इंग्लंडमध्ये सध्या समर ॠतू असल्याने, दिवस मोठा असतो. एका रविवारी, आम्हाला दक्षिण लंडनमधील ब्रायटन समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा योग आला. उंचच उंच इमारती, प्रशस्त रस्ते, मोकळी हवा, सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आनंदी अबालवृध्द डोळे सुखवत होते.
समुद्रकिनार्याच्या एका बाजूला आम्हाला सोडून, तो टॅक्सीचालक गेल्यावर आम्ही समुद्राचे आणि किनार्याचे ते विहंगम दृश्य पहात पहात सावकाश पुढे जात होतो. कारण सगळीकडंच माणसांची गर्दी लोटली होती.

समुद्राच्या नितळ निळ्याशार पाण्यावर मावळतीची सूर्यकिरणं पडल्याने ते सोनेरी पडून अधिकच विलोभनीय दिसत होते. किनार्यावर आणि समुद्राच्या पाण्यात शेकडो लोक पोहत होते, काहीजण पाण्यावर नुसते पडून डोळ्याने आकाशाच्या कॅनव्हासवर उमटणारे रंगाचे ढग न्याहाळत होते. किनार्यावर आकर्षक खेळांच्या स्टाॅल्समधून लहानमोठेजण खेळत होते, आकाशाला गवसणी घालणाऱ्या पाळण्यांतून जाणारे पाळणे उंच जाताना भितीने तर तेच पाळणे खाली येताना आनंदाने ओरडत होते. एकमेकांना गच्च पकडून ठेवत होते.

सध्या दिवस मोठा असल्यामुळे सायंकाळही उशीरा होते. फिरत फिरत पाहिलं. समुद्रातच एका ठिकाणी, काही तरुण स्कायबोटवरून पाण्यावर वेगवेगळ्या रितीने जलक्रीडा करत होते. किनार्यावर बसून ते त्याच्याकडं पहात असलेल्या लोकांकडं बघत अधिकच चेकाळत होते.
किनार्यावरचे काही प्रेक्षकही त्यांना ओरडून प्रोत्साहन देत होते. त्यांचे ते प्रयोग इतके चित्तथरारक वाटत होते की, मी सहज विचारलं, “इतक्या बेफान हे या समुद्रात त्या स्कायबोटने उसळतात; जर हे करताना एखाद्याचा हात सुटला किंवा बॅलन्स गेला तर ?”
“तर काय ? गेलाच वर !.”
कशासाठी हा उद्योग ? कशासाठी हे चित्तथरारक प्रकार ? आणि तेही आरडाओरड करत ?
हे निव्वळ एक थ्रील.
काही लोक प्रोत्साहन देतात; यानेच या जलबहाद्दरांना चेव चढतो आणि मग त्यांच्यापैकी काहीजण तर मृत्यूलाही आमंत्रण देतात.

यावरून आठवलं; मृत्यूला आमंत्रण आमच्या शंभूराजांनीही दिलं होतं. पण ते किनार्यावर पाॅपकाॅर्न चावत ओरडणाऱ्या प्रेक्षकांसाठी नव्हतं तर; हिंदवी स्वराज्यातील सामान्य रयतेसाठी. हे करताना, शंभूराजांना प्रोत्साहन देत होता, औरंगजेबाचा क्रूर छळ आणि त्याने अवघ्या महाराष्ट्रात पसरलेला सन्नाटा !
हळूहळू सूर्य बॅकफूटवर जात होता. सायंकाळच्या सावल्यांचा पडदा पडत गेला. हवेत थंडी पडू लागली. सुरवातीला ती कमी होती. पण जसजसा वेळ होत गेला, ती वाढत गेली. आम्हीही खाली उतरून अगदी समुद्राच्या काठावर बसायला गेलो.

मगाशी दुरून पाहिलेला समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा गळून पडला आणि काही ओंगळ सत्त्ये दिसू लागली. दुरून अतिशय स्वच्छ दिसणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि कागदाचे तुकडे पाहून मन खट्टू झालं.अनेक ठिकाणी खाऊन रिकाम्या केलेल्या खाद्यपदार्थांच्या पिशव्यांही इतस्ततः टाकून दिल्या होत्या. मोठमोठ्या आवाजात मोबाईलवरून कर्णकर्कश गाणी लावलेली होती.तरूण तरुणींचे समाजमान्य प्रेमाचे चाळे चालले होते.स्विमिंग काॅसच्युमच्या नावाखाली अर्ध्या तोकड्या कपड्यांत अनेकजण समुद्रकिनाऱ्यावर लोळत होते. काही युगुलं सिगारेटचे धूर सोडत होती. एकमेकांना मिठया मारत होती. काही आईवडील आपल्या लहान लहान मुलांना पाण्यातून खेळवत होते. मुलं कधीकधी भितीनं रडत रडत आपल्या आईवडलांना बिलगत होती. काही मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हे चित्र पाहून मनाला बरं वाटत होते.
किनार्यावरच्या एका कोपर्यात एक दाढीवाला भिकारी उघडा झोपला होता. जगलेल्या जीण्याचे रिकामेपण त्याच्या त्या कृश शरीरावर स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या एका ठिकाणी एक अर्धनग्न तरूणी पहुडली होती. तोंडाने ती काहीतरी चघळत होती. भिका-याच्या तुलनेत तिच्या अंगावरचे कपडे खूपच कमी होते. अर्धवट मिटलेल्या डोळ्यांत ती सोनेरी स्वप्नं पहात असल्याचं जाणवत होतं. संपन्नता आणि वंचितता या दोन्हींचे प्रदर्शन मी इथे पहात होतो. असा हा विरोधाभास पाहून मी खिन्न मन:स्थितीत तिथून माघारी परतलो.

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे हल्ली मुक्काम- इंग्लंड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800