Sunday, June 1, 2025
Homeलेखकुटुंब रंगलंय काव्यात - भाग - ७

कुटुंब रंगलंय काव्यात – भाग – ७

बिटको हायस्कूल मधील कवीगोष्टी कार्यक्रमात रसिक म्हणून सहभागी झालेल्या भारद्वाज रहाळकर यांच्या बरोबर माझा परिचय झाला. “मुद्रा” नावाच्या मुद्रणालयाचे ते मालक होते. मराठी भाषेवर विलक्षण प्रेम, वाचनाची आवड, उच्च शिक्षित रहाळकर सर नाशिकच्या “परशुराम सायखेडकर वाचनालयाचे व नाट्यगृहाचे” ट्रस्टी होते.

मी स्वतः कवी नाही, पण कविता संकलित करून त्या रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा वसा घेऊन मी कार्यक्रम करतोय या कल्पनेने भारावून गेले होते.

दुसऱ्याच दिवशी रहाळकरांनी वाचनालयाच्या सर्व ट्रस्टींची बैठक बोलावली व मला सुद्धा त्या बैठकीसाठी बोलावून घेतले…. सर्वांशी माझा परिचय करून दिला. “कुटुंब बसलंय काव्याला” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा एक प्रयोग मी अल्प मानधनात सायखेडकर नाट्यगृहात सादर करायचा…. त्या प्रयोगाला वाचनालयाच्या सर्व वाचकांना आणि नाशिक शहरातील सर्व मराठी साहित्यिकांना रहाळकरांनी निमंत्रित करायचे…. याला भरपूर वृत्तपत्र प्रसिद्धी द्यायची, असे सर्वानुमते निश्चित झाले.

ठरल्याप्रमाणे “परशुराम सायखेडकर नाट्यगृह” रसिकांनी भरले होते. त्यात नाशिकचे सर्व निमंत्रित साहित्यिक रहाळकर सरांसमवेत पुढच्या रांगेत बसले होते. रहाळकरांनी कांही साहित्यिकांबरोबर माझा परिचय करून दिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुसुमाग्रज मात्र येऊ शकले नाहीत, असे समजले.

माता सरस्वतीचे, सर्व गुरुंचे व नटराजाचे स्मरण करून….. वंदन करून मी कार्यक्रम सुरू केला. गदिमा, सूर्यकांत खांडेकर, सुधांशु, जगदीश खेबुडकर यासारख्या प्रस्थापित कवींच्या कवितांबरोबरच अपरिचित कवींच्या कविता सादर करत, आणि भावना, उत्कटता व सौंदर्य या तीन गुणांतील कविता सादर करत “उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार” म्हणजे कविता ही व्याख्या मी सहजपणे समजावून सांगितली. कवितांचे कांही प्रकार मी सादर केले. कुटुंबातील प्रत्येकासाठी एकएक कविता सादर करत… कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला.

तीन तासांचा केवळ कवितांचा कार्यक्रम अनुभवून अचंबित झालेले भारद्वाज रहाळकर कांही साहित्यिकांना बरोबर घेऊन रंगमंचावर आले. सर्वांनी माझ्या कार्यक्रमाची वाहवा केली. त्या साहित्यिकात सुप्रसिद्ध विनोदी लेखक डॉ. अ.वा.वर्टी सुद्धा होते. ते म्हणाले, “अरे बापट, तुझ्या कार्यक्रमात कुटुंबातील प्रत्येक जण रंगून जातोय… तेंव्हा कार्यक्रमाचे नाव ‘कुटुंब बसलंय काव्याला’ ऐवजी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ असे ठेवल्यास अधिक योग्य होईल. “त्यांच्या या सांगण्याला भारद्वाज रहाळकर यांनी पण दुजोरा दिला, आणि त्याच प्रयोगात कार्यक्रमाचे नामकरण “कुटुंब रंगलंय काव्यात” असे करण्यात आले.

या नावाने मी आजपर्यंत ३०३८ प्रयोग सादर केले असून आजही माझा हा एकपात्री प्रयोग मराठी रसिकांची व रंगभूमीची सेवा करतो आहे.

सायखेडकर नाट्यगृहातील या कार्यक्रमाला वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज हजर नव्हते, याची खंत मनात सलत होती. म्हणूनच एक दिवस मी अनघा थत्ते मॅडमना विचारलं, “माझी व कुसुमाग्रजांची भेट करून द्याल कां ?” माझ्या विनंती नुसार थत्ते मॅडमनी कुसुमाग्रजांना फोन केला आणि अरुणा कुलकर्णी या कवयित्री बरोबर मी त्यांच्या शालिमार चौकातील घरी पोहोचलो.

त्या दिवशी माझे नशीब जोरावरच होते, त्यामुळे तेथे आम्हाला दोन दिग्गज मराठी साहित्यिकांचे एकत्र दर्शन झाले.. कुसुमाग्रज आणि पु. ल. देशपांडे ! अरुणाने माझा परिचय करून दिला. मी, कुटुंब रंगलंय काव्यात हा माझा एकपात्री कार्यक्रम कसा सादर करतो, ते थोडक्यात सांगितले. या कुन्देन्दु तुशारहार धवला, या सरस्वती स्तोत्राची मराठीतील समश्लोकी ऐकवून माझ्या कार्यक्रमाची सुरुवात होते, असे सांगून ती समश्लोकी मी गाऊन दाखवली… आणि दोघेही माझ्यावर खूष झाले व पाठीवर शाबासकीची थाप दिली.

त्यांच्या अक्षरात कविता लिहून घेण्यासाठी माझी वही बरोबर होतीच. कुसुमाग्रजांनी ती वही ठेवून घेतली व आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो. नंतर मात्र पुलंची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. पण आठ दिवसांनी कुसुमाग्रजांच्या घरी जाऊन माझी वही घेऊन आलो.. त्यांची कविता मला त्यांच्याच अक्षरात लिहून मिळाली होती.

“आकाशपण हटता हटत नाही,
मातीपण मिटता मिटत नाही।
आकाश मातीच्या या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं, फिटता
फिटत नाही ।। ”

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम