Wednesday, June 18, 2025
Homeलेखआपण जागे कधी होऊ ?

आपण जागे कधी होऊ ?

कोणतीही दुर्घटना घडली की त्या नंतरच्या चर्चा लक्षपूर्वक बघा. तुमच्या लक्षात येईल की आपल्या विचाराच्या, निर्णयाच्या प्राथमिकता बदलत चालल्या आहेत. अगदी ताजे एअर इंडिया विमान अपघाताचे उदाहरण घ्या. जी ३०० माणसे मृत्युमुखी पडली त्यांच्या कुटुंबियांचे दुःख, त्यांचे म्हणजे मागे राहिलेल्याचे दु:ख, त्यांच्या चिंता यापेक्षा अपघात कसा झाला, कुणाची चूक, विमान कंपनी किती दोषी, की पायलटच दोषी, की इंधनात भेसळ, की त्यामागे आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवाई.. याच दिशेने चर्चा चालू असलेल्या दिसतात.

युद्ध चालू झाले की होणारा नर संहार, सामान्य नागरिकांचे, बालक महिलांचे होणारे हाल, त्यांच्या भविष्यातील काळोख यापेक्षा ट्रम्प चुकले की पुतिन, इस्रायल सरकारची चूक की इराणची यात आपल्याला जास्त रस असतो. एखाद्या राजकारणी व्यक्तीचा निर्घृण खून होतो तेव्हाही त्या कुटुंबाची, त्यातील निष्पाप मुलाबाळांची त्यांच्या भविष्याची चिंता करण्याऐवजी मिडियाला चिंता वाटते ती त्या मागच्या आकांची, स्थानिक आमदार, मंत्र्यांची, त्या मागे चाललेल्या घाणेरड्या राजकारणाची.. हॉस्पिटल मध्ये चुकीने म्हणा, अपघाताने म्हणा एखादा मृत्यू होतो तेव्हाचा फोकस बघा. मूळ मुद्दा, मूळ घटना, मूळ कारण राहते बाजूलाच. चर्चा भलतीकडेच भरकटत जातात. आश्चर्य म्हणजे यातील कुठलीही घटना लॉजिकल एंड पर्यंत पोहोचलेली दिसत नाही. कुठल्याही घटने मागचे खरे तथ्य, सत्य बाहेर येत नाही. तसा पाठपुरावा कुणी करताना दिसत नाही. किंबहुना झाले गेले गंगेला मिळाले असे समजून जाणीवपूर्वक सारे काही विसरण्याचा सामूहिक प्रयत्न होताना दिसतो. यात मिडिया, न्यायालय, सरकारी यंत्रणा, सामान्य जनता या सगळ्यांचा सहभाग असतो.

दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत, यांची हत्या किंवा आत्महत्या, बीड परिसरातील निर्घृण हत्या, एका न्यायाधीशाच्या घरात सापडलेल्या तथाकथित करोडोच्या जळलेल्या नोटामागचे रहस्य, एका आय ए एस उमेदवाराने केलेली यू पी एस सी ची, केंद्र सरकारची केलेली फसवणूक, पुण्याचं हॉस्पिटल प्रकरण, रशिया युक्रेन, इस्रायल, इराण, येमेन किंवा इतर अरब राष्ट्रातील युद्धे… अन् आताचा एअर इंडिया विमान अपघात.. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामागे चाललेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, मीडियाची भूमिका, न्यायालयाची दिरंगाई, सरकारची टोलवाटोलवी…
यातून नेमके काय सिद्ध होते ? कुणाला न्याय मिळतो? कुणाला न्याय मिळायला हवा? समाजाने कुणावर लक्ष केंद्रित करायला हवे ? आपला, सरकारचा, समाजाचा फोकस नेमका कुठे असावा ?
असे अनेक सामाजिक, तात्विक, नैतिक प्रश्न आहेत, ज्याकडे आपले साफ दुर्लक्ष होते आहे. आपण सारे भलतीकडेच भरकटत जातो आहोत. त्यामुळे आपल्याला समस्येच्या मुळा शी जायचे आहे की नाही ? आपल्याला लॉजिकल एंड गाठायचा आहे की नाही, ज्यांना खरी मदत हवी आहे त्यांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे की नाही अशा शंका निर्माण होतात.

एकीकडे माणसाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी तांत्रिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती केली असा आपण दावा करतो. ते खरेही आहे. अन् ही प्रगती कुण्या एका व्यक्तीने, समाजाने, एकाच राष्ट्राने केली असेही नाही. अगदी मानवी उत्क्रांतीचे टप्पे आपण नीट अभ्यासले तर हे सगळे परस्पर सहकार्याने, सामंजस्याने घडलेले आहे. रेल्वे, प्रिंटिंग, शेती, दळणवळण, संगणक क्रांती असे कुठलेही उदाहरण घ्या. त्यामागे अनेक जणांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक डोकी अनेक हात एकत्र काम करतात. अनेक समूह, अनेक राष्ट्रे एकमेकाशी सहकार्य करूनच ही औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक प्रगती करतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की एकमेकावर अवलंबून असलेली मानव जात, सहकार्याने पुढे गेलेला समाज लहान सहान कारणाने एकमेकाच्या जीवावर का उठतो ? दहशतवादी कारवाया, खून, हिंसाचार, का होतात ? युद्धे का पेटतात ? हजारो लाखो माणसे त्यांचा काहीही दोष नसताना बॉम्ब, मिसाईलस ची शिकार का होतात ? एकीकडे प्रगती साठी, नव्या संशोधनासाठी एकत्र यायचे, मिळून काम करायचे, अन् दुसरीकडे हजारो निष्पाप बायका मुलांचे जीव घ्यायचे ? या विरोधा भासा मागचे रहस्य, लॉजिक काय ? या प्रश्नावर मीडियात, समाजात चर्चा होताना दिसत नाही. याचा कुण्या विद्यापीठात संशोधनात्मक अभ्यास होताना दिसत नाही. इतके आपण निबर कातडीचे, निर्दयी, निष्क्रिय, थंड प्रवृत्तीचे कसे काय झालोत ? आपल्यावर कुणी कशाचे गारूड केले ? कुणी आपल्याला संमोहित, निष्क्रिय केले ?

कुणी काहीही म्हणो, मी माझा धर्म, माझी जात, माझे राष्ट्र, माझी जमीन हा स्वार्थी, अहंभाव सर्वाधिक प्रबळ आहे. त्यासाठीच हा संघर्ष, ही युद्धे, हा हिंसाचार, अत्त्याचार सुरु आहे. दुसरे काही कारण दिसत नाही. कुणा एकालाच शिखर गाठायचे आहे. तिथे कुणा एकाचेच साम्राज्य हवे आहे. एकाधिकार हवा आहे. मग त्यासाठी हे अल्प संख्यांक बाहुबली, सत्ताधारी, सत्तापिपासू, बहुसंख्य शिक्षित, निष्पाप, निर्दोष समाजाला आपल्या तालावर कठपुतळी सारखे नाचवताहेत. अन् आपण आपली बुद्धी गहाण ठेवून नाचतो आहोत. सहन करतो आहोत. वर उल्लेखिलेले आजूबाजूला जे काही अतर्क्य प्रकार चालले आहेत ते त्याचेच जिवंत प्रतीक आहे.
एकीकडे आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण, उत्तम जगणे हवे आहे. मग त्यासाठी या सगळ्या बाकीच्या तडजोडी करण्याची आपली म्हणजे या थंड समाजाची तयारी आहे.

युद्ध करा, हिंसाचार करा, घातपात करा, भ्रष्टाचार करा, अन्याय करा.. मला, आम्हाला काय त्याचे ? या न्यायाने दुर्लक्ष करायला, आजचे उद्या विसरून जायला, स्वतःवर जास्त परिणाम होऊ न द्यायला आता आम्ही शिकलो आहे. त्यामुळे मिडिया काय, आपले नेते, आपले सरकार काय, परराष्ट्रे काय.. कुणीही कसेही वागले, काहीही केले, आम्हाला अफूच्या गोळ्या देऊन सुन्न केले तरी आमची तक्रार नाही. आता आम्ही खोलात शिरणे, समस्येच्या मुळाशी जाऊन शोध घेणे, तर्काने, विवेकाने विचार करणे सोडून दिले आहे. आपल्या थंडगार मनोवृत्तीला कुणाशीही काहीही देणे घेणे नाही. आमच्या विचारांच्या वर्तुळाची त्रिज्या संकुचित झाली आहे. आमचा परीघ अगदीच आपल्या पुरता मर्यादित आहे. धर्म कोणताही असो. आपल्याच धर्म गुरूंनी, आपल्याच मौलिक ग्रंथात सांगितलेला सर्व धर्म समभाव, न्याय नीतीच्या संकल्पना, विवेकी गृहिते सगळेच सारे विसरत चालले आहे. नवी विसरभोळी स्वार्थी, संकुचित मनोवृत्तीची संस्कृती उदयाला येते आहे. बाकी हे तंत्रद्न्यान, ही उन्नती, हा विकास, हा सगळा मृगजळी आभास आहे. आजच्या भाषेत व्हर्च्युअल इमेजेस.. सगळा मनुष्य समाज हॅक झाला आहे.. कळत नकळत..
ही धोक्याची घंटा आहे जागे होण्यासाठी !!

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments