Tuesday, June 17, 2025
Homeयशकथाकोल्हापूरची रणरागिणी

कोल्हापूरची रणरागिणी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथल्या दिव्याताई मगदूम  हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. नवऱ्याने सोडून दिलेली म्हणून तिची अवहेलना व्हायची.आज ती परित्यक्ता, कुमारी माता आणि घटस्फोटित महिलांसाठी मायेची सावली बनली आहे.

मायक्रो फायनान्स कंपनीच्या विळख्यातून गरीब महिलांची सुटका व्हावी म्हणून मायक्रो फायनान्सच्या सुलतानी धोरणाविरोधात पंचगंगा नदीमध्ये जल आंदोलन करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांच्या समस्यांना वाचा फोडणारी रणरागिणी     म्हणून आता तिची ओळख निर्माण झाली आहे. रणरागिणी क्रांती सेनाछत्रपती शासन महिला आघाडीच्या माध्यमातून ती खंबीरपणे नेतृत्व करतीये.

दिव्याताई ऊर्फ शंकुतला पवार  ही वाळवा तालुक्यातील ऐतवडे गावाची. गोरा रंग, चेहऱ्यावर तेज, करारी बाणा या गुणवैशिष्ट्यांमुळे ती सर्वांना आपली वाटते. पण तिच्या वाट्याला जे दु:ख आले,  ते ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात. ती शोषित असली तरी अन्याय सहन न करणारी आहे. ती एकटी असली तरी ती असंख्य एकल महिलांची माऊली आहे.

भय, भीती, भोग, बाईपण हे सर्व तिने सोसले आणि भोगले आहे. या भयाला न डगमगता ती स्वतः च्या पायावर उभी आहे.

दिव्याताई आपली दिव्यकहाणी सांगताना म्हणाली, “घरची परिस्थिती तशी बेताची होती. माझ्या बापाच्या पहिल्या बायकोला मुलगी झाली. परंतु त्यांना वारस म्हणून मुलगा हवा होता, त्यानंतर बरेच वर्ष तिला कोणतेच अपत्य झालं नाही म्हणून माझ्या बापानं दुसरं लग्न माझ्या आईशी केलं. आईचा संसार सुखी चालला होता. कांही दिवसानंतर माझ्या पहिल्या आईला दिवस गेले आणि तिला मुलगा झाला आणि माझ्या आईला मी व माझी बहिण अशा दोन मुली झाल्या. आणि यानंतर सुरू झाली आमच्या संघर्षाची कहाणी.

आम्हाला आमच्या बापानं शेजारीच असलेल्या जनावरांच्या गोठ्यात एक छोटीशी खोली करून वेगळं ठेवलं. त्यानंतर आमच्या बापानं कधीच आमचा विचार केला नाही, कारण त्याला वारस हवा होता तो पहिल्या बायकोमुळे मिळाला होता.

आमच्या आईला मात्र दोन्ही मुलीच होत्या. माझी आई आमच्यासाठी दिवस रात्र पडेल ते काम करून आम्हाला जगवत होती. कधी कधी आम्हाला उपाशी राहून पाणी पिऊन झोपायची वेळ येत होती, ते पाहुनसुद्धा आमच्या बापाला कधीच आमची दया आली नाही. आमचा काय दोष होता? आमची अशी अवहेलना का व्हायची?आमच्याबद्दल आमच्या बापाला इतका तिरस्कार का? कित्येक वेळा माझा बाप दारू पिऊन माझ्या आईला व आम्हा दोघी बहिणींना रस्त्यावर ओढून आणून केस धरून लोळून काठीने मारायचा, त्यावेळी सगळे लोक बघत उभे राहायचे पण सोडवायला यायची कोणाची हिम्मत व्हायची नाही. काहीं तर सहानुभूती दाखवत गाव सोडून जाण्याचा सल्ला देत असत, परंतु हे माझ्या आईला कधीच मान्य नव्हते कारण ती एक भारतीय नारी होती. तिच्यात संस्कार भरले होते. तिने मोठ्या हिंमतीने अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला जगवायचे आणि एकटीनेच संसार करायचा अशी जिद्द बांधली होती.

पण शेवटी माणूसच ना? सततच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून ती हतबल होऊन आम्हा दोघी बहिणींना घेऊन गावाबाहेरील शेतातल्या विहिरीवर आत्महत्या करण्यासाठी गेली, त्यावेळी आम्ही दोघी बहिणींनी हंबरडा फोडून असे न करण्याची केविलवाणी विनवणी करत होतो, ते ऐकून शेजारील लोकांनी तिकडे धाव घेऊन आमच्या आईची समजूत काढून आम्हाला घरी पाठवून दिले. ती घटना मी आजही विसरू शकत नाही. कारण नको त्या वयात मी अनन्य अत्याचार सोसले आहेत. असे अनेक अन्याय अत्याचार सहन करत आमच्या जगण्याची धडपड सुरू होती.

शेजारीच असलेल्या शिवराज शाळेत मी शिक्षण घेत होते. सगळ्यांकडे चांगले कपडे, पुस्तके असायची पण मला मात्र मिळत नव्हते आणि मी ही कधी अपेक्षा केली नाही, कारण माझी परिस्थिती मला माहित होती. मैत्रिणीचे जुने पुस्तक घेऊन मी कसे बसे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

मी शाळेत कधीच मुली सारखी वागले नाही. नेहमी पोरासारखी डेअरिंग करत होते, तसा मी शाळेत वचक ठेवला होता, सर्वजण मला वाघीणच म्हणत. आजही कुठल्या मैत्रिणीचा फोन आला तर त्या शाळेतील आठवणी सांगतात आणि म्हणतात आजही तू तशीच वाघिणीप्रमाणेच आहेस.

दहावीनंतर आमच्या आईची काळजी वाढली होती, पोरी मोठ्या होत आहेत, कोण लक्ष्य देणार? कांही बरं वाईट घडू नये म्हणून सतत तिला चिंता वाटू लागली. म्हणून तिने माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे हुंडा देने शक्य नाही, मग असलं स्थळ मिळायचं कोठून? ही चिंता आईला खात होती.

मी नेहमी शाळा शिकण्याचा आग्रह आईजवळ केला पण माझं काही चाललं नाही. माझी शाळा शिकायची इच्छा अपूर्ण राहिली याची खंत आहे. शाळा नीट शिकता आली नाही, अशातच एक स्थळ चालून आलं. त्यांना हुंडा नको होता, मग काय आईनं कोणताही पुढचा मागचा विचार न करता माझं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि न्हानं आलं तवा आईने घाईघाईने लगीन लावून दिलं. तवा मी १५ वर्षाची असेन, २००२ साल असावं. माहेरात जे सुख मिळालं नाही ते नवऱ्याच्या घरात मिळेल या आशेवर सासर जवळ केलं.

पाणावलेल्या डोळ्यांनी माहेर सोडलं, पण पुढे निसर्गाने काय वाढून ठेवलंय काय माहीत होतं. कसा बसा माझा नवा संसार सुरू झाला. कांही दिवस गेले, नव्याचे नऊ दिवस संपले. माझा नवरा काहीच काम करत नव्हता. घरची १० गुंठे शेती होती. सासूने फर्मान सोडले दोघांना बसून किती दिवस घालायचे? असे टोमणे सुरू झाले. मी याबाबत नवऱ्याला सांगितले तर मी काम करणार नाही असं नवऱ्याने स्पष्ट केलं. म्हणून सासूने आम्हाला अवघ्या महिनाभरातच वेगळे ठेवलं. जी सुखी संसाराची स्वप्ने बघून मी या घरात आले होते त्या स्वप्नांचा एक महिन्यातच चुराडा झाला होता.

आता काय करायचं, आलिया भोगासी म्हणून मी नव्या उमेदीने संसार थाटायचा म्हणून कामाला लागले आणि कधीच शेतात काम न केलेली मी आज हिरवा चुडा घेऊन शेतात काम करू लागले. प्रपंचासाठी अहोरात्र कष्ट सुरू झाले. अजून माझी किती सत्त्व परीक्षा होणार होती माहीत नाही. शेतात काम करून हाताला फोड येत होते. मी रात्रभर रडायचे तरीसुद्धा माझ्या नवऱ्याला दया यायची नाही. त्यातच नवऱ्याला दारूचे व्यसन होते हे कळलं, मग तर माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी हताश झाले पण धीर सोडला नाही. माझ्याजवळ सहन करण्याशिवाय पर्याय न्हवता आणि माझ्या आईला पुन्हा दुःख देणं, हे मला पटत न्हवते म्हणून अशा नवऱ्याबरोबर चांगला संसार करूनच दाखवायचा निर्णय घेतला. आणि निमूटपणे सहन करून पडेल ते काम करून प्रपंच सावरण्याचा खूप प्रयत्न केला.

दिवसामागून दिवस गेले पण संसाराची घडी नीट बसेना कारण मी एकटीच राबत होते. फाटक्या संसाराला ठिगळं लावण्याचं खूप प्रयत्न केला. नवऱ्याला समजावून सांगण्याचा पण प्रयन्त केला पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मी हतबल होऊन पुढे कसं होणार या चिंतेत रडत बसायची. आणि एके दिवशी नको तो प्रसंग माझ्यासमोर उभा ठाकला तो प्रसंग मी सांगू शकत नाही कारण तो खूप भयंकर होता. आता मात्र मला इथे राहणे धोक्याचे वाटू लागले आणि मला रडू कोसळले, काय करावे काय नाही मला कळत नव्हते. पण मनाशी ठाम निर्णय घेतला, असलं जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर जगायचं आणि त्याच डोळ्यांच्या धारांनी मला माहेरी परतावं लागलं. सुखाचा संसार होईल असं वाटलं होतं. कशाच काय? माझं नशीबचं फुटकं. नवी नवरी म्हणून सासरी आली तवा ना नवऱ्याकडून, ना सासू सासऱ्याकडून चांगली वागणूक मिळाली.

सर्व सोसत, दु:खाला हसतमुखाने कवटाळत राहिले. तीन-चार महिन्याचे गरोदर होते, तेव्हा नवऱ्यानं मला सोडून दिलं. आयुष्यात काहीही भोगायचं शिल्लक ठेवलं नाही ते भोग माझ्या वाट्याला आलं होतं.

आता जायचं कुठं? आईबापाचं अस्सं.. शेवटी मी घरी आले एकदाची. लहान मुलासारखी रडत बसायची. जवळ पैसे नव्हते. कधी कधी जीव देऊन मरुन जावं असं वाटायचं. पोटात गोळा वाढत होता. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. जीवन एकलकोडं होऊन गेलं होतं. मी अगदी ठरवून टाकले होते. जे काय संकट आहे ते आनंदाने स्विकारायचं.

आयुष्याच्या एका टप्प्यावर चांगली माणसं भेटत गेली, आणि ठरवलं आता जगायचं तर आपल्या बाळासाठी ! तेवढाच विरंगुळा. जीव जगण्यासाठी धडपडत होता, ओढ घेत होता. त्यावेळी ‘सोडलेली बाई’ म्हणून आयाबायाकडून मला हिणकस वागणूक मिळायची. पुरूषांच्या नजरा वाईट असायच्या. न डगमगता, सहन करत पुढे जात राहिले.’

एके दिवशी म्हणजेच सण २००३ मध्ये अमन नागरी विकास’ संस्थेच्या माध्यमातून मला मार्ग भेटला. ही एन. जी. ओ. संस्था महिलांच्या सर्वांगीण विकासाचे काम करीत होती. मलाही आता तेच करायचे होते. मग मी या संस्थेचे प्रमुख श्री ए. ए. सनदी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना माझी सगळी हकीकत सांगून संस्थेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनीही होकार देऊन माझे मनोबल वाढविले. म्हणून मी या संस्थेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि मी बचत गटाचे काम करू लागले. सूर गवसला. पैशाची बचत होत गेली. विस्कटलेली घडी सावरू लागली. आणि इथेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

१३००  बचतगटांची स्थापना

महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण होते, हे दिव्याने अल्पावधीतच हेरले.

दिव्या म्हणाली, “बचत गटामुळं असंख्य महिला भेटल्या. माझ्यासारख्या समाजात अनेक महिला दिसल्या. या वाटेत अनेकजणी ओळखीच्या झाल्या. त्या माझ्याकडे येत. आपलं दु:ख सांगत. तिथून मी उठले. तिचे प्रश्न, वेदना समाजासमोर मांडू लागले. आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करू लागले. १३०० बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण केलं . आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच ते सहा लाख महिला बचतगटाशी जोडल्या गेल्या आहेत. बचतगटांचा संपूर्ण व्यवहार पारदर्शी असतो”.

जिव्हाळा’ने दिला जगण्याचा आधार

कोल्हापूर जिल्ह्यातील पीडित, शोषित, निराधार, घटस्फोटित महिलांना जगण्याचा आधार मिळावा म्हणून दिव्या मगदूम हिने २०१८ साली खोतवाडी येथे जिव्हाळा आश्रमाची स्थापना केली. या माध्यमातून सुमारे तीस महिलांचे पालन केले. वयोवृद्ध महिला, अपंग महिलांच्या आरोग्याचा प्रश्न, स्वतःच्या खर्चातून सोडवण्याचे कार्य तिने केले. शिवाय आश्रमातील महिला स्वावलंबी बनाव्यात यासाठी लघुउद्योग सुरु केला. बचतगटाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था केली.”

आश्रम चालवणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी पुरेसा पैसा आणि शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. मला कोणाचेही मदत मिळाली नाही. आश्रम चालवण्या इतपत माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे मला आश्रम बंद करावा लागला. पण आश्रमातील सर्व महिलांना योग्य ठिकाणी स्थलांतरित केले. या महिलांशी माझं जिव्हाळाशी नातं निर्माण झालं होतं पण परिस्थिती अभावी त्याचं पालन करू शकले नाही” अशी खंत दिव्याने व्यक्त केली.

२२ विवाहितांचा सुखाचा संसार उभा

दिव्या हिचं काम केवळ बचतगटापुरते मर्यादित नाही तर ती महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा पुकारते, संघर्ष करते, न्याय मिळवून देते.
दिव्या म्हणते, माझ्या आयुष्यात जे घडलं ते इतरांच्या आयुष्यात घडू नये याकरिता २०१८ मध्ये महाराष्ट्रातील अत्याचार पीडित महिलांचा मेळावा आयोजित केला त्या मध्ये जवळ जवळ १५ जिल्हातील पीडित महिलांनी सहभाग नोंदविला होता “पीडित महिलांना” न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढले, जनजागृती केली. महिलांना आत्मबल देण्यासाठी रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना  केली.

या माध्यमातून एकाच वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २२ विवाहित महिलांचा सुखाचा संसार उभा केला. माझ्याकडं असंख्य महिला येत असतात, आपली गऱ्हाणी सांगतात. अशिक्षित, अल्पशिक्षित, गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या वाट्याला अनेक दु:खे येतात. त्यांना ना समाजाचे सहकार्य मिळते ना शासनाची मदत. या महिलांची घुसमट ओळखून मी रस्त्यावर उतरते आणि त्यांनाच रणरागिणी म्हणून अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याची हिम्मत देते आहे.

दिव्याचे काम आज १३ जिल्ह्यात पसरले आहे. पिडीत, परित्यक्ता, घटस्फोटित आदी महिलांसाठी लढणारी रणरागिणी बनली आहे.

मायक्रो फायनान्स विरोधात लढा

कोल्हापूर जिल्ह्याला २०१९ साली महापूरचा मोठा फटका बसला. या संकटामुळं सर्वसामान्याचे जगणे मुश्कील झाले असताना मायक्रो फायनान्स या कंपन्याकडून महिलांवर अनन्य अत्याचार होत होते, जिल्ह्यातील बचत गटातील महिलांकडून बेकायदेशीर सक्तीचे कर्जाची वसुली केली जात होती. कंपनीच्या सुलतानी कारभाराच्या विरोधात दिव्याने लढा उभारला आणि तो राज्यभर गाजला.

याबाबत सांगताना ती म्हणाली, “माझा हा लढा केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हता, तर संपूर्ण राज्यात मायक्रो फायनान्स कंपनीकडून बचतगटांना नियमबाह्य कर्ज देऊन सक्तीची वसुली सुरू केली होती. गोरगरीब महिला माझ्याकडे येत. त्यांच्या डोळ्यांत अश्रू वाहत असत. एकीकडे निसर्गाने दगा दिला होता तर दुसरीकडे फायनान्स कंपनी सूड उगवत होती. त्यामुळं मी या विरोधात आंदोलन केले. माझ्या महिला कार्यकर्तीनी पंचगंगेत उडी मारली. पण इतर कार्यकर्त्यांच्या सजगतेने त्या वाचल्या. पालकमंत्री ते मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. शेवटी जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करून कंपनीची चौकशी सुरू केली. यातून बचतगटातील महिलांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे” आणि जो पर्यंत न्याय मिळणार नाही आणि महिला कर्जमुक्त होणार नाही तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे.

छत्रपती शासन महिला आघाडी

दिव्या हिच्या कामाचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसा तिचा लोकसंग्रह वाढू लागला. दांडगा जनसंपर्क लक्षात घेऊन, अनेक राजकीय पक्षांनी तिला पक्षात स्थान देण्याचे आमिष दाखवून, तिचा मतांसाठी वापर करून घेतला. खुर्चीचा हव्यास, घाणेरड्या राजकारणाला कंटाळून तिने २०२० साली छत्रपती शासन महिला आघाडीची स्थापना केली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात १६८ शाखांत, आघाडीचे काम सुरू आहे. जवळपास अडीच लाख महिला दिव्याच्या कामाशी जोडल्या गेल्या आहेत.

छत्रपती शासन महिला बँक

ग्रामीण महिला, शोषित, पीडित, घटस्फोटित, एकल महिलांना अधिकाधिक बचतीची सवय लागावी, बँकेचे व्यवहार कळावे आणि त्यातून स्वावलंबी बनव्यात यासाठी दिव्या मगदूम हिने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, १३ एप्रिल २०२१ रोजी बचत गटातील कर्जदार महिलांना एकत्रित करून छत्रपती शासन महिला विकास क्रेडिट सोसायटी  ची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिला कर्जात अडकल्या होत्या त्याच महिलांनी, दिव्याताईची प्रेरणा घेऊन उभी केली छत्रपती शासन महिला विकास को ऑप क्रेडिट सोसायटी.

दिव्या सांगते, “बचत गट व छत्रपती शासन महिला विकास आघाडीच्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध करुन देणं एवढेच माझं उद्दिष्ट नसून, त्यांना स्वावलंबनाकडं, आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी एक परस्परसंबंधी यंत्रणा विकसित करण्याचा माझा उद्देश आहे”

कोरोनाच्या संकटामुळे गोरगरीब कुटुंबाचे व वंचित समाजबांधवांचे हाल होऊ नयेत, म्हणून छत्रपती शासन महिला आघाडीने, योग्य ती खबरदारी घेतली आहे. टाळेबंदीत सेवा बजावत असलेल्या पोलीस बांधव व अन्य घटकांना भोजन पुरवण्यात येत आहे, असे दिव्या हिने सांगितले.

दिव्या मगदूम

विविध पुरस्कार
दिव्याताईने गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अत्याचार पीडित, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, अशा विविध महिलांचा सक्षमीकरण केल्याबद्दल
महाराष्ट्रातील विविध संघटनानी याची दखल घेऊन तिला १) डी वाय पाटील संस्थेकडून गृहिणी महोत्सवात अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कार
२) ओबीसी फौंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य यांचेकडून रणरागिणी नॅशनल अवॉर्ड
३) निसर्गराजा ग्रुप कर्नाटक यांचा रणरागिणी प्रेरणा पुरस्का
४) नाबार्डतर्फे उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान
५) भीमक्रांती सोशल फौंडेशन हरोली तर्फे सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार
६) श्रमशक्ती एकता संस्था तर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार
७) फुले शाहू आंबेडकर विचार मंच तर्फे समाजरत्न समाज जागृती पुरस्कार
८) गीता संघर्ष न्यूज तर्फे राज्यस्तरीय महिला आधार पुरस्कार
९) सकिना महिला महोत्सव तर्फे सकिना महिला रत्न पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

अभिनेत्री मनीषा कोईराला कडून पुरस्कार स्वीकारताना

कधीही आपल्या कामाविषयी प्रसिद्धी वा वाच्यता न करता कामावर निष्ठा ठेवणाऱ्या या रणरागिणीचा नुकताच, १५ मे रोजी वाढदिवस झाला. त्यानिमित्तानं तिला सलाम !

दिव्याताई, तुझे कार्य असच बहरत राहो..ही सदिच्छा

विकास पांढरे

– लेखन : विकास पांढरे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments