचिता मॅडम, आपली प्राध्यापकाची नोकरी आणि घर संसार सांभाळून शिक्षण, संशोधन, साहित्य, समाजसेवा, प्रसार माध्यमे या द्वारे नव्या समाजाच्या निर्मितीत योगदान देत आहेत. आपण त्यांच्या या कार्यात काही सहभाग देऊ शकतो का ? याचा विचार करू या.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
डॉ पाटील यांच्या सामाजिक कार्याचा उत्तम आढावा घेतला आहे… भुजबळ सर, अभिनंदन!
डॉ पाटील यांच्या निरपेक्ष समाज कार्यावरील
खुप छान लेख
डॉ सुचिता आपण केले ले समाजकार्य खुपच बहुमुलय आहे.आपणास कोटी कोटी प्रणाम, आपल्या पुंढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
प्रा. डाॅ. सुचिता सारख्या व्यक्ती आपल्या समाजात आहेत हे खरोखरच आपले भाग्य आहे. त्यांचे कार्य पाहुन नविन पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यांच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा 🤝
प्रा. डॉ. सुचिता पाटील महोदया आजच्या युवतींचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यास अनेक शुभेच्छा 👍💐💐
भुजबळ सर आणि मॅडम,
तुम्ही खूप सुंदर शब्दात माझ्या बद्दल लिहून माझी उंची वाढवलीत!
तुम्ही दोघेही नेहमीच अनेक चांगल्या मंडळीं चा समाजाला परिचय करून देत असता. आपलं हे पोर्टल अत्यंत वाचनीय आपल्या या ख -या जिव्हाळ्या मुळे झाले आहे.
खरच तुमचे आभार मानायला शब्द नाहीत.
खूप खूप धन्यवाद सर – मॅडम 🙏🙏
सुचिता मॅडमच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा 🙏सध्या समाजाला आपल्यासारख्या व्यक्तींची खूप गरज आहे 🤝
प्रा. डॉ. सुचिता आपण जे समाजकार्य करीत आहात ते वंदनीय आहे. समाजातील नविन पिढीला तुमच्या कार्यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल.
नमस्कार!
डॉक्टर सुचिता मॅडम यांचा आणि माझा परिचय तसा अलीकडचाच म्हणायला हरकत नाही. त्यांचे साहित्य क्षेत्र आणि थोडीफार सर्वदची माहिती इतकीच माझ्याकडे त्यांच्याबद्दलची माहिती होती. परंतू आज या लेखामुळे मला त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली आणि खरोखरच मी आश्चर्यचकित झालो. एक स्त्री आपले गृहिणीचे कर्तव्य सांभाळून किती विविध क्षेत्रात काम करून आपला एक वेगळा ठसा उमटवू शकते याचे डॉ सुचिता मॅडम हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि उत्तरोत्तर त्यांच्याकडून अशीच समाजोपयोगी कार्ये घडत रहावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना!