चपराक
नवरात्राचे दिवस होते. अष्टमी च्या दिवशी परंपरेनुसार कन्यांचं पूजन करायचं. त्यांना भोजन घालायचं. भेटवस्तू द्यायची.
लताने आपल्या मोहल्ल्यात शोधाशोध केली. तिला ६ कन्याच मिळाल्या. तिला ११ कन्यांची पूजा करायची होती. आता काय करायचं ? एवढ्यात कामवाली बाई आली. लताने तिला आपली समस्या सांगितली आणि विचारले, ‘तू तुझ्या मोहल्ल्यातून पाच मुली आणू शकशील का ? कामवालीने तिला आश्वस्त करत म्हटलं, तिच्या स्वत:च्याच दोन मुली आहेत आणि शेजारच्या तीन मुली मी आणीन.’
दुसऱ्या दिवशी कामवाली ५ मुलींना घेऊन वेळेवर आली. नीट-नेटक्या, स्वच्छ फ्रॉक, कापलेले केस, मोठ्या आकर्षक दिसत होत्या त्या. लता मनातल्या मनात खुश होऊन गेली. तिने सगळ्यांची विधीवत पूजा केली. त्यांना जेवायला वाढलं. मग छोट्या छोट्या भेटी दिल्या. आता ती त्यांना निरोप देणार, एवढ्यात तिच्या मैत्रिणीचा रमाचा फोन आला, तिलाही चार-पाच मुली कमी पडत होत्या. लताने लगेचच आपल्या कामवालीला ५ मुलींना घेऊन रमाकडे जायला संगितले. विचार केला, या गरिबांचंही भलं होईल.
रमाकडेही कन्यांचं विधीवत पूजन झालं. मग रमाने त्यांना जेवायला वाढलं. पण त्या एकमेकींकडे बघू लागल्या. कारण लताकडे त्या भरपेट जेऊन आल्या होत्या. रमाला त्यांची अडचण कळली. तिने पॉलिथानच्या पिशवीत जेवण पॅक करून त्यांना दिलं. आत जाऊन भेटवस्तू आणता आणता तिच्या कानावर बाहेरचं बोलणं ऐकू आलं. ‘मी घरी जातो आणि हे जेवण आईला देतो.’
दुसरा आवाज आला,
‘मी माझ्या ताईला देतो.
ती माझ्यावर खूप प्रेम करते.’
रमा दचकलीच. धावतच बाहेर आली आणि कामवालीला म्हणाली, ‘काय ग, मुलींच्या जागी मुलांना घेऊन आलीस. इतका मोठा धोका देताना तुला शरम वाटली नाही ? आमच्या माथी पाप मारलंस. तुलाही तितकंच पाप लागेल. लक्षात ठेव.’
कामवाली सहजपणे म्हणाली, ‘बाईसाहेब, आपल्यासारखेच लोक कन्या भ्रूण हत्या करून मुलींची संख्या कमी करताहेत. तेव्हा आपल्याला पाप लागत नाही ? वर्षातून केवळ एक दिवस आपल्याला पूजेसाठी मुलगी हवी. कुठून आणायच्या मुली ? मी केवळ मुलांना फ्रॉक घालून छोटंसं खोटं बोलले. लोक मुलींना जन्माला येण्यापूर्वीच त्यांची हत्या करतात, तरी त्यांना अपराधी वाटत नाही. आता आपणच न्याय करा. कुणाचं पाप मोठं आहे ? रमाची बोलतीच बंद झाली. कामवालीचे शब्द तिचा कानात किती तरी वेळ गुंजत राहिले. कारण तीन वर्षापूर्वी तिनेही कन्या भ्रूण हत्या केली होती.
मूळ हिंदी लेखिका : नरेंद्र कौऱ छाबडा.

— अनुवाद : उज्ज्वला केळकर. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
हृदयस्पर्शी कथा